Login

अर्धांगिनी भाग १४

in this part felicitation of chandu happens in the village

अर्धांगिनी भाग १४

क्रमश: भाग १३

चंदू घरी आला पण त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते , कुठे तरी त्याला मनात हीच खंत होती कि जरी रमेश च्या ह्या हाल होण्याला तो जवाबदार नाहीये पण तरीही मालती चे लग्न  आधी त्याच्याशी होणार होते . जोपर्यंत  रमेश चे सगळे नीट होत नाही तोपर्यंत त्याच्या मनातला शांती मिळणार नव्हती . रमेश जोपर्यन्त त्याच्या संसारात रमत नाही तोपर्यंत मालतीचे नाव त्याच्या मनात राहील असे त्याला वाटत होते .

मालतीला हे जाणवत होते इथे आल्यापासून चंदू काही तरी विचारात मग्न असायचा . त्याच्या डोक्यात काही तरी चालू  आहे . एकटा काय गावात जातो .  मालती शी काही गोष्टी लपवतोय हे तिला जाणवले होते .

रमेश च्या घरातून आल्यावर चंदू बाहेर झोपाळ्यावर एकटाच बसला होता . मालती आतून बाहेर आली तर हा शून्यात नजर ठेवून कसला तरी विचार करत होता . इतकं कि त्याला मालती त्याच्या जवळ आलेली पण दिसली  नाही

मालती " अहो , काय ? कसला विचार करताय ? "

चंदू " काही नाही .. असेच बघतोय तुमचे घर "

मालतीने त्याच्या डोक्याला हात लावून बघितला ताप वगैरे नाही ना आलाय

चंदू " नाही ग .. मी ठीक आहे "

मालती " मग डोके दुखतंय का ? थोडे दमल्या सारखे वाटताय म्हणून विचारले ?"

चंदू जरा वैतागूनच " नाही ग ,तुझं आपलं काहीतरीच .. जरा शांत बसला होतो तर .."

चंदू असा कधीच वैतागत नाही . मालती जरा  घाबरलीच

चंदू "मालू , अग तू काही तरी उगाच विचार करू नको .. मी  ठीक आहे.. जरा वेगळ्याच विचारात होतो . तू .. तू बरी आहेस ना .. आजची दुपारची गोळी खाल्लीस का ?

मालू " हमम "..

चंदू " काय झाले ?.. "

मालू " तेच तर मी विचारतेय ? तुम्हाला काय झालेय "

चंदू " पुन्हा तेच .. "

तेवढ्यात अण्णा आले . 

अण्णा " अहो जावई बापू तुम्हाला कळले का ? रमेश ...

चंदू ने अण्णांना  खुणावले .. मालती ला आत जाऊ द्या .

मालती " अण्णा .. काय झाले ? बोलता बोलता का थांबलात ?"

अण्णा " मालती, जरा पाणी आणते का ?

मालू " तुमच्या दोघांचे काय चालू आहे काय माहित ? नेहमी मला आत पाठवत असता "

अण्णा " अग , पाणी मागितले तर तुला काहीपण वाटते. तू नको आणू मी आई ला सांगतो पाणी दयायला . "

मालती " नको .. आणते .. १० मिनिटांनी .. तो पर्यंत होईल तुमचं बोलून का अजून पाहिजे वेळ . पाणी तिथेच आहे ते घ्या "

आणि मालती आतमध्ये जरा रागातच गेली  .

अण्णा वाकून बघितले मालती आत गेली का नाही आणि मग बोलयाला  लागले.

अण्णा " अहो त्या रमेश च्या बाबांनी रमेश ला आणि त्याच्या बायकोला घरात आणले आता . रमेश यायलाच तयार नव्हता . पण शेवट बाप च तो काय त्याला  झाले अचानक काय माहित  एकदम मुलाला आणि सुनेला घरात घेऊन आला . "

चंदू " एकदम खुश झाला .. वाह .. चला बर झालं.. चंदू ने बसल्या बसल्या देवाला हात जोडले .

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता चंदू चा शाळेत सत्कार होता . अण्णांनी चंदू ला एक झब्बा आणि लेहंगा दिला वरती एक गांधी टोपी . हा ड्रेस घाला उद्या छान दिसेल अगदी गाव वाले दिसाल "

चंदू " अण्णा .. आत हयाची काय गरज होती ? कशाला पैसे खर्च केलेत "

अण्णा " अहो जावई बापू , पैशाचे काय आज आहे उद्या नाही पण हा उद्याचा दिवस तुमच्या साठी नसेल पण माझ्या साठी खूप महत्वाचा आहे . माझ्या जावयाच्या उद्या अख्या गावासमोर सत्कार आहे . मी कधी बोललो नाही पण मला तुमचा खूप अभिमान वाटतो . "

चंदू " हा तुमचा सर्वांचा मोठे पणा आहे. सत्कार करायची काय गरज नव्हती खरी "

