#जलदलेखनस्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
विषय:- आपली माणसं
शीर्षक :- अतिलालसा भाग-३(अंतिम)
"बघा, मी म्हणत होते ना. हा तुमचा लाडका मुलगा. वाईट संगतीत राहतो. त्यात त्याने पैशाच्या अतिलालसेपोटी आपल्याला काही न सांगता वस्तू विकल्या." रागात आपल्या नवऱ्याला आणि मुलाला महेंद्रची आई म्हणाली.
"तुम्ही त्या वस्तू मला दिल्या होत्या त्यामुळे त्याचे काय करायचे ते माझे मी ठरवणार. तुम्ही एकदा त्या मला दिल्यावर त्यावरचा तुमचा त्याचे काय झाले हा विचारण्याचा हक्क नाहीये." रागात आईवर धावून जात महेंद्र म्हणाला.
आपल्या मुलाचे हे असे रूप बघून महेंद्रचे पप्पा पुढे येऊन त्याच्या एक जोरात कानाखाली मारतात.
"काय हे? ही काय तुझी बोलण्याची पद्धत? जिला बोलत आहेस ती तुझी आई आहे.ती आधीपासून सांगत होती तेव्हा मी दुर्लक्ष केले पण आता पाणी डोक्यावरून जात आहे." रागात महेंद्रचे पप्पा आपल्या बेशिस्त झालेल्या मुलास म्हणाले.
तेवढ्यात काही मुले आणि त्यांचे पालक महेंद्रच्या घरात आले. इतके आणि असे अचानक आलेले लोकं पाहून महेंद्र सोबतच त्याचे आई-वडीलाही विस्फारलेल्या नजरेने त्यांना बघत होते.
"महेंद्र आपल्याला आशिषने फसवले. ते ऑफिस आणि कागदपत्र सर्व खोट आहे आणि तो आता पळून गेला आहे." महेंद्रचा एक मित्र ज्याने त्याच्यासोबत गुंतवणुकीसाठी पैसे दिलेले तो घाबरत म्हणाला.
त्यांच्यासोबत त्यांचे पालक येऊन त्यावर चर्चा करत होते. कोणी घरातील दागिने विकले होते तर कोणी एटीएम मधून थोडे थोडे पैसे नकळत काढून आशिषला दिले होते.
आता सर्व मुलांची पैशाची धुंदी उतरली होती.आपण फसवले गेलो आहोत हे त्यांना समजले. पैसे काढताना आलेले मॅसेज त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या मोबाईल मधून डिलीट केले होते.
सर्व पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. आपल्या मुलांची चूक आहे आणि ते फसवले गेलेत हे त्यांना कळून चुकले होते पण जितके पैसे त्यांना परत मिळतील तेवढे त्यांना हवे होते. कारण कष्टातून त्यांनी एक एक पैसा गाठीशी ठेवला होता.
पोलिस स्टेशनमध्ये आधी तर मुलांना त्यांच्या मूर्खपणामुळे खूप काही बोलण्यात आले तसेच आपल्या मुलांवर लक्ष नाही म्हणून पालकांना त्यांच्या दुर्लक्षतेवर चांगलेच खडसावले गेले होते.
"जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तू तोपर्यंत आमच्याशी बोलायचे नाहीस तसेच इथून पुढे तुझा खर्च तुझा तू पाहायचा. एक दमडी सुद्धा तुला देणार नाही. तुझ्यापेक्षा कैक पटीने माझ्या मुली बऱ्या कधीच तक्रार घेऊन घरी आल्या नाहीत आणि तुझ्यामुळे मला पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागली."असे बोलून महेंद्रचे पप्पा आपल्या खोलीत गेले.
दोन्ही पालकांनी चिडल्यावर उगाच वेडे वाकडे पाऊल उचलायला नको म्हणून महेंद्रची आई जेवढ्याच तेवढे त्याच्याशी बोलत होती.
आपल्या पालकांच्या नजरेतून आपण खाली पडलो ह्याचे महेंद्रला खूप वाईट वाटले. शेवटी आपली माणसं ती आपली माणसचं असतात हे त्याला लवकरच समजले. त्याच्या काही मित्रांच्या वडिलांनी मुलाने पैशाचे नुकसान केले म्हणून आपल्या मुलाला घराबाहेर काढले होते पण महेंद्रचे घरचे छत्र तर त्याच्यासाठी शाबूत होते. वेळेवर जेवण आई देत होती आणि त्यानेही आपली चूक सुधारण्यासाठी कॉलेजनंतर पार्ट टाईम काम करण्यास सुरुवात केली.
आशिष लवकरच पकडला गेला आणि त्याच्याबरोबर अशी फसवणारी टोळीसुद्धा पकडण्यात पोलिसांना यश आले.
सर्व पैसे तर मिळाले नाहीत पण काही नसण्यापेक्षा काही असणे हे महत्त्वाचे त्यावेळी सर्व पालकांनी असा विचार केला.
सर्व मुलांनी आपल्या चुकीची माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही असे वचन देऊन आपले शिक्षण पूर्ण करण्यात लक्ष केंद्रीत केले.
"जावई बापू तुमची खूप मदत झाली. त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद." महेंद्रचे पप्पा आपल्या मोठ्या मुलीच्या नवऱ्याला जे इन्स्पेक्टर होते त्यांना म्हणाले.
"मामा, आता तरी मुलगा- मुलगी समान आहेत असा विचार करा. त्यात तुमच्या अतिलाडाचे दुष्परिणाम तुम्ही पाहिलेच. त्यामुळे पुढे असे करु नका." असे म्हणत जावईबापू निघून गेले.
त्यांनीच सर्व प्रकरणाचा छडा लावलेला होता. गरिबीतून शिकलेल्या जावयाला हे असे मेहुण्याचे लाड बघवत नव्हते म्हणून त्यांनी कधी नव्हे ते आता सासऱ्यांना खडे आणि खरे बोल बोलून दाखवले.
संकटात आपलीच माणसे कामाला येतात त्यावेळी कोणीच पुढे येत नाहीत. त्यात आपले चांगले पाहणारे खूप कमी असतात. पैसे झटपट मिळवण्याची लालसा माणसाला चांगलाच धडा शिकवते.
समाप्त.
© विद्या कुंभार
कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा