राज्यस्तरीय करंडक कथामालिका
शीर्षक - अकल्पित..! ९
विषय - रहस्य कथा
दुसऱ्या दिवसापासून जय साठी ची शोध मोहीम जोरात सुरू झाली होती.आता इन्स्पेक्टर विजय स्वतः त्यात पूर्ण लक्ष घालणार होता.तेवढ्यात त्याचा फोन वाजला. पलीकडून काल पासून चैताली ग्रुप च्या मागावर असलेली टीम होती. त्यांचे एक्झॅक्ट लोकेशन त्यांनी पाठवले होते .
जय ने लगोलग तिकडेच जायचा निर्णय घेतला.कारण जय कसा आणि कुठून पडला हे फक्त चैताली ला च ठाऊक होते. आदिती कुठे सापडेल याचा योग्य विचार करूनच तिने तिचा शोध लावला होता त्यामुळे ती शोध घेत असलेल्या जागीच जय चा शोध घेणे जास्त श्रेयस्कर होते.
पोलीस वेश सोडून सगळ्यांनी तिथल्या सामान्य नागरिकांचा वेष धारण केला होता. कुणी गुरे चारत होतं. तर कुणी अवजार धरून शेतीला निघालं होतं. महिला पोलिस तर सरपण गोळा करू लागल्या होत्या साडी घालून. पण आपापली कामं करतांना नजर मात्र तिकडेच होती.
काही वेळातच चैताली च्या ग्रुप च्या एकाने हलकीशी शीळ घातली अगदी पक्ष्यासारखी अन् थोड्याच वेळात ते सगळे एकत्र आले. खुणेनेच त्याने त्यांना काहीतरी दाखवले. एक एक जण लघुशंकेचा बहाणा करत त्या दिशेने जाऊन आले. आजुबाजुला ही सगळी मंडळी असल्याने त्यांनी तिथे खूण म्हणून एक ओंडके बसण्याच्या बहाण्याने आणून ठेवले. आणि असाच काही वेळ टाईम पास करून ते तिथून पसार झाले.
दोन जण दुरूनच त्यांच्याही नकळत त्यांचा पाठलाग करायला गेले होते. वापस जातांना त्यांनी माग घ्यायला बरोबर खुणा सोडल्या होत्या.
ते पुरेसे दूर गेले आणि मग इकडची सगळी टीम त्या जागेकडे वळली. तिथूनही मग पुढे तो मुलगा जिकडे खुणेने दाखवत होता तिकडे मग सगळ्यांनी मोर्चा वळवला. आणि जवळ जाऊन बघताच तिथे पसरलेला दुर्गंध त्यांना अस्वस्थ करू लागला होता. एक बॉडी तिथे तशीच पडून होती. तरीही नाकाला रुमाल बांधून अन् श्वास रोधून सगळे तिथे पोचले होते.बॉडी चा चेहरा डोके आपटून छिन्न विछिन्न अवस्थेत होते पण त्याला कुठेतरी पाहिल्या सारखे जय ला आठवत होते.
डोक्याला थोडासा ताण देताच त्याला आदिती च्या मोबाईल मध्ये असलेल्या फोटो मध्ये त्याला पाहिल्याचे आठवले. एक्झॅक्टली, म्हणजे हा जय आहे तर. त्याने स्वतः च्या मोबाईल मध्ये काही फोटो घेतले होते जय चे त्याला शोधण्यासाठी. त्याच्याशी पडताळून पाहताना अगदी तेच कपडे, तीच पर्सनॅलीटी. चेहरा ओळखू येत नसतांना सुद्धा तो जयच आहे हे ठाम कळत होते.
आता मात्र त्याला वेगळीच चिंता भेडसावू लागली होती, हे सगळे आदितीला आणि जय च्या घरच्यांना सांगायचे कसे? तो त्याला सुखरूप शोधून आणेल अशाच आशेवर होते सगळे .त्यांना कोणत्या तोंडाने सांगायचे की जय चा कपाळमोक्ष होऊन तो गेला म्हणून..!
एवढा हिम्मतीचा तो पण आज त्याचं सुद्धा डोकं अगदी सुन्न होऊन गेलं होतं.
काही वेळ तसाच शांततेत गेला. पुढे काय करायचे? सगळे जय च्या सूचनांची वाट बघत होते. जय सुद्धा भानावर आला होता.
चैताली चा ग्रुप माग घ्यायला खुणा सोडून गेला होता. पाठलाग करणारे सुद्धा फोन वर विचारल्या नंतर तेच सांगत होते म्हणजे ते पुन्हा इथे वापस येणार होते हे नक्की!म्हणजे ते एकंदरीत जय च्या बॉडी ची विल्हेवाट लावायच्या विचारात होते तर....!
पण विजयला असे होऊ द्यायचे नव्हते . कारण असे करणे म्हणजे पुरावे नष्ट करणे च होते. पंचनामा, पोस्ट मार्टेम आदी बाबी होणे आवश्यक होते.फॉरेन्सिक लॅब ला सँपल देऊन ती बॉडी जय चीच आहे का वगैरे सारे सोपस्कार करणे सुद्धा जरूरी होते अन् सगळ्यात मोठी अडचण म्हणजे दिवस जास्त झाल्याने तिथे कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे त्यांनी मागे सोडून ठेवलेल्या खुणांमध्ये बदल करत ,त्यांची थोडी दिशाभूल करत त्यांचा पुढचा प्लॅन बघणे एवढेच त्याला करता येणे शक्य होते.वरच्या ऑफिसर्स ला त्याचे वेळच्या वेळी रीपोर्टींग सुरू होते.अगदी साधेसे वाटणारे प्रकरण कुठले वळण घेत कुठे जात होते सारे समजण्या पलीकडेच होते.
