चूक कोणाची? ??

लग्न म्हणजे खेळ नव्हे.... वाटेल तेव्हा जुळवायला... वाटेल तेव्हा मोडायला

शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )

चूक कोणाची????

'ए पोरींनो अग आटपा की लवकर... किती वेळ ती मेंदीच  काढत बसला आहात... पोरगी कवाची ताटकळली आहे...

ए सुमा अग तू कुठं ह्या पोरींच्या नादी लागतं बसते... तुझ्या हातावर मेंदी काढून झाली न्हवं मग झोप बरं तू... उद्या बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे.. सांच्याला हळद लागलं तुला... तवा आता जरा आराम कर... ह्या पोरी काय रातभर जागत बसतील..'.

....... सुमाची आई रखमा आपल्या लेकीच्या काळजी पोटी बोलत होती...

रखमा आणि सुरेश या उभयंतांची सुमन एकुलती एक मुलगी... आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी फार लाडात वाढवली होती त्यांनी सुमनला...

सुमनने बारावी पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं...पण पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागेल खर्च पण खूप करावा लागेल आणि आपली आर्थिक परिस्थिती अशी नाही की आपण सुमन ला पुढचं शिक्षण देऊ शकू...   म्हणून रखमा आणि सुरेश ने सुमन च शिक्षण थांबवलं...

सुमन ने ही आपल्या आई वडिलांचा निर्णय मान्य केला आणि आपलं शिक्षण अर्धवट सोडलं...पण मग गावातच राहून तिने शिलाई कोर्स केला....

सुमन ने शिलाई कोर्स पूर्ण केल्यावर.... सुरेशने गावातूनच एक सेकंड हॅन्ड शिलाई मशीन तिच्यासाठी विकत घेतली...

आणि मग ओळखी पाळखीतील बायकांचे ब्लाउज शिवून दे... कधी  कोणाच्या कपड्याला शिलाई मारून दे अशी छोटी मोठी कामं सुमन घरी बसल्या करू लागली... त्यातून मिळणाऱ्या चार पैशाची घरात मदतच होत होती....

सुमन, रखमा आणि सुरेश हे त्रिकोणी कुटुंब सुखासमाधानाने आपलं आयुष्य जगत होते....

सुमन ची चुलत आत्या सुखदा ही मुंबईला  राहत होती... तिच्या नणंदेच्या मुलाचं प्रमोदच स्थळ तिने सुमन साठी सुचवलं....

सुरेश आणि रखमा ने जेव्हा ह्या स्थळा बद्दल ऐकलं... त्यांनी ह्या स्थळाला सरळ सरळ नकार दिला.... कारण त्यांना सुमनला  आपल्या पासून इतक्या दूर....  लांब शहरात पाठवायचं नव्हतं...

त्यांना  सुमन साठी असं स्थळ हवं होतं....  की ती नेहमी त्यांच्या आसपास राहू शकेल ... हवं तेव्हा तिला भेटता येईल ....

सुमन शिवाय दुसरं आहेच कोण आपलं या जगात.... नको नको सुमन ला इतक्या लांब द्यायलाच नको....

सुरेश ने आपल्या बहिणीला सुखदाला या स्थळाबद्दल नकार कळवला....

दुसऱ्याच दिवशी सुखदा शहरातून आपल्या भावाला कधी नव्हे ती  भेटायला गावी आली.... तिने रखमा आणि सुरेश ला विश्वासात घेतलं... प्रमोद आणि त्याचं कुटुंब किती चांगल आहे... सुमनला नात्यातच दिली तर कसं फायदेशीर आहे... मी शहरात असल्याने सुमनच्या संसारावर  माझं कायम लक्ष राहील.... तुम्ही पण हवं तेव्हा आपल्या लेकीला भेटू शकाल.... सासरची मंडळी सुमनवर कसलीच बंधन लादणार नाही.... हे आणि बरच काही गोड गोड बोलून सुखदाने सुमन आणि प्रमोदच्या लग्नाला होकार मिळवला....

आपली मुलगी सुखी राहावी इतकीच माफक अपेक्षा असणाऱ्या सुरेश आणि रखमा ने लग्नाला होकार दिला... सुमन आपल्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती...

कांदेपोह्याचा कार्यक्रम पार पडला... प्रमोदच्या आईवडिलांना सुरेश आणि रखमा कडून लग्नात कसलीच अपेक्षा नव्हती... ना हुंडा... ना लेनदेन....

सुमन आमची एकुलती एक मुलगी आहे तीच लग्न आमच्या दारातच व्हावं अशी ईच्छा आहे... ती तेवढी मान्य करा... सुरेश म्हणाला...

काहीही आढेवेढे न घेता प्रमोदचे आई वडील गावी लग्न करायला तयार झाले.... एक महिन्या नंतरची तारीख पक्की करण्यात आली...

दोन्ही घरात लगीनघाई सुरु झाली.... या एक महिन्यात सुमन आणि प्रमोद एकदाही एकमेकांशी बोलले नाहीत... सुमनला पहायला आल्यावरही तो  या लग्नाला फार  उत्साही आहे असं वाटतं नव्हतं....

असतो एखाद्याचा स्वभाव अबोल.... म्हणून सुमनने  याकडे दुर्लक्ष केलं.... सुमन ही तशी लाजाळू... त्यामुळे प्रमोद बरोबर बोलण्यास तिनेही पुढाकार घेतला नाही....

लग्न इतक्या घाई गडबडीत ठरलं...की इतर काही विचार करायला सुमन आणि तिच्या आई बाबांना वेळच मिळाला नाही....

सुमन आणि प्रमोदच लग्न दोन दिवसावर येऊन पोहचल...घर पै पाहुण्यांनी भरलं...

आज सुमनच्या मैत्रिणी तिच्या हातावर मेहेंदी काढत होत्या...त्यांनी  प्रमोद चं नावं सुमन च्या हातावर लिहिलं आणि त्या सुमनला प्रमोदच्या नावावरून चिडवू लागल्या...

त्यांच्या या चिडवण्याने सुमनच्या ही मनात गुदगुल्या होत होत्या... लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता... सुमनच्या हृदयाची धडधड वाढत होती ... आपल्या संसाराची स्वप्नं ती उघड्या डोळ्यांनी पाहू लागली...

बस उद्याचा एक दिवस आणि त्यानंतर आपल आयुष्य जन्मभरासाठी प्रमोद सोबत जोडलं जाणारं... या विचारांनीच सुमनच्या गाली लाली चढली...

रात्री कितीतरी वेळ ती जागीच होती आपल्या भावी आयुष्याची स्वप्न पाहत....

दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला... सुमनच्या हातात हिरवा चुडा चढवण्यात आला... आपल्या हातातील चुडा पाहून सुमन हरखून गेली... एक एक पाऊल आता ती प्रमोद च्या जवळ जात होती....

रात्री हळदीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला... सुरेश आणि रखमा ची आर्थिक स्थिती बेताचीच असली तरी त्यांनी आपल्या लेकीच्या लग्नाची तजवीज करून ठेवली होती... आपली आयुष्य भराची जमापूंजी त्यांनी सुमन च्या लग्नासाठी खर्ची केली...

सुमन च्या अंगाला प्रमोदच्या नावाची हळद लागली... इकडे प्रमोदच्या घरीही हळदीचा कार्यक्रम पार पडला...

हळदीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पासूनच सुमन च्या घरी लगबग सुरु झाली.... मुंबईवरून नवरदेव आणि पाहुणे मंडळी येणार म्हणून त्यांच्या  पाहुणचाराची जय्यत तयारी केली....

लग्नाचा मुहूर्त सकाळी 10.30चा होता... मंडळी मुंबईहून रात्रीच निघणार होती... पहाटे पहाटे पोहचणार होते... पण सकाळचे सात वाजले तरी वर्हाडाचा काही अतापता नव्हता...

सुरेश आणि रखमा ला काळजी वाटू लागली मंडळी अजून आली कशी नाहीत...

फोन करून विचारावं असा विचारच सुरेश ने केला होता... तेवढ्यात मुंबईहून त्याची बहीण सुखदाचा फोन आला....

सुरेश..... सुखदा आगं कुठं राहिला आहात तुम्ही... लग्नाची वेळ जवळ येत चालली आहे.. तरी तुमचा पता नाही... कुठं अडकलात बरं...

सुखदा.... ( आवंढा गिळत ).... माफ कर सुरेश हे लग्न मोडलं...

सुरेश :....लग्न मोडलं... सुखदा डॊकं ठिकाण्यावर हाय ना तुझं... काय बडबडते आहेस.... दारात मांडव घातला आहे... काल सुमन ला हळद लागली... घर पैपाहुण्यांनी भरलं.... सुमन लग्नासाठी तयार होत आहे.... आणि तू  म्हणते आहेस लग्न मोडलं.... हा काय बाहुला बाहुली चा खेळ चालला आहे का???...

सुखदा:.... मला सगळं समजतंय सुरेश पण आमचा नाइलाज आहे .....

सुरेश : अगं पण झालय काय ते तरी सांगशील का नाही...मी काय  समजायचं.... पाहुण्यांना,  माझ्या सुमनला मी काय उत्तर देऊ....

सुखदा :...सुरेश मी तुला आता काहीच नाही सांगू शकत माफ कर मला....

एवढं बोलून सुखदा  ने फोन ठेवला.... सुरेश आपल्या डोक्याला हात लावला... फोन हातातून खाली पडला... जवळच असणाऱ्या पाहुण्यांनी त्याला सावरलं... रखमा पण तेवढ्यात धावत आली... सुरेश रडत होता.... आपल्या लाडक्या लेकीला कसं समजवायचं त्याला काहीच सुचेना... सुरेशला या अवस्थेत पाहून रखमा पण घाबरली...

तिच्या कडे पाहत सुरेश म्हणाला.... रखमा आपल्या सुमनंच लग्न  मोडलं...

