अर्धांगिनी भाग १९
क्रमश: भाग १८
काही पण असो दोघांमधला रुसवा आत्या बाईंच्या पुढाकारानेच गेला होता . म्हणून पूर्वी पासून म्हणत घरात वयस्कर माणसे असावीत . वयस्कर माणसे त्रयस्था सारखा विचार करून मध्यस्त करतात .
मालती ला त्या म्हणाल्या कि आता बाळकृष्ण येऊ दे म्हणजे झाली आता मुलगी दोन वर्षांची झाली . आता दुसरा चान्स घ्या हे असे सांगणारे पण घरात कोणीतरे हवे .
चंदू चा मालतीचा संसार खूप बहरत गेला . तिला नंतर एक मुलगा आणि अजून एक मुलगी झाली .. एकमेकाला भावंडच कामाला येतात हे मालतीला बहुदा चांगलेच पटले असावे .
चंदू ने बजाज स्कूटर घेतली . आता चंदू मस्त स्कूटर वर बसून ऑफिस ला जातो .. मालती ची सकाळची शाळा असली कि तिला सोडायला जायचा .. मालती पण चंदू च्या बजाज स्कूटर वर मोठया ऐटीत बसायची ..
चंदू च्या घराचे गोकुळ झाले होते .. मुलं पटापट मोठी होत होती .. सगळे एकदंडी अभ्यासला बसायचे . एकदंडी जेवायला बसायचे ..रोज रात्री दोघं पैकी एका ने मुलांना गोष्टी सांगायच्या .. कधी मालती गोष्टी सांगायची पण चंदू इतकी रंगवून रंगवून गोष्ट सांगायचा कि मुलांना चंदू च्या गोष्टीची आतुरता असायची .
सुट्टीच्या दिवशी सर्व फिरायला जायचे .. कधी बागेत एक भेळ घ्यायची आणि सर्व मिळून खायचे नाहीतर मग खारे शेंगदाण्याची पाकीट हाच खाऊ असायचा . यामुळे काय होयचे मुलांना पण काटकसर आणि एकमेकांना वाटून खायची सवय लागते . म्हणता ना एक तिळाचा कण सात जणात वाटून खाता आला पाहिजे . हे वाटून खायचे संस्कार पण असे रूळवायचे असतात . दोघांना दोन न देता दोघात एक घेऊन द्यायचे मग ती वस्तू असो किंवा खाऊ .
धनु च्या पाठीवर त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव श्रीरंग ठेवले. श्रीरंग च्या पाठीवर त्यांना एक मुलगी झाली ती जरा उशिरा झाली .. तिचे नाव राजश्री ठेवले.
मुलांना पण आपल्या परिस्थितीची जाण होत गेली आणि ती पण चंदू आणि मालती सारखी गुणी मुले होत गेली . धनश्री तर मालती ची झेरॉक्स कॉपी दिसायची .. दोन मोठ्या वेण्या आणि वेणीत एक छोटेसे फुल घालूनच शाळेत जायची . श्रीरंग तर चंदू सारखाच दिसायचा . त्याला बघितल्यावर कोणी पण सांगेल कि हा चंदू साहेबांचा मुलगा .
धाकटी राजश्री कोणावर गेली काय माहित पण सगळे म्हणायचे रुक्मिणी आत्याचं मालती च्या घरी परत आल्या . तिच्या वागण्यात , बोलण्यात पण रुक्मिणी आत्यानं सारखा एक ठसका असायचा .
चंदू ची मुले अभ्यसात पण हुशार होती . मालती स्वतः शिक्षिका असल्या मुळे ती मुलाकडून चांगला अभ्यास करून घ्यायची . त्यांचे मार्क्स बघून त्याच्या वर्गातील मुले मालतीला विचारू लागले कि बाई तुंम्ही शिकवणी घ्याल का ?
मालती आधी नाहीच म्हणत होती पण तिच्या मुलांचा अभ्यास तर वेळ काढून घेतच होती ना .. मग तेवढ्या वेळेत बाकीच्या मुलाचा अभ्यास होईल .. पैशांपेक्षा मुळात तिला शिकवण्याची आवड आणि मुलांचे पालक पण मागे लागले कि " घ्या ना शिकवणी "बाई .
मग काय मालतीची आपोआप च डबल ड्युटी सुरु झाली . जर सकाळची शाळा असेल तर संध्याकाळी आणि जर दुपारची शाळा असेल तर सकाळी अशी मालती शिकवणी घेऊ लागली . मुळातच ती हाडाची शिक्षिका होती त्यामुळे ढ मधला ढ मुलगा पण चांगल्या मार्कांनी पास होयचा . त्यामुळे ति च्या शिकवाणी ला भरपूर मुले यायची . किती तरी गरीब मुलांना मालती तर फुकटातच शिकवायची कारण पैसे कमावणे हा हेतू नव्हता .
हळू हळू चंदू ने जागा घेतलेल्या घराचा पाया बांधला .. थोडे पैसे आले कि थोडे काम असे करून करून करून चंदू ने एक मस्त रो हाऊस सारखे घर बांधले त्यात मालतीच्या क्लास साठी एक स्पेशल रूम पण ठेवण्यात आली .
