अर्धांगिनी भाग २
क्रमश: भाग १
पाण्यात दगड पडावा असा आवाज झाला आणि सगळे विहिरीकडे पळाले . त्याच्या नंतर पुन्हा तसाच आवाज आला . मंडपात बसलेल्या लोकांना काही कळेना कि नक्की काय होतंय ..
तेवढ्यात कोणी तरी ओरडले " मालती ने विहिरीत उडी मारली . आणि घरात सगळ्यांची रडारड , आरडा ओरड सुरु झाली .
अण्णांचे पाय थरथर कापू लागले . अण्णा तिथेच एका पायरी वर बसले .
मालतीचा भाऊ विहिरीत वाकून बघत होता . त्याने बघितले कोणीतरी एक जण मालतीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आहे . तो कोणीतरी दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द रमेश चा मित्र चंदू होता . जसे लग्न मोडतय हे कळले तसा तो सिगारेट ओढण्यासाठी विहिरी जवळ गेला होता . तेवढ्यातच मालतीने पाण्यात उडी मारली . आणि तिला वाचवण्यासाठी चंदू ने मागचा पुढचा विचार न करता त्याने विहिरीत उडी मारली . पण त्याला मालतीला वरती आणता येत नव्हते शेवटी मालतीच्या भावाने पण उडी मारली आणि दोघांनी मिळून मालतीला वर काढली .
तिच्या भावाने पालथी घालून दाबून दाबून तिने पिलेले पाणी बाहेर काढले आणि मालतीने पाणी बाहेर फेकले आणि एकदम जागी झाली .
आपण वाचलोय हे बघून तिला रडू कोसळले .
मालतीच्या आईने आणि मैत्रिणींनी तिला आतमध्ये नेली .
मालतीला शुद्ध आल्यावर अण्णांनी सर्वांना माइक वरून सांगितले " हे लग्न मोडले "
अण्णा म्हणाले "थांबा लगेच कोणीही जाऊ नका . मला थोडे बोलायचे आहे . आज इथे जे घडले ते सगळ्यांनी पहिले . दागिन्यांचा नादात मी आता माझी सोन्यासारखी पोर गमावून बसलो असतो . त्यामुळे मी आत्ता इथे सर्वांच्या साक्षीने सांगतो कि रमेश बरोबर ठरलेले माझ्या मुलीचे लग्न मी मोडत आहे .
मला माझी मुलगी काही जड नाही. नाही लग्न झाले तरीही मी तिला आयुष्यभर सांभाळू शकतो . आणि सांभाळायची गरजच काय ती स्वतः एक शिक्षिका आहे . ती तिच्या पायावर उभी आहे उलट थोडे दिवसन्नी तीच आम्हाला सांभाळेल . आज तिने भावनेच्या भरात जे काही पाऊल उचलले ते अत्यंत चुकीचे होते . लग्न मोडले तर मोडले . त्यासाठी जीव द्यायची काहीच गरज नाहीये . पण अशा प्रत्येक स्त्री ला एकच भीती असते ती म्हणजे समाज . हा समाज आपल्याला नावे ठेवील. एकदा का मुलाच्या नावाची हळद लागली कि त्या मुलीवर त्या मुलाच्या नावाचा शिक्का बसला हे अतिशय वाईट आहे . एकदा लग्न मोडले कि पुन्हा लग्न जुळत नाही . दुर्दैवाने हे सगळे आता माझ्या मुलीच्या वाट्याला आले आहे . बोलता बोलता अण्णांच्या डोळ्यातला एक अश्रू खाली पडला . आज समाजाने विचार केला पाहिजे कि माणूस महत्वाचा कि सोन्याचा दागिना महत्वाचा . माणूस म्हणून माणसाची काही किंमत आहे कि नाही ?
असो जे झाले ते झाले . आज इथे मी हे लग्न मोडले असे घोषित करतो .
तेवढ्यात मालती एक साधी घरातली साडी नेसून बाहेर आली .
मालती " मला पण काही बोलायचंय "
मालती ला आपण घेतलेली स्टेप हि अत्यंत चुकीची होती हे आता कळून चुकले होते . आपल्या आणि आपल्या आई वडिलाना झालेला त्रास , अपमान आता तिला सहन होत नव्हता
मालती " जर याच मंडपात कोणी उपवर असेल आणि माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर सांगा .मी लग्नाला तयार आहे . "
अण्णा पण खाली बसले . “काय बोलतेस हे पोरी .. “
मालती " नाही अण्णा , मी बरोबर बोलतेय , गेले दोन महिने आपण लग्नाची तयारी करतोय . अर्धा खर्च आधीच झालाय आणि आता हे लग्न मोडणार म्हणजे आपण केलेले सगळे फुकट . या शिवाय हा समाज कितीही झाले तरी मागून मला नावे ठेवणारच आहे. माझ्या लग्नाचा विषय आज अत्ता मला मिटवायचा आहे . "
गावात असे कोण तयार होणार .” कोणी दुसर्याने रिजेक्ट केलेली मुलगी एक्सेप्ट तरी कोण करणार? . कितीतरी उपवर मुले होती पण कोणी पुढे येई ना .
मालती" ठीक आहे , अण्णा मी आज हे गाव सोडून जातेय . या पुढे तुम्ही तुमची मुलगी मेली असे समजा . मी चांगली शिकलेली आहे मी कुठेही जाऊन माझ्या पायावर उभी राहू शकते .पण काही झाले तरी आज माझा या घरातील शेवटचा दिवस असेल . अण्णा तुम्ही घाबरू नका ,मी तुम्हला वचन देते कि मी माझ्या जीवाचे काहीही वाईट करून घेणार नाही . आणि मालती पुन्हा घरात जायला निघाली
तेवढ्यात रमेश चा मित्र चंदू पुढे आला .
"मी तयार आहे लग्नाला "
मांडवात सगळे एकमेकांशी कुजबुजू लागले ..
रमेश " चंदू .. तू काय करतोयस तुला काही कळतंय का ?"
चंदू " हो नक्कीच .. आणि आता तू मोठ्यांच्यात बोलू नकोस . "
रमेश " चंदू तू माझा मित्र आहेस . आणि माझ्या लग्नासाठी माझ्या बरोबर आलेलास हे विसरलास का ?"
चंदू " नाही रे .. पण तू कसा वागलास ? तुम्ही जे काही वागलात हे फार चुकीचे होते . "
रमेश " तू हे विसरू नकोस कि तू एक अनाथ आहेस "
चंदू " तू आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद .. जो अनाथ असतो ना तो हे कधीच विसरत नाही कि तो अनाथ आहे . आज मला मी अनाथ असल्याचं अभिमान आहे कि मी मला जेव्हा काही खटकते तेव्हा मी मोकळे पणाने बोलू शकतो . माझे मत मांडू शकतो . त्यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही .
रमेश ला चंदू ला काय म्हणायचेय ते नक्कीच कळले होते . आणि तो गप्प बसला .
चंदू " नमस्कार अण्णा , मी थोडे माझ्या बद्दल सांगतो .. मी अनाथ आश्रमात वाढलो . तिकडेच शिकलो आणि आता रमेश च्या च ऑफिस मध्ये तेवढ्याच पगारावर काम करत आहे . मला माझी जात धर्म काहीच माहित नाही पण मी हिंदू आहे हे नक्की . मी मिश्र आहारी आहे . मी सिगारेट दारू या सगळ्या गोष्टी प्रमाणात करतो . व्यसन कोणतेच नाही . या व्यतिरिक्त मी आत्ताच्या आता तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे ते हि जर तुम्हाला योग्य वाटले तर "
अण्णा " तुम्ही तर माझ्या मुलीचे प्राण वाचवलेत . तुम्ही नसता तर आज इथून डोली न उठता अर्थी उठली असती
मी स्वतः आयुष्यभर गावाला सर्व धर्म समान हेच शिकवत आलो आहे .
मला तुम्ही जावई म्हणून पसंत आहेत . आणि अण्णांनी सांगितले “लावा रे लाऊड स्पीकर . . सर्वांनी माझ्या मुलीला आशीर्वाद देऊन आणि जेवून जावे . “
गावचे सरपंच चंदू ला म्हणाले " शाब्बास रे पोरा.. फार मोठा आहेस ती मनाने . आज तुझा बाप म्हणून मी उभा राहतो . मालती इतकी चांगली मुलगी तुला शोधून सापडणार नाही ."
