बालपण...जीवन ग्रंथाचं सोनेरी पान!

About Childhood


बालपण....जीवन ग्रंथाचं सोनेरी पान !


"मम्मी, मला झोपाळ्यावर बसायचे आहे,मम्मी,मला घसरगुंडी खेळायची आहे, मम्मी मला सी-सॉ वर बसायचे आहे..."

असे बोलणे वर्षाला ऐकू येत होते.वर्षा आपल्या मुलाला, साहिलला घेऊन गार्डनमध्ये आली होती. रोज तो आजीसोबत यायचा;पण आज वर्षाला ऑफिसला सुट्टी होती व साहिलनेही तिला गार्डनमध्ये येण्याचा हट्ट केला, त्यामुळे ती त्याच्या सोबतीला आली होती.

साहिल रोज आजीबरोबर गार्डनमध्ये यायचा आणि खेळ खेळायचा,आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारायचा. आजही रोजच्या सवयीप्रमाणे तो आपले खेळ खेळू लागला.
वर्षा एका जागी बसून साहिलला व इतर मुलांना पाहत होती.
छोट्या वयाच्या मुलांपासून ते मोठ्या वयाच्या मुलांपर्यंत सर्व मुले खेळण्याचा आनंद घेत होते.खेळताना पडत होते ,तरीही पुन्हा खेळत होते.
आईबाबा काळजीपोटी आपल्या मुलांना सारख्या सूचना देत होते, तरीही मुले आपल्या एका वेगळ्याचं धुंदीत, खेळण्याचा आनंद घेत होते,एन्जॉय करत होते.
मातीने आपले कपडे खराब होत आहेत, हातापायाला माती लागते आहे ,याकडेही त्यांचे लक्ष नव्हते. कोणी ओळखीचे असो वा नसो, एकमेकांना मदत करत खेळत होते.आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे निरागस हास्य होते...जो आनंदाचा भाव होता..ते पाहून त्यांच्या आईवडिलांनाही आनंद होत होता.
साहिलच्या चेहऱ्यावरील तो निखळ आनंद पाहून वर्षाच्या मनालाही आनंद होत होता.आणि तिला वाटलं,

\"किती निरागस निष्पाप
असतं हे छानसं बालपण
स्वार्थाचा लवलेशही नसलेलं
आपल्याचं विश्वात सुखावलेलं\"

खरचं, प्रत्येकाच्या आयुष्यातील \"मर्मबंधातील ठेव\" म्हणजे बालपण,
बालपण म्हणजे \"गोड आठवणींचा जणू ठेवाच\"!

वर्षाला या मुलांना पाहून आपल्या बालपणाच्या सुखद आठवणी आठवू लागल्या आणि त्यात ती हरवून गेली..

आजी- आजोबा, काका-काकू, आई-बाबा,भाऊ-बहीणी असे सर्व एकत्र कुटुंब!

आई व काकू जणू सख्ख्या बहिणीचं! इतके त्यांचे जमायचे. सख्खे - चुलत असे काही नव्हतेचं,सर्व आपलेच भाऊ व बहीणी!
आजोबांचा घरात आदरयुक्त दरारा होता.रोज संध्याकाळी नातवंडांना पाढे म्हणायला सांगायचे, शुभमं करोती म्हणून घ्यायचे.आजीही छान छान गोष्टी सांगायची.सर्व बहीण भाऊ एकत्र खेळायचे,एकमेकांशी भांडायचे तर कधी एकमेकांसाठी इतरांशी भांडायचे!
कैरी,चिंचा,बोरे हा तर आवडीचा खाऊ!
ऊस तोडून चावून चावून खाण्यात एक वेगळीचं मजा होती !
सुट्टीत मामाच्या गावाला जाणे ठरलेले असायचे.
सणावाराला घरी पाहूणे यायचे.
प्रत्येक सण उत्साहाने, आनंदाने साजरा व्हायचा. सणाच्या निमित्ताने आनंदाबरोबर नात्यांमधील प्रेम, आपुलकीही जपली जायची.
मुलांची खाण्याची,खेळण्याची,
फिरण्याची हौसमौज होती पण त्याबरोबर त्यांच्यावर जसे संस्कार घडत होते तसे मुले घडत होती. जीवनाला तसा आकार मिळत होता.कुटुंबाबद्दलचे प्रेम, नात्यांवरचा विश्वास, शिस्त, कामात प्रामाणिकपणा या गोष्टी आपोआपचं मुलांच्या मनावर रूजत होत्या.


