घालमेल तिची,त्याची

Anxiety of couple during various stages of life.

#घालमेल_तिची_त्याची

जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच असणण्याचं भाग्य फार थोड्यां जणांना लाभतं. बाकी सगळे शिक्षणासाठी, पोटाच्यापाठी जन्मभूमीपासून दूर जातात. काही वर्षांनी त्या कर्मभूमीचाही लळा लागतो. संधिकाली जन्मभूमीकडे परतावं म्ह़टलं तरी कर्मभूमीतून पावलं सुटता सुटत नाहीत.

आमचीही अशीच एक कथा. नोकरीसाठी जन्मभूमीपासून लांब शहरात घर घेतलं.  एक मुलगी आम्हाला,जाई. अलिकडेच दोन वर्षापूर्वी लग्न झालं तिचं. शिक्षिका आहे ती. जावईबापू,विनयही स्वभावाने नावाप्रमाणेच विनयशील आहे. 

लहानगी जाई भिंतींवर रेघोट्या ओढायची. आईबाबा,आजीआजोबा,मामामामी,काकाकाकू,आत्या,शाळेतल्या बाई..कितीजणं रेखाटायची ती भिंतीवर! प्रत्येक चित्राची तिने स्वतः रचलेली गोष्ट असायची.

 इवलेइवले हात नाचवत बोलक्या डोळ्यांनी ती मला कसल्या भन्नाट गोष्टी सांगायची. अगदी चांदोमामाची अंघोळही असायची तिच्या गोष्टीत. जाईच्या गोष्टीतला सूर्य पहाटे दूधपोळी खाऊन यायचा. 

हळूहळू जाई मोठी झाली. विविध कथाकथन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, शाळाकॉलेजात गाजवल्या तिनं. विनयची आणि तिची ओळख या तिच्या एक्टीविटीजमधूनच झाली.

 एकदा वादविवाद स्पर्धेत जाई व विनयची चांगलीच लढत रंगली होती. या लढतीतूनच हळूहळू मैत्री आणि मग मैत्रीतून प्रेमात पडले दोघं.

गधडी एरवी सगळं करताना बाबाच्या बाजूने पण बाबाला विनयबद्दल.सांगायला धजावेना. माझ्यामागे लागली. मग मीच सांगितलं ह्यांना. पहिलं विश्वासच बसेना यांचा.

 प्रेम वगैरे करण्याची अक्कल आहे का जाईला? एवढी मोठी झाली का? असं बडबडू लागले. प्रथमच एवढं संतापलेलं पाहिलं यांना. जाईचं अगदी भिजलं कोकरु झालं होतं. गुपचूप कोनाड्यात बसून बाबाचं संतापणं पहात होती. तिचे ते भेदरलेले डोळे अजुनही आठवतात मला. 

यांनी दटावलं,"नुसती भाषणं करुन,स्टेज गाजवून पैसा मिळत नाही. घाम गाळावा लागतो. भरपूर शिकावं लागतं. यातलं काय केलंय त्या विनत्यने. बीए पास आणि जर्नालिझमचा डिप्लोमा बास..यावर पोसणार तो आपलं कुटुंब? काहीतरी करुन दाखव म्हणावं."

ती रात्र आम्ही तिघांनी कशी काढली ती आम्ही आणि हे आमचं घरच जाणे. दुसऱ्या दिवशी हे लवकर गेले ऑफिसला. जाईही गेली यांच्यानंतर. घरात फक्त मीच उरले होते. बरंच रडून घेतलं. मोकळी झाले.

 बापलेकीमधला अबोला मला असह्य होत होता. संध्याकाळी जाई लवकरच आली. हे आले व टिव्ही लावून बसले होते. नुसती चित्र पहात होते वाटतं. डोक्यात काही शिरत नव्हतं यांच्या. अठ्ठावीस वर्ष जोडीने संसार केला..आता मला यांच्या मनातले विचार यांनी न सांगताच कळतात. कदाचित यांच्याहीपेक्षा ते मलाच जास्त कळतात.

