Login

आपली माणसं...भाग 3

आपली माणसं
आपली माणसं...भाग 3

ती गावातल्या मुलांना संगणक आणि इंग्रजी शिकवू लागली. मीनाच्या गौरी आणि चंचलसह अनेक मुलं तिच्या विद्यार्थिनी झाल्या. दर रविवारी ती शाळेच्या आवारात मोफत मार्गदर्शन वर्ग घेत होती.

गावकरी म्हणू लागले,
"आपलीच पोरगी. गेली मोठ्या शहरात… पण मन गावातच राहिलं तिचं."

एका संध्याकाळी, मीना आणि शीतल झाडाखाली बसून चहा पीत होत्या.

मीना म्हणाली,
"कधी वाटलं नव्हतं, की तू परत येशील… आणि एवढं काही करशील."

शीतल हसली.
"मला सगळं काही मिळालं शहरात, पण प्रेम… आपुलकी… ओळख… ते फक्त इथंच मिळालं. जेव्हा सगळे संबंध क्षीण होतात, तेव्हा एक आवाज आतून म्हणतो – ‘चल, परत चल... तुझी माणसं वाट पाहतायत."

गावात आल्यापासून शीतलच्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली होती. सकाळी मुलांचे क्लासेस, दुपारी गावातल्या महिला गटांसोबत चर्चा, आणि संध्याकाळी गावातल्या तरुणांसोबत रोजगाराच्या संधींबाबत बैठका.

ती आता फक्त “शीतलताई” नव्हती – ती "आपली शीतल" झाली होती.

एका रविवारी शीतलने गावच्या पंचायत कार्यालयात एक प्रस्ताव ठेवला.

"आपली संगणक शिक्षण योजना"
गावात एक संगणक लॅब सुरू करायची होती, जिथं मुलं आणि तरुण संगणक शिकतील, डिजिटल कामं करतील आणि हळूहळू शहराशी स्पर्धा करू शकतील.

मीना, गावच्या काही महिला आणि काही तरुण पुढे आले. लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
पण…


“शहरातून आलेली ही बाई आता आम्हाला शिकवणार काय?”
गावचा एक जुनाट विचारसरणीचा सरपंच – भोसले – आपली नाखूशी व्यक्त करत होता.
"मुलींना संगणक शिकवून काय उपयोग? शेतीतच राहणार आहेत त्या."

त्याला वाटत होतं, शीतल गावात आपलं वर्चस्व वाढवत होती.

त्या दिवशी मीनाचं मन खट्टू झालं.
"शीतल, तुला एवढं सगळं करायचं आहे, पण ही जुनी मानसिकता… तू थकून जाणार नाहीस का?"

शीतल म्हणाली,
"मीना, जेव्हा आपली माणसं अडथळा ठरतात, तेव्हा त्यांनाच आपल्यामधलं काही वेगळं दाखवून आपलं माणूसपण सिद्ध करावं लागतं."


पुढचे काही आठवडे खूप कष्टाचं असतील. शीतल आणि तिच्या टीमनं गावात संगणक देणगी मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली. गावातल्या जुन्या शाळेच्या खोलीत रंगरंगोटी करून एक प्रशिक्षण केंद्र सुरू झालं.

पहिल्या दिवशी मुलींच्या रांगा पाहून शीतलचे डोळे भरून आले.
गौरी आणि चंचल म्हणाल्या,
"शीतलताई, आम्हालाही तुझ्यासारखं काहीतरी करून दाखवायचं आहे."

भोसले मात्र शांत नव्हता. एका दिवशी पंचायतच्या सभेत त्याने आरोप केला,
"ही योजना म्हणजे शीतलची प्रसिद्धीची लहर आहे. गावच्या निधीचा अपव्यय चाललाय."

त्यावेळी उभी राहिली मीना. ठामपणे बोलली
"शीतल म्हणजे आमचं स्वप्न. जिला तू 'शहरातून आलेली' म्हणतोयस, तिने आमच्या मुलींचं भविष्य घडवलंय. आज तिच्यासारख्या माणसांची गरज आहे… जी माणसात माणूसपण जपतात."

गावात टाळ्यांचा कडकडाट झाला.
भोसले गप्प झाला आणि तो दिवस शीतलसाठी एक मोठा टप्पा ठरला.