अवि.. एक प्रेम कथा (भाग ७)

"म्हणजे, जिजू आणि सालीचे नातं आणि दिर, वहिनी, नंदेच नातं गंमतीच असतं. जेव्हा ह्या पैकी कोणी जेवायला बसलं की, बाकीचे त्याच्या पाठीवर पापड फोडतात ते पण तो बेसावध असताना आणि पापड पण चांगलेच जाड असतात. आमच्याकडे खानदेशात पापडाचा एक प्रकार आहे, त्याला बिबड्या म्हणतात, जाड असतात ते, त्या बिबड्या किंवा नाचणीचे पापड असे पापड फोडतात." विद्या
मागील भागात आपण बघितले…


समोरून विद्या येताना दिसली. पांढऱ्या रंगाच्या कॉटनच्या कुडत्यावर हलक्या गुलाबी, निळ्या रंगाची नाजूक फुले, त्यावर उठून दिसणारा तिचा हलक्या निळ्या रंगाचा दुपट्टा, कानात लोंबंते कानातले, मोकळे सोडलेले केस. कोणताही मेकअप नसलेली तिची उजळ कांती आणि दुरून त्याला बघून हसणारे तिचे नाजूक गुलाबी ओठ. बघून अजयचा पटकन त्याच्या हृदयावर गेला तोंडातून हलेच शब्द बाहेर निघाले.
"आई गं." तिच्या नजरेचा तिर सरळ त्याच्या काळजात घुसला होता.


तितक्यात चिरागने त्याला मागून हलकेच धक्का मारला. तसा तो भानावर आला. विद्या त्याच्या समोर येऊन उभी होती.


आता पुढे…


"काय रे कुठे हरवला आहेस?" विद्या अजयला बघत बोलली.


"काही नाही गं असच. तू सांग कसा झाला प्रवास?" अजय.
"तुझ्यातच हरवलो आहे गं." अजय मनातच बोलला.


"मस्त. जरा धावपळ झाली पण छान वाटलं. खूप गमती झाल्या. आपल्यावर सांगते आधी एक काम आहे ते करते. साक्षी चल जरा लायब्ररीत जाऊन येऊ. मला पुस्तक घ्यायचे आहे." विद्या खुश दिसत होती. साक्षी आणि विद्या तिथून निघून गेल्या.

"आज जरा जास्तच खुश दिसते आहे ही." अजय विद्याला जाताना बघत मनात बोलला.

"अजू, विद्या लग्नाला गेली होती. इतकी खुश आहे. म्हणजे काहीतरी गडबड तर नाही ना?" विद्या जाताच चिराग हळूच अजयच्या कानात बोलला.


अजयच्या देखील मनात त्याच वेळी हीच गोष्ट आली होती, चिरागच्या बोलण्यावर त्याने एकदम चिरागकडे बघितले. अजयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलेले होते. त्याच्या पोटात गोळा आला होता.


"खरंच असं असेल का?" अजय घाबरत बोलला. मनात विचारांचे थैमान सुरू होते.


"विचारू आल्यावर तिला." चिराग बोलला.


थोडावेळ दोघेही काहीच बोलले नाही. मनातली भीती खरी ठरली तर? ह्याच विचारात दोघे होते.


"अजू खरंच जर असं झालं असेल तर? तू काय करशील?" चिरागने शांतता भंग करत विचारले.


"मग काय, सगळं संपलं समज. जोडण्या आधीच ब्रेक अप होईल माझं." अजय रडवेला झाला होता.


"अरे, पण तरी तू तिला सांगू शकतोस की." चिराग.


"काय सांगू? माझं तुझ्यावर प्रेम आहे? आणि सांगून काय मिळेल? ती दुखावेलच. आमची मैत्री पण तुटेल. बघतो आहेस ना ती खुश दिसते आहे. म्हणजे तिला मुलगा आवडला असेल." अजयचा चेहरा पडला होता.


"अरे, अजून कुठे माहीत आहे आपल्याला काय झालं आहे ते? उगाच विचार नको करुस. मीच बोलतो तिच्याशी आल्यावर." चिराग बोलला.


तितक्यात साक्षी आणि विद्या परत आल्या. विद्या बाईकवर तिची बॅग ठेवत बसली. अजय आणि चिराग तिला बघत होते.


"विद्या काही बोलली का?" चिरागने हळूच साक्षीला विचारले.

"कशाबद्दल?" साक्षीने खुणेनेच विचारले.


"इतकी खुश का आहे?" चिराग.


"नाही काही नाही बोलली." साक्षी.


बोलताना चिरागचे विद्याच्या हाताकडे लक्ष गेले. तिच्या डाव्या हातात त्याला अंगठी दिसली आणि त्याची धड धड वाढली.


विद्या गाडीवर बसून हतीतल पुस्तक बघत होती. चिरागने अजय आणि साक्षीला, विद्याच्या हातातील अंगठी बद्दल खुणावले. तसे दोघांचे डोळे मोठे झाले. अजयचा चेहरा तर पार उतरला होता. मनात खूप काहीतरी दुखत होते. वेदना होत होत्या. त्याने पटकन चिरागचा हात पकडला.

त्याला बघून चिरागने त्याला शांत राहण्याचा इशारा केला.


"काय ते पुस्तक घेऊन बसली आहेस? आम्ही इथे तू काय मज्जा केलीस लग्नात ते ऐकायला बसलो आहे." साक्षी विद्याच्या हातातील पुस्तक घेत बोलली.


"बघ की, आल्यावर गंमत सांगते बोलली आणि पुस्तक घेऊन बसली आहे." चिराग साक्षीच्या बोलण्याला दुजोरा देत बोलला.

अजय बिचारा काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. जबरदस्ती हसत त्याने मान डोलावली.
विद्या दोघांच्या बोलण्यावर नुसतीच हसली.

"विद्या मज्जा केली मग लग्नात ना? सांग ना पटकन काय काय केलं? साक्षीने अजय आणि चिरागकडे बघत बोलायला सुरुवात केली.


"हो अगं खूप मज्जा केली. घरचं लग्नं होतं म्हंटल्यावर तर अजूनच मस्ती केली आम्ही. सगळ्या ताई, जिजाजी, भाऊ वहिन्या एकदम धमाल केली. डान्स, गाणी, हळद तर खूप खेळलो. आमच्याकडे जेवायला बसले की, पाठीवर पापड फोडतात." विद्या सांगत होती.


"म्हणजे?" चिरागने कुतूहलाने विचारले.


"म्हणजे, जिजू आणि सालीचे नातं आणि दिर, वहिनी, नंदेच नातं गंमतीच असतं. जेव्हा ह्या पैकी कोणी जेवायला बसलं की, बाकीचे त्याच्या पाठीवर पापड फोडतात ते पण तो बेसावध असताना आणि पापड पण चांगलेच जाड असतात. आमच्याकडे खानदेशात पापडाचा एक प्रकार आहे, त्याला बिबड्या म्हणतात, जाड असतात ते, त्या बिबड्या किंवा नाचणीचे पापड असे पापड फोडतात." विद्या


"चांगलंच लागतं असेल ना?" साक्षी डोळे मोठे करून बोलली.


"लागतं म्हणजे विचारू नको. लाल होते पाठ. पापड पण लागतो आणि तो फोडायला जोरात मरतात तर, तो मार पण लागतो." विद्या उत्सुक तेने सांगत होती.


अजय मात्र अधीर होत होता. कारण मुख्य विषय अजून बाकीचं होता.


"तू पण फोडले का मग पापड?" चिराग.


"वा मग काय तर? सोडते थोडी. चांगलाच बदला घेतला मी पण." विद्या भुवई उंचावून सांगत होती.


"वाह छान." अजय तोंड वाकवत बोलला. विद्या जे सांगत होती ते, ऐकण्यात त्याला अजिबात रुची नव्हती.


"मग अजून काय झालं?" चिराग बोलला.


"अरे, मी सगळ्यात लहान त्यामुळे सगळ्यांनी खूप खेचली माझी. तुम्हाला सांगते ह्या सगळ्या ताई, भाऊ, वहिन्या जिजाजी ह्यांना काही कामच नव्हतं. लग्नात फक्त माझ्यासाठी मुलं बघत होते. नुसतं छळलं मला सगळ्यांनी." विद्या आठवून हसत होती.


"मग, आवडला का तुला कोणता मुलगा?" साक्षीने लगेच विषय पुढे नेला.
अजयच्या काळजाचे ठोके वाढले होते. कसाबसा तो धीर एकवटून उभा होता.


विद्याला खरंच आवडला असेल का कोणी मुलगा? तिच्या हातातील अंगठी आहे, म्हणजे नक्की काय झाले असेल?" वाचत रहा अवि.. एक प्रेम कथा.


क्रमशः

©वर्षाराज



🎭 Series Post

View all