आकाशातून उमटणाऱ्या त्या अज्ञात मंत्रांनी संपूर्ण स्मशान हलवून टाकलं. धैर्यसिंह अंधारात हरवत असताना त्या आवाजाने त्याला जणू पुन्हा जिवंत केलं. त्याच्या डोळ्यांसमोर अस्पष्ट दृश्य तरळू लागलं आणि त्याने पाहिलं…
एका जटाधारी साधूने हातात त्रिशूळ उचलला होता.
स्मशानात उठलेल्या त्या काळ्या वादळाच्या मध्यभागी उभा राहून, त्या साधूने "ॐ नमः शिवाय!" असा घोष केला आणि त्रिशूळ जमिनीत रोवला. एक प्रचंड शक्तीचा लहरी उठला, आणि त्या भयंकर आत्म्यांची किंकाळी आकाशात विरून गेली.
देवदत्त वेदनेने ओरडला. त्याचं शरीर धुरासारखं हलायला लागलं, जणू त्याच्या अस्तित्वावर हल्ला झाला होता. तो चवताळून साधूकडे पाहू लागला.
"कोण आहेस तू? माझ्या मार्गात यायची हिम्मत कसली केलीस?"
साधू शांतपणे पुढे सरसावला. त्याच्या डोळ्यांत विलक्षण तेज होतं.
"तू मृत आहेस, आणि मृतांना जगण्याचा अधिकार नाही!"
देवदत्त गुरगुरला. त्याने आपले काळसर हात आकाशात उचलले, आणि त्या क्षणी स्मशानात जळालेल्या चितांमधून अजून काही भयावह आत्मे बाहेर आले!
"त्याला संपवा!" देवदत्त ओरडला.
धैर्यसिंहचा श्वास अडायला लागला. हे युद्ध आता अटळ होतं.
स्मशानातल्या आत्म्यांनी साधूला घेरलं. पण त्या साधूने आपल्या कमंडलूमधून भस्म उचललं आणि आकाशात भिरकावलं. ते भस्म हवेत पसरताच एक प्रचंड विद्युत चमकली, आणि त्या आत्म्यांची भयानक किंकाळी उठली!
एकामागून एक आत्मे नष्ट होऊ लागले.
देवदत्त ओरडून त्याच्या संपूर्ण शक्तीने वादळ निर्माण करायला लागला, पण साधू शांत होता." त्याने डोळे मिटले आणि एका हाताने त्रिशूळ हवेत उचलला. त्रिशूळातून एक प्रकाशकण बाहेर पडला आणि तो थेट देवदत्तच्या छातीत घुसला!
देवदत्तने हंबरडा फोडला… त्याच्या लालसर डोळ्यातून काळा धूर बाहेर येऊ लागला.
देवदत्तच्या वेदनांनी संपूर्ण स्मशान हादरलं. त्याच्या लालसर डोळ्यांत एक अनाकलनीय वेदना आणि राग होता. त्रिशूळाचा प्रकाश त्याच्या छातीत खोलवर घुसत होता, आणि त्याच्या काळसर हाडांवर भेसूर चटके उमटू लागले.
"नाही… हे असं होऊ शकत नाही!" तो प्राणांतिक किंकाळी फोडत ओरडला.
पण साधू शांत होता. त्याच्या डोळ्यांत अजूनही तीच विलक्षण ज्वाळा होती.
"मृत्यूलाही नियम असतो… आणि तुला तो मोडायचा अधिकार नाही!" साधूच्या आवाजात वज्रासारखी कठोरता होती.
धैर्यसिंह, जो अजूनही हे सगळं बघत होता, त्याला वाटलं की आता सगळं संपेल. पण अचानक स्मशानातल्या जळणाऱ्या चितांमधून एक नवीन उग्र उर्जेचा स्फोट झाला! आणि भयानक काळी सावली हवेत तरंगू लागली.
"तुम्ही मला संपवू शकत नाही!"पुन्हा एक आवाज घुमला.
आकाश लालसर काळं होत चाललं होतं.स्मशानाच्या सीमारेषेवर असलेल्या वृक्षांच्या फांद्या वेडसर हालायला लागल्या. तेथील पक्ष्यांनी प्राण सोडले.
साधूने त्रिशूळ अधिक जोरात आवळला."काळाचा खेळ आता संपलाच पाहिजे!"
पण यावेळी धैर्यसिंहच पुढे सरसावला. "हे शेवटचं युद्ध आहे… मी घाबरणार नाही!"बोलतच.तो जमिनीवर पडलेल्या मशालीकडे झेपावला, ती उचलली आणि त्या अंधाऱ्या शक्तीकडे जोरात भिरकावली.मशालीचा ज्वालामुखी त्या भेसूर सावलीवर पडला… आणि त्या क्षणी संपूर्ण स्मशान प्रचंड प्रकाशाने उजळलं!
मशालचा प्रकाश त्या सावलीला स्पर्श करताच, ती आणखीनच विक्राळ झाली. आता ती फक्त एक सावली नव्हती ती काहीतरी अधिक भयावह आणि विध्वंसक होती.
"माझा अंत कोणीच करू शकत नाही…"तो आवाज माणसाचा नव्हता. तो खोल गर्जनेसारखा होता, जणू एखाद्या अमानवी शक्तीने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
धैर्यसिंह मागे सरकला.त्याला जाणवलं की आता फक्त मशाल पुरेशी नाही.
साधू अजूनही शांत उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावरही आता गंभीरता दिसत होती.
"ही शक्ती वेगळी आहे… देवदत्तचा आत्मा नाही. ही खरी अंधाराची मूळ शक्ती आहे!" साधूने सागितलं.
"मग आता काय करायचं?" धैर्यसिंहने विचारलं, त्याच्या आवाजात भीती होती.
साधूने हळूच आपल्या हातातील त्रिशूळ उचलला आणि हवेत काहीतरी मंत्र म्हटला.त्या मंत्रांचा आवाज होताच, एक उष्ण ऊर्जा वातावरणात पसरली. तेवढ्यात, सावली अचानक हालली!ती धैर्यसिंहच्या दिशेने झेपावली!त्याने जोरात ओरडून बाजूला उडी मारली, पण त्याचा एक हात त्या सावलीच्या स्पर्शाने जळल्यासारखा लालसर पडला.
"हा फक्त सुरूवात आहे…" ती सावली हसली.
आता धैर्यसिंह आणि साधूच्या समोर होती एका प्राचीन शापाने ग्रासलेली एक भयावह शक्ती… जी अजून पूर्ण प्रकट व्हायची होती!
स्मशान हादरलं… हवा घनदाट झाली… आणि अचानक त्या अंधारातून हळूहळू एक आकृती स्पष्ट होऊ लागली. तिचे डोळे लालभडक होते, आणि शरीरातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडत होते.
"तुम्ही माझ्या जागेत प्रवेश केलात... आता परत जाणं अशक्य आहे!"ती सावली पुन्हा म्हणाली.
धैर्यसिंह आणि साधू एकदम सावध झाले. धैर्यसिंहने जखमी हात घट्ट धरला. त्याच्या त्वचेवर ती सावली जिथे स्पर्शली होती, तिथे काळे डाग पडले होते!
त्या आकृतीने पुढे पाऊल टाकलं. तिच्या प्रत्येक हालचालीबरोबर आजूबाजूचा अंधार अधिकच खोल आणि जिवंत होत चालला होता.
धैर्यसिंहने नकळत मागे पाऊल टाकलं, पण तेवढ्यात… त्याच्या कानाशी कुजबुज ऐकू आली.
"तूच निवडलेला आहेस… शतकांनंतर शाप पूर्ण होणार आहे!"
धैर्यसिंहने दचकून इकडे-तिकडे पाहिलं. आवाज कुठून आला?
तो साधूच्या जवळ गेला, पण त्याच्या मनात आता एक वेगळाच भय निर्माण झालं होतं.
"तुम्ही कोण आहात? आणि हा शाप म्हणजे काय?" धैर्यसिंहने जोरात विचारलं.
आकृती थांबली… आणि ती हलकासा हसली. त्या हास्यात विनाश होतं.
"हा शाप... तुझ्यामुळे पूर्ण होणार आहे, धैर्यसिंह!"त्या आकृतीचा आवाज घुमला त्या सरशी धैर्यसिंहच्या पाठीला गार वारा जाणवला… आणि एका क्षणातच त्याच्या समोर जमीन फाटली! एका उंच, भयाण गर्जनेसह, त्या विवरामधून काहीतरी बाहेर येऊ लागलं…
साधूने मंत्रांचा जोर लावला, पण ते पुरेसं नव्हतं…
कारण… हा शाप हजारो वर्षांचा होता.
त्या फाटलेल्या विवरामधून एक काळसर धूर बाहेर पडत होता त्याच्या सोबत येणारा वास कुजलेल्या मृतदेहासारखा होता.
"आता वेळ संपली… तुम्ही याला थांबवू शकत नाही!" ती लाल डोळ्यांची आकृती हसत म्हणाली.
धैर्यसिंहने त्या विवरामध्ये पाहिलं आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. आत शेकडो हाडांनी बनलेल्या हातांची हालचाल दिसत होती ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते!
साधूने झपाटल्यासारखं त्याच्या कमंडलूतून भस्म काढलं आणि मंत्र उच्चारत ते जमिनीकडे फेकलं. पण त्या मंत्राचा काहीही परिणाम होत नव्हता.त्या उलट ती आकृती अजूनच जवळ येत होती.
"हे असं होऊ द्यायचं नाही!" धैर्यसिंह जोरात ओरडला आणि तो तलवारीसारखी मशाल उगारून पुढे गेला.
त्या धुराळलेल्या विवरामधून अचानक एक भेसूर आकृती बाहेर पडली अर्धवट जळालेल्या चेहऱ्यासह, फाटलेल्या वस्त्रांसह! तिच्या काळसर हातांवर जुनी तपकिरी मेहंदी होती, जणू ती पूर्वी एखाद्या विधवेसारखी होती…
त्या आकृतीने नजरेला नजर दिली…
धैर्यसिंहच्या अंगभर शहारा आला.कारण त्या आकृतीचा चेहरा… त्याच्या स्वतःच्या चेहऱ्यासारखाच होता!
धैर्यसिंहला विश्वास बसत नव्हता समोर उभ्या असलेल्या त्या भेसूर आकृतीचा चेहरा त्याच्यासारखाच होता! फाटलेली त्वचा, गडद रक्ताचे ठिपके, आणि डोळ्यांमध्ये मृत्यूचा काळा साय…
"हे शक्य नाही…!" तो घाबरून एक पाऊल मागे सरकत म्हणाला.
त्या आकृतीचा अर्धवट जळालेल्या ओठांवर हसू उमटवलं.
"माझ्याकडे बघ, धैर्यसिंह… कारण हेच तुझं भवितव्य आहे!"ती आकृती म्हणाली.
स्मशानाचा कडा भीषण वाऱ्याने हलायला लागल्या. ज्या विवरामधून धूर निघत होता, तिथून अजून काही आकृत्या बाहेर पडू लागल्या सगळ्या अर्धवट जळालेल्या, वेदनेने विव्हळणाऱ्या!
साधूने जोरात मंत्रोच्चार सुरू केला.
तुमच्या मुक्तीची वेळ जवळ आली आहे! पण जर तुम्ही मानवाच्या रक्ताला स्पर्श केलात, तर तुम्हाला या जगातून कायमचं नष्ट व्हावं लागेल!त्या शब्दांसोबतच साधूने हातातली भस्माची पूडी हवेत भिरकावली.
पांढऱ्या भस्माचा स्पर्श होताच काही भुतांनी असह्य किंकाळ्या फोडल्या आणि ते पुन्हा राखेत विलीन झाले. पण… धैर्यसिंहसारखी दिसणारी ती आकृती मात्र अजूनही हसत उभी होती!
"हा शाप तुझ्या रक्ताशी जोडला आहे… "तू तुझ्याच मृत्यूला भेटायला तयार आहेस का?"ती आकृती पुढे होतं म्हणाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा