देवयानी विकास आणि किल्ली.
पात्र परिचय
विकास नायक
देवयानी नायिका
सुप्रिया देवयानीची मैत्रीण
लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर.
राजू सुप्रियाचा मित्र
शीतोळे पोलिस इंस्पेक्टर
भय्या विकासचा मोठा भाऊ.
अश्विनी विकासची वाहिनी, भैय्याची बायको
भगवानराव विकासचे बाबा
यमुना बाई विकासची आई
गोविंदराव देवयानीचे बाबा
कावेरी बाई देवयानीची आई.
मावशी आणि काका देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर
मनीषा विकासची बहिण
अंकुश मानिषाचा नवरा.
सुरेश देवयानीचा भाऊ.
विश्राम देवयानीचा चुलत भाऊ.
विनोद विकास चा चुलत भाऊ
प्रिया विकासची चुलत बहीण.
भाग 7
भाग 6 वरून पुढे वाचा ................
देवयानिनी नुसता चहाच केला नाही तर सर्वांच्या आवडती भजी पण तळली. मग काय आनंदी आनंदच. विदर्भातल्या लोकांना भजी, आलूबोंडा आणि समोसा अतिशय प्रिय. भजी खाऊन सगळ्यांच्या मधे एनर्जी आली आणि पुन्हा गप्पांचा अविरत ओघ सुरू झाला. आता देवयानी पण रुळली होती, तिच्या स्वभावाचा पण आतापर्यंत सर्वांना अंदाज आला होता त्यामुळे तिची पण धुव्वाधार मस्करी चालली होती. आणि हे सगळं देवयांनीला नवीन होतं पण फार आवडून गेलं. असच तासभर चाललं होतं.
देवयांनीच्या बाबांचा भगवान रावांना फोन आला. सगळे गप्प बसले. बाबांनी फोन घेतला.
हॅलो, बोला गोविंद राव, काय समाचार ?
आमच्या मुलीशी मी बोलत होतो आणि तिच्या तोंडून जे काही मी ऐकलं त्याने मी फार भारावून गेलो. अहो ही मुलगी एकटी तिथे आणि आमचा प्रोग्राम बारगळला त्यामुळे आम्ही सगळेच फार चिंतेत होतो. पण आता काळजी नाही. तुमचे आभार मानायला माझ्या जवळ शब्दच नाहीत.
अहो गोविंद राव आता तुमच्या मुलीची चिंता सोडा. आता ती आमची जबाबदारी आहे. देवयानीचा स्वभाव आमच्या इथे सर्वांनाच आवडला आहे. ती आमच्या घरात चटकन अगदी दुधात साखर विरघळते तशी रूळली आहे. तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण ते असू द्या. तुम्ही केंव्हा नागपूरला येणार ते सांगा.
उद्या दुपारी बाराची फ्लाइट आहे पुण्यावरून. साधारण दीड वाजेल तिथे पोचायला. घरी कसं यायचं ते सांगा. आम्हाला नागपूरची काहीच माहिती नाही म्हणून.
अहो चिंताच नको. आम्ही येउच की तुम्हाला रीसीव करायला, तिघंही येताय ना ?
हो तिघंही येतो आहे.
छान, प्रोग्राम बदलणार नाही न ?
नाही, नाही आता ती शक्यता नाही. चला ठेवतो मग. उद्या भेटुच.
बाबांच्या तोंडून सर्व ऐकल्यावर अंकुश आणि भय्या मधल्या जागेत नाचायला लागले.
देवयानी आश्चर्यानी बघतच राहिली अशी गंमत तिने आधी कधीच अनुभवली नव्हती. नाचता नाचता अंकुश नी मनीषाला आणि भैय्या ने अश्विनीला ओढलं. अंकुश विकासला म्हणाला अरे पाहातोस काय, तू पण ये, देवयांनीला पण घे ओढून. तिच्यासाठीच तर हे सगळं चाललंय. मग विकासलाही जोर चढला आणि त्यांनी देवयांनीला खेचलं. देवयानी आधी खूपच संकोचली पण मग भगवानराव म्हणाले, जा ग लाजते काय अशी ! यमुनाबाईंनी पण संमती दर्शक मान हलवली. मग मात्र तिचा सगळा संकोच गळून पडला.
दहा पंधरा मिनिटं असा काही हंगामा चालू होता की देवयानीच्या घरच्या कोणी बघितलं असतं तर त्याला वेडच लागलं असतं.
सगळे दमून भागून बसले. आता स्वयंपाक करायचं कोणातच त्राण नव्हतं. मग काय, बाहेरच जेवायला जायचा प्रोग्राम बनला.