चंदू आलेल्या कपड्यात लग्नाला उभा राहिला . चंदूला पण एक फेटा बांधण्यात आला . आणि चंदू पाटावर बसला . भटजींनी आधी साखरपुडा आणि मग लग्न असे दोन्ही विधी एका मागून एक केले. मालती ला तिच्या मैत्रिणींनी पुन्हा तयार केले . आधी साखरपुड्याची साडी आणि मग बनारसी शालू पुन्हा नेसवला . आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने अख्या गावा समोर मालतीचे लग्न खूप छान झाले .
रमेश ची फॅमिली मात्र तेलही गेले आणि तूपही गेले हाती राहिले धुपाटणे अशी अवस्था होऊन रिकाम्या हाती घरी गेले . आज त्यांनी खऱ्या लक्ष्मी ला नाकारले होते .
गावातल्या लोकांना आज लग्नाचे म्हणून खूप छान जेवण होते . गावातील लोक पोटभरून जेवले आणि मनभरून मालतीला आशीर्वाद देऊन गेले .
लग्न लागले संध्याकाळ झाली .चंदू म्हणाला “आता आम्ही निघतो . “
अण्णा " आता तुम्ही कुणिकडे जाणार "
चंदू " माझी खोली आहे तिकडेच जाऊ . तसही रमेश चे लग्न झाल्यावर मी खोली सोडणार होतो तर मी दुसरी खोली बघितली होती . तिकडेच जाईन "
अण्णा " तशी आज जाई पर्यंत रात्र होईल उद्या सकाळी निघालात तरी चालेल "
चंदू "पण वरात आज घरातून गेली पाहिजे ना "
अण्णा " हो पण .. काही रीती रिवाज नाही पाळले तरी चालतील "
सरपंच " अण्णा .. आपण मोठी वरात काढू , चंदू आता माझा मानस पुत्र आहे . तुमच्या घरापासून वरात आमच्या घरा पर्यंत येईल आज रात्री दोघे आमच्या कडे राहतील आणि उद्या सकाळी निघतील .
अण्णा नि सरपंचांना हात जोडले . सरपंचांनी अण्णांचे हात धरले
सरपंच " अण्णा , अहो मी काय परका आहे का ?"
सरपंचानी मोठा लाऊड स्पीकर बोलावला .
घरात मालती च्या बिदाई ची वेळ आली . मालती च्या बॅग आधीच भरलेल्या होत्या . जे जे काही द्यायचे होते ते दिले आणि मालती आई , भाऊ आणि अण्णांना भेटून घरातल्या देवांना नमस्कार करून बाहेर पडली . तिच्या मनाची अवस्था काय असेल आपण समजूच शकत नाही . कधीही न बघितलेल्या माणसा बरोबर निघून जायचे तेही कायमचे अजून तर तिने चंदू ला नीट पहिले पण नव्हते . पण ती आता मनाने खंबीर झाली होती .
घरून बाहेर पडत पडत अण्णांचा मात्र तोल गेला .
अण्णा रडू लागले " मालती , काळजी घे ग ,देवाने तुझ्या आयुष्यात काय लिहुन ठेवलेय मला नाही माहित .. जावई बापू माझ्या मुलीला सांभाळा "
चंदू "मी समजू शकतो तुमच्या भावना .. सध्या तरी मी हेच सांगेन कि काळजी नसावी .. "
मालती आणि चंदू च्या लग्नाची वरात अख्या गावात मोठ्या धुमधडाक्यात निघाली . ठरल्या प्रमाणे चंदू आणि मालती रात्री सरपंचाच्या घरी राहिले आणि भल्या पहाटेच्या गाडीने शहरात आले .
मालती तशी पहिल्यांदाच शहरात आली होती . ती फक्त चंदू च्या मागे मागे तिची एक बॅग घेऊन चालत होती . दोघेही एकेमेकांना अपरिचित होते .