पण कशाला उगाच आपल्याच माणसांना नावं ठेवायची म्हणून ती दुर्लक्ष करायची. सुहासचं गावी जाणं वाढतच चाललं होतं. स्वतःच्या घरासाठी सुट्टीच्या दिवशी भाजीपाला, किराणा वगैरे आणायचं सोडून तो गावी पळायचा. घराचा सगळा भार किर्तीवर पडत असे. शहरात तो फक्त नोकरीसाठी राहत होता. बाकी त्याचं सगळं मन गावी.
एकदा मुलांच्या शाळेत महत्वाची मिटिंग होती. किर्तीने त्याला तसं सांगितलं पण मला जमणार नाही, गावी जायचं आहे म्हणून तो सतत टाळत राहिला...
हे सतत होत राहायचं आणि कीर्तीची सहनशक्ती संपायची..
"संसाराचा ठेका फक्त मीच घेतलाय का? तुम्हाला तुमची भावंडंच हवी होती तर राहायचं ना त्यांच्यासोबतच, कशाला लग्न केलंत? इथे सुट्टीच्या दिवशी कधी फिरायला जाऊ म्हटलं, खरेदीला जाऊ म्हटलं तर नाही...साहेब सकाळी सकाळी बसमध्ये जाऊन बसतात...तुमची सख्खी भावंडं त्यांच्याकडे तरी बघा..सगळी आपापल्या शहरात आपापला संसार सांभाळताय..वर्षातून एकदा फक्त गावी चक्कर मारतात...तुमच्यासारखं उठसुठ जाऊन बसत नाहीत..त्यांच्याकडे जाऊ म्हटलं तर तर नको तुम्हाला..."
त्यांचे कायम यावरून वाद होत. पण पुढच्याच महिन्यात एका चुलत दिराचं लग्न असल्याने यावेळी दोघांनाही जावं लागणार होतं. सुहास काहीही काम नसतांना 8 दिवस सुट्टी टाकून आधीच गावी निघून गेला. 2 दिवस आधी कीर्ती आणि मुलं तिथे पोहोचली.
गावी जाताच कीर्ती आणि मुलं आपल्या आजी आजोबांच्या घरी थांबली. गावाकडे एकाच वाड्यातली म्हणजे सगळे चुलते एकाच रांगेत राहत. कीर्ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, "हे कुठे दोस्त नाहीत.."
"तो घरात असतो का कधी, आल्या आल्या आपल्या चुलत भावंडं सोबत जातो तो डायरेक्ट रात्रीच परत येतो.."
हे ऐकून किर्तीला अजूनच धक्का बसला. आई वडिलांसाठी सुहास गावी जातो हे एकवेळ मान्य करता येण्यासारखं होतं, पण हे भयंकर होतं..