Login

२) आत्म्याचा कैदखाना

भय कथा
हो, तो देवदत्तच होता… पण आता तो मानव नव्हता.

त्याच्या काळसर तोंडातून एक वेदनादायक किंकाळी बाहेर आली. पूर्ण स्मशान हादरलं. एका क्षणातच, राखेतून अजून काही आकृत्या बाहेर येऊ लागल्या. त्या सर्व मृतात्मे… जे स्मशानात अडकले होते… आता मुक्त होत होते!

धैर्यसिंहला पळायचं होतं, पण शरीर हलायला तयार नव्हतं. समोरच्या जिवंत प्रेतांनी त्याला घेरलं होतं.

"तू इथून जाऊ शकत नाहीस…" एक घोगरा आवाज ऐकू आला.

धैर्यसिंहच्या पाठीमागून एक थंडगार हात त्याच्या खांद्यावर आला. त्याने वळून पाहिलं.आणि त्याचा डोळ्यांसमोर अंधार पसरला.समोर एक ओळखीचा, पण भेसूर चेहरा होता. ते नुसतं भूत नव्हतं, तर त्याच्या आत्म्यात साचलेला भयाचा प्रतिबिंब होता.

धैर्यसिंहचा श्वास अडकला. त्याच्या पायाखालील जमीन हलल्यासारखी वाटली. राखेतून बाहेर आलेले सगळे मृतात्मे त्याच्याकडे टक लावून पाहत होते. काहींचे शरीर अर्धवट जळालेले होते, काहींचे डोळे खोल गडद विवरांसारखे भासत होते. अचानक, एका आत्म्याने त्याच्यावर झडप घातली!

धैर्यसिंहने मशाल जोरात पुढे धरली. जळलेल्या आत्म्याला त्या प्रकाशाने थोडा मागे हटावं लागलं, पण इतर मृतात्मे अजूनही पुढे सरकत होते.

"काय हवंय तुम्हाला?" तो थरथरत ओरडला.

त्या क्षणी, देवदत्तने मान वळवली आणि सांगितलं, "आम्ही मुक्ती शोधत आहोत…"

मुक्ती? ही आत्म्यांची कैद झाली होती का? धैर्यसिंहच्या डोक्यात एक क्षणात विचारांचे वादळ उठलं. गावकऱ्यांनी सांगितलेली पुराणी दंतकथा त्याच्या मनात चमकून गेली,

स्मशानभूमीत एक 'मृत्युद्वार' होतं. जो कोणी त्यात अडकतो, तो ना जगू शकतो, ना पूर्ण मरण पावतो.

"मग मी काय करू शकतो?" धैर्यसिंहने भानावर येत  धीटपणे विचारलं.

त्या शब्दांसोबतच सारा परिसर हादरू लागला. राख उडू लागली, आणि जमिनीखाली काहीतरी हलण्याचा आवाज येऊ लागला. स्मशानाच्या एका कोपर्‍यात, जमिनीवर कोरलेली ती भीषण अक्षरं चमकू लागली.

मृत्युद्वार उघडायचं, की स्वतः त्या अडलेल्या आत्म्यांमध्ये सामील व्हायचं? कोरीव अक्षर वाचतच.धैर्यसिंहने एक मोठा श्वास घेतला.

आता त्याच्याकडे वेळ नव्हता मृत्युद्वार उघडायचं, की स्वतः त्या अडलेल्या आत्म्यांमध्ये सामील व्हायचं? हा हा निर्णय ही त्याला घेता येत नव्हता.

धैर्यसिंहच्या हृदयाची धडधड वाढली होती. समोरची भेसूर अक्षरं आता रक्तासारख्या लालसर प्रकाशाने चमकत होती. जमिनीत काहीतरी खोल आत हलत होतं, जणू पृथ्वीच्या गर्भातून काहीतरी बाहेर पडणार होतं.

"मृत्युद्वार उघडायचं म्हणजे काय?" त्याने भीतभीत विचारलं.