सकाळीच देवयानीनी सुरेशला फोन केला.
हॅलो, काय रे निघालात ना ?
हो निघालो आहोत. On the way to pune. पण प्रोग्राम मध्ये थोडा बदल झाला आहे.
ए तू मला घाबरवू नकोस, काय बदल झाला आहे ? नीट मला समजेल असं सांग.
अग काही नाही, काल जरा गंमतच झाली.
अरे देवा, आता काय झालं ?
ऐक ना, घाबरतेस काय अशी, खरंच गंमत झाली. ऐक तर खरी.
ओके सांग
आधी सकाळी, आपलं जे काही बोलणं झालं होतं, ते मी कालच दुपारी विश्राम च्या कानावर घातलं होतं. आणि विश्राम नी ते काका आणि काकूंना सविस्तर सांगितलं त्यामुळे आता त्यांच्या मनात कसलीही शंका नाहीये. म्हणून आपण उद्या सकाळी निघू असं सांगायला काल संध्याकाळी काका काकू आणि विश्राम पुन्हा आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की सकाळी मावशीशी वाद विवाद करण्याची त्यांची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी सकाळी माघार घेतली होती.
एवढं झाल्यावर त्यांना नागपूर च्या प्रोग्राम बद्दल बाबांनी सांगितलं. मग काय, काका पण म्हणाले की अजून चार बूकिंग होतेय का पहा. विश्राम नी बघितलं आणि करून टाकलं सुद्धा. त्या मुळे आता आम्ही सात जण येणार आहोत.
देवयानी काय सांगते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तिने सांगितल्यावर, सगळ्यांच्याच आनंदात भर पडली. मग काय सगळेच कामाला लागले.
एकदमच धाव पळ सुरू झाली. आता मोठे पाहुणे येणार होते, घर खूप मोठं आणि चांगलं होतं, पण पसारा सुद्धा कमी नव्हता. घर कसं आरशासारखे लख्ख दिसायला हवं म्हणून एकजात सगळे कामाला लागले. आश्चर्य म्हणजे देवयानी सुद्धा त्यांच्यात सामील झाली, आणि कोणालाही त्यात काही वावगं वाटलं नाही इतकी ती त्यांच्यात सामावून गेली होती. जणू काही ती या घरचीच होती, आणि तिच्यासाठी सुद्धा तिचे आई वडील आता पाहुणेच होते. देवयानी कामात हातभार लावत होती आणि बाकीचे सर्व तिच्याकडे कौतुकाने पहातच राहिले. मध्येच तिच्या ते लक्षात आलं आणि तिला एकदम लाजलीच. तिच्या नकळतच किचन मधे पळून गेली. ती कीचन मधे आहे हे कळल्यावर सगळ्यांनी चहा, चहा असा आरडा ओरडा करायला सुरवात केली. यमुनाबाईंनीच जरा आवाज चढवून सांगितलं की आत्ताच चहा आणि नाश्ता झालेला आहे, आता कामं करा, चहा मिळणार नाही. देवयानीची चहातून सुटका झाली.
काका मंडळी येणार म्हंटल्यांवर घर छानच दिसायला पाहिजे म्हणून सगळी नेटाने कामाला लागली होती. कुठलीही कसर राहायला नको होती. जेवणाचा मेनू सुद्धा देवयांनीला विचारून ठरवण्यात आला.
दुपारी एक वाजता विकास, देवयानी आणि अंकुश तिघं एयर पोर्ट वर पोचले. अंकुश त्याची गाडी घेऊन आला होता
घरी आल्यावर भगवानरावांनी सर्वांचे स्वागत केलं. घर पाहिल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा आली. घर पाहून सगळे खुश झालेले दिसत होते. इतक्या मोठ्या घराची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. घरी दोन दोन गाड्या होत्या. ते बघून, आपली मुलगी एका सुखवस्तू घरात जातेय याचा त्यांना आनंद झाला. आल्यावर त्यांचं आंब्याचं थंड गार पन्ह देऊन त्यांचा श्रम परिहार केला. सगळे खुश. मग थोडा वेळ गप्पा टप्पा झाल्यावर जेवणाची वर्दी आली. या सगळ्या कार्यक्रमात देवयानी अगदी सराईता सारखी, अगदी घरच्या सूने सारखी वावरत होती ते बघून तर त्यांना खूपच संतोष वाटला.
देवयानीच्याच सांगण्याप्रमाणे त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला होता. वरतून खास विदर्भाची चव म्हणून पाटवडीचा रस्सा आणि भरल्या वांग्याची भाजी. केली होती.
