बंध रेशमाचे......

श्रावणी लोखंडे

मनीष आणि स्नेहा.….....कॉलेजमध्ये एकत्रच......म्हणजे एकाच कॉलेज मध्ये फक्त वर्ष वेगवेगळी......... मनीष लास्ट इयरला तर स्नेहा सेकंड इयरला......दोघांची भेट 
मराठी एकांकिका दरम्यान झाली......मनीष नाकी डोळी नीटसं आणि कृष्णवर्णी होता आणि शांत स्वभावाचा......तर स्नेहा नाजूक पण करारी होती मानेच्या खाली केसं, बारीक डोळे........हसल्यावर तर डोळे उघडे आहेत की बंद हेच कळत नसे......अशी ही दोघ........

बंध प्रेमाचे असं एकांकिकेच नाव होतं......दोघेही लीड रोल मध्ये........मुलगी गरीब घराण्यातली आणि मुलगा करोडपती......दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. तसं तर तो फक्त मित्रांसोबत पैज लावतो म्हणून तिच्याशी प्रेमाचं नाटकं करतो........पण त्याच्याही नकळत तो खरचं तिच्यावर प्रेम करायला लागतो......पण त्याला कळत नसतं.  एक दिवस ती मुलगी मैत्रिणीसोबत एका गार्डन मध्ये जाते तिथे ती त्याला मित्रांसोबत बोलताना ऐकते आणि तिला धक्काच बसतो.ती मागच्या बाजूने बाहेर येऊन त्याला तिच्या मनाशी खेळ करण्याचा जाब विचारते पण तो उर्मठपणे तिच्याशी बोलू लागतो. स्नेहा गरीब घरातली मुलगी असल्याने ती फार घाबरते कारण त्याने लग्नाचं वचन देऊन तिच्याशी शरीर संबंध ठेवलेले असतात. ती पण त्याच्या प्रेमाखातर स्वतःला त्याच्या पुढे समर्पित करते. तिला हे सगळं आठवून आता घाम फुटायला लागतो.तिची मैत्रीण तिला सावरते आणि घरी घेऊन जाते.अश्यातच तिची पाळी चुकते आणि तिला ती गरोदर असल्याचं समजते पण वेळ निघून गेलेली असते......ती त्याला जाऊन सगळं सांगते पण तो हे सगळं नाकारतो आणि तिला धुडकावून लावतो. पण त्याला त्याच मन त्याच तिच्यावर खरंच प्रेम असल्याची कबुली देतो.......तो परत तिच्या मागे तिला शोधायला जातो पण ती कुठेच सापडत नाही. त्यांच्या सोसायटी पासुन चालतच पंधरा मिनिटांवर स्टेशन असत त्याच्या मनात काहीतरी विचार येतो आणि तो गाडी घेऊन तडक तिकडे निघतो पण त्याला खूप उशीर झालेला असतो. तिच्यावर खरचं प्रेम आहे का????हे पटवून घ्यायला त्याला वेळ लागतो आणि इकडे ती स्वतः सोबत त्या निष्पाप जीवाची पण राख करते.....त्याच्या डोळ्यांदेखत ती एका एक्स्प्रेस समोर येऊन सगळा खेळ संपवते....... तो तिथेच उभा राहून जीव सोडतो आणि दोघेही वरती एकत्र येऊन आपली प्रेम कहाणी पूर्ण करतात अशी त्या एकांकिकेची कहाणी असते.......

मनीष आणि स्नेहा पण त्या किरदारांमध्ये जीव ओतून ती पात्र जिवंत करतात......त्या महिन्याभरात मनिषला स्नेहा आवडू लागते आणि अर्थात स्नेहाला पण मनीष आवडू लागतो.पण त्यांच्या एकांकिकेमध्येच मेल्यावर प्रेम एकत्र येते........अस असल्याने दोघेही व्यक्त व्हायला घाबरत असतात. शेवटी दोघांनाही एकमेकांच्या मित्रांकडुन त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर असलेले प्रेम समजत.

दोघे समोरासमोर येऊन व्यक्त होतात आणि शेवटी एकत्र होतात......मनीष चं शेवटचं वर्ष पूर्ण होऊन तो पुढे आयटीआय क्षेत्रात जॉब करू लागतो. स्नेहाला पण त्यांच्याच कॉलेजमध्ये मुलांना अभिनयाचे धडे देण्याची जबाबदारी पडते.ज्या कॉलेजमध्ये शिकली त्याच कॉलेजमध्ये नोकरीची संधी खूप कमी जणांना मिळते.


दोघांच्या नात्याला सहा वर्षे पूर्ण होत आलेली असतात आणि मनीषचं त्याच्या ऑफिस मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून प्रमोशन झालेलं असतं त्याचंच अवचित्य साधून दोघांनी घरी त्यांच्या नात्याबद्दल सांगायचं ठरवलेलं असत.


दुपारी प्रमोशन ची अनाउन्समेंट झाल्यानंतर संध्याकाळी मनीष त्याच्या आईवडिलांना घेऊन स्नेहाच्या घरी जातो.निघण्याआधी तो आई वडिलांना थोडी कल्पना देऊनच निघतो. घरी गेल्यावर सगळ्यांची ओळख करून दिल्यानंतर मनीष सगळ्यांना त्यांच्या नात्याबद्दल सांगतो. सगळं चांगलं आहे म्हंटल्यावर दोन्ही घरचे राजी खुशी तयार होतात. मनिशच्या घरचे स्नेहाला रीतसर मागणी घालून लग्नाच्या बोलणी साठी भेटण्याची तारीख ठरवतात. 


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मनीष आणि स्नेहा समुद्रकिनारी भेटतात. रात्री मित्रांना पार्टी देऊन..... बाहेरच जेवणं करणार असल्याच दोघेही आपापल्या घरी कळवतात. मनीष आणि स्नेहा दोघेही खुप खुश असतात.इतक्या वर्षाचं नात आता नवीन वळण घेणारं असतं....... दोघांनाही एक अनामिका अशी हुरहूर लागलेली असते...... चपला बाजूला काढून दोघेही वाळूत चालत असतात. दोघांचेही हात एकमेकांत घट्ट गुंफलेले असतात.....ज्यात कधीच वेगळं न होण्याची शाश्वती देत असतात. डोळे एकमेकांना विश्वासाची हमी देत असतात आणि हृदय आता स्वतःसाठी नाही तर आता आपल्या जोडीदारासाठी कायम धडधडत राहील असं जणू एकमेकांना न बोलता सांगत असतात. 


मुळात कमी बोलणारा दोघांचा स्वभाव स्नेहा कमी बोलणारी असली तरी तडफदार होती.दोघही समजूतदार यामुळे इतक्या वर्षात कधीच दोघांमध्ये वाद किंवा रुसवे फुगवे झाले नाही. दोघेही वेळेचे पक्के......खोटं बोलणं,उगाच खर्च करणं, विनाकारण फिरणं हा स्वभाव दोघांचाही नाही...... माणूस म्हणून मतं जरी वेगवेगळी असली तरी त्या मतांमुळे दोघांमध्ये अबोला कधी आलाच नाही.…...दोघे एकत्र असताना बाहेरचे वाद कधीच डोकं वर काढत नसे...... इंशॉट दोघेही "मेड फॉर इच अदर" .........


दोघांच्याही घरून मोजकेच पाहुणे आणि मित्र परिवार उपस्थित होता.......लग्न छान पार पडलं......पूजा आणि इतर सगळे विधिवत पूर्ण झाले.दोघेही बाहेरगावी फिरायला जाऊन नविन आयुष्याचे सोनेरी क्षण जगून आले होते........घरी येऊन चार दिवसाच्या सुट्टीनंतर दोघेही कामावर रुजू झाले.....


मनिषला आधीपासून आईला कामात आणि जेवणात मदत करायची सवय होती. तो स्नेहाला पण रोज सकाळी सगळ्या कामात मदत करत होता.दोघांच आणि घरातील सगळं आवरून स्नेहा कॉलेजमध्ये जायची तीच काम फक्त तीन साडे तीन तासांचा होतं. गॅदरिंग किंवा कुठल्या कार्यक्रमदरम्यानचं तिला घरी यायला उशीर व्हायचा.......