देवदत्तची जळालेली आकृती पुढे सरकली. "या जागेत एक शाप आहे. जो कोणी इथं मेला, त्याला शांती नाही. आम्ही फक्त मुक्ती हवी आहे."

"पण… मृत्युद्वार उघडल्यावर काय होईल?"

"हे दार एकतर आम्हाला मुक्त करेल… किंवा तुलाही आमच्यात सामील करेल."

धैर्यसिंहच्या हातातली मशाल आता मंदावत चालली होती. त्याने वेगाने विचार केला. काहीतरी चुकीचं केलं, तर तोही याच भयानक आत्म्यांमध्ये अडकून जाईल.

तेव्हढ्यात, जमिनीतली अक्षरं जास्तच  लालसर झाली. त्यातून अचानक एक आक्रोश बाहेर पडला!

"धैर्यसिंह… सावध!"

त्या शब्दांसोबतच जमीन मोठ्या आवाजाने फाटली आणि काळोखात काहीतरी हलू लागलं. एक अजस्र आकृती त्यातून वर सरकत होती अगदी दगडी देवळातील भयानक मूर्तीप्रमाणे! ती अंधाऱ्या धुराने वेढलेली होती, आणि तिच्या डोळ्यात रक्तासारखी आग पेटलेली होती.

धैर्यसिंह समजून गेला होता हा आत्म्यांचा रक्षक होता, जो त्यांना मुक्त होऊ देणार नव्हता!

देवदत्त आणि बाकी आत्मे वेदनेने किंचाळू लागले. मृत्युद्वार उघडण्याऐवजी काहीतरी भयंकर गोष्ट बाहेर पडत होती. धैर्यसिंहने शेवटचा निर्णय घेतला त्याला या आत्म्यांना मुक्त करायचं होतं, पण त्यासाठी या अजस्र रक्षकाला रोखणं आवश्यक होतं.

त्याच्या हातातली मशाल फक्त क्षणभर उजळली, आणि पुढच्याच क्षणी ती पूर्ण विझली.

आता त्याच्याकडे फक्त काळोख होता… आणि समोर मृत्यू उभा होता.

धैर्यसिंहने डोळे गच्च मिटले. त्याच्या कानात फक्त मृतात्म्यांचे आक्रोश आणि त्या अजस्र रक्षकाच्या भयानक गुरगुराटाचा आवाज घुमत होता.

अचानक, त्याला कुठूनतरी एक आवाज ऐकू आले एक मंद पण भारदस्त आवाज.

"धैर्यसिंह… प्रकाश शोध! तुझ्या रक्तातच त्याचं उत्तर आहे!"

त्याच्या मनात एक चमक उमटली. त्याच्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या,धैर्यसिंहच्या पूर्वजांनी या गावावर आलेल्या एका पुरातन शापाचा सामना केला होता. त्यांच्या रक्तात एक अशी शक्ती होती, जी या अंधाऱ्या आत्म्यांना रोखू शकत होती.

त्याने पटकन आपल्या मनगटाला चिरलं. गरम रक्ताच्या थेंबांनी जमीनीवरील त्या भयावह अक्षरांना स्पर्श केला… आणि एकच क्षणात वातावरण बदललं!

जमिनीवरची लखलखती अक्षरं अधिक उजळली. त्या विशाल रक्षकाने एक प्रचंड गर्जना केली आणि आगीसारखा धूर त्याच्या अंगाभोवती फिरू लागला. धैर्यसिंहला जाणवलं हा भयानक शक्तीमान रक्षक वेदनांनी तडफडत होता.

"हा शाप सोडवण्याचा हाच मार्ग आहे!" त्याने स्वतःला समजावलं.

देवदत्त आणि इतर आत्मे वेदनेने किंचाळले, जणू काहीतरी मोठं घडणार होतं. त्या रक्षकाने अखेरची एक प्रचंड डरकाळी फोडली आणि…संपूर्ण स्मशानात एक अंधाराची लाट उसळली.