अण्णा " अहो नाही कसे .. तुम्हला वाटतेय पण तुम्ही  आता लवकरच  एका मुलाचे बाप होणार आहेत . आपल्या मुलांच्या आयुष्यात असे काही वादळ आले ना तर बापाला आपण हतबल असल्या सारखे वाटते . हे आपल्याच मुलांच्या किंवा मुलीच्या बाबतीत झाले या साठी तो कोसत राहतो . आता माझेच बघा . रमेश चे बाबा किती माजुर्ड आहे हे मला आधीच माहित होते तरी पण मुलीला आपल्या गावातच द्यायची ह्या हट्टामुळे मी त्याला निवडला होता . हा माझा निर्णय नाही म्हंटले तरी चुकलाच होता. नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही देवा सारखे आलात आणि माझ्या मुलीशी लग्न केलेत . "

अण्णांचा आवाज जरा कापरा झाला . चंदू "अण्णा , आता उगाच मागचे कशाला  आठवता . आज  बघा मालू आणि माझा संसार खूप छान चालू आहे "

तरी पण अण्णांनी चंदू ला हात जोडले . चंदू ने त्यांचे हात धरले . आणि त्यांना  मिठी मारली ..

चंदू " मी काही देव नाही , मी पण एक माणूसच आहे . मालती सारखी सुन्दर , सुशील  मुलगी मला पण मिळाली  हे मी माझे भाग्य समजतो . शेवटी काय म्हणतात ना देवाच्या मर्जी शिवाय झाडा चे पान हलत नाही तर तुम्ही आम्ही कोण हो "

अण्णा " बरं , मी काय म्हणत होतो . माझी ती मागची बहीण तिला तुम्ही भेटले ना ..

चंदू " हो रुक्मिणी आत्या ना .. " 

अण्णा " हो .. तर आता तिकडे तुमच्या मदतीला कोणी नाहीये . मालती ला पण आता फार काम नाही जमणार . आणि ती सुट्टी पण घेणार नाही

तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिला थोडे दिवसांकरता घेऊन जाऊ शकता . ती मालतीला घरातल्या सगळ्या कामात मदत करेल . तशी कामाला  ताठ आहे . झाली तर तुम्हाला तिची मदतच होईल आणि आम्हाला पण काही काळजी राहणार नाही . मग नवव्या महिन्यात येऊ तिकडे . "

चंदू " हो चालेल कि .. त्या जर यायला तयार असल्या तर नक्की घेऊन जातो त्यांना .मालू ला पण जरा बरं होईल सोबत होईल . काय दुखलं खुपलं तर लगेच बाई माणसाला सांगायला पण बरे पडते नाही का ?"

अण्णा " ठीक आहे मग मी रुक्मिणी शी बोलून घेतो . "

दुसरया दिवशी सकाळी अण्णांनी मस्त धोतर सदरा  घातला  वर टोपी घालून मस्त  तयार . चंदू त्याला  अण्णांनी दिलेला ड्रेस घालून तयार . मालू ने पण काठापदराची साडी घातली होती . त्यावर एक तिने स्वतः तयार केलेला अबोलीचा गजरा . खूप छान दिसत होती . गरोदर पणाचे पण तेज येते ना तसे तेज आले होते तिला . आता साडीत पण  तिचे पोट दिसत होते . आणि पार्वती बाईंनी पण छान साडी घालून सगळे शाळेत गेले .

अण्णा, सरपंच आणि मुख्यध्यापक सगळे एकमेकांशी  कार्यक्रमाची चर्च करत होते . मधेच अण्णा कोणाला तरी घेऊन येत आणि चंदु ची ओळख करून देत असत. चंदू उभा राहून हात जोडायचा .. आणि मग पुनः खूर्चीत बसायचा. मालती ला बऱ्याच बायकांनी घेरले होते . काय ग कशी आहेस ? कितवा महिना ? कसे आहेत ग जावई ? काय ग नोकरी जमते का तिकडे ? वगैरे वगैरे असे प्रश्नाची उत्तरे देत होती . मालती आज खूप खुश होती . का असणार नाही . आपल्या नवऱ्याचा सत्कार होतोय याचा  आनंद काही वेगळाच .

कार्यक्रम सुरु झाला . चंदूला पुढच्या खुर्चीत बसायला सांगितले . त्याच्या एका  बाजूला मुख्याध्यापक आणि एका बाजूला अण्णा बसले , अण्णांच्या बाजूला सरपंच बसले . आणि मध्ये मध्ये आवाज कर्ण कर्कश होईल अश्या माइक वर कोण तरी दुसरे सर निवेदन करत होते .

" आपल्या गावाची शान वाढवणारे आपल्या  गावातील सरपंचांचे मानस पुत्र आणि आपल्या लाडक्या अण्णांचे जावई श्रीयुत चन्द्रशेखर उर्फ चंदू शेट यांनी आपल्या गावातील एक शिक्षिका आणि अण्णांच्या सुपुत्री मालती ताई यांच्याशी आयत्या वेळी लग्न करून त्यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठे पणा बद्दल आपण इथे त्यांचा सत्कार  करणार आहोत . तरी सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करावे . आणि टाळ्यांचा गजर झाला.