सहा महिन्यातच राजराणीच्या संसारात नवीन पाहुण्याची चाहूल लागते.सगळेच खूप खुश असतात.स्नेहा पण तिचे लाड पुरवून घेत होती. सातव्या महिन्यात ओटी भरणी झाली. स्नेहा फक्त दोन दिवसांची माहेरी गेली होती.तशी तर आपल्याकडची रीत आहे की मुलीचं पहिलं बाळंतपण हे माहेरी होत,पण ही रीत घरात कोणी मानत नव्हतं.पहिलं बाळंतपण माहेरी........ सगळा खर्च मुलीच्या माहेरच्यांचा आणि नातवंड म्हणून मिरवणार कोण तर सासरची माणसं...... जस काय सगळं यांनीच केलं. म्हणून ही रीत घरात कोणी मानत नव्हतं.नऊ महिने पूर्ण झाले आणि स्नेहाने गोंडस मुलीला जन्म दिला.बाळंतपणाचा सगळा खर्च दोन्ही कुटुंबांनी वाटून केला होता. "पहिली बेटी, धनाची पेटी" सगळे खूप खुश होते. सगळयांनी बाळ आणि बाळंतिणीच जोशात स्वागत केलं.बारशाच्या दिवशी  घर रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं, दोघांचेही कॉलेज फ्रेंड्स आले होते,घरात खुप सारी खेळणी आणली होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं.......... मुलीचं नाव "द्विजा" ठेवलं. पण म्हणतात ना........आनंदी घर देवालाही हवसं वाटते तसंच झालं.........रसगुल्ले आणायचं निमित्त झालं आणि काळाने चांगलीच चपराक लगावली.


मनीष रसगुल्ले घेऊन घरी निघालाच होता की मागून ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि तो ट्रक सरळ मनिशच्या अंगावर चढला.त्याला क्षणात काय झालं हे कळलं सुद्धा नाही. तो तिथेच गतप्राण झाला.


मनीष आला नाही म्हणून त्याच्या मित्राने फोन केला तर बाजूच्या एका दुकानदाराने फोन उचलून मनीष सोबत झालेला प्रकार सांगितला.दुकानदाराच बोलणं ऐकून तो तिथेच खाली बसला. घरात अचानक एवढी शांतता बघून स्नेहा बाहेर आली. स्नेहाच्या आई ने स्नेहाला सगळं सांगितलं. मनीष बद्दलची बातमी ऐकून स्नेहा स्तब्ध झाली. मनिशची बॉडी दारात आली होती. चालत गेलेला मनीष हा असा येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. सगळे रडत होते पण स्नेहा मात्र शांत राहून त्याला बघत होती....... त्याला शेवटचं डोळ्यात साठवून घेत होती. मनिषला उटणं लावून आंघोळ घातली त्याच्यावर हार चढवले........सोसायटीच्या काही बायकांनी मिळून स्नेहाला तयार केली. केसात वेणी माळली,कपाळावर भलं मोठं कुंकू लावलं,चुडा भरला,मंगळसूत्र घातलं, स्नेहा नव्या नवरीसारखी भासत होती.तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, एक वेगळीच चकाकी होती.........स्नेहा आरश्यात स्वतःच रूप न्याहाळत होती.तेवढ्यात बाहेरून आवाज आला......
स्नेहाला बाहेर घेऊन या असा........त्या बायकांनी मिळून तिला बाहेर नेलं,तिची ओटी भरली.........आणि काही वेळाने तिला सजवणाऱ्या बायकाच तीच सौभाग्याचं लेणं काढून घ्यायला पुढे आल्या.........त्यांनी तिचं मंगळसूत्र वाढवायला म्हणून हात लावलाच होता की मागून आवाज आला..........


