चिकटवलेली अभिधानं भाग१

A Story Of Women


कथेचे नाव - चिकटवलेली अभिधानं
कॅटेगरी - राज्यस्तरिय कथामालिका
सब कॅटेगरी- सामाजिक कथा


      "अबला म्हणून हिणवू नये,
       स्त्रीच्या भावनाशिलतेला…..!
          प्रसंगानुरूप रुपे तिची
        हरवणे कठिण चंडिकेला…..!!"

         रेवानी सत्काराला उत्तर देतांना चारोळी म्हटली अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला .


        प्रसंग होता "यशस्वी स्त्री उद्योजिका पुरस्कार सोहळ्याचा " सभागृहातील सर्व प्रेक्षकांचे हात पाणावलेल्या डोळ्यांनी टाळ्या वाजवत होते . रेवाची गाथा कुणाचेही डोळ पाणावतील अशीच होती .


           रेवा, श्रीमंताची एकुलती एक मुलगी . लाडाकोडात वाढलेली . नाकी डोळी सुंदर .
स्वभावानी सालस . शिक्षणापुरती बाहेर
पडणारी . एम बी . ए .झालेली परंतु रूढीवादी वातावरणात लहानाची मोठी झालेली . रेवाच्याआईवडिलांवर पुरुषी संस्कृतीचा
पगडा . सामाजिक प्रतिष्ठेला महत्त्व
देणारे . लोक काय म्हणतील ? हा प्रश्न त्यांच्या मनात कोणतीही गोष्ट करतांना
असायचा . त्याच्या ह्या रूढीवादी विचारांमुळे रेवाचे लग्न वयात व्हावे . रेवाचं वाढतं वय पाहून रेवाच्या लग्नाबाबत रेवाचे आईवडिल चिंतेंत
होते . काय तर, रेवाच्या हातावर पांढरे डाग होते . ते पाहून तिचे लग्न जुळत नव्हते .


               आपल्या मुलीचं लग्न नाही झालं तर, आपल्यानंतर तिला कोण सांभाळेल . हेही चिंता त्यांना खात होती .एखादा गरीबाचा होतकरू मुलगा शोधून रेवाचे लग्न लावून दयायचे व त्याला आपण मदत करायची अशीही त्यांची तयारी होती . रेवाचं कसे होईल ? . लग्न न होता समाजात जगणं सोपं नाही . अशी चिंता रेवाचे आईवडिल बोलून दाखवायचे त्यावेळी रेवा म्हणायची ," खरं तर उच्चशिक्षित मुलीला कुणी सांभळण्याच्या चिंतेपेक्षा तिला जगतांना कुणाची तरी सोबत मिळावी ही इच्छा असणे गैर नाही परंतु चिंता वाटणे यातून मुलीला कमजोर समजण्याची , परावलंबी समजण्याची मानसिकता दिसून येते. स्त्री असो वा पुरुष दोघांनाही एकमेकांची सोबत हवी असते .ती केवळ स्त्रीलाच लागते असे
नव्हे ना बाबा ."


      " खरं तर स्रीशिवाय पुरुष अधुरा
       पुरुषाशिवाय स्त्री अधुरी….!
      दोघांनी मिळून करायची असते
       आयुष्याची कहानी पुरी…..!!"

          " स्त्री पुरुषाचं अर्ध अंग म्हणजे अर्धांगीणी . दोघांनाही एकमेकांच्या सोबतीची आधाराची गरज आहे ना बाबा . तरीही स्रीलाच सोबत लागते आधार लागतो असं का म्हटल्या जाते ."


              नाही रे बाळा, "तू आमची लाडाची मुलगी . शिक्षणा व्यतिरिक्त बाहेरचं जग माहित नाही .
कुठला व्यवहार केला नाही . नव्हे तुला कधी तसे काम पडले नाही . त्यामुळे चिंता वाटते आमच्या नंतर तुझं कसं होईल .त्यात आपला समाज पुरुषप्रधान स्त्री ला कमजोर समजून एकट्या स्त्रीचा गैरफायदा घेणारे टपूनच असतात . पुरुषाचा दोष असला तरी मुलींनाच दोष देतात ."


         "बाबा, वेळ आली की सगळं बरोबर जमतं .
चिंता बरी नाही त्याचा तब्येतीवर परिणाम
होतो ".
"हो, झालाच आहे परिणाम . तुझी आई व मी दोघेही कमी वयात हार्ट पेशन्ट झालोत ", बाबा .


              रेवानी तिशी ओलांडली होती . तिच्याघरी तेवढ्यात एक पवार कुटुंब भाड्यानी राहायला
आलेलं . त्यांना दोन मुलगे एकाचं लग्न झालेलं दुसरा मुलगा राजेश . बीन लग्नाचा तीस बत्तीस वर्षाचा .जवळपास रेवाच्याच वयाचा होता . दिसायला देखणा . रुबाबदार . बाई व बाटलीचं तसेच सट्ट्याचं व्यसन असणारा . कुसंगतीत रहणारा . स्वभावानी धूर्त . सरड्या सारखे रंग बदलणारा . विघ्न संतोषी . "इसकी टोपी उसके सर " करून आपले शौक

भागवणारा .बारावी पास . अद्याप काहीही कामधंदा न करता वडिलांच्या भरवशावर खाणारा .


          रेवाचे लग्न न जुळण्याचे कारण त्याला ठाऊक झाले . रेवाचा कोड नसून ते केवळ पांढरे डाग आहेत हे त्याला कळाले . तसही कोड हा काही मोठा रोग नसून केवळ एक त्वचेची समस्या आहे . ही माहिती त्यानी काढली होती . त्यामुळे रेवाला प्रेमजाळ्यात अडकविण्याच्या हेतूने त्यानी रेवाचं वरचं घर भाड्यानी घेण्याचं बाबांना सुचवलं त्याच्या वडिलांना त्याचा दृष्ट हेतू माहिती नव्हता . रेवाच्या घरच्यांना त्याच्या दारूच्या व्यसनांबाबत भनकही लागू दिली

नाही .त्यानी रेवाला प्रेमजाळात फसविण्याचं ठरवले . रेवा समोर व तिच्या कुटुंबियांसमोर खूप आदर्श वर्तन करणे सुरु ठेवले .


          रेवाचे व रेवाच्या आई वडिलांचे मन जिंकून रेवाशी लग्न केले .


                सर्वकाही रेवाचेच आहे म्हणून रेवाच्या वडिलांनी रेवाला त्यांचे जिल्हयांच्या ठिकाणचे घर राहायला दिले . पवार मसाले पापड नावानी छान गृहउद्योग सुरु करून दिला . रेवा व राजेशचा संसार सुरु झाला . रेवा आनंदी होती .


           "मला पांढऱ्या डागांमुळे कुणी स्वीकारत नव्हते त्यामुळे आई वडिल चिंतेत होते . दुःखी होते .
तुझ्यामुळे आज आईबाबा आनंदी आहेत . तुझे माझ्यावर उपकार आहेत ", असे रेवा राजेशला नेहमी म्हणायची .


            दोन ते तीन महिने राजेश रेवासोबत चांगला वागला . तीन महिन्यानी रेवाच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली . ती आई बनणार होती . रेवाचे आईबाबा तसेच सासु सासरे आनंदात होते . रेवाला डॉक्टरांनी काही कारणास्तव काही महिने बेडरेस्ट संगीतली . रेवाची काळजी घ्यायला तिचे सासू सासरे जिल्ह्याला रेवाकडे राहायला आले . राजेशला ते ओळखून होते . रेवाची तो काळजी घेणार नाही त्यांना माहिती होतं .


            तसंच झालं . रेवा गरोदर असतांना तो जास्त बाहेर राहू लागला .त्याला बाई बाटलीचा शौक

होताच . एकदिवस घरी दारू पिऊन उशीरा घरी

आला .रेवाला धक्काच बसला .आजवर तो असा दारु पिऊन घरी आला नव्हता . काही दिवसानंतर दारू पिऊन उशीरा घरी येणं नित्याचच झालं .


             रेवानी दारु पिऊन उशीरा घरी येण्याबाबत टोकलं असता तिच्यावर हात उगारला . राजेशचं हे रूप पाहून रेवाच्या पायाखालची जमीनच सरकली .


         राजेशच्या अशा वागण्याबाबत आईबाबांना सांगीतले तर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल म्हणून तिनी राजेशच्या विचित्र वागण्याबाबत माहेरी सांगीतलं नव्हतं .


        रेवाने सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला . रेवाचे आईवडिल बातमी कळताच बाळ बाळंतीणीसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू व विविध प्रकारच्या मिठाई घेवून बाळ बघायला आले .


        रेवाचे आईवडिल तालुक्याच्या ठिकाणी
राहायचे . रेवाला जिल्हयाच्या डॉक्टरांची ट्रिटमेन्ट असल्यामुळे तिच्या सासुसासऱ्यांनी प्रसुतीसाठी माहेरी पाठवले नव्हते .

      राजेश मात्र उघोगाच्या निमित्ताने बाहेरगावी जातो सांगून मुलीच्या जन्माची बातमी कळाल्यावरही दोन दिवस बाळ बाळंतणीच्या भेटीला आला नाही . रेवाने राजेशला फोन लावला असता राजेश म्हणाला,
" मुलगा झाला असता तर धावत आलो
असतो ."


        राजेशचे विचार ऐकूण रेवा पुरती खचली . तिच्या आनंदावर विरजण पडले . तिच्या डोळ्यातील आसवं ती आईबाबांना सत्य माहित व्हायला नको म्हणून लपवत होती .


क्रमशः


      राजेशचं खरं रूप रेवाच्या आईबाबांना कळेल

           का ? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका .


धन्यवाद !

           कथा आवडल्यास लाईक कमेन्ट व शेऊर जरूर करा .न आवडल्यास माफ करा .


©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे

          टीम - अमरावती

🎭 Series Post

View all