\"लहान मुले म्हणजे मातीचा गोळा\"

जसा आकार दिला जातो,तसे ते घडत जातात.

मुलांच्या बालमनाला आकार देणारे म्हणजे घरातील सर्व मोठी मंडळी व शाळेतील शिक्षक !

खरचं बालपण किती सुखाचं असतं,दुःख, चिंता,जबाबदारी यांचा संबंध ही आलेला नसतो.आपण आणि आपलं विश्व! निःस्वार्थ ,निष्पाप स्वच्छंदी फुलपाखरासारखं  जगणं म्हणजे बालपण...परींच्या दुनियेची स्वप्न पाहणारं,इसापनीती,पंचतंत्र, चांदोबा या कथांच्या विश्वात रमणारं,बागुलबुवा ची भीती बाळगणारं ,मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारं, मोठ्यांचे अनुकरण करणारं,छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारं,मनासारखं न झाल्यास जोरजोरात रडणारं,हवं ते मिळाल्यास खुदकन हसणारं...

बाल्यावस्था म्हणजे जीवन ग्रंथाच सोनेरी पान!बालपणात आईचे वात्सल्य, वडिलांचे प्रेम,आजी-आजोबा ,नातेवाईकांकडून होणारे लाड,सर्वांकडून केले जाणारे कौतुक या सर्व गोष्टींचा आनंद काही औरचं!

आणि हे सर्व जीवन जगता जगता, व \"रम्य ते बालपण\" याचा अनुभव घेता घेता ... बालपणाचे जीवन संपून कधी मोठे होत जातो हे कळतचं नाही. वाढत्या वयाबरोबर अभ्यास, शिक्षणाचा व्याप वाढत जातो आणि बाळपणीचा सुखाचा काळ संपत जातो.
नवे मित्र,नवी उद्दिष्टे, नवी स्वप्ने, नवे विश्व यात मन रमत जाते.
\"जीवनात काहीतरी मिळवायचे आहे\", या दिशेने जीवनाची वाट सुरू होते. नोकरी, लग्न, संसार या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात आयुष्य गुरफटून जाते.


\"जया अंगी मोठेपण! तया यातना कठीण!!\"

याप्रमाणे,
वाढत्या वयाबरोबर समस्या ही वाढत जातात. कार्य क्षेत्रही वाढत जाते, नोकरी,व्यवसाय, पैसा,प्रसिद्धी यात गुंतुन जातो.निखळ आनंदाला पारखे होत जातो.

मोठे पणी असणाऱ्या जबाबदाऱ्या यामुळे बालपणीच्या कोमल फुलांचे मोठेपणी निर्माल्य होऊन जाते.मात्र त्या फुलांचा सुगंध आठवणींच्या रुपात मनाच्या कोपऱ्यात दडलेला असतो आणि बालपणाचे सवंगडी भेटल्यावर हा सुगंध नव्याने दरवळावा असे वाटते.
तेव्हा तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी आठवतात,

\"लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।।\"

या सुखद आठवणींचा आनंद घेत असताना, साहिलच्या आवाजाने वर्षाचे लक्ष साहिलकडे गेले. तो खेळून दमलेला असतो. साहिलला घरी आणून ,आपल्या कामात रमलेल्या वर्षाचे मन बालपणीच्या आठवणींकडे धाव घेत होते.

