लाडका सांता

About Santa claus


लाडका सांता


देशविदेशातील सर्वांचा लाडका सांता , कसा आहेस तू ? सध्या तू खूप बिझी असशील ना ? डिसेंबर महिना आला की तुला खूप कामे असतात ना ?
डिसेंबर महिना आला की, सर्वांना वेध लागतात नाताळाचे आणि उत्सुकता असते तुझ्या भेटीची.
जगभरात नाताळ साजरा होतो. त्यामुळे सांता तुझा सर्वत्र प्रवास होत असेल ना ? इतर देशांप्रमाणे भारतातही नाताळ सण साजरा होतो.
सांता,तू ही दरवर्षी भारतात येत असतोचं. मगं कसा वाटला आमचा भारत ? आवडला ना ?
आमचा भारत म्हणजे देवादिकांची, संतमंहतांची भूमी. भारतात वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक राहतात. प्रत्येक धर्मामध्ये \"सर्वधर्मसमभाव\" सांगितला आहे. त्यामुळे भारतात सर्वलोक गुण्यागोविंदाने राहत असतात.
भारतात जन्माष्टमी, दहीहंडी, रामनवमी साजरी करताना मुलांना कृष्ण व राम कळत असतात.
दिवाळी,पोंगल, बैसाखी,ईद ख्रिसमस असे सर्व प्रकारचे सण भारतात साजरे होतात. \"विविधतेत एकता \" हेचं भारताचे वैशिष्ट्य आहे.
हे सर्व सण साजरे करताना त्या सणांचे महत्त्वही मुलांना समजत असते.
संतमंहतांची, महानपुरूषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करताना त्यांच्या कार्याची भावी पिढीला ओळख होत असते.
आता तुला हे सर्व सांगायची काय गरज ? असे तुला वाटत असेल. तू तर हे सर्व जाणत असणारचं ना !

तुला पत्र लिहीण्यास कारण की, आजच्या काळातील मुले ही खूप हुशार आणि चौकस आहेत. कधी कधी असे प्रश्न विचारतात की,त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हे ही सूचत नाही. आणि दिले तरी त्यांचे समाधान होईलच असे नाही उलट आपल्या उत्तरावर पुन्हा त्यांचे प्रश्न तयार असतात.
आता तुला सविस्तरचं सांगते,
आमच्या सोसायटीतील डिसूझा अंटीकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नाताळची तयारी सुरू आहे . तूही दरवर्षी त्यांच्याकडे येत असतो ना ? तू आमच्या सोसायटीतील लहान मुलांना भेटतो,त्यांना चॉकलेट्स, गिफ्ट्स देतो. सर्वांना आनंद देतो. लहान मुलांना सांगितले जाते की, सांता आपल्या इच्छा पूर्ण करतो. आपण चांगले वागलो की, सांताही आपल्याला तसेच चांगले गिफ्ट देतो आणि आपली इच्छा पूर्ण करतो.
माझ्या मुलीला सावीला माहिती आहे की,दरवर्षीप्रमाणे तू यावर्षीही अंटीकडे येणार आहेस. ती तुला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. आणि त्या उत्सुकतेने ती मला म्हणाली,
" आई, सांता सर्व मुलांना हसवतो, आनंद देतो.मगं
माझ्या वर्गातील माझी फ्रेंड रियाची आई देवाघरी गेली आणि तिच्या बाबांनी दुसरी आई आणली. पण ती रियाला खूप रागवत असते. त्यामुळे रिया रडत असते. तिला सांता हसवणार का गं ?
आपल्या घरी काम करणाऱ्या मावशींचा मुलगा पार्थ हा त्याच्या आईसोबत आपल्या घरी आला की, मला म्हणत असतो, "तुझे बाबा किती चांगले आहेत ,माझे बाबा तर मला व आईला खूप मारत असतात. "
आई, सांता पार्थच्या बाबांना रागवणार का गं ?

