चिंतामणी भाग ५

चिंतामणी

                                            " हा अमूल्य चिंतामणी आहे. याचा तांब्याला स्पर्श होताच त्याचे सोने होते, अशा प्रकारचा याचा चमत्कार आहे आणि जो  सर्वात श्रेष्ठ भिकारी असेल त्याला हा द्यायचा आहे ". श्रीकरने सरळपणे सांगीतले.                                                                                "शेठजी आणि भिकारी ! काय ! हा मूर्ख बोलतो तरी काय ? " सर्व एकदम ओरडले.   " यात विशेष वाटण्यासारखे काहीही नाही. या जगात तुमच्यापेक्षा दुसरा भिकारी कोण असणार ? शेठजी ! जरा विचार करा. ज्या भगवंताने तुम्हाला हजार हातानी दिले आहे त्याचे स्मरण करायला तुम्हाला वेळ नाही. त्याचे नाव, त्याचे विचार घरोघरी न्यायला तुम्हाला फुरसत नाही असे असूनही तो तुम्हाला देतोच आहे.                                                                                            गेल्या जन्मातले आपण योगी असाल म्हणून या जन्मात तुम्हाला वैभव, कीर्ती हे सर्व प्राप्त झाले आहे . परंतू या जन्मात आपण काय केलेय ? शेठजी ! आपण जरा विचार करा म्हणजे तुम्हाला सहज समजेल की, तुम्ही अद्यापही भिकरीच आहात. या जन्मातले तुमचे कोणते वैभव आहे ? जरा दाखवाल का ? " असे म्हणून मणी तिथे ठेवून श्रीकर निघून गेला.                                                                                         शेठजी व त्यांची खुशामत करणारे हे सर्व ऐकत होते. त्यांना या प्रसंगाने आश्चर्याचा धक्काच बसला. श्रीकर जाता क्षणीच ते भानावर आले. शेठजीना वाटले: श्रीकर जे सांगत होता ते सत्य होते. त्याने मला झोपेतून जागृत केले आहे. त्यांनी मनोमन श्रीकरला प्रणाम केला. तो अपूर्व मणी घेऊन मणीभद्र राजदरबारात गेला. स्वतःजवळ अशा प्रकारचा मणी ठेवणे ही जोखीमदारीची गोष्ट होती.                                                                                               राजाला मण्याची वार्ता कळाली तर काय होईल ? राजा त्याला कैदेत ठेवील. मणीभद्राने चंद्रसेन महाराजाना तो मणी दिला व त्याला साद्यंत हकीगत सांगितली. राजाला वाटले: ज्याला अशा प्रकारचा अदभूत मणी मिळूनही त्याची किंमत वाटत नाही. तो तरुण नक्कीच मूर्ख असला पाहिजे किंवा तो स्थितप्रज्ञ तरी असला पाहिजे. चंद्रसेन व मणीभद्र दोघेही श्रीकरला शोधण्यासाठी निघाले. तो गावाबाहेर एका वटवृक्षाखाली बसला होता.                                                                                              खेडेगावातील लोकाबरोबर आनंदाने गप्पागोष्टी करीत होता. मानवी -जीवनाची सार्थकता कशात आहे हे तो समजावून देण्याचा प्रयत्न करीत होता. मानवाच्या खऱ्या वैभवाची त्यांना कल्पना देत होता. राजाला पाहताच सर्व लोक एकदम घाबरले व उभे राहिले. राजाने श्रीकरला विचारले :" चिंतामणी तुम्हीच दिला का ?"  " होय " श्रीकरने एका शब्दात उत्तर दिले. " याची किंमत किती आहे हे माहीत आहे का ? तुम्हाला याची काही किंमतच वाटत नाही ? " राजा जरा चिडून म्हणाला.                                                                                       " महाराज ! जरा विचार करा. या चिंतामणी सारखा मौल्यवान देह तुम्हाला प्राप्त झाला आहे. ज्याच्या योगाने तुम्हाला भगवान होता येईल. यदाकदाचित भगवान होता आले नाही तरी भगवंताचा खास होता येईल. चिंतामणी सारखा हा अदभुत आपण व्यर्थ का गमावता ? जीवनातल्या भोगविलासासाठी हा का खर्च करता ? आणि वरती मला उपदेश ही करता की, या चिंतामणीची तुम्हाला काही किंमत नाही का ?.... ".                                                                    क्रमशः 

🎭 Series Post

View all