खबरदार..........खबरदार जर तिच्या मंगळसूत्राला कोणी हात लावला....... ती माझी सून नाही लेक आहे आणि माझ्या लेकीला मी लंकेची पार्वती नाही होऊ देणार......हे रीती रिवाज मी पण मानते..... पण मी या पोरीला भुंडी नाही बघू शकत........लेक गेला माझा.......पण माझी लेक कायम अशीच राहील. "स्नेहाची सासू"


अहो ताई.......पण ही प्रथाचं आहे........नवरा गेला की शेवटचं त्या बाई ला सवाष्ण म्हणून तयार होऊ द्यायचं असतं......."शेजारच्या बाई"


का शेवटचं........?????तिचं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचं हे ती ठरवणार तुम्ही किंवा मी नाही........"स्नेहाची सासू"


सौभाग्याचं लेणं........ नवरा गेल्यावर काय कामाचं......ते पुसून टाकावचं लागते......."शेजारची बाई"

अहो कुठलं सौभाग्याचं लेणं......... मुलगी जेंव्हा जन्म घेते तेंव्हा तिच्या कपाळावर पहिलं हळदी कुंकू तिची आई लावते........मुलगी जेंव्हा घरभर धावू लागते तेंव्हा तिच्या पायात पैंजण आई बांधते........मागच्या दारात अबोली फुलली की त्याचे दोन गजरे करून एक स्वतःच्या केसांत आणि दुसरा लेकीच्या वेणीत आई माळते........ या गोष्टी तिच्या पासून हिरावण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी....??? आणि राहता राहिला प्रश्न मंगळसूत्र,जोडवी आणि चुड्याचा......तर तो काढायचा की नाही हे माझी लेक ठरवेल तुम्ही नाही.......... तुमची ही प्रथा मी मुळीच पाळणार नाही..........."स्नेहाची सासू"


शेवटी वाद थांबावा म्हणून काही पुरुष मंडळी पुढे येऊन मध्यस्ती करून मनीष च पार्थिव उचलू लागले....….स्नेहा मात्र मुळीच रडली नाही कारणं तिला खचायचं नव्हतं..तिने शेवटचं मनिषला डोळे भरून बघून घेतलं आणि मनात त्याच शेवटचं रूप साठवून ठेवलं........साश्रु नयनांनी तिने त्याला शेवटचा निरोप दिला.........घरात येऊन गरम पाण्याने आंघोळ केली आणि ती तिच्या बाळाकडे झेपावली........


बाळा........असं दुःख मनात नको साठवून ठेवू रडून मोकळी हो स्नेहा........"स्नेहाची आई"


अगं आई......मी खरचं दुखी नाही जिची सासरची माणसं एवढी समजूतदार आहेत ती भला दुखी का असेल.....उलट मी खूप खुश आहे की मनीष नंतर मी एकटी नाही.......... हां आता...... त्याची कमी आयुष्यात कायम राहील पण त्याच्या आठवणी पुष्कळ आहेत माझ्यासाठी........त्यात आमचं हे पिल्लू पण तर आहेचं....... अगदी बाबांवर गेली आहे.......... "स्नेहा"

नकळत तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या........
चल आता सगळं आवरते.

मनीशचे सगळे कार्य आटपतात. संध्याकाळी स्नेहा आई कडे म्हणजे सासुकडे थोडे दिवस आराम करून पुन्हा कॉलेज जॉईन करायचा विषय काढते.......


आई.......मी काय म्हणते.......आता मनीशचे सगळे विधी आटोपलेत आहेतच तर थोडे दिवसात कॉलेजला रुजू होईन....."स्नेहा"

अगं..... मीच तुला विचारणार होते......कॉलेजला जाणार आहेस की नाही पण म्हंटल मी विचारायचे आणि तुला परत अस वाटायचं की आत्ताच नवरा गेला आणि आई मला कामाचं विचारताहेत.म्हणून मी काही बोलले नाही...."स्नेहाची सासू"

मला का असा वाटेल......उलट आता आपण सगळ्यांनी धीराने घेतलं पाहिजे......"स्नेहा"

तू खमकी आहेस ना.......मग बस झालं.......थोडे महिने कर काम मग तुझ्या साठी....... तुझ्या योग्य वर शोधून आम्ही आमच्या जबाबदारीतून मोकळे होऊ.......कालचं मनीष स्वप्नात आला होता..........मला म्हणे माझ्या स्नेहुच आयुष्य मार्गी लावा फक्त..........चांगला मुलगा बघून आम्ही स्वतः तुझं कन्यादान करू......."स्नेहाची सासू"

नशीब थोर......माझ्या मुलीचं....... जिला एवढं समजून घेणार सासर भेटलं.......नाही तर नवरा गेला की लोक लगेच सुनेला त्रास द्यायला सुरू करतात......खूप काही पुण्य केलं होतसं तू मागच्या जन्मी म्हणून एवढं सुरेख सासर भेटलं.........."स्नेहाची आई"( हात जोडून स्नेहाच्या सासूचे आभार मानते.)

