बेरीज वजाबाकी आयुष्याची... भाग ४_अंतिम (वर्षाराज)

"आपल्या हॉस्पिटलच्या जवळ, चहा, वडापावचे छोटे दुकान आहे तिथे स्टोव्हचा भडका उडाला. त्या दुकानाच??

मागील भागात आपण बघितले…


"खरं आहे तुझं. मीच जबाबदार आहे ह्याला. खूप गृहीत धरले मी भार्गवीला. तिच्या मनाची घालमेल मी समजू शकलो नाही. परेश्वरा एक संधी दे मला. मला भार्गवी ची माफी मागायची आहे. तिला आधार द्यायचा आहे." शशांकच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.


तितक्यात समोरच्या वॉर्डातील एक नर्स धावत गेली आणि लगेच डॉक्टरची पळापळ सुरू झाली. थोडावेळ धावपळ झाल्यावर सगळे शांत झाले. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक दुःखाची छटा होती, सोबत काळजीची लकिर.



आता पुढे…



शशांक आणि धनंजय सगळं दुरून बघत होते. तितक्यात डॉक्टर जयेश तिथे आले.


"काय झालं?" धनंजयने विचारले.


"आपल्या हॉस्पिटलच्या जवळ, चहा, वडापावचे छोटे दुकान आहे तिथे स्टोव्हचा भडका उडाला. त्या दुकानाची मालकीण त्यात भाजली आणि तिला वाचताना तिचा नवरा देखील भाजला तीन दिवसांपासून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण आज आम्हाला अपयश आले." डॉक्टर जयेश हतबल होत बोलला.


"अरे, खूप वाईट झाले." धनंजय वार्डाच्या दिशेने बघत बोलला.


"त्याहून वाईट असे आहे की, त्यांना दोन महिन्यांचे बाळ आहे. ज्याचे आता ह्या जगात कोणी राहिले नाही. आता त्या बाळाला अनाथालयात पाठवावे लागेल." जयेशच्या डोळ्यात पाणी आले.



"शशांक दादा. चोवीस तासाला आता काहीच तास बाकी आहेत. ज्याने माझी काळजी अजून वाढते आहे. भार्गवी वहिनींना शुद्ध आली पाहिजे नाहीतर, त्या कोमात जाण्याची शक्यता आहे."


तितक्यात एक नर्स त्या बाळाला घेऊन आली. बाळ रडत होते.


"एक प्रयोग करून बघूया का?" धनंजयच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली.


"प्रयोग कसा?" जयेश बोलला...


"हे बघा भार्गवी अशीही अजून शुध्दीवर आली नाहीये. तिच्या मनावरील जखमांचा विचार करता ती मनाने खचली आहे. अशात तिला जर प्रेमाचा स्पर्श झाला तर?"


"म्हणजे काय म्हणायचे आहे तुला दादा?" जयेश आणि शशांक प्रश्नार्थक नजरेने एकमेकांना बघत होते.


"शशांक तुला देखील माहीत आहे की, भार्गवीला प्रेमाची, आधाराची गरज आहे. आपण ह्या बाळाला जर भार्गवी जवळ ठेवले तर? कदाचित त्याच्या रडण्याने त्याच्या स्पर्शाने तिच्यातील आई तिला उठवेल? मी असे म्हणत नाहीये की, बाळ तू घे पण किमान भार्गवीला जगवण्यासाठी तिला शुध्दीवर आणण्यासाठी असा प्रयोग करू बघायला काय हरकत आहे?"


"हो. माझ्या लक्षात कशी नाही आली आधी ही गोष्ट? मेडीकल सायन्समध्ये असे चमत्कार झाले आहेत. करून बघायला काही हरकत नाही. त्याने नुकसान काही होणार नाही. झाला तर फायदाच होईल." जयेश एका नव्या उमेदीने बोलला.



"असं करून जर भार्गवी बरी झाली, तर अजून काय हवे मला?" शशांक ने होकार देताच जयेश नर्स सोबत बाळाला घेऊन आत गेला. त्याच्या मागोमाग शशांक आणि धनंजय देखील आत गेले.

भार्गवी अजूनही निपचित पडलेली होती. जणू तिची जगण्याची इच्छाच संपली होती. जयेशने शक्याता असलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तशी औषधे, साधणे सज्ज केली. सगळे तयार असल्याची खात्री झाल्यावर त्याने नर्सला इशाऱ्यानेच बाळाला भार्गवी जवळ ठेवण्यास सांगितले. तेव्हा बाळ झोपले होते. थोड्यावेळात झोपेतच बाळाची हालचाल सुरू झाली. त्याचा स्पर्श भार्गवीला होत होता. डॉक्टर जयेश आणि इतर स्टाफ मॉनिटर वर भार्गवीच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब ह्यावर बारीक लक्ष ठेऊन होते. हळू हळू भार्गवीची स्पंदने वाढत होती. तिच्या बोटांची हलचाल होऊ लागली. सगळ्यांना एक आशेचा किरण दिसत होता. तितक्यात बाळाने टाहो फोडला आणि त्याच्या आवाजाने थोड्यावेळात भार्गवीने डोळे उघडले.

शशांक धावत तिच्या जवळ गेला. ती एका हाताने बाळाला कुरवाळत होती. शुध्दीवर आली तरी उठून बसण्याची शक्ती तिच्यात नव्हती. शशांकने बाळाला कुशीत घेतले.


"भार्गवी मला माफ कर. खूप चुकलो मी. माझ्या दुःखात इतका बुडालो की, तुझ्या दुःखाची जाणीव मला झालीच नाही. फार गृहीत धरले मी तुला. तुझ्या मनाचा विचार केलाच नाही.
व्यवसायाचे बॅलन्स शीट जुळवताना, आयुष्याची बेरीज वजाबाकी मात्र चुकत गेलो.
नफ्याची बेरीज होत गेली, पण आयुष्यातून प्रेम मात्र वाजा होत आहे, हे लक्षात आलेच नाही माझ्या. पण आता नाही आता ह्या बाळाला आपण दत्तक घेऊ. नव्याने आयुष्य सुरू करू. नव्याने बेरीज वजाबाकी करू. त्यात प्रेमाची बेरीज करू आणि संकटांची मिळून वजाबाकी करू.

डॉक्टर ह्या बाळाला आम्ही दत्तक घेत आहोत. त्याची तयारी करा."



"शशांक. मी आज खूप खुश आहे." शिन आवाजात भार्गवी इतकेच बोलली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यात शशांक आणि भार्गवी न्हाऊन निघाले. मळभ स्वच्छ झाले होते. भार्गवी आणि शशांकला जोडणारी इवलिशी कडी त्यांच्या हातात होती आणि त्या बाळाला हक्काचे घर मिळाले होते. ही कथा इथेच जरी संपली असली, तरी भार्गवी आणि शशांकच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला होता.



समाप्त
© वर्षाराज



प्रिय वाचक तुम्हाला कथा कशी वाटली नक्की सांगा. ह्या कथेतून इतकंच सांगण्याचा प्रयत्न केला की, एकमेकांना गृहीत धरू नका. पैसा, नाव, आपले दुःख ह्यात आपण आपल्या माणसांवर अन्याय करतो ह्याची जाणीव ठेवा. भार्गवी शशांकला परत मिळाली, हे त्याचे भाग्य होते. पण हे सगळ्यांच्या बाबतीत होईलच असे नाही. आजचा क्षण जगा. मिळून संकटांना सामोरे जा.



 

🎭 Series Post

View all