मग सरपंचांनी चंदू ला शाल श्रीफळ  आणि टोपी दिली . मुख्याध्यापकांनी  फुलांचा गुच्छ दिला .

पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला .  मालतीच्या डोळ्यात पण आनंदाश्रू आले आणि तिचा पण उर अभिमानाने भरून आला .

तेवढ्यात रमेश चे बाबा आले .

रमेश चे बाबा " थांबा .. मला काही तरी बोलायचंय "

रमेश चे बाबांना बघून  सगळे च कुजुबुजू लागले . आता हे काय बोलणार .. हा माणूसच मुळात असंतुष्ट . चंदू चा  होत असलेला सत्कार त्याला बघवत नाहीये असेच सगळे बोलत होते .

चंदू चे हावभाव  शांत होते . त्याला हा सत्कार हि नको होता आणि रमेश च्या वडिलांनी इथे येऊन त्याचा अपमान जरी केला तरी त्याने काही एवढे काही मनावर घेतले नसते .

मालती मात्र पुन्हा रणरागिणी झाली होती . मालती च्या आई ने तिला कसे बसे बसवले खाली . मालती ला वाटले कि हा माणूस आता माझ्या नवऱ्याचा अपमान करायची संधी सोडणार नाही . वेळ आली तर ती आता गप्प बसणार नव्हती . आणि आज तर गावातले सगळेच लोक होते. काय तो एकदाचा  सोक्ष  मोक्ष  च लावायचा असे तिने ठरवले होते .

रमेश चे वडील पुढं आले आणि माईक वर गेले आणि बोलायला लागले

रमेश चे वडील " चंदू हा  खरा आधी  माझ्या मुलाचा मित्र . त्याच्या लग्नाला म्हणून तो आपल्या गावात आला आणि आम्ही लग्न मोडल्या मुळे  तो आपल्या गावाचा जावई झाला .

अण्णा पटकन उठले आणि म्हणाले " थांबा .. लग्न तुम्ही नाही मोडले .. तुम्ही लग्न अडवले .. लग्न आम्ही मोडले "

रमेश चे वडील " अण्णा .. मला बोलू द्या .. मग तुम्ही  बोला .. बसा  खाली "

सरपंचानी अण्णांना बसायला खुणावले ..

रमेश चे वडील " तर गावकर्यांनो मी झाल्या सगळ्या प्रकरणाने अण्णांचे नुकसान केले नसते तर अण्णांना चंदू सारखा देव माणूस जावई म्हणून मिळाला  नसता तर गावकर्यांनो सर्वात आधी मी अण्णांची जाहीर माफी मागतो , माझ्या मुळे त्यांना थोडा मनस्ताप आणि त्रास दोन्ही झाला. मालती चे पण दुःख मी समजू शकतो  तिने त्यावेळेस विहिरीत उडी मारली हे हि मला आठवले कि फार दुःख होते . त्यामुळे मी मालतीची पण माफी मागतो . आज इथे मी माझ्या हट्टा मुळे  माझ्या मुलाचं पन नुकसान केले तो हि थोडा बिथरला होता . वाईट मार्गाला लागला होता . त्याने शहरात पण मालती ला आणि चंदू ला  त्रास  दिला होता . त्याबद्दल पण मी दोघा  उभयतांची जाहीर माफी मागतो .

चंदू खरोखरच एक देव माणूस आहे . त्याने रमेश ला समजून घेतले. त्याला पुन्हा चांगले आयुष्य जगायाला शिकवलं  त्याला पुन्हा माणसात आणले आणि आता माझा मुलगा रमेश पुन्हा चांगली नोकरी करू लागलाय . चंदू च्या शिफारशी मुळे माझ्या सून बाईला  शाळेत नोकरी पण मिळालीय .

चंदू शेट तुम्ही खरोखर देव माणूस आहात . तुम्ही मला माझी चूक पण दाखवून दिलीत . तुमच्या मुळे आज आम्ही बाप लेक पुन्हा एकत्र आलोय . तुमचे आभार कसे मानू  हेच कळत नाहीये आणि रमेश च्या वडिलांना अश्रू आवरेना .

त्यांचे अश्रू आवरायला सर्वात पहिले अण्णा आणि मग चंदू धावला .

रमेश च्या वडिलांनी चंदू च्या पुढे हात जोडले . चंदू ने अर्थातच त्यांना थांबवले .

जमलेल्या सर्वच जणांचे डोळे पाणावले होते . टाळ्यांचा कडकडाट होत होता . तिकडून धावत रमेश आला आणि चंदू ला कडकडून मिठी मारली .

तर अशा पद्धतीने चंदू चा सत्कार पार पडला .

आज चंदू ने अख्या गावा  समोर मोठ्या शान मध्ये मालतीला पण स्टेज वर बोलावले तिला पण त्याच्या बाजूला उभी केली . दोघांची जोडी एकदम छान दिसत होती . गावातले लोक म्हणत होते " लक्ष्मी नारायणाचा जोडाच दिसत आहेत दोघे ."

आज चंदू  च्या मनातील खल पण नाहीसे झाले आणि मालती चंदू ची वामांगी झाली होती.

🎭 Series Post

View all