परीक्षा आणि भीती हे दोन्ही शब्द म्हणजे जणू फेविकॉल चा
मजबूत जोडचं.परीक्षा काळात भितीसोबत चिंता,धास्ती.
मुलांच्याचं नव्हे तर अनेकदा पालकांमध्येही या भावना दिसतात.
आधी फक्त बोर्डाच्या म्हणजे दहावी,बारावीची परीक्षा देणाऱ्या..
मुलांच्या घरी असं वातावरण दिसायचं. पण आता तर केजीच्या
मुलांची परीक्षा ही पालक तितक्याच गांभीर्याने घेतानांचे चित्र
दिसते.
परीक्षा जसजशी जवळ येते तसं मुलांचं हसणं,खेळणं सगळं बंद.
अगदी खाता-पिता उठता-बसता \"जा अभ्यास कर परीक्षा जवळ
आली आहे \"हेच त्यांना ऐकायला मिळतं.
प्रत्येक आई-वडिलांना हेचं वाटतं की आपल्या मुलांनी जास्तीत
जास्त अभ्यास करावा. मोठ्या मुलांच्या बाबतीत हे ठीक आहे,
परंतु लहान मुलांच्या बाबतीतही हीच अपेक्षा केली जाते.
ती इतकी लहान असतात ते आपल्या पालकांना विरोधही करु
शकत नाही. आणि हळूहळू त्यांच्या मनात परीक्षेविषयी भीती
निर्माण होते.
आपल्या पाल्याशी बोलताना सुद्धा गुणांच्या टक्केवारी
बद्दलच बोलले जाते चांगला अभ्यास कर चांगले गुण मिळव,
तरच तुला चांगल्या शाळेत ,चांगल्या कॉलेजला, चांगल्या कोर्सला
प्रवेश मिळेल आणि चांगली नोकरी मिळेल, चांगले पॅकेज मिळेल
वगैरे वगैरे.
वास्तविक शिक्षण म्हणजे' सर्वांगिण विकास'पण घरच्या संवादातून
मुलं केवळ पुस्तकी किडा बनतात. त्यांच्या डोक्यावर अभ्यासाचा
ताण येतो. मग डोके दुखणे, चिडचिड होणे, झोप व्यवस्थित न लागणे
विस्मरण होणे, यासारख्या तक्रारी सुरू होतात.
कधीकधी तर कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्येपर्यंत सुद्धा
मुलांची मजल जाते.
म्हणूनच परीक्षा आणि भीती यामुळे तणावग्रस्त झालेल्या
मुला-मुलींना समंजस संवादाद्वारे यातून बाहेर काढायला हवे.
त्यांना योग्य मार्गदर्शन, सतत प्रोत्साहन देऊन अगदी खंबीरपणे
पालकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे.