पुर्वावलोकन
हळूहळू तानिया अर्नवच्या, अर्नव अनुच्या व अनु अरविंद च्या विचारांत अडकू लागले आहेत. अश्या प्रकारे त्यांच्यामध्ये लव्ह ट्रॅगल निर्माण झालं आहे. अनुच्या मनात आशेची छोटीशी किरण आहे की अरविंद तिला स्वीकारेल. बघुयात कथेत पुढे काय वळण येते ते.
आता पुढे
अर्नव घरी परतला. त्याला घरून फोन आला.
"हा आई."
"जेवण वगैरे केलंस ना नीट? आणि हो तानियाशी भेट झाली का?"
"हो आई पोटभर जेवण केलं. मी काय लहान थोडीच आहे!"
"हो माझ्यासाठी लहानच आहेस."
त्याच्या आईने परत विचारलं.
"तानियाशी भेटलास ना?"
"हो आई भेटलो ना."
"कशी वाटली तानिया?"
"समजदार झाली आहे खुप. तसेच खुप पारितोषिकं पण मिळवली आहेत गायनात."
"ते ठीक आहे रे पण नेमकी कशी वाटली?"
त्याला आई नेमकं काय बोलतेय ते कळलं नाही. तसेच त्याची आई तानियाबद्दल येवढं का विचारतेय हा प्रश्न त्याच्या मनात फिरू लागला.
"हो म्हणजे चांगलीच. तू इतकं का विचारतेय तिच्याबद्दल?"
"काही नाही, असंच. बरं काळजी घे. ठेवते."
"हो ठीक आहे."
अनु घरी पोहोचली. ती लगेच तयार होऊन पुजाच्या लग्नात आली.
"काय गं अनु ईतका उशीर?"
"सॉरी पूजा थोडं काम होतं. ( थोडं थांबून ) तसं तू नेहमीच चांगली दिसतेस पण लग्नाच्या जोड्यात तर खुपच देखणी वाटतेय तू."
तिच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली.
"ह्म्म्म, राहूदे. उशिरा आल्याची अशी भरपायी करू नकोस."
ती थोडीशी रुसून बोलली.
"आता जिजू वर रुसायचं उद्यापासून, आमच्यावर नाही."
ती हसू लागली. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या.
छान मंडप सजलेला होता. पाहुण्यांनी गर्दी केलेली होती. डीजे चा आवाज कानावर पडत होता. नवरदेव मंडपाजवळ येत होता.
"अगं पूजा आवर लवकर, नवरदेव पोहोचेलच काही क्षणात."
पुजाची आई बोलली.
"हो आई झालंच."
नवरदेव येऊन पोहोचला होता. नवरी पण मंडपात आली. दोघे एकमेकांच्या आजूबाजूला उभे होते. प्रत्येक लग्नात हमखास वाजणारं गाणं सुरु झालं. हो हो बरोबर ओळखलंत, 'बहारो फुल बरसाओ मेरा........' दोघांनी त्यांची करंगळी एकमेकांत गुंतवली होती. त्यांच्यावर समोरून लहान मुली फुलांचा वर्षाव करत होत्या. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होतं.
अनु त्यांना बघतांना विचारांत हरवली. ती नवरीच्या जागी स्वतः ला बघू लागली. स्वतःला ती छान लग्नाच्या जोड्यात कल्पू लागली. तिचे डोळे चमकू लागले. तिने नवरदेवाकडे बघितलं. ती अवाक झाली. तिला त्याच्यात अरविंद दिसू लागला. तिचा चेहरा हास्याने उजळला. तिचं मन तिला सांगत होतं की अनु काळजी करू नकोस तो तुला नक्की स्वीकारेल. पण तिचं डोकं तिला सांगत होतं की नाही अनु, तू एक मोलकरीन आहेस. तुमचं जुळणं अशक्य. मन व बुद्धी दोघांच्या मतामध्ये ती भरडली जात होती. मनाचं ऐकावं की बुद्धीचं या दुविधेने ती अस्वस्थ झाली होती.