पाहुण्यांना सगळ्याचंच अप्रूप वाटलं. हसत खेळत जेवण झाल्यावर सगळे हॉल मधे येऊन बसले. देवयानीचे काका म्हणाले की
तुमच्या घरचं हसतं खेळतं वातावरण पाहून खूप आनंद वाटला. एवढी सारी जनता
आणि कुठेही वादाचा सुर नाही हे बघून खूपच छान वाटलं. देवयानीची निवड चुकली नाही यांचा संतोष आहे.
आता काकांनीच पसंतीची पावती दिल्यावर काही प्रश्नच नव्हता. सर्वांच्याच चेहऱ्यावर पसंती दिसतच होती. सुरवातीच्या विरोधाचा लवलेशही दिसत नव्हता.
मग काका साहेब आता पुढे कसं ? भगवानरावांनी विचारले.
तुम्ही बोलायचं. आमची मुलीकडची बाजू आहे.
आम्हाला काहीच नको. देवाच्या कृपेने कसलीही ददात नाहीये. फक्त एवढीच इच्छा आहे की साखरपुडा किंवा लग्न यापैकी एक नागपूरला व्हावं. आणि तुमची तयारी असेल तर दोन्ही नागपूरलाच करू.
देवयानीची आई हळूच गोविंद रावांच्या कानाशी लागून म्हणाल्या की मावशीला पण इथे बोलवायला हवं. इथलं साम्राज्य पाहिल्यावर कदाचित तिचा पण विरोध मावळून जाईल. तुम्हाला काय वाटतं ?
तुझं म्हणणं बरोबर आहे कावेरी, पण जर तिने इथे येऊन भलतीच खुसपटं काढली तर प्रॉब्लेम होईल. आपण नागपूरला आहोत याचा विचार कर. सर्वांच्या समोर आपली शोभा व्हायला नको.
हे बघा, कावेरी बाई म्हणाल्या की
हा संबंध तर पक्काच झाला आहे काकांनी आत्ताच शिक्का मोर्तब केलं आहे. आता मावशीच्या बोलण्याने काही फरक पडणार नाहीये. ती माझी मोठी बहीण आहे आणि तिला जर यांची कल्पना दिली नाही तर आयुष्यभर ती माझ्याशी बोलणार नाही. असं म्हणून त्यांनी यमुना बाईंकडे पाहीलं. यमुना बाईंनी भगवान रावांकडे पाहिलं. आणि भगवानरावांनी गोविंद रावांकडे पाहून काय म्हणता या अर्थानी भुंवया उडवल्या. बॉल पुन्हा गोविंदरावांच्या कोर्टात.
ठीक आहे तू म्हणतेस तसं. पण तिच्याशी बोलणार कोण ? मी नक्कीच नाही.
मग देवयानीची आई सर्वांनाच उद्देशून म्हणाली की
माझी बहीण जरा आडमुठी आहे. तिचा या लग्नाला नाही पण नागपूर या शहराला विरोध आहे. नागपूर हे छोटसं खेडे वजा गाव आहे, अशी तिची आणि तिच्या नवऱ्याची पक्की धारणा आहे. मी तिला इथे बोलावून घेण्याच्या विचारात आहे. माझ्या मते ती दोघं जर इथे नागपूरला आली तर कदाचित नागपूर या गावाला असणारा तिचा विरोध मावळून जाईल. मी स्पीकर वर बोलते म्हणजे सर्वांनाच तिच्या स्वभावाची कल्पना येईल आणि ती इथे आल्यावर कसं बोलायचं यांची अडचण होणार नाही. तुम्हा लोकांचं काय मत आहे ?
एकदम बरोबर. कावेरी बाई तुमचं निदान अगदी अचूक ठरणार बघा. करा फोन. फक्त एकच करा स्पीकर वर टाकू नका. आणि तुम्ही आमच्या गेस्ट रूम मधे जाऊन बोला. म्हणजे संकोच वाटणार नाही. आणि आल्यावर सांगा डीटेल मधे.
बरय तसं करते, आणि कावेरी बाई बाजूच्या रूम मधे गेल्या.
हॅलो ताई, मी कावेरी. इतका वेळ का लावला उचलायला ? काल तीन वेळा फोन केला पण तू घेतलाच नाहीस. असं का ?
मी आत्ताही घेणारच नव्हते. पण हे म्हणाले की तिला जरूर असेल म्हणून इतक्या वेळा फोन केला. कितीही झालं तरी ती तुझी बहीण आहे. घे तो फोन, म्हणून घेतला. बोल आता काय प्रॉब्लेम आहे ?