जाई येऊन यांच्याजवळ बसली. यांचा हात हातात घेऊन म्हणाली,"ए बाबा,जस्ट चील यार. तुला नाही वाटत मी विनयशी लग्न करावं तर मी नाही करणार . मी आज विनयला तसं सांगून आले. तू माझं पहिलं प्रेम आहेस बाबा. तुला सोडून जाताना तू असा नाराज झालेलं मला नाही आवडणार." यांनी जाईला कुशीत घेतलं. दोघंही मग अश्रुफुलांनीच बोलत होती. मी कोपऱ्यात उभी राहून तो बापलेकीतला मुकसंवाद भरल्या डोळ्यांनी पहात होते. लेकीला प्रियकर गवसला होता पण बापाचं ह्रदयही मोडायचं..छे मोडायचं कसलं..हिंदकळायचंदेखील नव्हतं. 

हे म्हणाले,"जाई,पिल्लू काल बरंच बोललो गं तुला भावनेच्या भरात. नंतर रात्रभर विचार केला. स्वतःशीच बोललो, तेव्हा जाणवलं की तुझा विरह ही जाणीवच असह्य होतेय मनाला. मग तो प्रेमविवाह असो की ठरवून केलेलं लग्न पण जगाची रीत पाळायलाच हवी. तू एकदा तुझ्या विनयला घेऊन ये घरी."

जुईने यांना गच्च मिठी मारली नि लगेच विनयला फोन केला. तोही एका तासात हजर. त्याचेही डोळे तांबरटलेले. ही गधडी त्याला सरळ नाही म्हणून आलेली नं.

 मग जावयाची नि सासऱ्याची बरीच चर्चा झाली. मुलगा होतकरु वाटला. काहीतरी करण्याची उमेद वाटली त्याच्यात. 

यांनी दोघांनाही सांगितलं की आधी स्वतःच्या पायावर उभं रहा. मग विचार करु. दोनेक वर्षात तो टाईम्समधे लागला नि जाईलाही शिक्षिकेची नोकरी मिळाली. तीही तिच्याच शाळेत. ज्या शाळेत आपण अगदी बालवाडीपासून दहावीपर्यंत शिकतो त्याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होणं,ज्या बेंचवर आपण बसलो त्याच बेंचवर बसलेल्या निरागस मुलांना शिकवणं,ती शाळेची घंटा पुनश्च अनुभवणं किती सुंदर नं!

माझी जाई खरंच भाग्यवान. सासूसासरे अगदी हसतमुख आहेत. आम्ही अगदी थाटामाटात लग्न लावून देणार होतो पण त्यांनीच मोजक्या मित्रपरिवारात लग्नसोहळा करायचं ठरवलं व त्यातून वाचलेले पैसे एका मानवसेवा केंद्राला देणगी म्हणून दिले. आजकालच्या मुलांना काही कळतवळत नाही म्हणतात पण ते तितकसं खरं नाही. प्रगल्भ आहे हल्लीची पिढी आमच्या पिढीपेक्षा.

लेक दिवसातून दोनदा तरी फोन करायची. अधनंमधनं येऊन आमची चौकशी करायची. या वर्षी हे निव्रुत्त झाले आणि मग यांना जन्मभूमीचे वेध लागले. इथे बसून तरी काय करणार! तिथे वाडवडिलांनी बाधलेलं घर आहे.  यांची काकी रहाते तिथे सध्या. ते घर शाकारायचं,फुलबाग,फळबाग लावायची असे बरेच मनसुबे हे मनात रचत होते. 

मला खरंतर हे घर सोडवत नव्हतं. कितीही झालं तरी इथल्या भिंतींशी,इथल्या प्रत्येक कोपऱ्याशी नातं आहे हो माझं. जाणार हे निश्चित झालं. हे घर विकणार असं ठरवलं. माझी दोलायमान अवस्था झाली होती.  