रात्री झोपतानांही तिला बालपणापासूनचा ते आतापर्यंतचा प्रवास आठवत होता.शिक्षण,नोकरी, लग्न, साहिलचा जन्म ,साहिलचे बालपण ..आणि जेव्हा साहिलच्या बालपणाचा विचार मनात आला तेव्हा, तिला वाटले..
\"आपले बालपण आणि साहिलचे बालपण...किती फरक!\"

आपल्याला आपल्या बालपणात जे मिळालं ते आपण आता साहिलला देवू शकतो का? आणि साहिलला ज्या गोष्टी आता मिळत आहेत, त्या आपल्याला तेव्हा कधी मिळाल्याही नाही.

आपल्याला जे मिळाले नाही, ते आपण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतो.या स्पर्धेच्या युगात, आपल्या मुलांनी टिकून राहवे यासाठी चांगले राहणीमान, सर्व सुखसोयी, उच्च दर्जाच्या शाळा,ट्यूशन्स, वेगवेगळे क्लासेस हे सर्व आपणच त्यांच्यासाठी करत असतो ना !
जेव्हा मुले आईवडिलांकडे प्रेम,वेळ मागतात तेव्हा आईवडिलांचे उत्तर असते..\"आम्ही हे सर्व तुमच्यासाठी तर करत आहोत ना !\"

आपले बालपण आणि आताच्या मुलांचे बालपण याची तुलना होऊच शकत नाही. काळ बदलला, परिस्थिती बदलली, गरजा बदलल्या, जीवनाची तत्त्वे, उद्दिष्टे बदलली.त्यामुळे आपले बालपण चांगले की आपल्या मुलांचे बालपण चांगले ..हे कसे सांगू शकतो ?

मुले खेड्यातील असो की शहरातील,
गरीबाची असो की श्रीमंताची,
कुटुंबातील असो की अनाथ..

प्रत्येक मुलं हे आपलं बालपण आपल्या पद्धतीने जगण्याचा, आनंदी करण्याचा प्रयत्न करीत असतो.
परिस्थितीचा बालमनावर निश्चित परिणाम होत असतो. पण ते बालमन इतके निष्पाप, निरागस असतं की,त्या मनाला या सर्व गोष्टींशी काही देणंघेणंही नसतं,फक्त त्याला आपल्या बालविश्वात रमायचं असतं..

पुढे आयुष्यात कोणीही कितीही मोठे झाले तरी , प्रत्येकाला आपले बालपण आवडतचं असतं..बालपणाच्या आयुष्यातील सुखदुःखाचे क्षण प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेले असतात.

लहानपणीच्या खोड्या,धम्माल, लाड ,कौतुक, खेळ,उनाडपणा ,गंमतीजंमती आपणास विचारांचे पंख लावुन अलगद भूतकाळात नेऊन सोडतात.... 

मोठे झाल्यावर आपल्याला जगाची ओळख पटू लागते,अनुभवांची शिदोरी असते,परिपक्व विचार असतात ,सुखसोयी पायाशी लोळण घालत असतात.पण पाहिजे असलेला आनंद कोठेतरी शोधत असतो आणि तेव्हा प्रत्येकाला  बालपणीचा काळ सुखाचा वाटतो.


असे असले तरी काळ थांबवणे आपल्या हातात नसते आणि परत मागील काळात जाणेही शक्य नसते.आयुष्य हे पुढे जगायचे असते.

खरंतर प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते पण आपण ते कधी शोधत नसतो.जरी वयाने मोठे झालो तरी बाल्यातील निरागस वृत्ती ही आयुष्यभर जपली तर...एक कोवळ,लवचिक, प्रामाणिक मन जपलं तर...

केशवसुतांच्या शब्दांत सांगायचे तर \"प्रौढत्वी निज शैशवास जपणे\" 


वय,जबाबदाऱ्या विसरून मनाने पुन्हा लहान होऊन बालपणाचा आनंद घेतला तर...

या विचाराने वर्षाला खूप आनंद झाला व त्या आनंदातच तिला शांत झोप लागली.