दैव देते कर्म नेते
" अगं रिया,माझ्या मावशीची म्हणजे तुझ्या सासूबाईंची तब्येत ठीक नाही. तुला त्यांच्याकडे शहरात जावं लागेल."राघव रियाला म्हणाला.
"आताच तर पंधरा दिवसापूर्वी जाऊन आले मी."
अगं रिया आपलं ठरलं होतं नां, तुला दर पंधरा दिवसातून, महिन्यातून असंच जाणं येणं करावं लागेल. तिला तेवढेच बरं वाटेल. राघव रियाला समजावत म्हणाला.
"कसली बला लागली माझ्या पाठीमागे कोणास ठाऊक."राघवला ऐकू जाणार नाही अशा आवाजात रिया फणफणत म्हणाली.
आणि ठिक आहे म्हणत तिथून निघून गेली.
मंदाताई आणि मालती ताई दोघीही सख्ख्या बहिणी आणि सख्ख्या जावा. मनोहरराव व माधवराव दोघे भाऊ. मनोहररावांच्या पत्नीचे नाव मंदाताई आणि माधवराव यांच्या पत्नीचे नाव मालती ताई.
मनोहरराव व मंदाताई खेड्यावर राहायचे. वडिलोपार्जित जी काही थोडीफार शेती होती ती शेती मनोहरराव पाहत. माधवराव चांगल्या पोस्टवर होते त्यामुळे ते पती-पत्नी शहरात नोकरीच्या ठिकाणी राहायचे. आपल्या मिळकतीतून त्यांनी बरीच मोठी शेती आणि शहरात घर सुद्धा विकत घेतले होते.
अलीकडे माधवराव सेवानिवृत्त झाले होते पण तरीही मालतीताईंच्या तब्येतीमुळे त्यांनी शहरातच राहण्याचा निर्णय घेतला. मालतीताईंना किडनीचा आजार होता. त्यांना मुलबाळ नसल्यामुळे राघवला त्यांनी मुलाप्रमाणेच प्रेम दिले. राघववर दोघांचाही खूप जीव होता. राघव दोन्ही कुटुंबाचा एकमेव वारस होता.
एक वर्षापूर्वीच राघवचे लग्न झाले होते. रिया सून म्हणून घरात आली. मनोहररावांनी रिया च्या आई वडिलांना, रियाला या सर्व गोष्टींची अगोदरच कल्पना दिली होती.
रिया सुरुवातीला ठरल्याप्रमाणे शहरात राहणाऱ्या आपल्या सासू-सासऱ्यांकडे जायची. पण हळूहळू तिला या सर्व गोष्टींचा कंटाळा येऊ लागला. तिची त्यांच्या प्रति वागणूकही बदलली.
माधवरावांनी मालती ताई साठी केअर टेकर शिवाय इतर घर कामासाठी नोकर ठेवले होते. परंतु चार दोन महिन्यातून हक्काचे कोणीतरी येऊन राहावे असे त्यांना वाटे. म्हणून रियाला पंधरा दिवसातून, महिन्यातून आठ दहा दिवसांसाठी त्यांच्याजवळ राहावं लागेल असं ठरलं होतं.
मात्र रियाला त्यांची संपत्ती हवी होती. पण त्यांची जबाबदारी मात्र नको होती. महत्प्रयासाने ती त्यांच्याकडे जायची पण तिथे गेल्यावर त्यांना प्रेम देण्याऐवजी ती त्यांचा तिरस्कार करू लागली.
राघवला नोकरीमुळे आपल्या मावशीकडे फारसे लक्ष देता येत नसे. तिथे जाऊन राहता येत नसे. त्याला वाटे आपली पत्नी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकते. परंतु तसे नव्हते.
माधवराव आणि मालतीताईंच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. परंतु "आपलेच दात आणि आपलेच ओठ" शिवाय त्या उभयतांच्या शांत स्वभावामुळे त्यांनी या गोष्टीची आपल्या भावाजवळ वाच्यता केली नाही. आता मालतीताईंचा आजार आणखीनच बळावत चालला होता. त्यांना सतत कोणाच्यातरी आधाराची गरज होती. अशातच एक दिवस मालतीताईंचा मृत्यू झाला. माधवरावांनी आपली सर्व संपत्ती एका वृद्धाश्रमाला देणगी म्हणून देऊन टाकली. आणि तेथेच जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. मालतीताईंच्या मृत्यूचे सर्वांनाच दुःख झाले.
रिया आपल्या सासू-सासर्यांशी
चांगली वागली असती, त्यांना प्रेम दिले असते तर निश्चितच राघव व रिया या सर्व संपत्तीचे मालक बनले असते. खरोखरच "दैव देते पण कर्म नेते" म्हणतात नां हेच खरे.
चांगली वागली असती, त्यांना प्रेम दिले असते तर निश्चितच राघव व रिया या सर्व संपत्तीचे मालक बनले असते. खरोखरच "दैव देते पण कर्म नेते" म्हणतात नां हेच खरे.
सौ.रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा