#१००शब्दांचीगोष्ट
सासूबाई लहान दिरावर जास्त प्रेम करतात,ते आले की लगबगीने पाणी,चहा देणार,त्यांना काय हवं नको बघणार पण आपल्या नवऱ्याला विचारत नाही असं निशाला वाटत होतं.मनाने वाईट नव्हती ती पण तिच्या मनात ही सल होती.स्पष्टवक्ती असल्यामुळे तिने सासूबाईंना परस्परच विचारले तेव्हा त्या प्रेमाने म्हणाल्या,"अगं, वेडाबाई आता तू आली आहेस ना त्याची काळजी घ्यायला,त्याला काय हवं नको ते बघायला.उगीच माझी लुडबुड नको तुमच्या संसारात.आईला तर सगळ्या मुलांची सारखीच काळजी असते बेटा पण माझी अतिकाळजी किंवा अतिलुडबुड तुमच्यात भांडणाचं कारण बनू नये म्हणून मी स्वतःच माघार घेतली कारण कुठे थांबावं हे ज्याचं त्याला समजायलाच हवं ना?"निशाच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तिच्या मनातील गैरसमजाचे मळभ धुवून निघाले.