आसुसलेले मन...❤️ भाग 4

Baba honyasathi asuslela to

आसुसलेले मन...❤️ भाग 4


आधीच्या भागात आपण पाहिले की,


मनीषच्या घरी जो प्रकार घडला त्यामुळे सारंग खूप अपसेट होता. तो त्या रात्री दारू प्यायला. रमाला हे अजिबात आवडतं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सारंग पेपर वाचत बसला. पेपर मधील बातमी वाचून सारंगचं मन सुन्न झालं.


रमाने दुसरं लग्न केलं तर तिच्या पदरी मुल येईल, तिला जास्त त्रास भोगावा लागणार नाही. हा विचार तो करत होता. आणि बराच वेळ विचारात गुंतून होता.


तो याबद्दल रमाशी बोलला,तिने दुसऱ्या लग्नाला स्पष्ट नकार दिला.

आता पुढे,


रमा तिच्या खोलीत निघून गेली, सारंग उठून फ्रेश झाला.
“अग जेवायला तरी देणार आहेस का? की मी तसाच उपाशी झोपू, अग पण झोपही लागणार नाही. पोटातले कावळे ओरडतायेत.”


ती थोडी हसावी म्हणून त्याचं बोलणं सुरू होतं.
रमा खोलीतून बाहेर आली, किचनमध्ये गेली.  सारंग तिच्या मागे गेला,


“रमा तू अशी रुसू नकोस ग, मी यानंतर तो विषय नाही काढणार ग.” त्याने मागेहून तिच्या खांद्यावर हात ठेवला.
ती वळली, त्याचा हातात हात घेतला.


“हे बघा काहीही झालं तरी मी असं काही करणार नाही. अहो आपल्या जीवनात काही कमी दुःख आलं का पण आपण दोघांनी मिळून दिवस काढलेत ना? इतके वर्ष निघाली मग आता समोरची वर्षही निघतील. असा का विचार करताय? आणि मी तुमच्यासोबत खूप आनंदात आहे. आपण दोघे एकमेकांसाठी आहोत मग आपल्याला आता काय गरज आहे कोणाची. मला दुःख होतोय मला त्रास होतोय हा विचार करू नका. जेवढा त्रास मला होतो त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतो. तुम्ही त्याच त्रासातून चाललात ना? मग तरी असा विचार का करताय.? आता मला प्रॉमिस करा यानंतर तुम्ही असं काहीही बोलणार नाही.”

“हो ग सॉरी, पण नाही बोलणार यानंतर.”

दोन-तीन दिवसानंतर सकाळी सकाळी सारंग कडे त्याचा गावचा एक मित्र आला. बऱ्याच वर्षानंतर त्यांची भेट झालेली होती. आल्यानंतर गप्पांना सुरुवात झाली, लहानपणीच्या आठवणी, मित्रांच्या आठवणी, असं करता करता गप्पा वाढत गेल्या. मग लग्न, मुलंबाळ याची चौकशी झाली.
बोलता-बोलता त्याने सांगितले, 


“माझ्याही लग्नाला बरेच वर्षे झाले होते आणि मूल होत नव्हतं म्हणून मी एक मुलगी दत्तक घेतली. आता ती पाच वर्षाची आहे. ती महिन्याभराची होती तेव्हा मी तिला दत्तक घेतलं होतं. खूप छान आहे. आता आम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीच कमी वाटत नाही. मला बाबा म्हणून हाक मारते ना तेव्हा आनंद गगनात मावेनासा होतो.” तो बोलत होता सारंग मात्र शांत झाला.

“काय झालं सारंग्या असा शांत का झालास?”

“तुझी आधी जी परिस्थिती होती ना तीच परिस्थिती माझी आहे रे आता, पण माझ्या मनात हा विचार आलाच नाही. किती पुण्याचा काम केलेस तू, एक आईला तिची मुलगी मिळाली आणि मुलीला आई मिळाली. खरंच खूप छान केलेस तू.”

“सारंग्या मग तू पण हा विचार का करत नाहीस? का इकडे तिकडे पैसा घालवायचा आणि उपचार करत बसायचं. त्यापेक्षा तोच पैसा एखाद्या अनाथ मुलांच्या शिक्षणाला लावला ना तर पुण्यचं मिळेल तुला. तुझ्या मनातली पोकळी भरेल रे, तुझे आसुसलेलं मन आहे ना त्याला शांती मिळून तुझे सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ. विचार करून बघ तुला नक्कीच आनंद मिळेल मला विश्वास आहे.”

थोडावेळ त्यांचं बोलणं झालं, त्यानंतर सारंगचा मित्र तिथून निघून गेला. रमा आणि सारंग दोघेही विचार करत होते.

“अहो विचार करायला काय हरकत आहे.”

“नाही तुझं म्हणणं बरोबर आहे पण आपल्या घरचे, समाज, आपले नातेवाईक हे काय म्हणतील? ते मान्य करतील?”

