अंबा भाग तीन (अंतीम)

Story Of A Unfortunate Woman



अंबा तीन


ज्याने जिंकून आणलं तो भीष्म आणि ज्याच्यावर प्रेम केलं तो शाल्व या दोघांनीही नाकारल्यामुळे, संतापलेली अंबा भीष्माच्या मृत्यूची खूणगाठ मनाशी बांधून कठोर तपश्चर्ये कर्ता वनात निघून गेली.

अंबेच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकराने अंबेला आशीर्वाद दिला की, \"तुझ्या हातून भीष्म मृत्यू होईल.\" या वरदानासह भीष्म मृत्यूच्या इच्छेने अंबेने अग्नी काष्ठ भक्षण केले. तिला पुढचा जन्म मिळाला द्रुपदाच्या घरी शिखंडनीच्या रूपात.


पुत्रप्राप्तीसाठी राजा द्रुपद शंकराची उपासना करत होता. तेव्हा शंकराने द्रुपदाला आशीर्वाद दिला की, \"तुझ्या पोटी कन्या जन्मास येईल व तीच पुढे पुरुष होईल.\"

शिवाचा आशीर्वाद असल्याने कन्या झाल्यावर राजा राणीने कन्येचे गुपित इतरांपासून लपवुन ठेवले. पुत्र प्रमाणेच तिचे पालन पोषण केले. सर्व अस्त्रशस्त्रविद्यांमध्ये तिला पारंगत केले. शिखंडीनीचे हेच पुरुष रुप म्हणजे राजकुमार शिखंडी होय.

राजपुत्र युवा अवस्थेत आल्यावर त्याचा विवाह दशार्ण देशाचा राजा हिरण्यवर्मा याच्या कन्येसह अत्यंत आनंदात पार पडला. मात्र काही दिवसातच आपला पती शिखंडी हा पुरुष नसून एक स्त्री आहे हे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले, आणि तिने दासीन मार्फत हे वृत्त आपल्या वडिलांना कळविले. द्रुपदाने आपली फार मोठी फसवणूक केली आहे हे लक्षात येऊन हिरण्यवर्मा क्रोधीत झाला आणि त्याने द्रुपदावर आक्रमणाची तयारी केली. ह्या वार्तेने द्रुपद अत्यंत भय व चिंताग्रस्त होता. आपल्या मात्यापित्यांची ही दयनीय अवस्था बघून शिखंडिनी व्याकुळ झाली आणि देहत्याग करण्यासाठी ती वनात निघून गेली. तिथे ती अन्नपाण्याचा त्याग करून उपासना करीत असताना तिची भेट स्थुनाकर्ण यक्षाशी झाली. शिखंडीची वेदना ऐकून स्थुनाकर्णाने काही दिवसांसाठी आपले पुरुषात व तिला बहाल केले..

यक्ष -"मुली एवढ्या घनदाट, निबीड अरण्यात तू एकटी कशी काय आलीस?"

शिखंडीनी -"महाराज माझ्या मातापित्यांनी माझा सांभाळ राजकन्येप्रमाणे न करता एखाद्या राजपुत्राप्रमाणे केला आणि माझा विवाह हिरण्यवर्मा या राजाच्या राजकन्याशी करून दिला. परंतु आता त्या राजकन्येला माझ स्त्रीत्व कळलेले आहे आणि राजा हिरण्यवर्मा माझ्या वडिलांवर म्हणजे द्रुपदांवर आक्रमण करणार आहे. माझ्या स्त्रीत्वामुळे, माझ्या वडिलांच्या राज्याला आणि जीविताला धोका निर्माण झाला आहे म्हणून, मी देह त्याग करण्याकरिता या अरण्यात आले आहे."


यक्ष -"मुली तुझी कथा अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे मी माझे पौषत्व काही दिवसांसाठी तुला देतो. तुझे संकट हरण झाले की, माझे पुरुषत्व तु मला परत दे."


शिखंडी खरोखरच पुरुष होऊन आपल्या राज्यात परत गेला. शंकराचा वर सुफल झाला हे बघून द्रुपदास अत्यानंद झाला आणि त्यांनी दशार्ण राजास निरोप पाठवून शिखंडी हा पुरुष असल्याची शहानिशा करण्यास सांगितले. हिरण्य वर्माने शिखंडी ची परीक्षा घेतली आणि तो पुरुष असल्याची खात्री पटताच समाधानी होऊन तो राज्यात परत गेला.

ठरल्याप्रमाणे शिखंडिनी स्थुनाकर्णास त्याचे पुरुषत्व परत करण्यासाठी गेली परंतु कुबेराच्या शापाने स्थुनाकर्ण कायमस्वरूपी स्त्री झालेला होता. त्यामुळे आपसूकच शिखंडीनिलाही कायमस्वरूपी पौरुषत्व प्राप्त झाले.

पण महाभारताच्या युद्धात शिखंडीच्या हातून भीष्मांना मरण आलेच नाही. कदाचित एका स्त्रीच्या हातून भीष्माला मृत्यू देणं महाभारतकारांना रुचलं नसावं. ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या भीष्मांचा मृत्यू महाभारतकारांना तेजस्वी आणि गौरव पूर्ण करायचा आहे होता म्हणूनच, त्यांनी एका स्त्रीच्या शौर्याकडे दुर्लक्ष केले. शिखंडीच्या रूपातील अंबेला शौर्य दाखविता आले नाही. पराक्रम हा पुरुषाचाच अलंकार ठरवून शिखंडीला त्यांनी आपले पौषत्व सिद्ध करू दिले नाही. भीष्माचा मृत्यू झाला तो अर्जुनांच्या बाणांनी.

दुसऱ्या जन्मी ही अंबेला शेवटी न्याय मिळालाच नाही, म्हणूनच भूतकाळात डोकवताना अंबा किंवा शिखंडी ही तळमळतच राहिली. कदाचित स्त्रीला कधीच न्याय मिळत नाही, नसावा. आजही आपण आपल्या अवतीभोवती बघतो की, एखाद्या मोठ्या पदावर असणाऱ्या पुरुषाकडून एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला तरीही तिला आजच्या आधुनिक युगात न्याय मिळणे दुरापास्तच आहे.


समाप्त.


फोटो साभार गूगल.

©® राखी भावसार भांडेकर.

संदर्भ 

1.व्यासपर्व लेखिका दुर्गा भागवत.

2. महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी दिनांक 6 सप्टेंबर 2020.

3. मृत्युंजय लेखक शिवाजी सावंत.



**********************************************

🎭 Series Post

View all