Login

चित्र एक कथा नायिका दोन

वेश भिन्न पण ध्येय एक
चित्र एक कथानायिका दोन...

विद्याला तर अश्रू अनावर झाले होते.शाळेचे सगळे शिक्षक,विद्यार्थी, विद्यार्थिनी सुद्धा डोळे पुसत होते.
असं काय घडलं होतं?

विद्या सरस्वती ज्ञानमंदिरची
विद्यार्थिनी. आज त्याच संस्थेत प्राचार्य आहे. सुरुवातीला प्राथमिक शिक्षिका नंतर माध्यमिक शिक्षिका असा प्रवास करत आज ती प्राचार्य पदावर विराजमान आहे.

विद्याचीच सहाध्यायी समिधा. दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी. दोघीही खूप हुशार.दोघींमध्ये पहिल्या नंबर साठी नेहमी चुरस असायची.

पण दोघींच्या घरची परिस्थिती घरातले वातावरण यात मात्र जमीन अस्मानचे अंतर.

विद्याच्या घरी शिक्षणाचा मागमुसही नाही. वडील एका दुकानात नोकर.आई चार घरचं काम करणारी. दोन भाऊ एक बहीण. ती सगळ्यात मोठी.

त्यात वडील पॅरलेसिसने आजारी झाले. त्यांची नोकरी सुटली. औषध पाणी,घराचा भार आईवर एकटीवर. विद्या हातभार लावू लागली.पण शिक्षणाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. काम करता करताच शिकू लागली. दिवसा कामे करायची आणि रात्री आपल्या मैत्रिणींच्या वह्या आणून पुस्तक आणून त्याच्यावरून अभ्यास करायची. अर्ध्याला अर्धे दिवस तिचे शाळेत जाणेही जमत नसे. पण शिक्षकांना माहीत असल्यामुळे कोणी तक्रार केली नाही आणि ती अभ्यास भरून पण काढायची.

भविष्याची मोठी मोठी स्वप्न पाहणं तिच्यासाठी खरंतर एक स्वप्नच ठरावे.
पण त्याही वयात तिच्या ठिकाणी खूप समजदारी होती.तिने मनाशी एकच ठरवलं होतं मला इतपत शिकायचं आहे की मी लवकरात लवकर नोकरी करून माझ्या कुटुंबाला हातभार लावू शकेल.

त्यामुळे जसं कळायला लागलं तसं तिने आपलं ध्येय निश्चित केलं होतं बारावी करून डीएड करायचं आणि शिक्षिकेची नोकरी करायची.

या उलट परिस्थिती समिधाच्या घरची. समिधाच्या घरी शैक्षणिक वातावरण.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिचे आजोबा नेव्ही मधून रिटायर झालेले तर वडील आर्मी मधून रिटायर झालेले. त्यामुळे तिच्या घराला सैनिकी शिक्षणाची पार्श्वभूमी होती. देश सेवेसाठी वाहिलेलं कुटुंब होते ते.
त्यामुळे तिच्या वडिलांचे स्वप्न होते तिच्या भावाला सैनिकी शिक्षणा साठीच पाठवावे आणि त्यानीही ते स्वप्न जोपासलं होतं रक्तातून आलेला गुणधर्म असेल कदाचित पण त्याच्याही मनात आर्मी किंवा नेव्हीत जाण्याचेच विचार रुंजी घालत होते. त्या दृष्टीने त्याची तयारीही सुरू होती.
शारीरिक फिटनेस साठी दररोज चार सहा किलोमीटर रनिंग करायचा. त्या दृष्टीनेच त्याचे खाणे पिणे हे असायचे. तो बारावीला गेला आणि एका अज्ञात रोगाचा शिकार होऊन चार दिवसातच होत्याचे नव्हते झाले.
कुटुंबावर डोंगरच कोसळला आई तर अंथरुणाला खिळली.वडील एकट्यात डोळे पुसायचे एवढा बरोबरीचा मुलगा गमावला.
समिधा त्यावेळी जेमतेम आठवीत होती पण परिस्थितीने तिलाही शहाणपण आले.ती आईची आई झाली तशीच वडिलांचीही आई झाली. तिने तिचे ध्येय निश्चित केले बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे. मी जाईन सैनिकी शाळेत.मी करीन देशाची सेवा.
पण बाबांना तिची किरकोळ शरीरयष्टी माहित होती. ही नाही पेलवू शकणार.
ते नाही म्हणत होते पण समिधाने मनाची तयारी केली होती.
आणि तिने त्या दृष्टीने शारीरिक फिटनेस मानसिक फिटनेस या दृष्टीने स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी तयारी सुरू केली.
बारावी उत्तम गुणांनी पास झाल्यानंतर तिने भारतीय सैन्यात प्रवेश घेण्याच्या दृष्टीने कोर्स निवडला. आणि पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा पास होऊन सैन्यात दाखल सुद्धा झाली.

