चिरुमाला (भाग १६))

मी चिडून म्हणालो,"........

मी चिडून म्हणालो," सगळ्यांनी मिळून जुडेकरच्या बाबतीत मलाच टार्गेट करायचं ठरवलंय का? " मग तो थोडा समजावणीच्या सुरात म्हणाला,"तू थांबवलं असतंस तरी तो थांबला नसता. जरी रजा दिली नसतीस तरी तो गेलाच असता. त्यात तुझाही दोष नाही म्हणा. "....मी थोडा नरमाईने म्हणालो " चल, जेऊन घेऊ या". जेवणाच्या टेबलावर बसता बसता,मी उद्या भुयारातून चर्चच्या भागात जायचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्याला बरं वाटलेलं दिसल़ं. त्याला नवीन काहीतरी करायला आवडत हे मला माहीत होतं.जेवणं होऊन टीव्ही बघेपर्यंत दहा वाजायला आले. आम्ही हॉलमधेच बिछाने घातले.त्याला मधेच काहीतरी आठवून त्याने त्याची बॅग उघडली. त्यातून चार उदबत्त्या काढल्या. ते पाहून मी खुणेने, हे काय म्हणून त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला," अरे, या विशिष्ट प्रकारच्या उदबत्त्या आहेत. जिथे अमानवी शक्तींचा वावर असतो तिथे लावल्या तर त्या पळून जातात आणि बळकावलेली जागा सोडतात "....‌..मी म्हटलं," छान! तू कधीपासून असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलास ?"
त्यावर काही उत्तर न देता त्याने त्या पेटवून एक माझ्या बेडरूममध्ये ,दुसरी हॉलमध्ये,तिसरी जिन्यावर आणि चौथी वरच्या मजल्यावरील कॉरिडॉर मधे लावली. लवकरच लसूण , धूप , काळी हळद आणि इतर मसाल्याचा तीव्र दर्प सगळीकडे भरु लागला. लवकरच घशात घुसमट होऊन मी खोकू लागलो.त्याचीही तीच अवस्था झाली. मी खोकत खोकत म्ह़टलं," विझव लवकर, नाही तर झोपणं मुष्किल होईल ". ....खोकणं थांबवीत तो म्हणाला," अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळ त्रास होणार नाही. पण रात्रभरात नक्कीच काहीतरी घडेल. " लवकरच संवय झाल्याने आम्हाला झोप लागली. घडलं काहीच नाही.मात्र रात्री एकदीडच्या सुमारास बऱ्याच लोकांच्या दबक्या आवाजातील गलबलटाने मला जाग आली..........