अहो ताई.......हात काय जोडताय.......स्नेहा आमची पण लेकचं आहे....... असं हात जोडून परकं नका हो करू......"स्नेहाची सासू"

मला दुसर लग्न नाही करायचं.........आणि तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना!!! पण मला आता तुमचा मुलगा व्हायचं आहे......."स्नेहा"


अगं पण आयुष्यात सुख दुःखात जोडीदाराची गरज भासतेच........"स्नेहाची सासू"


माझा जोडीदार आहे की अजून माझ्या सोबत....... स्नेहा मनिशच्या फोटो समोर जाऊन उभी राहते.......

सोबत नसलास तरी तुझं अस्तित्व जाणवतं मला........तुझा अनामिक सहवास हवाहवासा झालाय मला........हयात नसलास तरी मनात कायम आहेस आणि राहशील.......मी फक्त तुझीच आहे आणि मला कायम तुझीचं बनून रहायचं आहे........ आपल्या दीड वर्षाच्या संसारात तू माझ्या आई वडिलांना पण कधीच सासू सासरे मानलं नाहीस. तुझ्या आई वडिलांसारखचं प्रेम दिलंस.......सासरी जाऊन राहण्यात प्रत्येक मुलाला कमीपणा वाटतो पण तू दर शनिवारी रविवारची सुट्टी माझ्या सोबत माझ्या माहेरी येत होतास. माझ्या आई वडिलांची काळजी घेत होतास त्यांच्या सोबत गप्पा मारत होतास.......त्याचा जावई नाही मुलगा होतास तू..........आणि मला आता या दोन्ही घराचा मुलगा बनायचं आहे......... त्यात तुझी सोबत हवी आहे........ मला साथ देशील ना.......!!!!! "स्नेहा" 


तो क्षण असा होता त्यात दोघीही स्नेहाच्या खांद्यावर विश्वासाचा आणि धीरचा हात ठेवून त्या दोघी तिच्या सोबत नेहमी असतील असं आश्वास्थ करतात आणि थंडगार वाऱ्याची झुळूक स्नेहाच्या चेहऱ्याला स्पर्शून जाऊन मनीषही तिच्या सोबत असल्याची जणू चाहुलच देत होता. ती मनिषचा हार घातलेला फोटो काढून तिथे त्यांच्या लग्नाचा फॅमिली फोटो लावतो. मनीषचा फोटो ती कबाट मध्ये ठेवून देते कायम साठी.घरात फक्त मनिषचा वाढदिवस साजरा होतं होता.त्याची पुण्यतिथी कधीच केली नाही.

पंचवीस वर्षांनी.............


द्विजा......... मनीष आणि स्नेहाची मुलगी........... ती पण आता मोठी झाली होती. कॉलेजमध्येच एक मुलगा तिला आवडत होता.......दोन आठवड्यात तो अमेरिकेत जाणार होता त्यांचा फॅमिली बिजनेस साठी.कारण त्याचे वडील हृदयविकाराच्या झटक्यात गेले होते. जाण्याआधी तो स्नेहाला भेटून सगळ सांगितलं. मुलगा चांगला आहे म्हणून तिने त्यांच्या नात्याला ग्रीन सिग्नल दिला. दोनच आठवड्यात घरगुती विवाह सोहळा करून दोघेही अमेरिकेत गेले.


इकडे आता फक्त स्नेहा  आणि आई बाबा होते. ते ही आता फार थकले होते. स्नेहाच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले मग तिचे बाबा स्नेहा सोबत राहू लागले तिच्या सासरी.त्यांचा वेळ तर जात होता,पण बायको नसल्याने ते पोरके झाले होते.....आई पाठोपाठ महिन्याभरातच ते पण गेले........

