पुर्वावलोकन
आतापर्यंत आपण बघितलं की तानिया पेपरमध्ये कॉपी करतांना पकडली गेली आहे. तिच्या मॅडमनी तिच्या आईला घडलेल्या प्रकाराबद्दल फोन करून सांगितलं आहे. सुरुवातीला राग आलेली तिची आई, तानिया अनाथ असल्याचं तानियाला माहित आहे हे कळल्यामुळे, आता शांत झाली आहे.
आता पुढे
तानियाला का कळलं तिच्या अनाथ असण्याबद्दल? किती वेदना झाल्या असतील ना तिला! काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची! आपल्या तोंडातून ती बाब बाहेर निघालीच कशी? भिंतीला देखील कान असतात याचं मला भान का राहिलं नाही? तानियाच्या आईचे मन विचारांनी, प्रश्नांनी तुडुंब भरले होते.
तिने जे केलं त्यात माझीही चूक होतीच ना. माझ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती अशी दबून जाऊ शकते हे मला का कळलं नाही? का मी फक्त मला काय हवं याचाच विचार केला? सतत पिल्लूवर बंधनं घातले. असं नको हसू, तसं नको वागू. तेही का? कारण कुणी मला व तानियाला नाव ठेऊ नये म्हणून? कारण माझ्यात मिसेस शिंदेंना सामोरं जायची हिम्मत नव्हती म्हणून? का मी खोटी प्रतिष्ठा मिरवत राहिले? का मला कळलं नाही की हे जग आपण कितीही चांगले असलो तरी आपल्यामध्ये चुका काढतंच? तानियाच्या आनंदापेक्षा का मला या क्षुल्लक गोष्टी जास्त महत्वाच्या वाटल्या? माझ्या दडपणामुळे, मला काही सहन करावं लागू नये म्हणून तिला कॉपी करण्याचा मार्ग अवलंबवावा लागला. काय हवं होतं तिला माझ्याकडून? फक्त थोडासा जिव्हाळा, तोही मला तिला देता आला नाही! कशी आई आहे मी? तिला मी दत्तक तर घेतलं पण तिला आपलंसं नाही करता आलं मला. त्या या सर्व वैचारिक वादळामुळे सुन्न झाल्या होत्या.
तानिया झोपेतून उठली. तिने घड्याळाकडे बघितलं. तिचा उद्या पेपर होता. बराच वेळ झाला होता. ती लगेच फ्रेश होऊन अभ्यासाला बसली. तिने एक क्षण आईकडे बघितलं. परत पुस्तकात नजर खोसली. तिच्या आईचं मन पाझरून गेलं होतं. त्या फक्त तिच्याकडे एकटक बघत राहिल्या. त्या थोड्या वेळाने बाहेर गेल्या. तानियाला आता कॉपी करण्याचा मार्ग बंद झाला होता. तिने वचन दिलं होतं की ती परत असं करणार नाही.
ती अभ्यास करत होती. तिला तिच्या खांद्यावर कुणाच्यातरी हातांचा स्पर्श जाणवला. तिने वळून बघितलं. तिची आई होती. त्या तिच्यासाठी स्वतः दुध घेऊन आल्या होत्या. त्यांनी दुधाने भरलेला ग्लास तिच्याकडे सरकावला. ती काही क्षण आईकडे बघतच राहिली. आईने दुध घेण्याचा फक्त ईशारा केला. काहीही बोलल्या नाही. तिने दोन्ही हातांनी ग्लास पकडला. ती दुध पिऊ लागली. तिने रिकामा झालेला ग्लास आईच्या हातात दिला. त्यांनी ग्लास घेतला. तिच्या डोक्यावर हात फिरवला व त्या निघून गेल्या.
त्यांना आज घरामध्ये करमत नव्हतं. काहीही करायची ईच्छा होत नव्हती. आपल्या मनाच्या अवस्थेचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. मन जर खुश असेल तर कामाचा कंटाळा येत नाही पण मन जर निराश असेल तर मात्र मजेशीर काम पण करावं वाटत नाही. त्यांच्यासोबतही तेच होत होतं. त्या घराबाहेर आल्या. त्यांच्याघरासमोर बगीच्यामध्ये मार्बलचा झोका होता. त्या तेथे येऊन बसल्या. त्यांनी दोन्ही हात गालाला लावले व त्या विचारांत मग्न झाल्या.
त्यांना त्यांचे बालपणाचे दिवस आठवले. त्यांच्या घराशेजारी एक मुलगी रहात होती. त्या दोघी एकाच वर्गात होत्या. फरक एवढा होता की ती मुलगी अभ्यासात खूपच हुशार होती व तानियाची आई तेवढी हुशार नव्हती. त्यांना सतत त्या मुलीचं गुणगान ऐकायला मिळायचं. सगळेजण तिची स्तुती करायचे. त्यांचे आईबाबा सुद्धा. त्यांना त्या मुलीचा फारच हेवा वाटायचा. आपलंही कौतुक व्हायला हवं असं त्यांना सतत वाटायचं. एके दिवशी त्यांनी ठरवलं की त्या तिच्यापेक्षा जास्त गुण मिळवणार. त्यांनी प्रयत्नही केले होते. त्याने त्यांचे गुण वाढले देखील. पण तितके कुठं वाढले होते? जे काम त्यांना जमलं नव्हतं ते काम त्या तानियाकडून होण्याची कशीकाय अपेक्षा करत होत्या? आता त्यांना कळू लागलं होतं की प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते. तसं ती वाढवता येते पण सगळ्यांना त्यात यश येत नाही. ही गोष्ट त्यांना पहिले का नाही कळली? प्रत्येकजण वर्गात पहिलं नाही येऊ शकत ना! प्रत्येकात वेगवेगळं टॅलेंट असतं. कदाचित तानियालाही एखादी गोष्ट जमत असेल. तिला त्या ईतर गोष्टी करण्यापासून अडवत राहिल्या व तिला फक्त अभ्यास करण्याची सक्ती केली तर कसं कळेल की तिला काय जमतं? तिला काय आवडतं? हे सर्व विचार त्यांना अजूनच उदास करत होते. त्यांच्यात अपराधी असण्याची (guilt) भावना निर्माण करत होते.