हे ऐकताच रखमा धाय मोकलून रडू लागली... आपल्या एकुलत्या एक लेकीच्या लग्नाची स्वप्नं धुळीला मिळाली... हे ऐकून त्या माऊलीच आयुष्यच उध्वस्त झालं....

सुरेश आणि रखमा ला नातेवाईकांनी सावरलं... पण सुमन... तिला कसं सावरायचं... तिच्या डोळ्यानी  भावी आयुष्याची स्वप्नं रंगवायला नुकतीच सुरुवात केली होती....

आणि समाज त्याला कसं तोंड द्यायचं... लग्न मोडलेल्या मुलीकडे समाजाची पाहण्याची दृष्टीच वेगळी असते... तिचा काही दोष नसताना समाज मुलीलाच दोषी मानतो... ह्याला अपवाद आपली मुलगी तरी कशी राहील.... तिला ह्यातून बाहेर कसं काढायचं.... हा प्रश्न सुरेश आणि रखमाला सतावू लागला...

आपल्या आईवडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून सुमन धावत आली.... तिला थोडी कुणकुण लागलीच होती... आईबाबांना ह्या अवस्थेत पाहून तिला परिस्थितीचा अंदाज आला.... धावतच आपल्या आईबाबांच्या गळ्यात पडली...

सुरेश आणि रखमा सुमनला काही सांगणार तोच तीच  आपल्या आईबाबांचा आधार बनली... आपल्या आईवडिलांना उद्देशून म्हणाली... काळजी करू नका सगळं ठीक होईल....तुम्ही माझ्या सोबत आहात तर मला कसलीच भीती नाही...कसलीच चिंता नाही... समाज काय म्हणेल या पेक्षा आपण तिघे एकमेकांसोबत आहोत हे माझ्या साठी फार महत्वाच आहे... माझ्या नशिबात कदाचित हेच लिहिलं असेल... तर त्याला आपण तरी काय करणार... पण मी दुःखी नाही... मुळीच नाही... कारण एका चुकीच्या कुटुंबासोबत  नातं जुळण्यापासून आपण वाचलो आहोत आई  बाबा...

आपल्या लेकीच्या समजूतदारपणावर काय बोलावं... सुरेश आणि रखमा दोघांना ही सुचेना...

पण सुरेश उठला आणि तडक मुंबई ला निघाला... ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायला आणि प्रमोद व त्याच्या कुटुंबाला जाब विचारायला...

सुरेश जेव्हा प्रमोदच्या घरी पोहोचला... तिथली परिस्थिती तर अत्यंत भयानक होती... सगळ्या घरात स्मशान शांतता पसरली होती...

सुरेशला पाहताच प्रमोदच्या आईबाबांनी हात जोडून त्याची माफी मागीतली... सुरेशला सगळा काय प्रकार आहे काहीच समजेना...

सुखदा तिथेच होती तिने सुरेशला सगळी हकीकत सांगितली... प्रमोदचं त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम होतं... पण मुलगी दुसऱ्या जातीतली आहे म्हटल्यावर प्रमोदच्या आईबाबांनी या लग्नाला नकार दिला...

प्रमोदच्या आयुष्यातून त्या मुलीला घालवण्यासाठी त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून देण्याचा त्यांनी अट्टहास धरला... प्रमोदने सुरुवातीला लग्नाला नकार दिला.. पण आईवडिलांनी त्याला ब्लॅकमेल केलं... त्यामुळे अनिच्छेनेच त्याने ह्या लग्नाला होकार भरला...

लग्न ठरेपर्यंत शांत असणारा प्रमोद अंगाला हळद लागली अन रात्री सर्व गाढ झोपेत असताना आपली बॅग भरून पळून गेला....त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीला घेऊन....

सुरेशला काय बोलावं काही सुचेना... तोंडात मारल्यासारखा तो परत आपल्या गावी आला....

ह्या सगळ्या प्रकरणात खरी चूक कोणाची होती....

प्रमोदची???...  आपलं प्रेम दुसऱ्या मुलीवर असताना सुमनबरोबर लग्नाला तयार झाला... आपल्या आईवडिलांना विरोध न करता पळपुटा सारखा रात्री पळून गेला.... एका मुलीच्या स्वप्नांची राखरांगोळी करून...

प्रमोदच्या आईवडिलांचा???.... आधुनिक जगात वावरत असताना... एकीकडे स्वतःला सुशिक्षित म्हणवून घ्यायचं अन दुसरीकडे जातिभेद मानायचा...

सुखदाचा???....  सत्य माहीत असताना या लग्नात तिने पुढाकार घेतला...

सुमनच्या आईबाबांचा???..... आपली मुलगी मोठ्या घरात जातेय म्हटल्यावर.... मुलाची फार चौकशी न करता लग्नाला होकार दिला...

की सुमनची??? आपले आईवडील म्हणतात तो प्रत्येक निर्णय तिने डोळेझाकून मान्य केला...

( सत्य घटनेवर आधारित... )

शितल ठोंबरे.....

कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा...पण लेखिकेच्या नावासहित  कथा वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.....