स्नेहा पण तिच्या कामात व्यस्त होती. मनीषची आठवण यायची खूप पण इतकी वर्षे तिने त्याच्या आठवणीत काढली होती. तिला पण माहित नाही पण हल्ली ती खूप एकटं एकटं राहत होती.


एक दिवस तिने सासूला खोलीत बोलवून घेतलं.दोघी पण मनिशच्या आणि स्नेहाच्या लग्नाचे अलबम बघत बसल्या होत्या.थोड्यावेळाने सासरे पण चहा आणि स्नॅक्स चा ट्रे घेऊन आले, आणि ते पण त्या दोघींना जॉईन झाले.लग्नाचे फोटो त्यातल्या गमती जमती असे बरेचसे किस्से सांगून.......ऐकून सगळे हसत होते. तहान लागली म्हणून स्नेहा पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेली आणि तिथेच तिच्या जीवनाची प्राणज्योत कायमची मालवली.......


सासू सासऱ्यांसाठी हा खूपच मोठा धक्का होता. द्विजा पण तिच्या नवऱ्यासोबत मुंबईत आली.तिचे आजी आजोबा खूप हेल्पलेस झाले होते.त्यांच्या जगण्याचा आधार त्यांना हसताखेळता सोडून गेला होता.


स्नेहाचे सगळे विधी तिच्या सासऱ्यांनी बाप म्हणून पूर्ण केले. शेवटच्या क्षणी पण तिला सौभाग्यवती म्हणूनच निरोप दिला. हिरवीकंच साडी, मोगऱ्याचा गजरा,हातभार चुडा,कपळावर मळवट भरलेली स्नेहा अगदी नव्या नवरी सारखीचं दिसत होती. इतक्या वर्षांनी नवऱ्याला भेटण्याचा तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं.
स्नेहाचा आत्मा परमात्मात विलीन झाला........

मनीष तिकडे तिची वाटच बघत होता.

स्नेहा हिरव्या साडीत वर जाते तर मनीष तिथे पांढऱ्या शुभ्र कपड्यात उभा असतो तिच्या स्वागतासाठी. स्नेहा आणि मनीष एकमेकांना कडकडून मिठी मारतात.दोघेही खूप रडतात.

बापरे.........इकडे किती पांढर शुभ्र दिसतंय......."स्नेहा"


अगं आपण स्वर्गात आहोत........ते काळकुळकुळीत तिकडे पाताळात असत........आपण नेहमी पुण्याचं काम केलं ना म्हणून स्वर्गात आलो......."मनीष"


खरचं की काय.....??? म्हणचे तू माझ्या आई बाबांना पण भेटला असशील ना......??"स्नेहा"


हो मग .......मी इकडे फॅमिली गेट टू गेदर  साठीच आलोय ना........!!!काय तू पण विचारतेस........मी इकडे तुझी वाट बघतोय तर म्हणे हे आले का...... नि ते आले का???? "मनीष"

बरं बरं सॉरी........पण मनीष.........आता आपण कधीच वेगळं नाही व्हायचं.......कायमची साथ देणार अस वचन देऊन फक्त दीड वर्षाचा संसार केला आपण तुझी रसगुल्ले खाण्याची इच्छा किती भारी पडली बघ........"स्नेहा"

जे झालं ते झालं......जाऊदे .........आपली सोबत तेवढीच होती......... पण आता मी सगळ्या उणिवा भरून काढणार आहे.......आता आपण कधीच वेगळं नाही व्हायचं....."मनीष"

हो...........कधी म्हणजे कधीच वेगळं नाही व्हायचं......."स्नेहा"

 ती त्याचा हात घट्ट पकडत बोलते........दोघेही एकमेकांचा हात पकडून आता शेवटचा प्रवास सोबत करायचं ठरवून निघून जातात.........हिरव्या साडीत असणारी स्नेहा आता पांढऱ्या शुभ्र कपड्यात आली होती.........

हे बंध रेशमाचे... आता कधीच तुटणार नव्हते...

समाप्त..........

कथा कशी वाटली हे कमेंट द्वारे जरूर कळवा.......

धन्यवाद...????????????????