मागील वर्षी संपूर्ण विश्वात पसरलेल्या या *कोरोना*
महामारीमुळे जग अगदी थांबल्यासारखं झालं होतं. ना कुठे बाहेर फिरणे ना गाड्या उडवणे,ना मौजमजा . होती ती केवळ रोगराई, संचारबंदी अन् रूग्णसंख्या ! मी , तुम्ही - आम्ही कधी कल्पनादेखील केली नसेल असा प्रारंभ झाला होता 2020 सालचा. तत्पूर्वी सगळ कस सुरळीत चालू होत. पण हा भयंकर विषाणू आला अन् सुरू झालं रोगराई चं तांडव. . . ५-१०-१०० म्हणता म्हणता रुग्णांची संख्या लाखांत जाऊन पोचली हो ,???? हे जस विदेशात तसच भारतात देखील. सुरुवातीला हलक्यात घेतल परंतु हा हा म्हणता आपल्या मायभूमीत या विषाणू ने पाय पसरले अन् झोपलेले जागे झाले.
या प्रसंगी मला नुकत्याच पाहिलेल्या जुन्या हिंदी चित्रपटाची आठवण झाली. *वक्त*! अतिशय सुंदर कथा, कलाकारांचा कसदार अभिनय अन् त्यातून मांडला गेलेला अतिशय मोलाचा संदेश ! यातील मुख्य चरित्र अभिनेत्याला ,लाला केदारनाथ याला स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास असतो, अभिमान असतो की माझं आणि माझ्या मुलांचं भवितव्य केवळ मीच लिहिणार अन् ते साकार करणार. परंतू केवळ आत्मप्रौढी मध्येच रमणाऱ्या लालाजीला एका गोष्टीचा विसर पडतो की मानवाच्या तीक्ष्ण बुद्धीपेक्षा देखील एक अनाकलनीय गोष्ट आहे.
ती म्हणजे काळ ! आणि तेच होत. काळाची अत्यंत निर्दयी चपराक भूकंपाच्या रूपाने बसते आणि केदारनाथ सहित त्याचं संपूर्ण कुटुंब देशोधडीला लावते अन् याचं कारण म्हणजे काळाला कमी लेखणे.
*वक्त से दिन और रात, वक्त से कल और आज, वक्त की हर शह गुलाम , वक्त का हर शह पे राज !*
*आदमी को चाहिए वक्त से डरकर रहे , कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज !*
काय सुंदर आणि तंतोतत खर असं वर्णन केलंय साहिर साहेबांनी ! आणि आज हीच परिस्थिती संपूर्ण विश्वात व्यापून राहिली आहे. जो तो या जगात केवळ धावत होता. कोणी पैशामागे, कोणी प्रतिष्ठा जपण्यामागे, कोणी स्वप्नं पूर्ण करण्याच्या मागे आणि हे सगळ करत असताना , उर फाटे पर्यंत धावत असताना कोणी विचारही केला नव्हता की एका क्षणांत कालचक्र फिरेल. काळाने आपली ताकत दाखवली. सगळ्या जगावर आपल वर्चस्व गाजवण्याच्या फुटकळ इर्षेतून या विषाणूचा उगम झाला अन् सगळी सृष्टी वेठीस धरली गेली. मी आणि मीच केवळ इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे याची मानवा - मानवामध्ये जणू अहमहमिका लागली होती. काळाची जराही तमा न बाळगता काळाची पावल ओळखून वेळीच पूर्णविराम न घेता , आपण जगत होतो, जगत असतो. परंतू आज बघा! सर्वशक्तिमान काळ आपल्या प्रत्येका पुढे *आ* वासून उभा आहे अन् म्हणतोय," बाबा रे, आता तरी ही ईर्ष्या सोड, आपल्या भाग्यातल आयुष्य आनंदात जग, परोपकार कर पण अभिमान आपल्या जवळ देखील फिरकू देऊ नकोस".
पण काळाची ही साद,त्याची ती पावल ऐकू न येण्याइतपत मनाची बधिरता आलिये आपल्याला! काळ त्याच्या गतीने पुढे सरकतो आहे, त्याच्या मनातील कल्पनांसोबत , पण आपल्याला तो एक संधी देऊ पाहतोय, विचार क्षमता वापरण्याची , आपली बुद्धी जागृत ठेऊन वावरण्याची. पण आपल्याला ती संधी नकोय, आपल्याला काळाने देऊ केलेला वेळ नकोय. आपल्याला हवीय ती केवळ उन्मत स्वतंत्रता, आणि आपण वाट पाहत होतो ती केवळ *लॉक डाऊन* उठण्याची, सगळ जग पुन्हा धावण्याची अन् पुन्हा तीच जीवघेणी स्पर्धा सुरू होण्याची. आपल्याला मात्र आत्मप्रौढीतच जगायचय, स्वतःवर आत्मविश्र्वास असावा पण फाजील नाही. मी काळाला देखील हरवेन, हा अभिमान चुकीचा आहे.
तेव्हा काळा ला कमी लेखून आपण विनाशाकडे वाटचाल का करावी? सुज्ञ आहोत आपण सगळेच. यावर विचार करूया अन् सर्वशक्तिमान दैवाचा सन्मान करूया !
दैवाचा ना कुणा कधी कळला खेळ,
बसवू या आपण कर्म अन् दैवाचा मेळ!
काळाला स्मरून करूया केवळ सत्कर्म,
मानवी आयुष्याचे हेच खरे मर्म !
दैवाने कालचक्र फिरवून प्रदान केली एक संधी,
आतातरी उतरो जगावरची आत्मप्रौढी ची धुंदी !
मिळालेल्या या सुसंधी वर करूया जरा विचार,
काळाचा कृतज्ञ होण्याचे भाग्य करू साकार !
धन्यवाद
सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी
नासिक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा