भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 17
मागील भागात आपण पाहिले की हिराबाई आणि निशा एका भुयारात आत गेल्या. इकडे प्रियाकडे असलेली शक्ती पाहून विभावरी संभ्रमात पडली. आता पाहूया पुढे.
हिराबाई आणि निशा किती काळ अंधारात खाली जात होत्या याचा काहीच अंदाज येत नव्हता. बऱ्याच वेळाने प्रकाशाचा झोत दिसू लागला. अचानक दोघींची शरीरे स्थिर झाली आणि त्या दोघींचे पाय जमिनीवर पडले.
भोवताली एक अतिशय प्रगत असे शहर होते. त्यांच्या सभोवती एक स्त्री योद्धा उभी होती. तिने त्यांना आपल्या मागून चालत यायची खूण केली. पर्वत उतारावर वसलेले ते शहर आणि वर असलेला देखणा भव्य राजवाडा. प्रगती अगदी शंभर वर्षे पुढे पण पोशाख आणि भाषा दहाव्या शतकातली. हे सगळे पाहून हिराबाई सुद्धा स्तब्ध झाल्या.
इतक्यात समोरच्या दरवाजातून आत गेल्यावर त्यांना बसायला सांगून ती स्त्री योद्धा निघून गेली. निशा आणि हिराबाई ते दालन पहात होत्या. अनेक सिद्ध पुरुष आणि स्त्री योध्यांच्या भव्य प्रतिमा तिथे लावल्या होत्या. त्याबरोबर अनेक प्रकारची शस्त्रेसुद्धा होती.
सगळे बघण्यात ह्या दोघी मग्न असताना अचानक समोरील दरवाजा उघडला गेला त्यातून एक अतिशय दिव्य सौंदर्य असलेली स्त्री आणि एक पुरुष चालत आले. त्यांच्या चेहऱ्यावर असलेले तेज आणि आत्मविश्वास पाहून त्यांना हिराबाई आणि निशाने नमस्कार केला.
हिराबाई म्हणाल्या,"हे सगळे काय आहे? आम्ही नेमके कुठे आहोत? तुम्ही कोण आहात?"
ती स्त्री हसत म्हणाली,"हिराबाई,तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आमच्याबरोबर चला."
हिराबाई आणि निशा त्या स्त्रिबरोबर आत गेल्या.
निशा आणि हिराबाई आत आल्यावर सर्व दरवाजे आपोआप बंद झाले. ती स्त्री समोरील आसनावर बसली.
निशा म्हणाली,"कुठे घेऊन आलात आम्हाला? तुम्ही नक्की आहात कोण?"
त्यावर तिच्या बरोबर आलेला तो पुरुष बोलू लागला,"ह्या आहेत महाराणी गार्गी आणि आम्ही आहोत महाराज शिवानंद. आता तुम्ही आमच्या नगरात आहात. गेली हजारो वर्ष आम्ही इथे राहून जगातील अदृश्य काळया शक्तींना थोपवत आलो आहोत. हिराबाई,तुम्हाला वेळोवेळी इथूनच मदत मिळत होती."
हिराबाई म्हणाल्या,"मग आजवर तुम्ही समोर का आला नाहीत?"
त्यावर स्त्री बोलू लागली,"आम्ही नियमाने बांधील आहोत. फार हस्तक्षेप नाही करू शकत. आजही तुम्ही दिव्य अस्त्र आणायला चालला आहात. त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन लागेल."
निशा म्हणाली,"तुम्ही सांगाल ते आम्ही करू. विभावरी मुक्त झाली आहे."
महाराज म्हणाले,"आम्हाला ठाऊक आहे. तिने राणी अवंतिकाला मुक्त केले तर मात्र ही लढाई जिंकता येणार नाही."
हिराबाई म्हणाल्या,"ते दिव्य अस्त्र कुठे आहे? तिथवर कसे पोहोचायचे?"
महाराणी गार्गी पुढे आल्या,"हिराबाई,त्या अस्त्रापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तीन सिद्ध पुरुषांना पार करावे लागेल. त्या प्रत्येकाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे उत्तर देत तुम्ही इच्छित स्थळी जाल."
निशा म्हणाली,"मग सांगा आम्हाला."
त्यावर महाराज म्हणाले,"थांब,जसे आम्ही आहोत तशा काळया शक्तीसुद्धा आहेत. पहिल्या सिद्ध पुरुषापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तीन चेटकीण बहिणींना हरवावे लागेल."
महाराज पुढे बोलू लागले,"निशा,तुझ्या सर्व शक्ती जागृत कराव्या लागतील. हिराबाई स्वतः एक योद्धा आहेत.त्यांच्या स्मृती जा लागतील.चला आमच्या बरोबर."
महाराणी गार्गी आणि महाराज त्या दोघींना एका गुप्त दालनात घेऊन गेले. तिथे एक दिव्य वृक्ष होता.
महाराणी म्हणाल्या,"समोरील दिव्य झऱ्यात स्नान करून ह्या आसनावर बसा."
महाराज बाहेर निघून गेले. आता पुढील विधीला सुरुवात झाली.
इकडे प्रिया आणि विनय सर्वांना सुखरुप घरी घेऊन आले. विभावरी प्रचंड संतप्त झाली होती. निरंजन आणि वैदेही दोघांनी तिला दोनशे वर्षांपूर्वी कैद केले. ही मुलगी कोण आहे? तिच्याकडे निरंजनच्या शक्ती कशा?
वाड्यावर सगळे पोहोचले. प्रियाला काहीही कळत नव्हते.अचानक तिच्यात ही शक्ती आली कशी? सगळेजण दमले होते.
प्रियाने सर्वांना सांगितले,"आता आपण सुरक्षित आहोत. वाड्याचे कवच ते भेदू शकत नाहीत."
विनय म्हणाला,"जयवंत काका बरोबर मी झोपतो."
सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले.
इतक्यात विहान बरोबर आलेली ती मुलगी उठली. तिने एकदा त्याच्याकडे पाहीले. नंतर हातात सुरी घेतली. ओठ दाताखाली घट्ट आवळून तिने मांडीवर काप दिला.त् यातून एक छोटी कुपी बाहेर काढली.
त्यानंतर तिने मांडीवर आवळून पट्टी बांधली आणि कूपी उघडली. त्याबरोबर आतून चार काळया सावल्या बाहेर पडल्या. तिने इशारा करताच एका सावलीने तिच्यात प्रवेश केला. इतर सावल्या उरलेल्या तिघात प्रवेश करत होत्या. विहानच्या शरीरात काळया सावलीला प्रवेश मिळेना. ती सावली कुपीत परत बंद झाली.
त्या मुलीने विहानला हात लावायचा प्रयत्न केला पण तेही तिला जमेना. शेवटी ते तिघे दबक्या पावलांनी जयवंत सरदेसाई यांच्या खोलीकडे जाऊ लागले. खोलीत येताच तिने एक आणखी औषधी कुपी बाहेर काढली. तिचे झाकण उघडताच एक औषधी हवेत पसरली
दुसऱ्या दिवशी उमाच्या तोंडावर उन्हे यायला लागली. तिने डोळे किलकीले केले. समोरील घड्याळात तासाकाटा अकरा ह्या आकड्यावर पाहून उमा खाडकन जागी झाली. तिने प्रियाला हलवून जागे केले.
प्रियाने घड्याळ पाहिले आणि धावत सुटली. खाली जयवंत काका आणि विनय दोघेही नव्हते.
प्रिया ओरडली,"कसे शक्य आहे?"
तेवढ्यात विहान पळत आला,"माझ्याबरोबर आलेले तिघे जण खोलीत नाहीत."
प्रियाला उत्तर मिळाले होते.
स्वाती म्हणाली,"प्रिया,आता काय करायचे?"
प्रिया म्हणाली,"अमावस्या अजून तीन दिवसांनी आहे. तोवर विभावरी त्यांना काहीच करणार नाही. मला आधी तो ग्रंथ वाचू दे."
तेवढ्यात विनायक धावत आला,"प्रिया, गावाच्या आठही दिशांना असलेल्या पवित्र संरक्षक वृक्षांपैकी दक्षिण दिशेला असलेला वृक्ष नष्ट झाला आहे."
प्रिया म्हणाली,"याचा अर्थ गावाभोवती असलेले कवच तुटले आहे. मी ग्रंथ वाचते. काहीही झाले तरी वाड्याच्या बाहेर जाऊ नका."
प्रियाने तो ग्रंथ उघडला.
त्यावर लिहिले होते,"मी निरंजन आज माझ्या रक्ताच्या वारसासाठी हा ग्रंथ लिहीत आहे. यातील मंत्र केवळ माझा वारस वाचू शकेल."
प्रियाने थरथरत पुढील पान पालटले आणि तिला अक्षरे स्पष्ट दिसू लागली. प्रियाला कळेना की तिचे बाबा निरंजन कसा असेल?"
माझे बाबा तर एक सामान्य व्यक्ती आहेत. पण जर मी निरंजनची वारस असेल तर मंत्र दिसू लागतील. थरथरत्या हाताने प्रियाने पान उलटले.
तेवढ्यात मंत्र उमटू लागले. प्रिया भराभर ते संरक्षण देणारे मंत्र वाचू लागली. जवळपास आठ तास तिने तो ग्रंथ वाचला. शेवटचे पान उलटले आणि त्यात एक पत्र होते.
तिने पत्र उघडले,"ज्या अर्थी तू हे मंत्र वाचत आहेस त्या अर्थी काळया शक्तींनी मला संपवले आहे. हा ग्रंथ कायम जपून ठेव. तुला एक भाऊ आहे. फक्त त्याची आई वैदेही आहे.जमल्यास त्याचा शोध घे."
विनय शुध्दीवर आला. त्याला बांधलेले होते.समोर तिक्षिता उभी होती.
त्याच्या जवळ जात ती म्हणाली,"चेटकीण वंश वाढवण्यासाठी आता तू माध्यम होणार आहेस."
विनय चिडला,"असे कधीच होणार नाही. आजी मला वाचवायला येईल."
विभावरी म्हणाली,"निरंजनची मदत नसती तर सगुणाबाई कधीही मला कैद करू शकल्या नसत्या. आता निरंजन ह्या जगात नाही. तिक्षिता ह्या दोघांना विवस्त्र कर. त्यांच्या शरीरावर काही विधी करावे लागतील."
तिक्षिता हसत पुढे झाली.
विनय गरजला ,"खबरदार मला हात लावशील तर."
तिक्षिता उपहासाने म्हणाली,"हात न लावता मी हे करू शकते."
तिने एक मंत्र म्हणातच विनय आणि जयवंत दोघांच्या अंगावरील वस्त्रे विरून गेली.
हिराबाई अस्त्र घेऊन येतील का? प्रिया शक्ती वापरू शकेल का? वैदिहीचा मुलगा कोण असेल?
वाचत रहा.
भय इथले संपत नाही.