Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३

गोष्ट लग्नानंतरची
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३

मागील भागाचा सारांश: अभिराजच्या घरी ऋतुजाचा गृहप्रवेश झाला. तसेच अभिराज व ऋतुजाचा हळद उतरवण्याचा कार्यक्रम झाला.

आता बघूया पुढे….

दुपारी जेवण करताना आजूबाजूला बसलेल्या बायका ऋतुजाचं निरीक्षण करत होत्याच शिवाय तिच्या बद्दल कुजबुज करत होत्या. बायका आपल्याकडे एकटक बघत आहेत, हे ऋतुजाच्या एव्हाना लक्षात आलं होतं. ऋतुजाला जेवण करताना अवघडल्यासारखे होत होते. ऋतुजाच्या हालचाली वरून आरतीच्या हे लक्षात आले होते.

"गया काकू, माझी वहिनी दिसायला सुंदर आहे, पण तिच्याकडे सतत टक लावत बघू नका. तिला नजर लागेल." आरती हसून म्हणाली.

"आरती, काही काय बोलते ग बाई. मी तिच्याकडे टक लावून कशाला बघू, मी आपलं जेवण करते आहे." गया काकू आपली नजर फिरवत म्हणाली.

"बरं बाई, माझं चुकलं. तिला सुखाने जेवण करू द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. ती आपल्यात अजून नवीन आहे. हळूहळू तिला तुमची आणि सगळ्यांच्या नजरांची, बोलण्याची सवय होऊन जाईल." आरती अस बोलल्यावर बायकांनी ऋतुजा वरील नजर हटवली.

ऋतुजा खाली मान घालून गालातल्या गालात हसली. जेवण झाल्यावर ऋतुजा, पियू, अर्पिता, आरती आणि अभिराज दोन-तीन चुलत बहिणी बसलेल्या होत्या. त्यांच्यात इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या. ऋतुजा सगळ्यांशी आदराने बोलत होती.

"आरती दीदी, शीतल कुठे आहे? मला कालपासून दिसलीच नाहीये." ऋतुजाने आरतीला विचारले.

"तिला स्वयंपाक घरातून बाहेर पडायला वेळच मिळत नाहीये. ते झालं की परीच काहीतरी सुरूच असत. तिला तिथल्या तिथे घुटमळायला आवडतं. मी बघ बर सगळीकडील काम करून येते." आरतीने सांगितले.

"आता त्यांच्यावर सगळी जबाबदारी असेल, मग त्या तरी काय करतील?" अर्पिताने आपली प्रतिक्रिया दिली.

यावर अभिराजची एक चुलत बहीण म्हणाली,
"शीतल वहिनीचं हे नेहमीचंच असतं. कार्यक्रम कोणताही असो ती स्वयंपाक घर काही सोडत नाही. तिला तिथंच आवडत असेल. आम्ही सुरुवातीला बळजबरीने आमच्यात गप्पा मारायला ओढून घेऊन यायचो, पण थोडा वेळ झाला की, ती पुन्हा निघून जायची. आता बोलावण्याचे कष्टच घेत नाही."

ऋतुजाने यावर आपले काहीच मत दिले नाही. तेवढ्यात अभिराजची आई तिथे येऊन म्हणाली,
"पोरींनो, ह्यांना जरा आराम करू द्या. गप्पा आता बस झाल्या. आरती माझ्यासोबत चल एक काम आहे. ऋतुजा, अर्पिता आणि पियू तुम्ही रुममध्ये जाऊन आराम करा. संध्याकाळी तुम्हाला देवदर्शनाला जावे लागेल."

ऋतुजाने मान हलवून होकार दर्शवला. ऋतुजा, पियू व अर्पिता रूममध्ये निघून गेल्या. ऋतुजाचा चेहरा चिंताग्रस्त असल्याने अर्पिता म्हणाली,
"ऋतू, कसला विचार करत आहात?"

"वहिनी, आता आईंनी मला आराम करायला सांगितला, पण हेच शीतलला सांगत असतील का? शीतल स्वतःहून कामात गुंतत असेल की तिला कोणी गुंतवत असेल?" ऋतुजाच्या मनात बरेच प्रश्न सुरू होते.

"ऋतू, एक सांगू. आता सध्या तुम्ही या सगळ्याचा विचार करू नका. कुठल्याही एका तर्कावर येण्याआधी आपल्याला दोन्ही बाजू माहीत असायला हव्या. तुम्हाला हळूहळू सगळ्यांचे स्वभाव कळू लागतील. सगळ्यांच्या स्वभावाला दोन बाजू असतात, एक पॉजिटिव्ह आणि दुसरी निगेटिव्ह. आपल्याला जे पटत ते घ्यायचं. मात्र स्वतःचं मन मारून घ्यायचं नाही. तुम्हाला जे पटेल तेच करायचं. समोरच्याला न दुखावता तो चुकतोय हे सांगण्याची कला तुम्हाला अवगत करावी लागेल.

तसंही तुम्ही पुण्याला राहणार, तर इकडे जास्त राहण्याचा प्रश्न येणार नाही, सो एवढा विचार करण्याची गरज नाहीये." अर्पिताने ऋतुजाला समजावून सांगितले.

दोघींचं बोलणं सुरू असतानाच दरवाजावर नॉक करून शीतलने विचारले,
"आत येऊ का?"

"हो, ये ना." ऋतुजा हसून म्हणाली.

शीतल आत येत म्हणाली,
"तुही विचार करत असशील की, ही आपली जाऊबाई कशी आहे, घरात आल्यापासून आपली विचारपूस सुद्धा करायला आली नाही. अग काय करू स्वयंपाक घरातून हलताच येत नाही. दोन मिनिटं कुठे गेले तरी सगळे शीतलच्या नावाचा जप सुरू करतात. त्यात परी इतकी त्रास देते आहे ना. मला नको नको करून टाकलं आहे. आता तिला झोपवलं आणि लगेच तुझी भेट घ्यायला आले."

शीतल सगळं काही एका दमात बोलून गेली.

"परी आईंकडे राहत नाही का?" ऋतुजाने विचारले.

"राहते, पण आता आईचं कोणत्या ना कोणत्या कामात बिजी आहेत. परीला मला त्यांच्याकडे देता येत नाही." शीतलने उत्तर दिले.

"लग्नघर म्हटलं की धावपळ आलीच." अर्पिता म्हणाली.

"तू उभी का, बस ना. तू जेवण केलंस का?" ऋतुजाच्या बोलण्यात काळजी दिसून येत होती.

"बसायला मला खरच वेळ नाही. जेवण अजून करायचं आहे. घरातील सगळेजण जेवल्याशिवाय मला जेवायला बसता येत नाही." शीतलने सांगितले.

शीतल बोलत असतानाच आरती तिथे आली,
"शीतल, तू इथे काय करते आहेस? तिकडे मावशी तुला शोधत होती, तिला काय रवा सापडत नाहीये म्हणे."

"ऋतू, मी माझ्या कामाला जाते." एवढं बोलून शीतल तेथून निघून गेली.

"हिचं आपलं असच असतं. कामाच्या वेळी ही गायब होते." आरती चिडून म्हणाली आणि शीतलच्या पाठोपाठ निघून गेली.

ऋतुजा अर्पिताकडे आश्चर्याने बघून म्हणाली,
"वहिनी, हे नेमकं काय समजायचं?"

"याला एक प्रकारचं फॅमिली पॉलिटिक्स म्हणू शकतो. तुम्ही याकडे आत्तापासून एवढं लक्ष देऊ नका." अर्पिताने सांगितले.

"आरती दीदी, पुण्याला वेगळ्या आणि इथं वेगळ्याच भासत आहेत." ऋतुजा म्हणाली.

"काही व्यक्ती परिस्थिती प्रमाणे बदलत असतात. माणस वाईट नसतात. परिस्थिती त्यांना तसं बनायला भाग पाडते. आता डोक्याला अतिताण देण्यापेक्षा जरावेळ झोपा. डोकं शांत होईल आणि त्यातील विचार सुद्धा." अर्पिताने आपली प्रतिक्रिया दिली.