आई, आपण माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी जिथे गेलो होतो आणि त्या सर्वांना आपण भेटवस्तू दिली होती. ते सर्व मुले एकाच ठिकाणी राहत होती पण त्या सर्वांचे आईबाबा दिसत नव्हते.
आई, सांता या मुलांना आईबाबा देवून आनंद देईल का ? "
सांता, तूचं सांग या प्रश्नांची मी काय उत्तरे देवू?
तिच्या या भाबड्या पण विचार करणाऱ्या प्रश्नांना ऐकून मलाही या सर्व मुलांविषयी वाईट वाटते. लहान वयातच त्यांना किती दुःख? किती त्रास?
\"मुले म्हणजे देवाघरची फुले\"
पण ही फुले चांगली फुलण्याऐवजी,
उमलण्याऐवजी कोमेजली जात आहे.

आपली मुले आनंदात रहावी यासाठी आईवडील कष्ट घेत असतात.
पण अनेक मुलांच्या नशिबात आईवडिलांचे प्रेमच नसते तर काही ठिकाणी गरीबीमुळे आईवडील मुलांना सुख देवू शकत नाही.
गरीबी,व्यसनाधीन वडील,अनाथ, आजाराने त्रस्त अशा अनेक कारणांनी मुलांना आपल्या जीवनाचा कधी आनंदच घेता येत नाही. या सर्वांच्या आनंदासाठी सांता तू काही करू शकतोस का?

सोशल मीडियाचे दुष्परिणाम, वाढते प्रदूषण, घर असो की देश पैशासाठी,सत्तेसाठी होणारा संघर्ष,
नात्यांची,मैत्रीची बदलत जाणारी व्याख्या, आपल्याच लोकांकडून होणारी आपली फसवणूक, केला जाणारा विश्वासघात. कोरोनासारखे आजारांचे संकट, अशा अनेक समस्यांचा विचार करता जीवन जगत असताना मनात कुठेतरी असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि आपल्या मुलांचे भविष्य कसे असेल ? हा विचार मनात येऊन जातो.
सांता, प्रत्येकालाच आपले जीवन आनंदात जावे असे वाटत असते. आपल्या जीवनात आनंद येण्यासाठी आपणही इतरांच्या जीवनात आनंद दिला पाहिजे.अशी भावना प्रत्येकाच्या मनात का निर्माण होत नाही?

सांता,तुझा हसरा चेहरा व तुझी इतरांना आनंद देण्याची वृत्ती यामुळे तू सर्वांचा लाडका झालास . तू फक्त नाताळातच येतो.तू दिलेला हा आनंद वर्षभर मिळण्यासाठी तू तुझे काम प्रत्येक व्यक्तीला सांगू शकतोस ना ? आणि तुझे ते ऐकतील ही. म्हणजे फक्त लहान मुलेच नाही तर सर्वच जण आनंदाने आपले जीवन जगतील. आणि त्यामुळे तुझे कामही सोपे होऊन जाईल.
सांता, बोलता बोलता बरंच काही लिहिले गेले ना ! तुला माझ्याप्रमाणे इतरांचीही मदत करायची असेल ना ? म्हणून मी माझे पत्र येथेच संपवते. तुझ्या प्रत्यक्ष भेटीच्या अपेक्षेत.


तुझी फॅन असलेल्या छोट्या सावीची आई.


सकाळी झोपेतून उठल्यानंतर सावीची आई, सायली हिला कळाले की, संध्याकाळी डिसूझा अंटीकडे नाताळची तयारी पाहून आल्यानंतर सावीने तिला सांताविषयी विचारले आणि आपल्या मनातील प्रश्न सांताला सांगणार असल्याचे सांगितले. सावीचे हे बोलणे ऐकून सायली रात्री त्याच विचारात झोपली आणि तिनेचं स्वप्नात सांताला पत्र लिहिले.
पण तिच्या मनात एक विचार नक्कीच येऊन गेला, खरचं सांताने जर प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद दिला तर ..कोणीच दुःखी राहणार नाही. आणि सावीला असे प्रश्नही पडणार नाहीत.


समाप्त

नलिनी बहाळकर