अग, इथे तुझी मला फार जरूर आहे. खूप गोंधळ झाला आहे आणि मी अगदी एकटी पडली आहे.
अग काय झालय ते तरी सांग, मी आत्ता तुझ्या घरी येते. मग सविस्तर सांग.
अग नको आम्ही आता बेळगाव ला नाही आहोत.
मग ? नागपूरला गेलात की काय ?
हो.
कावेरी, अग त्या दिवशी तुला एवढं समजावलं तरी तुम्ही मूर्खासारखे नागपूरला गेलात ? काय म्हणायचं तुला ?
म्हणूनच तुझी मला जरूर भासते आहे. आधी मी काय सांगते ते सगळं ऐकून घे म्हणजे तुला कळेल.
आणि मग कावेरीबाईंनी सगळं सांगितलं. अगदी सविस्तर.
एवढा घोळ तुम्ही लोकांनी घातलाच आहे आणि आता मला म्हणतेस की निस्तरायला माझी मदत हवी आहे म्हणून ?
अग विकास बद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, पण नागपूर चं काय ? या खेड्या मधे आपल्या मुलीला द्यायची ? मला काही तुझ्या सारखं बोलता येत नाही. पण मी ठाम पणे सांगितलं की देवयानीची मावशी जो पर्यन्त हो म्हणत नाही, तो पर्यन्त काही पक्क करायचं नाही. तू येतेस का ? येशील ना ?
अग इतक्या तातडीने मी कशी येणार ? नागपूर काय जवळ आहे का ?
त्यांची चिंता तू करू नको. मी सुरेशला सांगून तुला विमानाची दोन तिकीट पाठवते. तो बेळगाव ते पुणे टॅक्सी ची पण व्यवस्था करेल. फक्त तू हो म्हण.
आता तू एवढा अग्रहच करते आहेस तर काढ तिकीट. आणि सांग मला. पण मी तिथे येऊन करू काय ?
मी तुला काही सांगायची काही आवश्यकता आहे का ? तुलाच इथे आल्यावर सगळी परिस्थिती समजून येईल. तिकीट काढायला सांगू का ?
सांग. आणि ठेव आता. लवकर काय ते सांग. बॅगा भराव्या लागतील. तेवढा वेळ दे.
ठीक आहे. ठेवते.
कावेरी बाई हॉल मधे आल्या आणि काय बोलणं झालं ते सविस्तर सांगितलं.
अग आई, सुरेश म्हणाला, म्हणजे तू मावशीला उलटंच सांगितलं ?
हो, त्या शिवाय ती इथे येणं शक्यच नव्हतं. तेंव्हा आता हा गड कसा जिंकायचा हे तुम्ही सगळे मिळून ठरवा. आणि सुरेश तू ताबडतोब उद्याची दोन तिकीट आणि बेळगाव ते पुणे टॅक्सी ची व्यवस्था कर.
आई, तू सगळंच काम अवघड करून टाकलंय आता जर मावशी ने खोडा घातला तर ?
असं काहीही होणार नाही. तिचा गैरसमज नागपूर या शहराबद्दल आहे, विकास बद्दल नाही. आणि नागपूर ला आल्यावर तिचा हा गैरसमज दूर होईल यांची खात्री आहे. नागपूर हे खेडं नसून मुंबई, पुण्या सारखं मोठंच शहर आहे याची खात्री पटेल. मग सगळंच ठीक होईल. काळजी करू नका.
विकास तो पर्यन्त बूकिंग बघत होता, त्यांनी बूकिंग करून टाकलं. आणि टॅक्सी पण बूक करून टाकली. आता फक्त मावशी येण्याचीच वाट होती. संध्याकाळी पाहुण्यांना जरा नागपूर फिरवून आणलं. नागपूरातले रस्ते पाहून तर सगळे चकित झाले. मग सगळे तेलंग खेडी तलावावर गेले. तिथली चौपाटी बघून तर पाहुण्यांची बोलतीच बंद झाली. बरंच खाणं पिणं झालं. सगळे खुश. घरी परतल्यावर बैठक बसली. मावशीला कस सांभाळायचं याचा प्लॅन तयार झाला. आणि मग बराच वेळ गप्पा झाल्या. जेवणं झाल्यावर पुन्हा गप्पांचा अड्डा. पाहुण्यांना हे सगळं नवीन होतं पण आवडलं. इतका मोकळे पणा त्यांनी पण कधी अनुभवला नव्हता. घर मोठं असल्याने झोपायची कसलीच अडचण झाली नाही. उद्या मावशी येणार मग काय होईल याचाच विचार सर्वांच्या मनात होता. .
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.
माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा.
https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187
धन्यवाद.