बदललेला बाबा

love between daughter n father

ओह्ह बाबा...!! काय यार तू एवढे पण लक्षात नाही रहात तुझ्या.??किती वेळा शिकवलं मी बाबा तूला...आता परत सांगणार नाही हं...अपेक्षा लाडीकपणाने आपल्या बाबाशी बोलत होती....


मीराताई लांबूनच सर्व बघत होत्या आणि मनात हसत होत्या...त्यांची नात म्हणजे अपेक्षा..संदीपला म्हणजे त्यांच्या मुलाला अगदी अरे तुरे करून बोलायची अगदी मित्र मैत्रिणीचे नाते होते त्या दोघांचे....

अपेक्षा  मजा आहे तुझी ग...आमच्या वेळेस असे नव्हते ग काही बोलता बोलता  नकळत त्या भूतकाळात गेल्या..त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा माहेरचा वाडा, बाहेर असलेला झोपाळा आणि त्यावर बसलेले अण्णा दिसत होते..अण्णांची कडक शिस्त...त्यांचा शब्द म्हणजे जणू "काळ्या दगडावरची रेष..." अण्णा म्हणजे त्यांचे काका पण घरातले मोठे त्यामुळे ते म्हणतील ती पूर्व दिशा असायची...
आमची आजी म्हणजे रमाबाई त्यांची सावत्र आई, अगदी पोटच्या मुलाप्रमाणे तिने वाढवले पण अण्णांसमोर ती काही बोलायची नाही, तात्या म्हणजे माझे वडील,भाई काका म्हणजे लहान काका सर्व अण्णा सांगतील ते आणि तसेच वागायचे कधी उलट प्रश्न केला नाही त्यांनी का???कशाला??

अण्णांना दोन मुली खूप मोठ्या होत्या आमच्या पेक्षा ताई आणि माई बोलायचो आम्ही अगदी आमचे आई बाबा सुद्धा...घरातल्या मोठ्या मुली म्हणून रित असायची तशी...खूप मज्जा करायचो पण अण्णा आले की कोणाचा आवाज नाही सगळे एकदम शांत व्हायचे...अण्णा म्हणजे त्या घरचे वडील त्यामुळे त्यांचा धाक असायचा तसा...

काळ पुढे गेला ताई-माई यांचे लग्न झाले अगदी १३ व्या वर्षी तेव्हा अशी पद्धत होती,आम्ही अगदी ५ वर्षाच्या होतो...पण माई लग्नानंतर दोन महिन्यात गेली अगदी आम्हाला कायमची सोडून आणि अण्णा एकदम खचून गेले...तिला खूप छळायचे तिने अण्णांना तसे सांगितले एकदाच आली होती माहेरपणाला रित म्हणून तेव्हा...पण अण्णा एकदम कडक काही चालले नाही तिचे त्यांच्या समोर...एकदाच गरजून बोलेले लग्न झालेल्या मुलीने असे माहेरी राहू नये,एकदा पाठवली सासरी की माहेर सुटले,मरेपर्यंत नवऱ्याचे घर सोडु नये...

आज त्यांचे शब्द त्यांना आठवत होते,मुली लहान असतानाच बायको गेली होती...आता ताई आणि ते..आम्ही सगळे होतोच पण त्यांच्या पुढे कोण बोलणार??भाई काका यांचं लग्न पण नुकतेच झाले होते...त्यांना मुले झाली आणि अण्णा एकदम बदलले, माई गेल्या पासून तें हळवे झाले होते...त्यांची शिस्त,त्यांचा कडकपणा हरवला होता,सुरवातीला आम्हाला मज्जा वाटली पण नंतर मात्र त्यांना असे बघवत नव्हते आम्हाला....
आम्ही मात्र सुखी होतो लग्नाच्या बाबतीत २० वर्ष होईपर्यंत ..मग् लग्न लागले..अण्णा एकदम गहीवरून बोलले, पोरी कधी वाटलं तर बिंदास यायचं माहेरी मला अजून एक पोरगी नाय गमवायची...अण्णा काय बोलतील, ओरडतील का असा विचार नाही करायचा....पहिल्यांदा मी अण्णांना असे बघत होते...
घाबरत घाबरत सासरी आले,लहान असल्या पासून सवय लागली होती दडपणा खाली राहायची....पण ह्या आपल्या घरी पहिल्या पासून वातावरण खेळी-मेळीचे होते...मी अगदी लवकर रमले...
आतापर्यंत वडील माणूस म्हणजे कडक,शिस्तप्रिय एवढंच माहीती होते मला पण इकडे आले नी वेगळीच रूपं बघितली बाबांची...माझे सासरे म्हणजे तुझ्या बाबांचे आजोबा अगदी लेकी सारखा जीव लावत होते मला....सून कधी म्हंटले नाही त्यांनी मला...मग् हळू हळू मुले झाली संदीप,सागर सुजाता आले..पण कधीच पसारा केला म्हणून ओरडले नाहीत की चुकले म्हणून मारले नाही माझ्या ह्यानी म्हणजे त्यांच्या बाबांनी, हे असे बाबा मी कधी बघितले नव्हतेच...पण त्यांचा दरारा एवढा होता की एक नजर टाकली की तुझे बाबा,आत्या आणि काका लगेच गप्प व्हायचे....
काळ बदलला होता, मी अण्णा,तात्या याना बघत मोठी झाले होते त्यामुळे हे सर्व नवीन होते माझ्या साठी.....

आणि आता तुमची पिढी म्हणजे काय अगदी ए बाबा काय??यार काय??मज्जा आहे तुमची...

संदीप ऐकत होता सर्व, त्याने अपेक्षाला बाहेर खेळायला पाठवले आणि म्हणाला, आई " अगदी खर आहे तुझे..." पण हि पिढी अशी आहे की त्यांना त्यांच्या भाषेत सांगायला लागतें पूर्वीसारख नाही जमत ग...!!!!
आई म्हणते,अरे बरोबर आहे तुझे मी आठवण म्हणून सांगितलं सर्व..."पण खर सांगूं का..??" हा बदल चांगला आहे खरंच...असे नाते असेल तर मुले मनमोकळेपणाने बोलतात नाहीतर मनात कुढत बसतात रे...मीरा ताईना भरून आले...

लहान असल्यापासून खूप रूप बघितली या बाबांची...कडक आणि शिस्तप्रिय बाबा,नुसता डोळ्यात धाक ठेवणारा बाबा, आणि आता हा तुझ्या सारखा बाबा...

आई रडून मोकळी होते,डोळे मिटून प्रेम करते आणि म्हणून आपल्याला आई आवडते पण बाबाचे तसे नसते रे, "बाळ सुखरूप बाहेर येईपर्यंत बाहेर अस्वस्थ होऊन फेर्या घालणारा बाबा...मुलगी मोठी झाली की ती घरी येईपर्यंत तिच्या काळजीने घर डोक्यावर घेणारा बाबा, मुलाला नोकरी हवे म्हणून साहेब लोकांपुढे हतबल होणारा बाबा...आयुष्यभर साठवलेली पूंजी मुलीच्या लग्नात खर्च करणारा बाबा, आणि लग्न होऊन गेली की तिच्या आठवणीने तळमळणारा बाबा...."
"अहो बाबाचा ए बाबा झाला तरी मनात असणार्या भावना त्याच ना रे...!!!"
संदीप चे डोळे भरून आले....तो म्हणाला हो ग आई खर आहे तुझे बाबा कितीही मॉडर्न झाला तरी शेवटी बाबाच तो डॅड म्हणा,पप्पा म्हणा, पण भावना मात्र एकच....बदलले आहे ते बाह्यरूप....अंतर्मनात तो हळवा कोपरा तसाच आहे.....

आकांक्षा हाक मारते,ए बाबा ये ना खेळायला....संदीप जातो आणि मीरा ताई मात्र दोघांकडे कौतुकाने पाहत बसतात...


अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका......

तुमच्या सुचना आणि अभिप्राय नक्की सांगा....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे...लेख आवडला असेल तर जरुर शेअर करा पण नावासहीत....

© अनुजा धारिया शेठ
२२/०६/२०२०