दुसऱ्याच दिवशी मी काकांना भेटलो. सगळं सांगितल्यावर ते म्हणाले, " अरे बघतोच मी त्या नायरला. मी म्हंटलं. " जाऊ द्या, काका. माझ्या नशिबात जर अशीच कामं असतील तर मी तरी काय करणार? त्यावर ते भडकून म्हणाले, " मग जातोस उद्यापासून लच्छी कडे? तुला काही वाटतं की नाही.? सध्या जरा थांब, कुठे चांगला जॉब आहे का बघतो किंवा क्लेरिकल मध्ये आहे पाहातो. मी घरी आलो. आईला सांगितलं. पण तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिनी मला नुसता बसू नकोस वगैरे असही काही म्हं टलं नाही. मग मात्र मी सहा सात महिने असेच काढले. साबू, वॉशिंग पावडरी वगैरे कमिशन वर विकण्याची लहान सहान कामे मी करित होतो. पण आवक एवढी कमी की कामावर जाणं आणि घरी बसणं सारखचं वाटायचं. फक्त दिसायला, मी कामावर जात होतो असे दिसे. आई ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे आमच्याकडे कोणी नातेवाईक असा येतच नसे. बापाशीच संबंध नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा प्रश्नच नव्हता. नाहीतर लोकांकडे आज काय मामा आला, उद्या काय मावशी मग कधी लोकं काकांकडे जात. आम्ही बारा महिने तेरा काळ घरीच असायचो. आम्ही कोणत्याही वस्तूसाठी हट्ट करीत नव्हतो. करमणूक हा प्रकार नव्हताच. करमणुकीसाठी आधी थकावं लागतं. पण आम्ही अगदीच निष्काम कर्मयोगी होतो. एक गोष्ट मात्र आईने कटाक्षाने पाळली होती. ति म्हणजे, पैसे कितीही कमी मिळोत दूध मात्र चांगलचं आणायचं. जेवायलाही वरण भाताशिवाय काही नसायचं. कधी कधी आई गोड म्हणून भाताची खीर करायची. ती मात्र अप्रतीम लागायची. कधी कधी आई जिथे कामं करायची तिथे मिठाई वगैरे मिळायची. आंब्याचे दिवस असले की आई कुठून तरी लागलेले आंवे घेऊन यायची. त्यांचा चांगला भाग वापरून ति आमरस करायची. पण आम्हाला आमरस खायला घालायची.
एक दिवस एक पत्र आलं. अर्थातच निनावी. सोमवार होता. मला थोडा ताप असल्याने मी घरी होतो.आई आणि बहीण बाहेर गेली होती. भाऊ शाळेत गेला होता. ते एक बंद पाकीट होतं. मी ते उघडलं. आम्हाला पत्र लिहीणारे नातेवाईकच नव्हते. मग हे पत्र कसं आलं कोण जाणे. आत एक चिठ्ठी वजा कागद होता. त्यात "श्री नाही, मायना नाही". मला वाटलं कोणी खपला की काय?. पण या पत्रानी माझं आयुष्य चांगलच बदललं. त्यात एकच ओळ होती. " त झी आ ई भ ल ती च भ ज नं क र ते. सांभाळ. "खाली सही नाही काही नाही. निनावी पत्रावर सही नसतेच. पोस्टाचा शिक्का पाहिला. गिरगावातलाच होता. चिठ्ठी उलटी सुलटी करून पाहिली ,कोणत्याही प्रकारच्या खुणा अथवा लिखाण नव्हतं. मला त्या वाक्याचा अर्थ लागेना. मी ते पत्र बॅगेत टाकलं. कोणालाच सध्या काहीही न बोलण्याच ठरवलं. पोस्टात चौकशी करून काही उपयोग नव्हता. मग नेहेमीप्रमाणे गुरुवार आला. आई भजनाला जाणारच. मी ऑफिसला असल्याने मला काहीही करणं शक्य नव्हतं. मग पुढच्या गुरुवारी दांडी मारण्याचे ठरवले.
त्या गुरुवारी मी सकाळी दहा वाजत आले तरी उठलो नाही. हे पाहून आईने आज जायचं नाही का अस विचारलं. त्यावर मी आज जायचा कंटाळा आलाय म्हणून म्हंटलं. पण ती म्हणाली, " ठिक आहे, मला आज दुपारी भजनाला चारलाच जायचय. ", असं म्हणून ती जिकडे कामं करायला जायची तिकडे गेली. मग मी परत पडून राहायचा प्रयत्न केला. पण माझ्या डोक्यातून ती ओळ जाईना. " भ ल त च भ ज न ". म्हणजे काय? लिहीणारा पागल असला पाहिजे आणि ओळखणाराही. चाळीतलं कोण असेल? मला डोकं भणभणू लागलं. मला अंदाय येईना. आईचं नक्की काय चालू आहे?. झोपही येईना. म्हणून अंघोळ, जेवण वगैरे उरकून घेतलं. एक वाजायला आला. मी लोळत पडलो होतो. अडीचच्या सुमारास आई आली. मी झोपलेला आहे असे पाहून ती भजनाला जाण्याच्या तयारीला लागली. मी हळूच डोळे उघडून पाहिलं. ती चांगली साडी नेसून, गजरा वगैरे माळून तयार झाली. मग मला तिने उठवलं. म; ई खरं तर जागाच होतो. पण उठल्या सारखं केलं. बहीणही नुकतीच सगळं आवरून झोपली होती. आई म्हणाली, " मी जाऊन येते. " मी न राहवून विचारलं. " भजनाला एवढी अगदी तयार होऊन चालल्येस? कमाल आहे. ती म्हणाली, " अरे. आज ग्रुप मधल्या बायकांनीच आग्रह केला. त्या सगळ्या साठीच्या पुढच्या आहेत आणि विधवाही. " मी मध्येच म्हणालो, " तशी तूही काही विधवे पेक्षा कमी थोडीच आहेस?. "माझ्या बोलण्याचा रोख तिला आवडला नाही. पण स्वतःचा मूड ठिक ठेवीत ती म्हणाली, " मीच लहान आहे म्हणून त्यानीच मला आग्रह केला, की मला चांगली साडी नेसून यायला काहीच हरकत नाही. आज बुवा निरूपण पण करणार आहेत. म्हणून जरा लवकर. मला यायला जरा उशीर होईल. म्हणजे सात साडे सात. सरू करील जेवणाचं. " न राहवू न मी विचारलं, " असं कोणतं मंदीर आहे गं, जिथे तू जातेस. " " हे कोपऱ्या वरचं रामाचं नाही का? " ती घाईघाईने म्हणाली. आणि चपला घालून ती निघाली देखील.