बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 33

बाबा वैभव मला पसंत आहे लग्नासाठी, एकदा ठरलय ना माझ लग्न मग का अस करताय तुम्ही? , दुसर्‍या स्थळासाठी मी तयार नाही, मला ते जमणार नाही, बाबा मला वैभव सोबतच राहायचं आहे",..


बंध हे प्रेमाचे... ❤️ भाग 33

कधीही न तुटणारे.....

©️®️शिल्पा सुतार
..............

मीनल कडे नवरदेवा कडची मंडळी आली, सगळ्यांचा चहापाणी झालं, आनंदी वातावरण होत, जरावेळ गप्पा टप्पा झाल्यानंतर दुपारचं जेवणाची पंगत बसली, जेवण झालं, सोनल प्रिया बाहेर येऊन बसल्या, मीनल च घर जवळच होतं, तिथून सोनल च घर दिसत होत

"सोनल तुमच्या घरासमोर बघ कुणाची तरी गाडी उभी आहे",.. प्रिया

सोनल ते नीट बघितलं,.." ती संतोष ची गाडी आहे, आक्का आत्या आल्या असतील बहुतेक",

" आता कशाला आल्या आहेत त्या?",.. प्रिया

"तेच केस मागे घ्या, आम्हाला माफ करा सुरु आहे त्यांच",.. सोनल

"वाईट वागताना काही वाटलं नाही का त्यांना?, आज काही करता काही झाल असत तर काय केल असत आपण ",.. प्रिया

"हो ना तेच, राहुल च्या घरचे किती नाराज आहेत माझ्या वर, मी पण रागावले होते राहुल वर, किती प्रॉब्लेम झाले इकडे त्यांच्या मुळे, मी आता अजिबात संतोषला माफ करणार नाही, मला जरा त्याला शिक्षाच व्हायला हवी आहे, त्यामुळेच त्याला समजेल की दुसऱ्याचे नाव घेण काही सोपी गोष्ट नाही, त्यामुळे काही लोकांनी धडा घ्यायला पाहिजे, दुसर्‍याच्या मनाविरुद्ध त्याच्या मागे मागे करू नये ",.. सोनल

" बरोबर आहे त्याला अजिबात माफ करू नको, आता काय करायचं? आपल्याला घरी जायचं होतं ना, तयारी करायला ? ",.. प्रिया

" मी येऊ का तुमच्याकडे प्रिया? , आत्या गेल्यानंतर जाईन घरी, मला अजिबात बोलायच नाही त्यांच्याशी, एक तर त्यांना काही समजत नाही उगीच बोलत राहतात त्या आत्या ",.. सोनल

" हो चालेल ना, जावु आपण माझ्या घरी, आणि असं का विचारते आहेस तू?, केव्हाही माझ्या घरी येऊ शकते, तू जर म्हणशील तर तुझा ड्रेस मी घेवून येईल तुमच्या घरून, आपण तयारी करू आमच्या कडे ",.. प्रिया

"हो चालेल बघु जरा वेळ वाट, आक्का आत्या नाही गेल्या तर करू काहीतरी",.. सोनल

"मीनल आम्ही थोड्या वेळात येतो तयार होऊन",.. प्रिया

" जास्त उशीर करू नका ग, जरा वेळाने पार्लरवाली येणार आहे तर मला मदत लागेल",.. मीनल

" हो आम्ही येतोस एक तासात तो पर्यंत तू जिजुंशी बोलत बस ",.. सोनल आणि प्रिया उगीच तिला चिडवत होत्या

" काहीही काय ग",.. मीनल आनंदात होती
.....

आई बाबा बोलत बसले होते..

"काय करायच ह्या आक्कांच? त्या काही पिच्छा सोडत नाही आपला",.. आई

" हो ना त्रासदायक आहे ती आक्का, आधी आपल्याला त्रास द्यायचा नंतर आपल्या मागे मागे करायच, मी सोडणार नाही पण त्यांना, काहीही संबध ठेवायचे नाहीत त्यांच्याशी आपण ",.. बाबा

जरा वेळाने सोनल ने बघितलं आक्का गेलेल्या होत्या, ती घरी आली,

आई-बाबा पुढे बसलेले होते, सोनल आत गेली, तिला आलेल बघून ते दोघे शांत बसले,

"आक्का आत्या आल्या होत्या ना",.. सोनल

" हो",... बाबा

" काय बोलत होत्या",.. सोनल

आई-बाबा दोघेही शांत होते

"नको बोलूया आपण त्या विषयावर",.. आई बाबांना भीती होती सोनल उगीच त्रास करून घेईन

" आई-बाबा मी आता एकदम ठीक आहे, मला माहिती आहे आक्का आत्या संतोष ची केस मागे घेण्यासाठी आल्या असतील, नाहीतरी कोर्टात मला या सगळ्या गोष्टी बोलायला लागणार आहेत, मी आता एक गोष्ट शिकली आहे आता आई-बाबा, जे आहे ते आहे, त्याला घाबरून चालणार नाही, स्पष्ट बोलायचं, ज्या गोष्टी टाळता येतील त्या टाळायच्या, जर टाळता येत नसतील तर त्याला तोंड द्यायचं",.. सोनल