.......पाहतो तर काय ,वरच्या मजल्यावरील कॉरिडॉर मधे एक नाही तर दहाबारा ,बिनचेहऱ्याचे, पांढऱ्या कपड्यातील मृतात्मे कांहीतरी कुजबुजत उभे होते.त्यातली काही जिन्याच्या कठड्यावर रेळून उभी होती. अगदी स्वतःच्या घरात वावरतात तशी. ते कोणत्यातरी अगम्य भाषेत बोलत असावेत ‌ . काही हातवारेही करीत होती. माझ्या तोंडाला कोरड पडू लागली. आणि घामही सुटू लागला. बाजूला घोरत असलेल्या श्रीकांतला मी उठवलं.त्याला वरच्या मजल्याकडे बोट करीत म्हटलं," पाहिलंस काय आहे ते ?" त्यावर तो न घाबरता शांतपणे म्हणाला," उदबत्यांनी आपलं काम केलंय " मग मी तडकून म्हंटल, "अरे, पण ही गर्दी जाणार कशी आणि कुठे ?". .... त्यावर तो म्हणाला," आपल्याला वाट पाहावी लागेल . मलाही अनुभव नवा आहे ‌ विकणारा म्हणाला सुरवातीला त्रास होईल ."....... आता बिनचेहऱ्यांच्या मृतात्म्यांची कुजबुज वाढली होती. पण भाषा मात्र कळत नव्हती. आणि ते कुठेही जात नव्हते की खालीही येत नव्हते. श्रीकांत हलक्या आवाजात म्हणाला," यांचा अर्थ इथे, बिनचेहऱ्याचे एकदोन नाही तर दहाबारा मृतात्मे असले पाहिजेत. उद्या आपण खालचं भुयार आणखी ढुंडाळून पाहू ." मला त्याही अवस्थेत त्याच्या धैर्याची दाद द्यावीशी वाटली.........
साधारण दीड दोन तास आम्ही अंथरुणावर बसून काढला. चार वाजण्याच्या सुमारास त्यांची गर्दी कमी होऊ लागली. श्रीकांत म्हणाला," ही त्यांची जाण्याची वेळ दिसत्ये.आपण कोणातरी दर्दी माणसाचा सल्र्ला घ्यायला हवा "
पाचच्या सुमारास परत झोप लागली. मग मात्र एकदम साडेसातला जाग आली. मी घाईघाईने ऑफिसला जायची तयारी केली. श्रीकांतला मी लवकर येईन असं सांगितलं.मग आपण भुयाराची तपासणी करुन,पण त्याला पाहिजे तर तो आधी जाऊनही तसं करु शकतो. त्याला बरं वाटलं. इतके दिवसांत माझ्या एक गोष्ट लक्षात आली की श्रीकांतला त्यांच्या इच्छेनुसार वागून दिलं तर बरं असतं.नाहीतर तो नाराज होतो. मी घाईघाईने बॅंकेत शिरलो. तर माझी वाट पाहत पारलोकेंचा मुलगा बसलेला दिसला. मी आधी काही रुटीन कामं हातावेगळी केली. आणि मुलाला बोलावलं. त्याचा चेहरा उतरलेला दिसला.मी काही विचारण्याच्या आतच तो म्हणाला," बाबा गेले, तुम्हाला माहिती आहेच. पण पर्वा आईलाही त्यांनी पळवून नेलंय. " असं म्हणून तो रडायला लागला. मग त्याच्या जवळ जाऊन पाठीवर हात फिरवत मी म्हटलं," हे बघ, पो.स्टेशनला जायचं सोडून तू इथे का आलास ?" त्यावर तो त्याला भिती वाटली म्हणाला. मग मी त्याला म्हटलं, आपण आत्ताच जाऊ पो. स्टेशनला. मलाही काम आहेच. " मलाही कानविंदेंकडे जायला नवीन कारण मिळेल असं वाटल्याने थोडं हलकं वाटलं. तो तयार झाला. मग पैंना सांगून आणि हेडऑफिसला मेसेज करुन आम्ही गाडीने निघालो. हेडऑफिसच्या उत्तराची वाट मी मुद्दामच पाहिली नाही. कारण एकतर माझ्याबद्दल मोहंती साहेबांचं मत फारसं चांगलं नव्हतं आणि उगाचंच वेळ जाईल . मात्र एक गोष्ट मी ठरवली की पैंना एकदा चांगलं दमात घ्यायचं, म्हणजे बरीच माहिती मिळेल. असो. आम्ही पंधरावीस मिनीटात पो. स्टेशनला पोहोचलो. कानविंदे कोणत्यातरी आरोपीला कोठडीमधे बोलतं करण्याचा प्रयत्न करीत होते. आम्ही आल्याची खबर दिल्यावर त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. कदाचित मी एकटा आलो नाही म्हणूनही असेल.

थोड्याच वेळात ते बाहेर येऊन म्हणाले," या मुलाला का घेऊन आलात ?याचा काय संबंध ? मग मी त्यांना पारलोके गेल्यावर काय काय घडलं ते थोडक्यात सांगितलं.आणि त्यांच्या बायकोलाही आता पळवून नेली असल्याचं सांगितलं. सगळं ऐकल्यावर ते म्हणाले,"ते आपण बघू या. पण जुडेकरच्या खुनाचा तपास पूर्ण झाल्याशिवाय यांच्या आईचा छडा कसा लागेल ? मला वाटतं हे जे कोणी करतायत ते एकमेकांशी संबंधित असले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं? आणि हो या मुलांची कम्प्लेंट लिहून घेऊन याला जायला सांगा मग आपण चर्चा करु " मग त्यांनी "ताटके !" अशी हाक मारली. त्याबरोबर एक सपाट चेहऱ्याचा कॉन्स्टेबल आला. आणि त्या पोराला घेऊन गेला. कम्प्लेंट लिहून होईपर्यंत मी थांबलो.मग त्या मुलाला रिक्षात बसवला आणी नंतर त्याला भेटण्याचे आश्वासन दिले.त्यावर तो म्हणाला " काका मला घरी एकट्याला राहायला भीती वाटते हो ".

मी समजू शकत होत़ो.पण वाड्यावर राहायला ये,असं म्हणणं म्हणजे अडथळा निर्माण करण्यासारखं असल्याने,मी तसं म्हंटलं नाही.एखतर श्रीकांतला विचारावं लागलं असतं आणि हा मुलगा तिथे घाबरला असता आणि बाहेर जाऊन त्यांनी सांगितलं असतं, तर माझी पंचाईत झाली असती. म्हणून मी त्याला " पाहतो काय करता येईल ते " असं म्हणून त्याला जायला सांगितलं.
मग परत मी कानविंदेंसमोर येऊन बसलो. ते थोडावेळ जाऊन देऊन म्हणाले," मि. सबनीस, तुम्ही , हा मोहंती, हरिदास,जुडेकर , गोळे यांचा ग्रुप आहे का हो ?"
मी अर्थातच नकार दिला. पण त्यांचा विश्वास बसेना. जवळजवळ तासभर ते वेगवेगळे तर्कवितर्क मांडून पुन्हा त्याचं अनुदानावर येत. मग मात्र मी काहीच बोलत नाही असं दिसल्यावर ते म्हणाले," चला निघा. तुमचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. पण, एक लक्षात ठेवा," दर शनिवारी तुम्ही पो.स्टेशनात येऊन हजेरी द्यायची आणि आमचा तपास पुरा होत नाही तोपर्यंत हे गाव सोडून जायचं नाही " त्यावर चिडून मी म्हंटलं," मी हे असलं काही करणार नाही. कारण मी गुन्हेगार नाही.आणि आता मात्र मी माझ्या वकिलाच्या सल्ल्यानुसारच वागेन."
मग मात्र ते म्हणाले," पूढे काय करायचं ते मी पाहीन.तुम्हाला वरिष्ठांचे आदेश मानण्याची अजिबात संवय नाही असं दिसतंय. " .... त्यावर मी शांतपणे म्हणालो," तुम्ही माझे वरिष्ठ नाही,आणि मी कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि हो यापुढे, मला रितसर समन्स पाठवित चला." ... त्यांना माझं बोलणं आवडलेली दिसलं नाही.पण त्यांची पर्वा न करता मी गुडबाय करून बाहेर आलो.घरी निघालो. .... खरंतर मी बॅंकेत जायला पाहिजे होतं. पण माझा मूड कानविंदेंनी चांगलाच खराब केला होता.
मी वाड्याच्या गेटमधून कानोसा घेत आत शिरलो.हल्ली मी सावधपणे वागत होतो. पुढचा दरवाज्या उघडून आत शिरलो. श्रीकांत घ्या नावाने हाक मारली. पण श्रीकांतला पत्ता नव्हता. सरदार साहेबांच़ चित्रही वर सरकवलेलं होतं.याचा अर्थ तो भुयारात असावा.

(क्रमशः:)

🎭 Series Post

View all