Login

अधुरी एक कहाणी अंतिम

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, अवंतिकाच्या मैत्रीणींनी अवंतिका आणि सुयशच्या नात्याबद्दल सगळं सांगितले.. अवंतिका प्रेग्नंट होती.. सुयश आणि ती लग्न करणार होते.. अवंतिका तिच्या आईला सगळं काही खरं खरं सांगणार होती.. आता पुढे..

कदाचित अवंतिकाची आत्महत्या नसून खून देखील असू शकतो आणि हा खून सुयशने केलेला असेल.. त्याच्यामुळे अवंतिका प्रेग्नंट होती.. कदाचित घरातून त्यांच्या लग्नाला मान्यता मिळाली नसेल किंवा त्याला तिच्याशी लग्न करायचे नसेल.. असे एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात चालू होते..

"मला सांगा जेव्हा अवंतिकाचा मृत्यू झाला त्या दिवशी तिचा मूड कसा होता?" अमोल

"त्यादिवशी ती नेहमीसारखीच होती.. ती कॉलेजला आली नव्हती.. आम्ही सगळ्याजणी कॉलेजला गेलो होतो.. पण तिचा मूड नव्हता.. कॉलेज सुटल्यावर आम्ही जेव्हा आलो तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे आम्हाला समजले आणि आम्ही सगळेजण एकदम शॉकमध्ये होतो.. आम्हाला तर वाटले की, हे सुयशनेच केले असावे.." निशा

अमोल यांनी सुयशच्या घराचा पत्ता विचारला.. पण तो कोणालाच माहीत नव्हता.. सुयशचा नंबर तेवढा माहित होता पण त्या नंबरवरून फोन केल्यास कोणी उचलत नव्हते.. मग त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन सुयशच्या घरचा पत्ता घेतला आणि त्याच्या घरी गेले..

सुयशच्या घरी गेल्यानंतर तो घरामध्ये नव्हता.. त्याच्या घरामध्ये कोणीच नव्हते.. तो एकदम श्रीमंत होता.. त्याच्या घरात नोकर चाकर होते.. अमोल यांनी नोकरांना विचारले की, सुयश कुठे गेला आहे? तेव्हा एका नोकराने सांगितले की, ते फार्म हाऊसवर गेले आहेत.. हे ऐकून सगळ्यांचे तळपायाची आग मस्तकाला गेली.. अवंतिकाला मारून हा इकडे मजा करतोय असे त्यांच्या मनात आले.. अमोल यांनी नोकराकडून सुयशच्या फार्महाऊसचा पत्ता मागून घेतला आणि ते सगळे फार्म हाऊसकडे वळले..

ते सगळे फार्म हाउसमध्ये जातात.. तिथे गेल्यानंतर त्यांना कोणीच दिसत नाही.. मग ते आतमध्ये जाऊन बघतात आणि काय आश्चर्य! तिथे सुयश एकटाच कुठेतरी शून्यात हरवून बसला होता.. मग अमोल तिथे जाऊन त्याला हाक मारतात.. तर सुयश घाबरतो आणि ओरडतो.. ओरडल्यावर अमोल तिथे जातात आणि त्याचा हात पकडतात..

सुयश भीतीने थरथर कापत होता.. ते पाहून सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटते.. इतक्यात सुयशची बहिण संजाली तेथे आली आणि ती त्या सगळ्यांवर ओरडली.. "तुम्ही सगळे इथे कसे काय आलात?"