सगळी व्यवस्था मार्गी लावून आता फक्त वेट अँड वॉच सुरू होते. काही वेळातच मागावर असणाऱ्यांचा इशारे वजा फोन आला. संध्याकाळ होत आल्यामुळे प्रकाशाचं साम्राज्य सुद्धा ओसरू लागलेलं होतं. आता फक्त मिळेल त्या जागी सगळे जण दबा धरून बसलेले कारण आता कुणाच्याही अस्तित्वाची चाहूल सुद्धा लागू द्यायची नव्हती तिथे....!
काही वेळ गेला आणि अपेक्षित वेळेत ते टोळके तिथे पोचले. दुर्गंधीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी नाकाला रुमाल बांधले अन् ते पुढच्या मोहिमेसाठी सरसावले. डमी बॉडी वर तिथेच पडलेल्या काड्या , पाला पाचोळा सगळं रचून तिची विल्हेवाट लावायची तयारी त्यांनी सुरू केली.
वरून सोबत आणलेले पेट्रोल टाकून तिथे आग लावून दिली त्यांनी. एक खूप मोठी मोहीम फत्ते केल्याचा आनंद आता त्यांना होता.
" आता बॉस आपल्याला खुश होऊन मस्त इनाम देईल.
आदिती तुला तर जॅकपॉट च लागेल वाटते. तुझे सर आणि बॉस दोन्हीही मस्त खुश असणार तुझ्यावर....!" अशा त्यांच्या गप्पा सुरू असताना अचानक समोर जणू भूत प्रकट व्हावं असे चारही बाजूंनी पोलिसांनी त्यांना घेरले.त्यांच्यासाठी हे इतकं अनपेक्षित होतं की त्यांना सुटून पळून जायची संधीच मिळाली नाही.
हे सगळ त्यांच्यासाठी एवढे शॉकिंग होते की बस्स..!
त्यांच्या कल्पनेचे सारे मनोरे उधळले गेले होते. ते ज्या बक्षिसाची स्वप्न बघत होते पण हातात मात्र बेडी पडली होती त्यांच्या...!!
त्यांचे अटक करायच्या आधी चे जे वाक्य होते " आता बॉस आपल्याला मस्त इनाम देईल." ते ऐकून जय चे विचारचक्र सुरू झाले होते. म्हणजे यामागे एखाद्या मोठ्या ग्रुप चा सुद्धा हात असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.नाहीतर चैताली ने आदितीचा जीव घ्यायचा प्रयत्न करावा असं काही आदिती आणि चैताली मधे घडलेच नव्हते निदान आदिती च्या सांगण्यावरून तरी....!
आता चैताली शी गोड बोलून किंवा कशाही पद्धतीने या सगळ्याची माहिती काढायचे त्याने मनाशीच ठरवले होते.आता पुढची रणनीती काय असेल याचा विचार करावा लागणार होता.
जय च्या घरी फोन लावून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतलं. प्रथम दर्शनी तर तो जय च वाटत होता पण चेहरा आणि डोके अगदीच ठेचाळले असल्याने ओळख पटवणे जरा जिकरीचेच होते. ते सारे बघून जय च्या वडिलांची आणि बहिणीची अवस्था फार बिकट झाली होती. जय चे असे काही होईल असा विचार सुद्धा त्यांनी केला नव्हता. जय जिथे पडला होता तो भाग अतिशय निर्जन असल्याने आजवर शोध लागला नव्हता पण चैताली ने मात्र पूर्ण विचार करून त्याचा बरोबर माग घेतला होता. त्याचे बाबा आणि बहीण यांचे सांत्वन करायचा इन्स्पेक्टर विजय पूर्ण प्रयत्न करत होता पण त्यांचे दुःख च एवढे मोठे होते की त्याला काही पार नव्हता.
आता पुन्हा आदिती ची सुरक्षा किती महत्वाची आहे याचा तो विचार करू लागला. कालच्या या ग्रुप च्या बोलण्यावरून तर अजून मोठी शक्ती त्यामागे कार्यरत असण्याची शक्यता च जास्त वाटू लागली होती. कोण असतील हे लोक? म्हणजे चैताली तर फक्त मोहरा होती तर...!!! खरा सूत्रधार कुणीतरी दुसरा च होता. त्याला आदिती बद्दल काय माहिती मिळाली होती हे सुद्धा गुलदस्त्यातच होतं. जय ची विल्हेवाट लावल्याची खबर तर नक्कीच त्यांच्या पर्यंत पोचवली असेल यांनी . यांना अटक झाली म्हटल्यावर आता तो चूपचाप नक्कीच बसणार नव्हता. कदाचित आता तर आदिती सोबतच चैताली च्या सुरक्षेची सुद्धा जिम्मेदारी वाढली होती त्याची.
तिला दगा फटका होण्याची दाट शक्यता आता विजय ला वाटू लागली होती. सर्वप्रथम तिला ग्रुप पासून अलग करावं लागणार होतं अन् मग एखाद्या सुरक्षित अन् गुप्त स्थळी तिला ठेवावे लागणार होतं. घटनेचा माग काढायचा असेल तर अत्यंत हुशारीने आणि सावध पावलं उचलावी लागणार होती. वरिष्ठ अधिकारी आता पर्यंत त्याला पूर्ण साथ देत आले होते. आता सुद्धा त्यांच्याकडून तशीच साथ मिळू दे ही अपेक्षा तो मनोमन बाळगत होता. पुढच्या रणनीतीचा विचार करतच त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सूचना देणे सुरू केले.
काय होईल पुढे? चैताली कडून काही कळेल का? हे प्रकरण अजून कोणते वळण घेईल! हे सगळं जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.
टीम - भंडारा
©® मुक्ता बोरकर- आगाशे
मुक्तमैफल