सामान आवरायला घेतलं. पहिलं सगळं प्लास्टिक भंगारवाल्याला देऊन टाकलं. मग जुने कपडे काढले..जाईची चनिया चोळी,तिचा अंबरेला फ्रॉक,यांचा जुना मनिला शर्ट,मी दिलेला गीफ्ट वाढदिवसाला,माझे जुने ब्लाऊज..ते अस्तरवाले..आता कोपराच्यावर न घुसणारे..किती म्हणून आठवणी,जाईची टाय,तिच्या शाळेची डायरी,तिचा बेल्ट..खरंतर हे केव्हाचं टाकून द्यायला हवं होतं पण नाही हो जीव होत टाकायला. तरी बरेच फ्रॉक मी कामवालीच्या मुलीला दिले पण काही अगदी जवळचे असतात ज्यांवरची मालकी सुटता सुटत नाही. मायेचे पाश अधिकाधिक घट्ट होत जातात.

 माझ्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. तितक्यात बेल वाजली. दारात जाई न् विनय. मी पदराने डोळे टिपले. 
जाई आत येत म्हणाली,"बघ विनय,मी म्हंटलं नव्हतं तुला ,आमच्या घरी नळ आलेत न् ही आई अशाच बादल्या भरत बसणार." मी जाईला एक चापटी मारली व नजरेनेच दटावलं. 

जाईने मला आरामखुर्चीत बसवलं व विनयच्या मदतीने तिने चारेक तासात सारी  आवराआवर केली. सगळं सामान मोठे खोके आणून त्यात पेक केलं. मग मी तिघांसाठी कॉफी बनवली. 

ती दोघं मस्त न्हाऊन ओलेत्या केसांनी माझ्यापाशी येऊन बसली. कधीकधी ही दोघं मला भावंडच वाटतात न् माझ्या विचाराचं माझं मलाच हसू येतं. मला असं हसताना पाहून जाईने विचारलच,"का गं आई हसतेस?"
मी मान हलवून 'काही नाही.. सहजच' म्हणाले.
मला विळखा घालत जाई म्हणाली,"तू ना अशीच सेंटी आहेस बघ. लब यू ममा."

त्या रात्री जाई व विनय आमच्याकडेच झोपले. सकाळी उठून मी झाडांना पाणी घातलं नि झाडांना म्हंटलं," आता मनाची तयारी करा तुम्हीही. नऊ वाजता गाडी येईल. निघायचंय आपल्याला." 

सामान उचलणारे आले. एकेक बांधलेले बॉक्स,गाद्या नेऊ लागले. कपाट आडवं,उभं,तिरकं करत एकदाचं बाहेर न्हेल. तसंच शीतकपाट,वॉशिंग मशीन,टिव्ही,गेस शेगडी सिलिंडर.. एकेक करुन सगळ्या वस्तू,अगदी कुंड्याही ट्रकमधे जाऊन बसल्या नि मोकळ्या घरात मी एकदा झाडू फिरवला. 

देव्हाऱ्यातले देव गाठोड्यात बांधून माझ्या हातपिशवीमधे घेतले होते. रिकाम्या देव्हाऱ्याला नमस्कार केला. सगळ्या भिंतींवरुन भरल्या डोळ्यांनी हात फिरवला. बालकनीत जाऊन क्षणभर उभी राहिले. काय होत होतं मला, माझं मलाच माहीत. 

वाटलं काय हे जगणं..माहेरच्या घराला जीव लावला ते सोडताना अगदी असंच भरुन आलं होतं. आज पुन्हा कर्मभूमी सोडताना तोच व्याकूळ अनुभव.

 शेजारच्या वहिनी माझ्याजवळ येऊन कधी उभ्या राहिल्या मला कळलच नाही. माझ्या केसांत त्यांनी मोगऱ्याच्या टपोऱ्या कळ्यांचा गजरा माळला. मला म्हणाल्या,"घर विकलत तरी इथले धागेदोरे जपून ठेवा. कोणत्या न् कोणत्या निमित्ताने येत जा आमच्याकडे कधीही..हक्काने या हं."

 मी मिठी मारली वहिनींना. जोराचा हुंदका आला. हे दारात उभे राहून म्हणत होते,"चल लवकर. तो ट्रकवाला खोळंबलाय कधीचा." यांनी पटापटा दारंखिडक्या बंद केली. वास्तुपुरुषाला नमस्कार केला. दाराला कुलुप घातलं. यांच्या आवाजातला फरक मला लगेच जाणवला.

-----सौ.गीता गजानन गरुड.