“अहो कुणाचं काय करायचं, आपण आपलं बघायचं. चांगलं झालं तरी लोक बोलतात, वाईट झालं तरी लोक बोलतात. त्यांना कुणालाच कुणाचं काहीच बघवत नाही. आपण आपला विचार करूया ना. लोकांचं काय आहे ते कधीतरी आपल्या दुःखात भागीदारी झाले आहेत का सुखातही नाही होणार, काय फरक पडणार आहे.”

“ठीक आहे बघू, विचार करू आणि हो आधी आपण कुणालाच काही सांगायचं नाही. आधी आपण आपला विचार पक्का करू आणि त्यानंतर बाकीच्यांना सांगू.”

“बघा तुम्हाला काय वाटतं.”

“मी विचार करतो.” असं म्हणून सारंग ऑफिसला गेला. 

ऑफिसमध्ये गेल्यानंतर सारंग मनीषशी या विषयावर बोलला. मनीषला पण खूप छान वाटलं. त्यानेही या गोष्टीला दुजोरा दिला.

आता आईला सांगण्याची वेळ आली. सारंगच्या मनात धाकधूक सुरू होती, थोडं टेंशन वाढलेल होतं. आईला कसंही करून आईला समजावून द्यायचं होतं, तिला पटण महत्वाचं होतं.


सारंगने त्याच्या आईला सांगितलं पण त्याची आई जुन्या विचाराची असल्यामुळे तिला हे कधीच मान्य झाल नव्हतं.

“वंश वाढवायला आता दुसऱ्याचं पोर आणायचं घरी, हे इतकच बघायचं बाकी राहिलं होतं. देवा रे हे बघायच्या आधी मरून गेले असते तर बरं झालं असतं.” त्याच्या आईची बडबड सुरू झाली. 


“अग आई दुसऱ्याचं पोर झालं म्हणून काय झालं. रमाला एक मूल मिळेल आणि त्या बाळाला एक आई मिळेल, आईचं प्रेम मिळेल. अजून काय हवंय ग? आपल्या हातून पुण्याच काम घडणार आहे.”


“नको रे बाबा ते पुण्य, ते पुण्य म्हणजे माझ्यासाठी पापचं होय. कोणाचं कसलं पोर, कोणाचं पाप असेल कुणास ठाऊक, ते आपल्या घरात आणायचं आणि आपल्या घरात वाढवायचं, आपलं नाव द्यायचं. बघा रे बाबा मला तर काही पटत नाही.”
सारंगच्या आईची बडबड सुरू होती पण सारंग आणि रमाने लक्ष दिले नाही. त्यांनी ठरवलं की आता आपण बाळ दत्तक घ्यायचं.

एक दिवस सहज म्हणून ते अनाथाश्रम मध्ये गेले. तिथे काही छोटी मुले, काही मोठी मुले बघून रमाला खूप छान वाटलं. रमा बराच वेळ त्या छोट्या छोट्या मुलांसोबत खेळली. त्यांच्यासोबत वेळ घालवला. रमा आणि सारंग त्यांच्यासाठी काही खेळणी घेऊन गेले होते. ते त्यांना दिले. मुलांना खूप आनंद झाला.

काही दिवसानंतर दिवाळी येणार होती म्हणून रमाने अनाथआश्रम मध्ये जेवढे ही मुलं आहेत त्यांच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेतली. कुणाला कपडे, कुणासाठी पुस्तक, कुणासाठी काही खेळणी असे बरंच काही वस्तू घेऊन रमा आणि सारंग अनाथाश्रमात गेले.

रमा सगळ्यांना पुस्तकं वाटतं असताना तिचं लक्ष अचानक बाजूला बसलेल्या एका मुलीकडे गेलं. रमाने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं.

काही वेळाने रमा तिच्याजवळ जाऊन बसली,

“काय ग अशी का बसलीस?”
तिने मान फिरवली, ती रमाशी बोललीच नाही.
“काय झालं बाळा? अशी का बसलीस तू?”

“आता दिवाळी येणार आहे ना? पण माझ्याकडे तर नवीन कपडे नाहीयेत, फटाके पण नाहीयेत. मग मी कसं दिवाळी करणार?”

“अगं असे कसे तुझ्याजवळ नवीन कपडे नाहीत? मी आणलेत ना तुझ्यासाठी नवीन कपडे आणि फटाके ते पण मी तुझ्यासाठी घेऊन येणार आहे. हे बघ तुझ्यासाठी नवीन फ्रॉक आणलाय. कसा आहे?”

“तुम्ही मला देणार?”
“हो, छान दिसतोय ना तुझ्या अंगावर.”

“नाही, नको मला.”

“का नको?”

“कारण तुम्ही मला फ्रॉक द्याल आणि मग मला तुम्हाला पैसे द्यावे लागणार ना? माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी तुम्हाला कुठून पैसे देऊ?”

“अगं वेडाबाई तुला कोणी सांगितलं. अग तुला मला पैसे द्यायचे नाहीयेत. हे माझ्याकडून आहे तुला दिवाळीचं गिफ्ट आहे.”

“खरंच तुम्ही मला देणार?”

“हो ग बाळा..” रमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
तिला खूप आनंद झाला. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रमाला खूप समाधान झालं.

क्रमश:

🎭 Series Post

View all