" खूप हुशार आहेस तू माझं बाळ, खुप लवकर सावरलं तू स्वतःला यातून, मला खूप अभिमान आहे तुझा, आता तुझा रिझल्ट लागेल आपण लगेच तुझी ऍडमिशन घेऊन टाकू, तू स्वतःला तुझ्या शिक्षणात मध्ये बिझी करून घे आणि राहुल आणि तू म्हणत असतील तर आपण तुमचं लग्न लावून टाकू नाहीतरी वैभव दादा आणि निशा च लग्न करायचं आहे, तुमचंही करून टाकू दोघांचं, तुम्ही दोघांनी काय आहे ते बोलून घ्या एकमेकांन सोबत ",.. बाबा

" हो चांगल्या गोष्टी केलेल्या बर्‍या, उगीच नको ते विचार नको आपल्याला",.. आई

सोनल छान हसत होती,.." चला मी आवरते मला तिकडे मीनल च्या साखरपुड्याला जायचं आहे, तुम्ही येत आहात ना दोघं? ",.

"हो आम्ही पण येतो पण जरा वेळाने येऊ, आज वैभव निशा च्या घरी जाणार होता ना त्याची वाट बघतो आहोत आम्ही ",.. बाबा

" हो ना मी विसरून गेली, काय होईल तिकडे काय माहिती, एक एक आहे आपल्या कडे ",.. सोनल

सोनल आत आवरायला गेली

" आपण जायला पाहिजे होत का वैभव सोबत?",.. आई

" तो नाही बोलला ना, माहिती नाही तिकडे काय होईल, बघु आता काय होतय तिकडे ",.. बाबा

आई बाबांच्या चेहर्‍यावर समाधान होते

वैभव दादा आज ऑफिस मधुन लवकर निघाला , आज तो निशा च्या घरी जाणार होता,

त्याने निशाला फोन केला,.." मी येवू का आता तिकडे? आपण जाऊ तुमच्या घरी",.

चालेल..

वैभव दादा नी रमेश दादा ला फोन लावला,.." आज मी जातो आहे निशा कडे, बहुतेक तिला मी घेऊनच वापस येईल, तुम्हाला माहिती आहे ना निशा च्या घरच्यांनी नकार दिला आहे आमच्या लग्नाला, तिच्या घरच्यांचा विरोध आहे लग्नाला, बहुतेक भांडणे होऊ शकत तर मला थोडा सपोर्ट मिळेल का?",.

" हो चालेल ना कुठलं गाव कोणत्या हद्दीत येते ते, आणि तुम्ही काही काळजी करू नका, होईल नीट सगळ",.. रमेश दादा

वैभव दादा ने सगळी माहिती दिली

" ठीक आहे, मी त्या गावच्या पोलिस स्टेशनला फोन करतो, जर समजा तुमच्यावर पोलिस केस झाली तर निशाला आणि तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही सज्ञान आहोत आम्हाला दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे, आम्हाला सोबत राहायचं आहे",.. रमेश दादा

" ठीक आहे,चालेल",..वैभव

रमेश दादाने लगेच त्या पोलीस स्टेशन ला फोन केला,.. " आम्हाला गरज लागली तर तुमची मदत होईल का ",

त्या इंस्पेक्टर साहेबांनी होकार दिला आणि फोन नंबरही दिला, रमेश दादाने वैभव दादाला फोन नंबर दिला

वैभव दादाने निशाला फोन करून सगळं सांगितलं,.. "काळजी करण्यासारखं काही नाही आहे मी येतो तुला घ्यायला मग आपण दोघे तुझ्या घरी जाऊ",.

" ठीक आहे",.. निशा

"तुझी तयारी झाली आहे का काही? ",.. वैभव

" नाही माझी काहीच तयारी नाही, घरच्यांसमोर अशी तयारी करता येत नाही ",.. निशा

" ठीक आहे तुला घरून काय काय सामान घ्यायचं आहे त्याची लिस्ट तयार कर, महत्वाचे डॉक्युमेंट्स ते गरजेचे आहेत, बाकी कपडे वगैरे तर विकत घेता येतात",.. वैभव

" हो ते मी शोधून ठेवले आहेत",.. निशा

"तुझं पक्क आहे ना पण माझ्यासोबत यायचं",.. वैभव

" हो माझं पक्क आहे, होईल सुरुवातीला मला त्रास पण आयुष्यभर आपल्याला सोबत राहायचं असेल तर हा डिसिजन आता घ्यावाच लागेल आणि तुला माहिती आहे का वैभव मला काल एक स्थळ सांगून आलं होतं बहुतेक ते लोक रविवारी बघायला येणार आहेत त्यामुळे आपण हा डिसिजन आजच घेतलेला बरा",.. निशा

" बापरे एवढे पुढे गेले आहेत तुमच्या घरचे, मला तयारीनेच यावं लागेल ",.. वैभव

" काय करायचं आपण तुझ्या घरी जायचं का डायरेक्ट, माझ्या घरी आपण सांगायला नको, मला भिती वाटते आमच्या घरचे आडकाठी आणतील",.. निशा

" मी इंस्पेक्टर साहेबांनी सांगितल आहे, काळजी करू नकोस, आपण तुझ्या आई वडिलांना भेटू निशा, एकदा मी बोलतो त्यांच्याशी असं न सांगता तू डायरेक इकडे निघून येणे योग्य नाही",.. वैभव

"ठीक आहे, पण मग जे होईल ते होईल",.. निशा

" हो तू काळजी करू नकोस मला एकदा त्यांच्याशी बोलायच आहे ",.. वैभव

वैभव आणि निशा वहिनी दोघं मिळून निशाच्या घरी गेले, जाता जाता त्यांनी इंस्पेक्टर साहेबांना फोन करून सांगितलं,.." आम्ही जातो आहो निशाच्या घरी जर काही लागलं तर मदत करा ",.

" ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, हवालदार काकांना पाठवतो तिकडे ",.. इंस्पेक्टर

निशा चे आई वडील वैभव ला बघून दचकले जरा, निशा सोबत होती त्यांना समजलं की काहीतरी म्हणणं आहे या दोघांचं

" काय काम काढलं वैभव तुम्ही आमच्याकडे ",.. बाबा

" आमच्या दोघांचं लग्न ठरलं आहे तर कधी करायचे पुढचे कार्यक्रम हे बोलायला आलो आहे मी, तुम्ही निशा ला माझ्याशी बोलू देत नाही, मग मी स्वतः इथे आलो, म्हटल बघाव काय झालाय ते",.. वैभव

"तुम्हाला एव्हाना समजलं असेल की आमचा नकार आहे या लग्नाला ",.. बाबा

"का काय कारण आहेत नकार द्यायला",.. वैभव

" तुमच्या घरी आमची मुलगी सुरक्षित राहणार नाही असा आमचा मला वाटत आहे",.. बाबा

" एवढं काय झालं आहे तिकडे असुरक्षित वाटायला ",.. वैभव

" तुमच्या बहिणीला कोणी तरी किडनॅप केल होत ना",.. बाबा

" जे झाल ते दुर्दैव आहे आमचं, आम्हाला वाटल नव्हत संतोष अस करेन सोनल राहुल संतोष यांचा जुनी गोष्ट आहे, संतोष खूप वर्ष झाले सोनल ला त्रास देतो आहे त्यामुळे ते असं घडलं, याचा अर्थ असा नाही की निशाला ही तिकडे धोका आहे",.. वैभव

" ते काही का असेना हे लग्न आता आम्हाला मान्य नाही",.. बाबा

" असं करू नका मामा तुमचे आशीर्वाद खूप गरजेचे आहे आम्हाला लग्नासाठी, आमच्या दोघांचा विचार पक्का झाला आहे आम्हाला लग्न करायचा आहे आणि सोबत राहायचं आहे ",.. वैभव

आई-बाबा दोघे एकमेकांकडे बघत होते,.. "निशा तुला यांच्यासोबत लग्न करायचं आहे का?",..

हो बाबा..

"आम्हाला हे चालणार नाही, रविवारी तुला बघायला पाहुणे येणार आहेत तयार व्हायचं त्यासाठी",.. बाबा

" बाबा वैभव मला पसंत आहे लग्नासाठी, एकदा ठरलय ना माझ लग्न मग का अस करताय तुम्ही? , दुसर्‍या स्थळासाठी मी तयार नाही, मला ते जमणार नाही, बाबा मला वैभव सोबतच राहायचं आहे",.. निशा

" आमची परमिशन नाही या लग्नाला तरी चालेल का तुला? ",.. बाबा

" चालणारच नाही, आई बाबा मला तुम्ही दोन्ही हवे आहात माझ्या आयुष्यात, पण मी वैभव ला सोडून दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही, तुम्ही राग सोडा आणि आमच्या लग्नाला होकार द्या",.. निशा

फोन केल्यामुळे त्या गावचे पोलीस हवालदार निशा च्या घरी येऊन बसले, आई-बाबांनी त्यांना बघितलं त्यांना खूप राग आला

" ही अशी सोय करून आलेले आहात का तुम्ही दोघं?, नाही हे लग्न होणार नाही, तुला जर वैभव शी लग्न करायचं असेल तर तुझा मी आमचा कायमचा संबंध संपला",.. बाबा

"आई बाबा मला माफ करा मला हा डिसीजन असा घ्यायचा नव्हता, मी तुमच्या होकाराची वाट बघेन, मी वैभव शिवाय दुसर्‍या कोणाशी लग्न करणार नाही आणि मी आता वैभव सोबत जाते आहे त्यांच्याकडे ",.. निशा आत गेली, तिने तिची बॅग भरली महत्वाचे डॉक्युमेंट कपडे वगैरे घेऊन बाहेर आली

वैभव उभा राहिला,.." आई बाबा परत एकदा विचार करा, आम्हाला आमच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाची गरज आहे ",..

" नाही ते शक्य नाही, आमचा विरोध आहे या लग्नाला",.. बाबा

" ठीक आहे मग आम्ही निघतो दोन-तीन दिवसात माझं आणि निशा च लग्न आहे तोपर्यंत जर तुमचा विचार बदलला तर या आमच्याकडे किंवा मला फोन करा तुमचं कायम स्वागतच असेल आमच्या घरी ",.. वैभव

निशाच्या डोळ्यात पाणी होतं आई बाबांचा आशिर्वाद घ्यायला वाकली, बाबा आत निघून गेले, आई रडत होती, वैभव दादा दोघी जवळ आला,.." हे बघा मामी तुम्ही काळजी करू नका निशा ची, तिला कसला त्रास होणार नाही आमच्या घरी, मी शब्द देतो ",.

" जा सुखात रहा, इथली काळजी करू नकोस निशा, वैभव काळजी घे निशा ची, तिला काही कामाची सवय नाही खूप नाजूक आहे आमची मुलगी",.. आई हळवी झाली होती

"हो मी निशा ला जपेन, तुम्ही मामांशी बोलायचा प्रयत्न करा",.. वैभव

निशा वैभव घरातुन निघाले, हवालदार काका वापस पोलीस स्टेशनला गेले, रस्त्यात निशा बऱ्यापैकी गप्प होती, वैभवला समजत होती तिची मनाची अवस्था,

"निशा त्रास करून घेऊ नकोस, तुझा विचार पक्का आहे ना, अजून विचार कर ",.. वैभव

"हो माझा विचार पक्का आहे, पण मला थोडा त्रास तर होणारच, शेवटी लहानपणापासूनच घर सोडताना खूपच यातना होतात, आई बाबा ऐकत नाही या गोष्टीचा त्रास जास्त होत आहे",.. निशा

"हो मी समजू शकतो ते, पण मला बर वाटतय तू योग्य निर्णय घेतला, तू माझी साथ दिलीस, मी सुद्धा तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही, आपण करू लग्न, होतील नीट तुझे आई बाबा, आता तर आई व्यवस्थित आहेत, त्या समजावतील बाबांना",.. वैभव

" हो काहीच प्रॉब्लेम नाहीये आपण सोबत राहायचे ठरवले आहे, आपण आपला डिसीजन घेतला",.. निशा
.......

मीनल चा साखरपुड्याचा कार्यक्रम छान झाला, नवरदेव छान आहे, मीनल खूप खुश होती, सोनल प्रिया मीनल च्या आसपास होत्या, खूप मदत केली त्यांनी तिकडे,

वैभव निशा दोघं घरी आले, आई बाबा मीनल कडे साखरपुड्याला जावुन आले होते, सोनल अजून तिकडे होती, निशाला बघून आई बाबांना खूप आनंद झाला, निशा पुढे होऊन आईला भेटली, ती एकदम रडायला लागली

" मी अगदी समजू शकते निशा तुला आता काय वाटत असेल, आई वडीलांचे घर सोडताना खरंच खूप त्रास होतो, काळजी करू नको, तुझे आई-बाबा लवकरच राग सोडतील, सगळ ठीक होईल आणि या घरात तुला प्रेमच मिळेल" ,... आई

आई निशाला घेवून आत गेली

"काही गडबड झाली नाही ना तिकडे?",.. बाबा

" चिडले आहेत तिच्या घरचे, बघू पुढे शांत होतील ते लवकर ",.. वैभव

" मी बोलतो गुरुजींशी, आपण तुमचं लग्न लवकरात लवकर करून टाकू, तेच योग्य राहील तुमच्या दोघांसाठी, एकदा लग्न झालं की काही काळजी नाही",.. बाबा

वैभव खूप खुश होता...



🎭 Series Post

View all