तिच्या कुटुंबासाठी जशी ही अभिमानाची बाब होती तशीच ती गावासाठी आणि तिने ज्या संस्थेतून शिक्षण घेतलं त्या सरस्वती ज्ञानमंदिर आणि गावासाठी पण अभिमानाची गोष्ट होती.
इकडे विद्याच्याही मनात सुप्त इच्छा होतीच. मैत्रीण समिधा सैनिकी शिक्षण घेण्यासाठी गेली तेव्हाच तिलाही वाटले होते आपणही जावे. पण घरची परिस्थिती पाहता तिला आपली इच्छा मनातच दाबून ठेवावी लागली.
पण तिने शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करताना विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाविषयी नेहमीच प्रोत्साहन दिले आणि त्याचे फलित म्हणजे तिच्या हाताखालून गेलेल्या पिढ्यांमधून दोन मुले आणि एक मुलगी सैनिकी शिक्षण घेण्यासाठी गेले. याचा तिला सार्थ अभिमान होता. तसेच मैत्रीण समिधा विषयी पण तिच्या मनात खूप आदरयुक्त भावना होती.
विद्या प्राचार्य झाल्यानंतर समिधा गावाकडे आली असता विद्याने आपल्या शाळेतील मुलांना उद्बोधन देण्याकरिता समिधाला एक दिवस शाळेत बोलावले.
समिधालाही खूप आनंद झाला कारण ती त्याच शाळेची माजी विद्यार्थिनी होती.
समिधाचा परिचय स्वतः विद्यानेच करून दिला.आणि त्या दिवशी आपल्या ओघवत्या वाणीने समिधाने सगळ्यांची मने जिंकून घेतली.
तिने मुलांना अतिशय सुंदर मार्मिक शब्दात उद्बोधन दिले. त्यामुळे कितीतरी मुला मुलींच्या मनात हा भाव जागृत झाला की आपणही देशसेवा करावी. त्यासाठी सैनिकी शिक्षण घ्यावे.
कार्यक्रम आटोपल्या नंतर समिधा भोवती विद्यार्थी विद्यार्थिनींनी गराडा केला. त्यांना तिला काय काय विचारू आणि काय नको असे होऊन गेले.हेच खरे तर यश होते. कार्यक्रम आटोपला समिधा निघून गेली.
पण सगळ्यांच्या मनात तिचे शब्द जणू अंकित झाले होते.आणि तिच्याविषयी सगळ्यांच्या मनात एक आदराची भावना निर्माण झाली होती.
ह्या गोष्टीला जेमतेम एक महिना उलटला असेल तर ती बातमी येऊन धडकली.
सीमेवर लढताना समिधाला वीरमरण.
शाळेत शोकसभा आयोजित केलेली. सगळ्यांनाच अश्रु अनावर झालेले.कोणीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही.विद्याने अगदी रडत रडत आपली श्रद्धांजली अर्पण केली. तिच्यासाठी तो फार मोठा धक्का होता.
तिच्या नजरेसमोर बालपणापासून तो महिन्याभरापूर्वी च्या प्रसंगापर्यंत सगळ्या घटना फेर धरून नाचू लागल्या.
पण सत्याचा स्वीकार करावाच लागतो.
समिधाचे शव तिरंग्यात गुंडाळून गावात आणले. तिचा शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार झाला.
त्यावेळी सगळ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या , समिधा अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता सगळ्या गाव वाशींचा उर अभिमानाने भरून आला होता.

समिधाने देश रक्षणासाठी झालेल्या सीमेवरच्या लढाईच्या होमात आपली समिधा अर्पण केली होती. तर तिचीच वर्ग मैत्रीण विद्याने आपल्या जीवनात देशहिताला प्राधान्य देत आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सैनिकी शिक्षणाकडे वळवण्यात खूप मोठी भूमिका शाळेच्या रणांगणावर लढली.
दोघींचा वेश परिवेश वेगळा असेल त्यांची कामे वेगवेगळ्या स्वरुपाची असतील पण दोघांच्याही ठिकाणी देशसेवा हा समान धागा होता.
©®शरयू महाजन