"जयु, अगं सविता आठ दिवस झाले ग्रुपवर दिसलीच नाही.. कुठे गेली आहे?" प्रियाने जयुला फोन करून विचारले..
"प्रिया, अग आठ दिवस झाले तिची काकू देवाघरी गेली ग.. खूप चांगल्या होत्या ग त्या काकू.." जयु
"हो ग.. त्यांच्या कपाळावर मोठं कुंकू असायचं.. आणि त्या नऊवारी साडी नेसायच्या ना.." प्रिया
"हो ग.. त्याच आणि त्या मेल्यावरही त्यांना अगदी ठसठशीत कुंकू लावलं होतं.. हिरवीगार साडी नेसवली होती.. ते पाहून मन अगदी पिळवटून गेलं ग.. मी पण तेथेच होते तेव्हा.. यार असे मरणं यायला हवे.. सौभाग्याचे.. अखंड सौभाग्याचे.." जयु
"हो ग.. सौभाग्याचे मरणच मिळो ग.. ज्या स्त्रीया भाग्यवान असतात.. त्यांना सौभाग्याचे मरण येते म्हणे.. कारण त्या भाग्यवान देखील असतात ग.." प्रिया
प्रिया आणि जयु दोघींचे फोनवरील बोलणे ऐकून प्रियाची मुलगी श्रावणी प्रियाला म्हणाली, "आई, अगं सौभाग्याचे मरण म्हणजे काय ग?"
"अग, बाळा सुवासिनी मरण ग.. म्हणजे नवरा असताना आलेलं मरण.." प्रिया
"मग मागे नवर्याचे कितीही हाल झाले तरी?" श्रावणी
"म्हणजे??" प्रिया
"म्हणजे एखादी स्त्री मरण पावली की तिचा नवरा एकाकी जीवन व्यवस्थित जगू शकेल का?? एक स्त्री कठोर होऊन एकाकी जीवन जगू शकते तसे पुरूषाला जमत नाही ग.. जेवणाचे हाल होतात.. एखादा पदार्थ खायचा म्हटलं तरी दुसर्याकडे मागायला हवं.. बाई कशी बनवून खाऊ शकते ना.." श्रावणी
"तू म्हणतेस ते खरे आहे ग.." प्रिया
"आणि आई.. सौभाग्याचे मरण म्हणजे भाग्यवान असे का म्हणत आहेत? माहित आहे का तुला?" श्रावणी
"का ग?" प्रिया
"अगं विधवा स्त्रियांना कार्यक्रमात समारंभात कोणतीच किंमत दिली जात नाही.. विधवा स्त्रियांचे समाजाकडून अवहेलना केली जाते.. त्यांची निंदा केली जाते.. त्यांना काही बाही बोलले जाते.. कपडे घालण्यावरून, त्यांच्या वागण्यावरून त्यांना बोल लावले जाते.. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.. त्यांना अपशकुनी, पांढर्या पायाची म्हणून हिनवले जाते.. कोणत्याही प्रसंगी तिला पुढे येऊ दिले जात नाही.. म्हणूनच सौभाग्याचे मरण भाग्याचे म्हटले जाते.. आपणच त्यांना प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी किंमत दिली.. त्यांना व्यवस्थित वागणूक दिली तर ही वेळ येणारच नाही.. अग माॅडर्न युगात विचारही माॅडर्न हवेत ना.. भुरसटलेले विचार मागे सोडून एका स्त्रीला स्त्री म्हणून वागणूक देऊ.." श्रावणी
"अगदी खरं आहे ग बाळा तुझं.. " प्रिया
धन्यवाद
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..