गोष्ट छोटी डोंगराएवढी. विषय:- दीपोत्सव उत्सव नात्याचा. दिपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव ! दिपोत्सव हा केवळ एक उत्सव नाही, तर उत्सवाचे स्नेहसंमेलन आहे. धनत्रोयादशी,नरकचतुर्दशी,दिवाळी,पाडवा(नववर्ष) आणि भाऊबीज असे पाच उत्सव, पाच विभिन्न सांस्कृतिक विचारधारा घेऊन या उत्सवात सहभागी झाले आहे जाणीवपूर्वक व समजुन जर हा उत्सव साजरा करण्यात आला तर मानवाला समग्र जीवनाचे दर्शन यातून मिळेल. धनोत्रोयादशी:- म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस. महालक्ष्मी हत्तीवर बसून वाजत गाजत आपल्या घरी येते.विपरीत मार्गाने वापरली जाते अलक्ष्मी, स्वार्थासाठी वापरले जाते ते वित्त, योग्य कामासाठी वापरली जाते ती लक्ष्मी. लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय मानली आहे. वैदिक ऋषींनी तर लक्ष्मीला उद्देशून "श्रीसुक्त" गायलेले आहे. लक्ष्मी पूजनाने घरात सुख समाधान नांदते. नरकचतुर्दशी:-या दिवशी महाकालीचे पूजन करतात.परपीडनासाठी वापरली जाते ती अशक्ती,स्वार्थासाठी वापरली जाते ती शक्ती रक्षणासाठी वापरतात ती काली व प्रभू कार्यासाठी वापरतात ती महाकाली. नरकचुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा नाश झाला.त्याच्या त्रासापासून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला म्हणून त्याला "नरक चतुर्दशी" म्हणतात. दिवाळी:- म्हणजे वह्या पूजनाचा दिवस. संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा हा दिवस.या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे.राग, वैर ,शत्रुता जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी प्रेम श्रद्धा व उत्साह टिकवला पाहिजे. पाडवा:- यालाच "बलीप्रतिपदा" म्हणतात. तेजस्वी वैदिक विचाराची उपेक्षा करुन वर्णाश्रम व्यवस्था उद्धवस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला.याचे स्मरण म्हणून "बलीप्रतिपदा" हा उत्सव साजरा होऊ लागला. बली दानशूर होता.त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात असलेले शुभत्व पाहण्याची दृष्टी देते. "तमसो मा ज्योतिर्गमय" पाडव्यादिवशी अंधकारातून प्रकाशाकडे केले जाते प्रयाण जुने वैर विसरून संपूर्ण विश्व करते एकमेकांचा सन्मान!! भाऊबीज:- तसे सगळेजण असतात प्रेमळ नात्याला घट्ट करणारे, पण काही सण असतात गोड आठवणी साठवणारे, आठवणीना हृदयाच्या कप्प्यात कसे जपावे हे तर जगात सारेच जाणतात. दिवाळी उत्सवातील अमृतासमान एक सण त्याला "भाऊबीज" म्हणतात.बहिण व भाऊ याच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते असा सुंदर उपदेश देणारा ज्ञानदीप जर ह्रदयात प्रगटला तर आपले जीवन दिपोत्सव महोत्सवासमान बनेल. दिवाळी म्हणजे "दीपोत्सव". दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे प्रत्येकाच्या ह्रदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणिवेने दिवाळीचा सण "दीपोत्सव उत्सव नात्याचा" साजरा करण्यात येतो. एक दिवा अनेक दिवे पेटवू शकतो. विजेचा दिवा एकही दिवा पेटवू शकत नाही म्हणूनच ह्या काळात दिव्याचे,त्याच्या ज्योतीचे वैशिष्ट आहे.माणसाने दिव्या पासुन ही प्रेरणा घेण्यासारखी आहे. मी प्रकाशित होईल आणि दुसऱ्यालाही प्रकाशित करीन. स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा दिवा आपल्याला देतो.