Login

बाबा, मला माफ करा अंतिम भाग

About Good People

' असे कसे झाले?' , ' काहीही काय सांगत आहात?, ' आता थोड्या वेळापूर्वी तर फोनवर बोलणे झाले.' , ' काल तर भेट झाली आमची.' ,'असे होऊच शकत नाही!'

असेच उद्गगार सर्वांच्या मुखातून निघाले होते, जेव्हा या सर्वांना प्रकाशरावांच्या निधनाबद्दल कळाले होते.

'देवाने असे का केले? एवढ्या चांगल्या व्यक्तीला, देवमाणसाला देवाने का नेले? त्यांचे हे काय जाण्याचे वय होते का? त्यांना जीवनात अजून खूप कार्य करायचे होते. त्यांनी कोणाचे कधी काही
वाईट केले नाही.नेहमी सर्वांचे चांगलेच केले.तरी त्यांच्या बाबतीत देवाने असे का करावे? '

सर्वांच्या मनात असेच प्रश्न येत होते.
प्रकाशरावांबद्दलचे त्यांचे प्रेम, आपुलकी हे सर्व त्यांच्या रडण्यातून ,दु:खातून व्यक्त होत होते.
सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का होता आणि यातून सावरण्यासाठी खूप वेळ लागणार होता.

सतत लोकांच्या भल्याचा विचार करणारे प्रकाशराव , एका गावातून रक्तदान शिबिर करून गाडीने घरी एकटेच येत होते, तेव्हा त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यातच ते गेले होते.

अवयवदान करण्याची आपली इच्छा प्रकाशरावांनी आपल्या घरी व आपल्या जवळच्या मित्रमंडळींना सांगितलेली होती. त्यामुळे त्यांची ही इच्छा कुटुंबातील व्यक्तींनी व मित्रमंडळींनी पूर्ण केली.

जिवंतपणी लोकांना मदत करणारे प्रकाशराव मृत्यूनंतरही इतरांच्या कामी आले होते.

'प्रकाशराव खऱ्या अर्थाने जीवन जगले.त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले.'
असेच सर्वजण म्हणत होते.



आपले बाबा आपल्याला जे सांगत आहे, ते चुकीचे आहे. असे समजणारा अजय..बाबा गेले त्या दिवसापासून दु:खी झाला होता. आपण खूप काही गमावल्याचे दु:ख त्याला होत होते.

आपल्या बाबांसाठी रडणारे लोक, बाबांविषयीच्या त्यांच्या भावना, त्यांचे प्रेम पाहून आणि आपल्या कुटुंबावर आलेल्या अशा दु:खद प्रसंगात या सर्वांनी केलेली मदत,प्रेमाचा दिलेला आधार या सर्व गोष्टींमुळे, आपल्या बाबांचे कार्य व त्यांची महानता अजयला समजली होती. आपल्या देवासमान वडिलांना आपण कधी ओळखू शकलो नाही. त्यांना आपण कधी सुख दिले नाही.याची खंत त्याच्या मनाला लागली होती म्हणून तो आज शोकसभेत बाबांच्या फोटोकडे पाहत म्हणाला,

" बाबा, मला माफ करा. मी चुकलो.यापुढे तुम्हांला जसे आवडते तसे वागेन.तुम्हांला आनंद देईन."


अजयला खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला. हे त्याच्या वागण्यात झालेल्या बदलावरून कळत होते. त्याने अभ्यास करून बारावी चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर, B.Com ला ॲडमिशन घेतले व दुकानातही तो लक्ष देऊ लागला.

आपल्या देवतासमान वडिलांच्या फोटोला नमस्कार करत व त्यांचे आशीर्वाद घेत अजय आयुष्यात यशस्वी होऊ लागला.


समाप्त

नलिनी बहाळकर


सदर कथा काल्पनिक असली तरी,
समाजात प्रकाशरावांसारख्या व अजयसारख्याही व्यक्तीविषयी ऐकायला मिळाले किंवा अशा काही घटना पाहण्यात आल्या त्यातून ही कथा लिहीली आहे.

अशा व्यक्ती, अशा घटना पाहताना मनात विचार येतात...
देव अशा चांगल्या लोकांना का लवकर नेतो?
जर असे झाले असते..तर तसे झाले असते. असे अनेकदा लोक म्हणतात.
हे म्हणणे खरंच खरे असते का? की फक्त आपल्या मनाचे खेळ असतात? व्हायचे ते होणार असते.
आपल्या हातात खरंच काही असते? की सर्व अगोदरच विधिलिखित असते?

🎭 Series Post

View all