पूर्वी समाजात बालविवाह प्रथा होती. नकळत्या वयात म्हणजे ..
अगदी बालवयात मुला-मुलींचे लग्न लावून दिले जाई.साथीचे
रोग मोठ्या प्रमाणावर होते. अशावेळी त्या छोट्या मुलीचा
नवरा जर मृत्यू पावला तर तिला बालविधवा म्हणून संपूर्ण आयुष्य
कंठावे लागे.अनेक समाजसुधारकांच्या प्रयत्नातून बालविवाह,
जरठकुमारी विवाह या प्रथा बंद झाल्या. मात्र कपाळावरील कुंकू..
पुसणे , गळ्यातील मंगळसूत्र , पायातील जोडवी काढणे या
कुप्रथेतून वैचारिक दारिद्र्य संपलेले नाही.जन्म- मृत्यू या गोष्टी..
कुणाच्याचं हातात नाही.पती मृत्यू पावला तर कां तीला एवढी
शिक्षा ? त्यात त्या स्त्रीचा काय दोष ? आज समाजात बऱ्याच
प्रमाणात सुधारणा झालेली दिसत आहे. शिक्षणामुळे सामाजिक
जागृती निर्माण झालेली आहे. पण अजूनही प्रयत्नांची गरज आहे .
विधवा स्त्रियांना नोकरी , व्यवसाय निमित्त्याने बाहेर जावे लागते ,
तेव्हा तिने स्वतःच्या संरक्षणासाठी कुंकु लावले , मंगळसूत्र घातले,
असेल तर त्यात वाईट ते काय ? उलट समाजाच्या विखारी...
नजरांपासून ते कुंकू (टिकली ) मंगळसूत्र त्या स्त्रीचं संरक्षण करते.
मग त्यावर टीकाटिप्पणी का? उलट त्यांच्याशी आपुलकीने वागा ,
त्यांना सन्मान द्या. कोणत्याही शुभ कार्यात त्यांना आवर्जून बोलवा.
संक्रांतीच्या कार्यक्रमात त्यांना बोलवा. त्यांना त्यांचा हक्क द्या.
त्यांनाही बरं वाटेल.
समाजातल्या काही लोकांच्या मनात अजूनही रुतून बसलेल्या..
अनेक रूढी , परंपरा , कुप्रथा यात बदल झाला पाहिजे असे..
केवळ म्हणून उपयोग होणार नाही. प्रत्येकाने स्वतःपासून..
त्याची सुरुवात करावी लागेल.