Login

अश्शी सासू छान बाई... भाग -2

सासू सून संबंध
अश्शी सासू छान बाई... भाग -2

जवळच्या दवाखान्यात दाखल करेपर्यंत वेळ गेला. शेवटी खूप तडफडला पण...
आणि...क्षणार्धात सगळं संपलं.

त्याचं निश्चेष्ट शरीरच घरी आलं.
सर्वत्र हळहळ.
रेवावर तर डोंगर कोसळला होता पण ती माऊली ? वीणा... तिचे हृदय कुठे असेल ?तिला स्वतःवर गुदरलेला प्रसंग आठवला.पण रेवाकडे पाहून तिने सगळं दुःख गिळलं.

कुणी म्हणालं," किती कठोर हृदय आहे तिचं डोळ्यातून एक टिपूस पडला नाही."

ती आतल्या आत किती रडली हे कुणाला दिसणार होते ?

कुणी म्हणालं," तिचे अश्रु आटलेत एवढ्या पहाडासारख्या दुःखाने."

पण एकांतात ती अश्रुला वाट मोकळी करून देत होती.
रेवाला तिने आपले अश्रृ दिसू दिले नाहीत.

अवीचे तेरा दिवस झाले . औपचारिकता म्हणून सगळे सोपस्कार आटोपले.
सगळे नातेवाईक गेले.आता फक्त रेवाचे आईवडीलच होते
.
वीणाताईंनी त्यांना मुद्दामच थांबवून घेतले होते.
वेळ बघून वीणाताईंनी त्यांना बोलावले आणि...

" बघा,मी काय म्हणतेय . मी माझा विचार मांडतेय.
रेवा तुला पटतेय का ते सांग.जबरदस्ती नाही. तुला जे वाटते ते तू सुद्धा मनमोकळे पणाने सांग.

ज्यादिवशी तुझं अवीसोबत लग्न झालं त्याच दिवशी मी तुला सुन नाही तर मुलगी म्हणून स्विकारलं. आज आई म्हणून बोलतेय.

मी तुझं दुःख जाणते सोपं नाही पचवणं ते दुःख.कारण मी ही त्यातून गेले आहे.

पण आज काळ बदललाय. तू एवढ्या दूर एकटी कशी राहू शकशील एवढं दुःखाचं ओझं शिरावर घेऊन ?

माझ्या मनात एक विचार आला तो बोलून दाखवतेय .
आपल्या घरापासून पाचसहा घरं दूर शशी राहतो.अवीचा मित्रच.तूही चांगली ओळखतेस त्याला.तोही उच्चशिक्षित एम्.बी.ए. आहे.रेडीमेड कपड्यांची शोरूम आहे.त्याची बायको वर्षभरापुर्वी पहिल्या बाळंतपणातच गेली.तेही मुली शोधत आहेत.

वीणाताईंनी कुणालाच बोलायची संधी दिली नाही त्या सलग बोलत होत्या. वात्सल्याने काठोकाठ भरलेले हृदय,शब्दाशब्दातून करुणा झरत होती.

बघ तुझी इच्छा असेल तर .तुला नोकरी सोडावी लागेल पण माझ्या नजरेच्या सावलीत राहशील. कन्यादान मीच करेन."

रेवाची आणि तुमची सहमती असेल तरच पुढचे पाऊल उचलू. तसे शशी आणि त्याच्या घरच्यांशी बोलावे लागेल त्यांचं काय मत पडतं तेही बघावे लागेल.

आणि हो तुम्हाला प्रश्न पडला असेल काल मुलाची तेरवी आटोपली नाही तर आज या बाईला हे काय सुचतेय ?काही दुःख वगैरे आहे की नाही ?

पण खरे सांगु का मी जे भोगले ज्या वाग्बाणांनी माझे हृदय विदिर्ण झाले ते इतरांचे बाणासारखे हृदय चिरणारे बोल हिच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी लवकरात लवकर उपाय शोधतेय.

रेवाचा आणि तिच्या आईवडीलांचा कल बघून त्यांनी शशीकडे निरोप पाठवला.त्याला ,त्याच्या आईवडीलांना बोलावून घेतले.
क्रमश:
पुढील भागात भाग-3 अंतिम मधे
शशी कडून होकार येतो का? हे लग्न होते का ? लोकं काय म्हणतात? हे बघूयात पुढच्या भागात...
©®शरयू महाजन

🎭 Series Post

View all