2020 च्या डिसेंबर पासूनच बोललं जाऊ लागलं, भविष्यवाणीही करण्यात आली आणि अनुमान लागले कि 2021 च्या फेब्रुवारी आणि मार्च मध्ये कोरोना विस्फोट होईल. पण फेब्रुवारी महिना आला तरीही सगळं बऱ्यापैकी नॉर्मल होतं. मोठया मुलांच्या (काही) शाळा, कॉलेज सुरु झाले होते. लोकं मास्क न लावता फिरतांना दिसू लागले. लसीकरणही सुरु झालेले. मग भीती कशाची बाळगायची? पण त्या लसीवरही किती वाद विवाद, अनेक भ्रम, अनेक चेष्टा, नाना प्रकारचे तर्क वितर्क ! कोणी म्हणे कोरोना लस घेतल्यानं माणसात नपुसंकता येते, कोरोनाचे किटाणू आपल्या शरीरात जातात, खूप ताप येतो, त्रास होतो, कोणत्या कंपनीची लस चांगली? त्यात व्हाट्सअप वर फिरणारे मॅसेजेस ????. त्यामुळे लस घ्यायला लोकांचा हवा तसा प्रतिसाद तेव्हा दिसला नाही.
जो भेटला तो म्हणे, "आपण लस अजिबात घेणार नाही."
"सर्वांची घेऊन झाली कि त्यांचा अभ्यास करू, मग घेऊ."
त्यावेळी मलाही वाटलं होतं कि मीही घेणार नाही लस. पण मार्च मध्यांतर येता येता कोरोना चांगलाच फोफावला. माझ्याच ऑफिस मधल्या 99% लोकांना कोरोना होऊन गेला. आपल्याला कोरोना झाला तर आपल्या सोबत 14 दिवस 7 वर्षाच्या आपल्या मुलाला घरात कसं कोंडून ठेवायचं या विचारानेच मी गळून गेली. मास्क, हळदीचे दुध, वाफारा, व्हिटॅमिन सी च्या गोळ्या तर मागच्या 12 महिन्यापासून सुरु आहेत. ऑफिसच्या मैत्रिणीकडून समजलं कि ऑफिसच ओळख पत्र आणि आधार कार्ड दाखवलं कि, 'लसीकरण केंद्रात' आपल्यालाही (म्हणजे 45 पेक्षा कमी वय असणाऱ्यांनाही) मिळतेय. साहेब (मुलाचे बाबा) नागपूरला होळीसाठी आलेले होतेच. म्हटलं ताप आला तर हे पाहून घेतील मुलाला. तसंही आज ना उद्या लस घ्यायचीच आहे मग आपल्याला मिळतेय तर आपण घेऊनच घ्यावी आणि 30 मार्चला लस घेतली. लस घ्यायला गेली तेव्हा तिथे फक्त 6-7 वृद्ध लस घ्यायला आलेले. पाच मिनिटात लस मिळाली. डॉक्टरचा हात खूपच हलका. पहिल्यांदा सुई घेतांना अजिबात त्रास झाला नाही, समजलंही नाही.
"आराम करायचा. रात्री ताप येऊ शकतो, तेव्हा डोलो 650 ही गोळी घेऊन जा." डॉक्टरने सांगितलं. पण मी आळस केला गोळी विकत घ्यायचा, कारण घरी पॅरासिटामॉल होती. म्हटलं घेईल ती ताप आल्यावर. त्यात लंच ब्रेक मध्ये सुई घ्यायला गेली होती. सुई घेतल्यावर परत ऑफिसला गेली. तीन तास काम केलं. घरी आली. जेवण बनवलं आणि जेवलीही छान. रात्री 1-2 वाजताच्या सुमारास हातात दिलेलं कोरोनाचं आणि कंबरीत (आधीची ) दिलेली इतर इंजेकशन खूप दुखू लागली. साहेबांना उठवलं. गोळी घेतली. थोडयावेळाने झोप लागली. सकाळी परत त्रास झाला, परत पॅरासिटामॉल घेतली. 3-4 तासाने परत तेच. एकदम अंगात ताप भरल्यासारखं वाटलं. साहेबांनी ओल्या पट्ट्या कपाळावर ठेवल्या. हात पाय पुसले. तेव्हा बरं वाटलं. पण परत मळमळ सुरु झाली. डॉक्टरला कॉल करून येऊ का म्हटलं, तर तिनी सांगितलं, "डोलो 650 घे. रात्री पर्यंत ठणठणीत होशील."
शहाणपणा भोवला मला माझाच. एकतर सांगितलेली गोळी घेतली नाही, दुसरं आराम केला नाही. म्हणून डॉक्टर सांगतात ते आपण ऐकायला हवं. खरंच डोलो 650 घेतली संध्याकाळी आणि रात्री पर्यंत बरं वाटलं. पण जाम थकवा आला कारण जुनी इंजेकशन दुखत असल्यामुळे सारखं मळमळ होत होतं म्हणून दिवसभर काही खाल्लंच नव्हतं.
माझं वय 35 वर्ष आहे. आज 13 दिवस झालीत लस घेऊन. मी एकदम ठीक आहे. ऑफिसला जाते, घरातील सगळं करते. पण हो मास्क अजूनही वापरते. आता कोरोनाचा पूर आल्यामुळे लसीकरण केंद्रात खूप गर्दी होतेय. म्हणून 45 वर्ष वयाच्या वरच्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जात आहे. स्व अनुभवाने सांगतेय, लस घेतांना काही महत्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.
1.लस घ्यायला जातांना छान पोटभर जेवून जा.
2.लस घेतलेल्या व्यक्तीने 2 दिवस तरी पूर्णपने आराम करा.
3.डोलो 650 जवळ नक्कीच ठेवा.
4.मेडिकल इमर्जंसी असलेल्यांनी आपल्या डॉक्टरला दाखवून नंतरच लस घ्या.
5.स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करा.
6.Imp जवळ काळजी घेणारं कोणी असतांना लस घ्या ????
माझ्या सासूबाईला आणि सासर्यांना दमा आणि शुगर आहे. त्यांना फक्त नॉमिनल ताप आला होता. मला तरी लस पूर्णपणे सुरक्षित वाटली. पण प्रत्येकाला लस घेतल्यावर वेगवेगळे अनुभव येतात. मला कोणीतरी म्हटलं होतं कि फक्त चांगलंच सांगायचं. लस घेतल्यावर त्रास झाला वगैरे असं नाही बोलायचं. नाहीतर लस घेणार नाहीत लोकं. मला वाटतं आपण रियलिस्टिक असणं गरजेचं आहे. लस अनिवार्य आहे. म्हणून मी माझा हा अनुभव सर्वांसमोर मांडत आहे.
धन्यवाद !
©®अर्चना सोनाग्रे वसतकार