जवळ जवळ एकाच ठिकाणी त्यांनी १० वर्षे काढली . आधी तर एकच खोली होती पण नंतर त्यालाच जोडलेली खोली घेतली होती . मालकीण बाईला पण त्यांनी जेव्हा त्यांचे घर सोडले तेव्हा खूप वाईट वाटले . पण कधी तरी स्वतःच्या घरात तर जायचेच होते ना .. घरा पुढे मस्त अंगण . अंगणात तुळस मागे थोडी जागा जिथे मालतीच्या गावा सारखी पपई , पेरू ची झाडे लावली . मोगरा , अबोली जास्वदांची झाडे लावली ..
प्रथम दर्शनी एक मोठा झोपाळा लावला . रोज संध्याकाळ झाली कि दिवा लावला कि मालती आणि चंदू त्या झोपाळ्यावर बसून झोके घेत गाणी गुणगुणत .. गप्पा मारत बसायचे .
मुख्य म्हणजे घराचे नाव काय ठेवायचे .. तर चंदू चे म्हणणे होते कि “मालती सदन” ठेवायचे पण मालती ला काही हे नाव पसंत नाही आले .. हे काय माझ्या एकटीच आहे का ? आपल्या दोघांचे आहे असे म्हणू लागली
चंदू " मग आता तूच काही तरी सुचव"
मालती " हे घर बांधून आपण आपल्या दोघांचे स्वप्न पूर्ण केले आहे तर याचे नाव आपण " स्वप्नपूर्ती " असे ठेवू .. बघा तुम्हाला आवडते का ?"
चंदू " तुला आवडलाय ना .. मग झालं .. आणि त्याच्या घराचे नाव " स्वप्नपूर्ती " असे ठेवण्यात आले .
चंदू आणि मालती ने मुलांना पण छान शिकवले . धनश्री डॉक्टर झाली आणि तिने एका डॉक्टर मुलाशी लग्न केले... श्रीरंग आता इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहे आणि चांगली मार्कांनी नक्कीच पास होईल असा हुशार आहे . राजश्री आता बारावी ला आहे आणि आता ती कोण होते ते अजून काही ठरले नाही पण तिला पण मालती सारखं टीचर बनायचंय .
थोडक्यात काय सगळे आलबेल आहे .. चंदू ला दोन वेळा एम्प्लॉयी ऑफ द इयर चा सन्मान मिळाला .. आता दोन वर्षांनी चंदू ची रिटायरमेंट ची वेळ आली होती .
मालती ला पण २ वेळा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला .
आज लग्नाला इतकी वर्षे झाली चंदू चा अपघात झाला होता ते २ महिने सोडले तर असे कधीच झाले नाही कि चंदू ने मालतीला कधी गजरा आणला नाही . दोघांचे केस काळ्याचे पांढरे झाले .. पण त्याचे प्रेम मात्र वाढतच गेले ..
मालती ने घराला ना मात्र अगदी समर्पक ठेवले होते . चंदू बरोबर संसार करताना मालती ची सगळी स्वप्न आणि चंदू ने पूर्ण केली होती .
जेव्हा लग्न केले किंवा लग्न झाले तेव्हा एकमेकांची साधी ओळख सुद्धा नव्हती . त्यात चंदू अनाथ म्हणजे त्याचे काही घराणे वगैरे असेही काही नव्हते .. तरी पण तेव्हा मालतीने ,चंदू ने आणि मुख्य म्हणजे अण्णांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांचे लग्न झाले .
चंदू नेहमी म्हणतो तसेच " माणूस काय हो निमित्त मात्र असतो सगळी कृपा आणि ईच्छा हि देवाचीच असते “
प्रतेय्काचा जोडीदार देवाने राखून ठेवलाय . तो तुम्हाला शोधता आला तर बरा नाहीतर काहीतरी निमित्ताने तो तुमच्या समोर येणारच .
म्हणून तर म्हणतात जे होते ते चांगल्या साठी ..
चंदू आणि मालती चा संसार एकमेकांवर वाढत गेलेल्या प्रेमामुळे बहरत गेला .. वाढत गेला आणि आणि आदर्श बनत गेला .. आज त्या शहरात अजूनही लोक त्यांच्या लग्नाची कथा त्याच्या मुलं बाळांना सांगतात कि कसे ह्या दोघांनी एक मेकांना सावरले ... एकमेकांना आधार देत .. आधार घेत ते एकरूप झाले आणि त्याचे पुढील आयुष्य सुखात गेले .. मुलं बाळांची लग्न केली .. नातवंडे झाली आणि एका अनाथ मुलाचे घर बनले . चंदू च्या सदनात आजी आजोबा , मुले सुना , जावई ,आणि नातवंडे येऊन घराचे गोकुळ झाले .. कारण एकच मालती सारखी अर्धांगिनी चंदूच्या आयुष्यात आली . मालतीने ख ऱ्या अर्थाने चंदू चे अनाथ पण स्वीकारले . त्याच्या सुखात , दुःखात , त्याच्या बरोबरीने उभी राहिली .
या अर्धांगिनी ला काय हवे असते फक्त नवऱ्या कडून प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टींच्या जोरावर ती एखाद्या हिरकणी सारखी पटापटा सगळे चढ उतार पार करते.
तू दुर्गा , तू शक्ती ,तू रणरागिणी
तू माता , तू आई , तू जगत जननी
तू कन्या ,तू स्नुषा ,तू भगिनी
तू दिशा , तू दीक्षा , तू अर्धांगिनी
(स्नुषा: snusha (सून))
समाप्त !!!
(कथा कशी वाटली ते सांगा . वाचकांचे आणि ईराचे मनापासून धन्यवाद ..)