पुर्वावलोकन
अनुला पन्नास लाखाची लॉटरी लागली आहे. पण तिला याची काहीच कल्पना नाही कारण तानियाच्या आईने तिचं तिकीट स्वतः कडे ठेऊन तिला दुसरंच तिकीट दिलेलं आहे. तानियाला कळलं आहे की तिच्या आईवडिलांनी तिला दत्तक घेतलं आहे. हे दुःख तिला खूप सतावत आहे.
आता पुढे
तानियाच्या आईने लपवून ठेवलेलं ते लॉटरीचं तिकीट बाहेर काढलं. त्या चुपचाप कुणालाही खबर न लागू देता सगळे डॉक्युमेंट्स घेऊन घराबाहेर पडल्या. नंतर त्या लॉटरीच्या कार्यालयात गेल्या. तेथे त्यांनी ते तिकीट दाखवलं. सगळ्या फॉर्मॅलिटिज पूर्ण केल्या. सगळे आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट केले. नंतर पन्नास लाख रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर झाले. त्या विजयी मुद्रेने घरी परतल्या. चेहऱ्यावर आनंद होता. त्यांच्यातील चांगल्या मनाचा आवाज दबला होता. पण त्यांना वाटू लागलं आपण काही चुकीचं तर केलं नाही ना? त्यांनी त्यांच्या अंतर्मनाचा आवाज झिडकारून लावला.
तानिया अजूनही उदासच होती. तिला वाटू लागलं होतं की या जगात तिचं कुणीच नाही. एके दिवशी तिला सर्वजण सोडून देतील. बालमनात एखादी भीती रुजली की ती सहजासहजी मिटवता येत नाही. तिचं मनही दुविधेत अडकलं होतं. तिचं एक मन म्हणायचं की नाही, तिचे बाबा तिच्यावर खूप प्रेम करतात. तिची आई तिच्यावर ओरडत असली तरी तिला माहित होतं त्यांचंही तिच्यावर खूप प्रेम होतं. हे आपल्याला का सोडून जातील? पण तिचं दुसरं मन म्हणायचं की ते तिचे खरे आईबाबा नाहीत. त्यामुळे जर त्यांनी तिला सोडून दिलं तर? भीती खुळी होती, पण काय करणार बालमन होतं ते!
तानियाने बघितलं की देशपांडे सर दारात उभे होते. ती गोंधळली. आज तर सुट्टी होती ना? ते येऊन बसले. आज ते पहिले 'गुड मॉर्निंग' म्हणाले. ती पण 'गुड मॉर्निंग' म्हणाली.
ती पुढे म्हणाली,"पण सर आज तर रविवार आहे. "
सरांनी मोबाईल मध्ये बघितलं. त्यांची पत्नी व मुलं गावाकडे गेले होते. त्यामुळे त्यांना घरी कुणी आठवण करून देणारं पण नव्हतं.
ते म्हणाले, "अरे! लक्षातच नाही राहिलं. बरं आता आलोच आहे तर काहीतरी करूयात. मी तुला शिकवत नाही आज. तुला काही गोष्टी सांगतो."
तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. तिचे सर तिला श्रीकृष्णाच्या बाललिलांच्या गोष्टी सांगू लागले. तिने रामायण, महाभारत हे कधी बघितलेलं नव्हतं. त्यामुळे तिच्यासाठी या कथा नवीनच होत्या. तिला श्रीकृष्णाच्या बाललिलांचं नवल वाटू लागलं. तसंच तिला या कथा मजेशीर पण वाटू लागल्या.
ते सांगू लागले, "श्री कृष्ण व त्यांचे मित्र चोरून लोणी खायचे. त्यामुळे गोकुळातील सर्व स्त्रिया वरती छताला लोणीची हंडी लटकावून ठेवायच्या. श्री कृष्ण व त्यांचे मित्र घरात कुणी नसलं की चुपचाप घरात जायचे. ते सर्व वयाने लहान असल्याने कुणाचाही हात लोण्यापर्यंत पोहोचत नसायचा. तसंच त्या काळात स्टूल पण नसायचे."