"ते राहू दे, पहिला तुम्ही कोण आहात? ते सांगा.." अमोल

"मी संजाली.. सुयशची बहिण.." संजाली

"आम्ही सुयशची चौकशी करण्यासाठी आलो आहोत.. आम्हाला अवंतिकाविषयी थोडे विचारायचे आहे त्याला.." अमोल

"कोण अवंतिका.. ती आत्महत्या केलेलीच काय?" संजाली

"म्हणजे तुम्हाला यातील सगळं माहिती आहे.." अमोल

"होय, मला सगळं माहिती आहे आणि त्या अवंतिकामुळेच माझ्या भावाची ही अशी परिस्थिती झाली आहे.." संजाली

"म्हणजे??" अमोल

"अवंतिका आणि सुयशचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि अवंतिकाला दिवसही गेले होते.. ते दोघे लग्नही करणार होते.. पण आमच्या घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता.. ती एक गरीब मुलगी होती आणि आमच्या आई-बाबांना श्रीमंत घरची अगदी तोडीस तोड असलेली मुलगी हवी होती.. पण सुयश तिच्याशीच लग्न करणार म्हणून अडून बसला होता.. एकीकडे त्याचा हट्ट आणि दुसरीकडे आई-बाबा.. मग मी ठरवले की, सुयशलाच मदत करायचे आणि त्या दोघांचे पळवून लावून लग्न करून द्यायचे.. एकदा का ते मूल जन्माला आले की, आई-बाबा त्यांचा स्वीकार करतीलच.. सगळं काही आम्ही प्लॅन केलं होतं.. पण अवंतिकाच म्हणणं होतं की, आई-बाबांना घेऊनच लग्न करायचं.. पळून जाऊन लग्न करायला ती तयार नव्हती..

एक दिवस माझी आई तिला भेटून तिला काही वाट्टेल ते बोलली.. इतकी निर्लज्ज मुलगी आहेस तू.. असेही तिला म्हणाली.. आणि माझ्या आईचं बोलणं तिने मनाला लावून घेतले.. शेवटी माझी आई तिला म्हणाली की, जर सुयशशी लग्न केलंस तर मी तुझ्या आईला तू उधळलेली गुणं जाऊन सांगेन.. मग पुढच्या परिस्थितीला मी जबाबदार नाही.. त्यामुळे तू सुयशचा विचार सोडून दे आणि दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून मोकळी हो.." संजाली

"मग पुढे काय झाले.." अमोल

"पुढे काय झाले माहीत नाही.. पण आम्ही तिला घ्यायला जाणार होतो.. इतक्यात तिने आत्महत्या करून घेतली होती आणि जेव्हापासून आत्महत्या केली तेव्हापासून सुयशच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.. तो असा एकटाच हरवून बसलेला असतो.. बहुतेक तिच्या आईला याबद्दल सगळे समजणार आणि तिच्या घरची अब्रू जाणार या भीतीनेच तिने आत्महत्या केलेली असावी.." संजाली हे बोलत असतानाच एकदम चांदण्या चमकाव्यात असा थोडा प्रकाश पडला.. ते पाहून सगळ्यांना अवंतिका तिथेच असल्याचे जाणवले आणि संजाली जे काही बोलत आहे ते खरे आहे, असा विश्वास सुद्धा वाटला..

इतक्यात अवंतिका सगळ्यांना दिसू लागली.. आणि अवंतिकाला बघून सुयशदेखील उभारला.. तो अवंतिकाकडे जाऊ लागला.. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या.. अवंतिका म्हणाली, "आपलं एकमेकांवर खरं प्रेम होतं.. पण आपण एक होऊ शकलो नाही.. आपल्या प्रेमाची अधुरी कहाणी आपण आता पूर्णत्वास नेऊया.. तू माझ्याबरोबर चल आपण दोघे नव्याने जिवन जगूया.." असे म्हणून अवंतिकाने त्याच्यासमोर हात पुढे केला आणि सुयशनेही तिच्या हातामध्ये आपला हात दिला.. इतक्यात अवंतिका गायब झाली आणि सुयश चक्कर येऊन खाली पडला.. सगळेजण त्याच्याजवळ जाऊन बघतात तर त्याचाही प्राण केला होता..

अशीही अधुरी एक कहाणी स्पर्धेसाठी लिहिलेली कथा.. कशी वाटली? नक्की अभिप्राय द्या..
समाप्त..

🎭 Series Post

View all