अरे संसार संसार... भाग 2
भाग 1 क्रमशः
नवरा कमी डोक्याचा असल्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता.
पण आता पुष्पाला त्या घरात राहायचंच नव्हतं. पुष्पाने त्या घरातून पाय काढला, नवऱ्याला घेऊन ती जंगलात गेली.
जंगलात जमिनीचा तुकडा होतं. गुरासारखं राबून तिथं मोती पिकवले. तिथे शेती करून पैसे कमवायला लागली. सुखाचा संसार सुरु झाला. पण म्हणतात ना सुखाचे दिवस येतात तसे दुःखाचेही येतात..
सावकाराने तिथेही तिला सोडलं नाही, आवडाव बघून तिथे तिच्यावर अत्याचार केले.
ती पुन्हा डगमगली, हरली, रडत बसली..
नियतीच्या खेळात ती हरली. नशिबाने साथ सोडली. कुठेही जावं तर त्या नराधमाचाच चेहरा समोर यायचा. अशातच तिला दिवस गेले पण नवऱ्याने नाकारलं.
“त्याच्या पापाला मी माझं नाव का देऊ?” अस म्हणून त्याने तमाशा केला, तिला मारहाण केली.
अशातच तिचं मुलं गेलं.
दिवस महिने सरत गेले. काही महिन्यांनंतर नवऱ्यापासून तिला दिवस गेले. ह्या वेळी तो खूप आनंदी होता. तिची काळजी घेऊ लागला. स्वतः रानात काम करायला जाऊ लागला, जसं जमेल तसं काम करायचा. पण पुष्पाला काहीही करू देत नव्हता.
एकदा तो तिला मंदिरात घेऊन गेला.
तिथे दोघांनी दर्शन घेतले, मंदिराच्या परिसरात थोड्या वेळ बसले, काही वेळाने पुष्पाला भुरळ आली ती गिरक्या घालून खाली पडली. तिच्या नवऱ्याने तिला लगेच उचलून बाकावर बसवलं. तितक्यात एक आजी आल्या, त्यांनी तिला बघितलं.
“काय झालं लेकरा?”
“बेशुद्ध पडली आहे, काय झालं कुणास ठाऊक?”
“पोटुशी आहे?”
“हो”
“तू जा, तिच्यासाठी पाणी घेऊन ये.”
तो लगेच पाणी घेऊन आला, तिच्या चेहऱ्यावर थोडं थोडं पाणी टाकलं.
काही वेळाने पुष्पा शुद्धीवर आली.
“ये पोरा जप हिला,हिची तब्बेत खालावत आहे, जपलं नाहीस तर कायमची गमावशील.”
“पण आजी मी तर काहीच काम करू देत नाही.”
“पण खायला देतोस का चांगलं.”
तो विचारात पडला.
“थांब पोरी मी आली.” आजी पुष्पा कडे बघत म्हणाली.
आजी तिची थैली आणायला गेली, ती थैली घेऊन आली, त्यातलं एक गाठोडं काढलं, त्यात भाकरी आणि पिठलं होतं, त्या आजीने ते पुष्पाला भरवलं.
पुष्पाचे डोळे भरून आले, तिला त्या आजीच्या डोळ्यात स्वतःविषयी प्रेम आणि माया दिसत होती.
आज बऱ्याच दिवसानंतर ती असं पोट भरून जेवली होती.
तिने आजीला नमस्कार केला आणि ती तिथून निघून गेली.
आजीही तिच्या मागे मागे गेली.
दोघेही त्यांच्या झोपडीत गेले, ती मोडकी झोपडी बघून आजीचे डोळे पाणावले.
‘काय होणार पोरीचं? कसं करणार ही?’ ती स्वतःशीच बोलू लागली.
थोडा वेळ तिथे उभे राहून आजी निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी त्यांच्या दारात उभी होती. पुष्पा लगेच त्यांच्याजवळ गेली. त्यांना नमस्कार केला.
“आजी तुम्ही सकाळी सकाळी इकडे?”
“भूक लागली असेल ना लेकी तुला? तुझ्यासाठी भाकर आणली.”
“आजी हो तुम्ही कशाला? इकडे म्हणजे..” ती अडखळत बोलत होती.
“काही बोलू नकोस मला माहिती आहे तुला भूक लागली आहे. दोन जीवाची आहेस ना मग जास्त भूक लागते आणि सकाळी उठल्या उठल्या तर पोटात काहीतरी लागतच ना. आता तुझा नवरा जाईल आणि काहीतरी घेऊन येईल तोवर तू उपाशीच राहणार म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे बस आणि खाऊन घे.”
पुष्पा आजीला बिलगली आणि रडू लागली.
क्रमशः