ते दोघे स्टेजवर येऊन पोहोचले. त्यांच्या मध्ये अंतरपाट धरण्यात आला. मंत्र सुरु झाले. त्यांच्या अंगावर अक्षतांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. शेवटी लग्न संपन्न झालं. जोरजोरात फटाके वाजू लागले. नंतर पंगती बसू लागल्या.
"अगं अनु चल जेवायचं नाही का?"
"हो चंदा, चल."
त्या दोघी पंगतिमध्ये बसल्या. जेवण साधंच होतं पण छान सुगंध येत होता. सर्वांना छान पानावर जेवण वाढण्यात आलं. पाणी, भात, भाजी, पोळी असे आवाज कानावर पडू लागले. तिच्या कानावर आवाज पडला.
"अनु, वरण?"
तिला तो आवाज ओळखीचा वाटला. तिने वर बघितलं. अरविंद होता. तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं. अरविंदही हसू लागला. नंतर त्यांचं जेवण आटोपलं. अनु पंगतीतून बाहेर आली. अनुला एका काकूंनी आवाज दिला. तिने वळून बघितलं. त्यांच्या अंगावर एक चिमुकली होती. ती बहुतेक झोपलेली होती.
"ताई, ही झोपली आहे हिला घरात नेऊन सोडता का?"
"हो ठीक आहे. द्या."
त्यांनी त्या मुलीला अनुच्या हातात दिलं. तिने त्या मुलीला ह्रदयाशी पकडलं व ती पुजाच्या घराकडे निघाली. सर्वजण बाहेर होते. घरात कुणीच नव्हतं. घर अगदी रिकामं होतं. ती एका रूममध्ये आली. तिने अलगद त्या चिमुकलीला झोपवलं. तेथे एक आजी पण होत्या.
"आजी इच्याकडे लक्ष द्या बरं."
"हो गं बाई. आहे मी इथंच. काळजी करू नकोस. जा तू."
ती रूममधून बाहेर निघाली व मंडपाच्या दिशेने जाऊ लागली. अचानक तिची पाऊलं थांबली. समोर कुणीतरी उभं होतं. तिने वर बघितलं, अरविंद होता. ती थोडीशी गंभीर झाली होती.
"अनु........."
तो पुढे बोललाच नाही. ती खाली बघत पायाचा अंगठा फर्शीवर घासत होती.
"उम्म?"
"कसं सांगू?"
ती हसू लागली. तोही हसू लागला. तिने तिचं हसू आवरलं.
"आपण याला आपलं सत्य सांगायला हवं. जर सत्य ऐकल्यावर याने आपल्याला स्वीकारलं तर चांगलंच आहे. नाहीतर त्याचा विचार डोक्यातून काढून टाकुत."
तो तिच्या जवळ येऊ लागला. त्याने जवळ येत तिचा हात हातात घेतला. ती तिचा हात त्याच्या हातातून काढून घेत थोडं मागे सरकली. तिने तिचं सत्य त्याला सांगायला सुरुवात केली.
"हे बघा हे नातं निर्माण होण्यापूर्वी मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते."
त्याने मान हलवली. तो ऐकण्यासाठी उत्सुक होता. ती पुढे बोलू लागली.
"मी घरकाम करणारी मुलगी आहे. मी फक्त नववी पास आहे. माझी आई पण मोलकरीण आहे. माझ्या बाबांचा अपघातात हात गेलेला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आम्ही दोघी काम करतो."
तो विचारात अडकला. त्याचे हावभाव तिला बदललेले जाणवले. त्याने तिच्याशी नजरही मिळवली नाही. ती थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. नंतर ती तेथून निघाली. तिला वाटलं तो तिला थांबवेल, त्यासाठी ती हळूहळू चालू लागली. त्याने तिला थांबवले नाही. ती वेगाने तिच्या घराकडे निघाली. तिच्या डोळ्यांत पाणी साचलं होतं. त्यामुळे तिला सगळं धुसर दिसू लागलं. तिला तिच्या गरिबीचा खुप राग येऊ लागला होता. ज्या गोष्टीची तिला भिती वाटत होती, शेवटी तेच घडलं होतं.
क्रमश.
©Akash Gadhave