तानियाने प्रश्न विचारला, "मंग त्यांना लोणी कसं मिळायचं?"
ते सांगू लागले, "श्री कृष्ण यांनी नंतर एक युक्ती लढवली. त्यांनी त्यांच्या सर्वांत मोठया मित्रांनी एकमेकांना पकडून उभं रहायला सांगितलं. त्यांच्यावर त्यांच्यापेक्षा लहान मित्रांना चढवलं. असं करत-करत ते छतापर्यंत पोहोचले. सर्वांत वर श्रीकृष्ण चढले व त्यांनी ती हंडी काढून घेतली."
तानियाला खूप मज्जा वाटू लागली. तिच्या डोळ्यांसमोर ते सगळं दृश्य उभं राहिलं.
ती म्हणाली, "दहीहंडी ला करतात तसंच ना?"
ते म्हणाले, "हो अगदी तसंच. मुळात त्याच्यानंतरच दहीहंडी साजरी व्हायला सुरुवात झाली होती. नंतर गोकुळातील स्त्रियांना जेव्हा कळलं तेव्हा त्या यशोदेकडे तक्रार करायला गेल्या."
तानियाने विचारलं, "यशोदा कोण? श्री कृष्ण यांची आई का?"
ते सांगू लागले, "हो. श्रीकृष्ण यांची आई. तसंतर त्यांना दोन आया होत्या."
तानिया म्हणाली, "दोन? ते कसंकाय?"
ते बोलू लागले, "देवकीने त्यांना जन्म दिला होता पण ते यशोदेकडे राहत होते."
तिला जाणवलं की तिच्यासोबत पण असंच तर झालं होतं!
तिने विचारलं, "म्हणजे त्यांची खरी आई देवकीच होती ना? त्यांना यशोदेने सोडून दिलं होतं का नंतर?"
ते बोलू लागले, "नाही तानिया, जरी देवकीने त्यांना जन्म दिलेला असला तरी त्यांचा सांभाळ तर यशोदेनं केला होता ना. जन्म देणाऱ्याबरोबरच सांभाळ करणारे आईवडील यांनाही तेवढंच महत्व असतं. श्रीकृष्ण यांच्यावर दोन्ही आईवडील प्रेम करायचे. श्रीकृष्ण सुद्धा दोघांवर प्रेम करायचे. त्यामुळे देवकी खरी व यशोदा खोटी आई असं म्हणणं चुकीचं आहे. राहिला प्रश्न सोडून देण्याचा तर आईवडील मुलांना कुठं सोडून देत असतात का? जन्म देणारे पण आणि सांभाळ करणारे पण आईवडीलच असतात."
नंतर सर कथा पूर्ण करून निघून गेले. तिच्या डोक्यात सरांनी सांगितलेले शब्द फिरत होते. तिला कळलं की ती जे समजत होती की हे तिचे खरे आईबाबा नाहीत, तो समज चुकीचा होता. हेच तिचे आईबाबा होते आणि ते तिला कधीही सोडून देणार नव्हते. ती उगाच चिंता करत होती. आता तिच्या मनावरील मोठा दगड कुणीतरी काढल्यासारखं तिला वाटू लागलं. तिची उदासी नाहीशी झाली. ती परत तिच्या पहिल्या रूपात परतली.
बऱ्याच वेळा आपल्या मनातही असे चुकीचे समज येऊन बसतात. आपण उगाच चिंता करू लागतो. उगाच आपल्याला भिती वाटायला लागते. मुळात परिस्थिती तेवढी वाईट नसते. तेव्हा गरज असते ती दृष्टीकोन बदलण्याची आणि दृष्टीकोन बदलण्यासाठी कुणातरी अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची. कारण बऱ्याच वेळा गोष्टी जेवढ्या अवघड दिसत असतात प्रत्यक्षात मात्र त्या तेवढ्या अवघड नसतात.
क्रमश
©Akash Gadhave