Login

बाबा, मला माफ करा भाग 2

About Good People

"अरे अजय बेटा, तुझे हे बारावीचे वर्ष आहे. खूप महत्त्वाचे वर्ष आहे. चांगला अभ्यास कर.वेळ वाया नको घालू."

प्रकाशराव आपला मुलगा अजयला समजावून सांगत होते.

"काय हो बाबा, तुम्ही सारखे सारखे हेचं काय सांगत असतात.'अभ्यास कर..अभ्यास कर...' जीवनात फक्त अभ्यासच नाहीतर इतरही काही गोष्टी असतात ना करण्यासाठी? मला नाही आवडत अभ्यास करायला."

प्रकाशरावांच्या बोलण्यावर अजय चिडतच बोलला.

"अजय, यात इतके चिडण्यासारखे काय आहे? मी तुला काही चुकीचे नाही बोललो, खरे तेचं बोललो.अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गोष्टी आहेत पण आता ती वेळ नाही. आता फक्त अभ्यास.ज्या गोष्टी ज्या वेळेत नाही केल्या तर ..मग पश्चाताप करावा लागतो. म्हणून तुला सांगतो आहे. तू राग नको मानू."

प्रकाशराव चेहऱ्यावर राग न दाखवता शांतपणे अजयला म्हणाले.

वडिलांच्या सांगण्यावरून अजय अभ्यासाला बसला खरा...पण त्याचे अभ्यासात लक्षच नव्हते. त्याला अभ्यासाची आवडच नव्हती. मित्रांबरोबर हिंडणे,फिरणे, गप्पा,मौजमस्ती करणे. या गोष्टी त्याला आवडत होत्या.अजय हुशार होता पण अभ्यास व्यवस्थित करत नव्हता. कसातरी बारावीपर्यंत आला होता.

याउलट प्रकाशराव खूप मेहनती होते. त्यांना शिक्षणाची,अभ्यासाची आवड होती. त्यांनी आपले काॅलेजचे शिक्षण पूर्ण केले होते आणि अजून पुढे शिक्षण घेऊन नोकरी करण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या वडिलांचे कापड दुकान होते व छान चालत होते. त्यामुळे आपल्या मुलाने कुठे नोकरी न करता आपल्याला व्यवसायात मदत करावी. असे त्यांना वाटत असल्याने, प्रकाशराव दुकानात लक्ष देऊ लागले. पुढे वडिलांच्या निधनानंतर ते स्वतःच छान पद्धतीने व आवडीने दुकान सांभाळू लागले.

प्रकाशराव मेहनती होते,हुशार होते. त्यामुळे त्यांची व्यवसायात चांगली प्रगती होत होती.लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होती. पण प्रकाशराव असे शांतपणे सुखाचा उपभोग घेणार्‍यांपैकी नव्हते. त्यांचा पिंडच वेगळा होता. लोकांना मदत करणे, त्यांना मनापासून आवडत होते. मदत लहान असो की मोठी, ते आपल्या परीने प्रयत्न करायचे. त्यांच्या नि:स्वार्थी भावनेमुळे त्यांना त्यांच्या कार्यात यशही मिळत होते. आजारपण,शिक्षण, लग्नकार्य , व्यवसाय किंवा अजून कोणतेही कारण असो, ते पैशांची व इतर काही मदत लागली तर करत होते.त्यांचे नशीबही खूप चांगले होते. लोकांनीही त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा कधी घेतला नाही.त्यांचे पैसे लोक आठवणीने परत करत. काही खरंच खूप गरीब असतील तर प्रकाशराव त्यांच्याकडून पैसे परत घेत नव्हते.