अंतरीचं काहूर! ( भाग -४) अंतिम (जलद कथामालिका लेखन स्पर्धा)

Disturbance of a woman's mind.

अंतरीचं काहूर ! ( भाग -४)


लेखिका - स्वाती बालूरकर , सखी.

" त्याक्षणी मला कुठलं बळ आलं काय माहित, मी त्यांना स्पष्ट सांगितलं , \"हात उचलायचा नाही, मी विनंती करते तुम्हाला! आज हे पहिलं व शेवटचं. तुम्हाला काय वाटलं ते -ते बोला, बसा, समजावून सांगा . पण यानंतर तुम्ही हात उचलाल तर मी हे घर सोडून निघून जाईल. बाळालाही सोबत नेणार नाही.\" माझ्या ह्या करारी वाक्याने त्यांनी आणखी खूप संताप केला. हवं नको ते बोलले. तो वाद पुढे आठ दिवस चालला.
मग तो अबोला पुढे आठवडाभर चालला आणि एके दिवशी केव्हा तरी बहीण बाळाला बघायला आली , तर मी तिच्यासोबत माहेरी गेले. तिथे बारशाची तिथि काढली व बारसं ठरलं .
त्यावेळी मनोहरांनी इगो बाजूला ठेवला व मोठ्या मनाने सगळं विसरून आईकडे आले. मला म्हणाले दुष्टस्वप्न समजून सगळं विसरून जायचं व पुन्हा कधीच या घटने बद्दल बोलायचं नाही.

त्यांच्यासाठी सगळं पुन्हा पूर्वीसारखा झालं.

मग मी पुन्हा पहिलेसारखीच राहू लागले पण ये सगळं बाहेरून बाहेरून असलेलं वागणं होतं.

पण खरं सांगू त्यांनी त्यावेळी राग राग करून केलेली हिंसात्मक वागणूक , मला झालेला मानसिक त्रास आणि त्यांनी उचललेला तो हात या गोष्टी मी आजतागायत कधीच विसरू शकले नाही.
त्यांच्यासमोर मी म्हणाले की मी सगळं विसरते आपण पुन्हा सुरू करूयात.

पुन्हा तीन वर्षांनी अनु तू झालीस . तुमचं बालपण छान गेलं. कॉलेज झालं, अनघाचं लग्न झालं. बघ नात झाली. अद्वैत, आता तुझं लग्न होत आहे पण ही मनातली सल अजूनही गेली नाही. प्रत्येक वेळी हिंसा म्हणजे कोणाचा तरी खून खराबा किंवा रक्तपात, युद्ध किंवा मारामारीच नसते रे! एखाद्याचं वागणं किंवा बोलणं माणसाच्या जिव्हारी लागलं की ती देखील हिंसाच असते."

"पण आई एक विचारू का ? इतकी वर्षे मनात दडवलेलं हे काहूर किंवा सल म्हण हवी तर. . . आजच का सांगावी वाटली गं?" अनघाने अवंतिकाला जवळ घेवून विचारलं.

"अगं सांगायचं नाही हे ठरलं होतं गं! पण आज बरेच योगायोग झाले मग राहवलं नाही. दुपारी ते बनारशी की पैठणी यावरून अद्वैत व गौरीत काहीतरी बिनसलेलं पाहिलं. याचा रागीट चेहरा पाहून ती वरमली गं! मला मीच आठवले नवरीसारखी घाबरलेली . . . शिवाय आज मनोहर बाहेर जाताना रेडिओ लावून गेले. त्यात २ ऑक्टोबर आहे म्हणून अहिंसे बद्दल कितीतरी काय काय सांगत होते. त्यावरून ही आठवलं. असा एकांत आपल्यं तिघांना किती वर्षात मिळसला नसेल म्हणून म्हटलं तुम्हा दोघांना थोडी समज द्यावी व माझ्या मनातलिो हुरहुर ही थोडी कमी करावी. "

"आई हलकं वाटतंय ना तुला ? द डपणात मनात ठेवलं होतंस सगळं. कधीच कळू दिलं नाहीस. आई २७ वर्षे हे सगळं दाबलंस. ग्रेट आहेस तू!" अद्वैत अवंतिकाचे पाय धरून म्हणाला.

"ते सगळं ठीक आहे अद्वैता पण अशी मानसिक हिंसा तू चुकूनही गौरी सोबत करू नकोस. तुला काही नाही पटलं तर तिला सांग की तुला आवडलं नाही. आवडलं तर मोकळरपण्ने सांग की आवडलं. म्हणजे तिच्या मनाला लागेल आणि उगीचच मनात आढी पडेल असं वागू नकोस .

त्यावेळी सासूबाईंच्या सपोर्टमुळे मी सगळं सहन केलं. तेव्हा म्हणजे आमच्या पिढीच्या बायका विद्रोह पण करत नव्हत्या रे! नवर्‍याची तक्रार करणं पण पाप वाटायचं! परंतु आजकाच्या मुली नाही सहन करणार हे सगळं!"

अवंतिकसने हे सगळं सांगेपर्यंत अनघाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या होत्या .

" आई आम्ही खूप नशिबवान आहोत गं , तुझ्यासारखी आई आम्हाला मिळाली.
बाबांनी ते मनात ठेवलं नाही आणि ते तुझ्याशी मोकळे राहतात हा त्यांचा ग्रेटनेस असला तरीही एवढे दुःख जिव्हारी जपून तू सहज वागून आम्हाला वाढवलंस,योग्य संस्कार दिलेस."
तिच्या बोलण्याने अवंतिकाचे डोळेही ओले झाले.

अद्वैत म्हणाला ," खरंच तू ग्रेट आहेस , नवर्‍याची वागणूक समाजासमोर येऊ दिली नाहीस आणि सगळ्यांमधे त्यांचा मान जपलास.

मला खरच याचा अभिमान वाटतो. होय हा प्रसंग मी नेहमी लक्षात ठेवीन आणि गौरीला त्रास नाही होऊ देणार!"

इतक्यात अनघाने तिघांसाठी कढी- खिचडी वाढली .
तिघांची तीन ताटं ठेवून ती पापड भाजायला गेली.

अवंतिकाला मात्र आज अहिंसेवर एखादं व्याख्यान देवून २ ऑक्टोबर साजरा केल्याचा मानसिक तर आनंद झालाच होता शिवाय आपल्या अंतरीचं काहूर आपल्या लेकरांसमोर व्यक्त केल्याचं समाधान पण मिळालं.

समाप्त

लेखिका - स्वाती बालूरकर , सखी
दिनांक - २० .१० .२२


चित्र गुगलवरून साभार.

🎭 Series Post

View all