त्यांच्या कानांवर पडलेल्या आवाजाने त्या विचारांतून बाहेर आल्या. त्यांनी त्यांच्या गालावरील हात काढले. त्यांच्या समोर अनुची आई उभी होती.
अनुची आई म्हणाली, "चला मॅडम. जेवण तयार आहे. जेवण करून घ्या."
त्या म्हणाल्या, "हो. आलेच."
अनुची आई निघून गेली. त्या अनुच्या आईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ बघत बसल्या. त्या तेथून उठल्या व घरामध्ये आल्या. त्यांनी बघितलं तानिया डायनिंग टेबलवर बसलेली होती. स्वयंपाक वाढलेला होता. पण तिने ताटाला हात लावला नव्हता. ती आईचीच वाट बघत होती. तिच्या अश्या कृती बघून त्यांचं मन अजूनच पाझरू लागलं. त्या तिच्याजवळ येऊन बसल्या. नंतर तिने जेवायला सुरुवात केली. त्यांनीही सुरुवात केली. जेवतांना तानियाला ठसका लागला. त्यांनी झटकन पाण्याचा ग्लास उचलला व तिच्यासमोर धरला.
त्या म्हणाल्या, "अगोदर वर बघ तानिया."
ती वरती बघू लागली. त्या तिच्या पाठीवर हात फिरवू लागल्या. नंतर तिचा ठसका थांबला.
त्या म्हणाल्या, "आता पाणी पी."
त्यांनी तिला पाणी पाजलं. तिला बरं वाटू लागलं. ती मात्र काहीही बोलली नाही. जेवण झाल्यावर ती चुपचाप वरती रूममध्ये जाऊन बसली. तिची आई रूममध्ये आली. त्यांनी बघितलं ती अभ्यास करू लागली होती. त्या पण रूममध्ये येऊन बसल्या. तिचा अभ्यास चालूच होता. त्यांनी घड्याळामध्ये बघितलं, बराच वेळ झाला होता. तरीही तानियाचा अभ्यास चालूच होता.
त्या म्हणाल्या, "तानिया, चल झोप आता. खूप उशीर झाला आहे. उद्या लवकर उठावं लागेल ना. ते सगळं ठेऊन दे."
तिने घड्याळामध्ये बघितलं. बराच उशीर झाला होता. तिने सगळी पुस्तकं आवरून ठेवली. नंतर ती अंथरुणात येऊन झोपली. तिच्या आईने तिचं डोकं कुरवाळलं. त्यांनी तिला कुशीत समावून घेतलं. तानियानेही तिच्या चिमुकल्या हातांनी आईला घट्ट पकडलं. तिला खूप छान वाटू लागलं. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. त्यांनी लाईट बंद केला. त्यांना आठवलं की त्यांनाही उद्या तानियाबरोबर शाळेत जायचं होतं. तिच्या मॅडमनी बोलावलं होतं ना. त्यांच्या मनात काही क्षणासाठी काही प्रश्न आले. काय बोलावं त्यांच्याशी? काय बोलतील त्या? सगळ्यांना कळल्यावर कोणत्या नजरेने बघतील ते आपल्याकडे. त्यांनी ते सर्व प्रश्न मनातून झिडकारून लावले. कारण आता त्यांच्यासाठी ईतर लोकांच्या त्यांच्याविषयीच्या मतापेक्षा तानियाचा आनंद व तिच्यासोबत ठामपणे उभा राहणं महत्वाचं होतं. त्या ठामपणे स्वतः ला म्हणाल्या की जे होईल ते बघितलं जाईल. त्याही झोपी गेल्या. त्यांनाही सकाळी लवकर उठायचं होतं.
बऱ्याच वेळा आपण एखाद्या गोष्टीला जरा जास्तच महत्व देऊन बसतो. ईतकं की त्या गोष्टी शिवाय आपल्याला दुसरं काही दिसतच नाही. उदाहरणार्थ प्रेम. बरीच तरुणतरुणी प्रेमाला ईतकं महत्व देऊन बसतात की जर प्रेमभंग झाला तर त्यांना सगळं संपल्यासारखं वाटतं. बरेच जण आत्महत्या सुद्धा करतात. पण काही वेळानंतर जेव्हा सगळं ठीक होऊन जातं, जेव्हा त्यांच्या आयुष्यात त्यांना चांगला साथीदार मिळतो. तेव्हा त्यांना जाणवतं आपण उगाच स्वतः ला त्रास करून घेतला. मान्य आहे भावना दुखावल्यावर त्रास होतो. पण अतिमहत्व देखील देणं चुकीचंच ना! काही तरुण त्यांच्या प्रेयसीला त्रास देखील देतात. प्रेमात आंधळे होऊन जातात. हे चुकीचंच ना! तानियाच्या आईचंही हेच झालं होतं. आता त्या सावरू लागल्या होत्या.
क्रमश
#लाईन्स ऑफ द डे
का मी खोटी प्रतिष्ठा मिरवत राहिले? का मला कळलं नाही की हे जग आपण कितीही चांगले असलो तरी आपल्यामध्ये चुका काढतंच?
©Akash Gadhave