धैर्यसिंह काहीच पाहू शकत नव्हता. तो फक्त त्याच्या आजूबाजूच्या भयावह शक्तींच्या अस्तित्वाचा अनुभव घेत होता.आणि मग… अचानक सगळं स्तब्ध झालं.

स्मशानातला अंधार जणू काळाच्या गाभ्यात उतरला होता. धैर्यसिंहच्या श्वासांचा वेग वाढला. त्याला काहीच दिसत नव्हतं फक्त भयाण नीरवता आणि भोवतीच्या मृत आत्म्यांची दबलेली कुजबुज.

अचानक, एका घोगऱ्या आवाजाने साऱ्या वातावरणाला कंप दिला.

"तू शाप सोडवू शकतोस… पण किंमत मोजायला तयार आहेस का?"

धैर्यसिंहने डोळे उघडले. त्याच्या समोर एक भयप्रद आकृती उभी होती अर्धवट जळालेलं शरीर, राखेने माखलेले हात आणि निर्विकार, पण खोल असलेले डोळे. तो… देवदत्त होता.

"किंमत?" धैर्यसिंहने दबक्या आवाजात विचारलं.

देवदत्त पुढे झाला. "हा शाप फोडण्यासाठी तुला एका आत्म्याची आहुती द्यावी लागेल… तुझी किंवा एखाद्या निर्दोष आत्म्याची."

धैर्यसिंह हादरला.

तितक्यात, दूरवरून मशालीचा प्रकाश झळकला. गावकऱ्यांचा जमाव स्मशानाच्या दिशेने येत होता. भीतीने त्रस्त, पण आपल्या गावाच्या सुरक्षेसाठी धैर्यसिंहला वाचवण्यास सज्ज.

देवदत्तने एक तिरस्कारयुक्त हसू फेकलं. "हे लोक तुला वाचवायला येत आहेत, पण तुला माहित आहे का? यांपैकी एकजण आधीच शापाचा भाग बनलाय!"

धैर्यसिंहने गोंधळून मागे पाहिलं. गावकऱ्यांमध्ये कोण शापित असणार? त्याने दृष्टी रोखली… आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.

तो कोणी तरी परिचित होता.

आता त्याला निर्णय घ्यायचा होता गाव वाचवायचं की सत्य बाहेर काढायचं,

धैर्यसिंहच्या मनात हजारो विचार घोंघावत होते. गावकऱ्यांमध्ये कोणीतरी शापित आहे… पण तो कोण?

त्याने झपाटल्यासारखा गर्दीकडे पाहिलं. मशालीच्या प्रकाशात एकेक चेहरे स्पष्ट होत होते पांडुरंग काका, गंगू मावशी, सुरेश, भीमा… आणि त्यात एका व्यक्तीचे डोळे विचित्र चमकत होते.

ते होते राघवचे डोळे.

राघव गावातला सर्वांत विश्वासू मित्र, धैर्यसिंहचा लहानपणापासूनचा सोबती. पण त्या डोळ्यांमध्ये आज काहीतरी वेगळं होतं. एक अमानवी ताकद, एक अज्ञात भीती.

देवदत्तने अंधारातून हसत उत्तर दिलं. "तुला समजलं का आता? हा तुझ्या गावचा नाही… हा माझ्या शापाचा वारसदार आहे."

धैर्यसिंहच्या हृदयाचा ठोका चुकला. राघव शापित होता.

गावकरी जवळ आले होते, पण त्यांना काहीच कळत नव्हतं. धैर्यसिंहने मशाल उंच धरली आणि राघवच्या दिशेने काही पावले टाकली.

"राघव, सत्य सांग… तुझ्यासोबत  काय घडलं?"धैर्यसिंहने थेट प्रश्न केला.

राघव मागे सरकला.त्याच्या श्वासाचा वेग वाढला. शरीर थरथरत होतं. मग अचानक, तो जोरात किंचाळला एक वेदनादायक, भेसूर आवाज.

गावकरी भयभीत झाले. कोणी मागे हटले, कोणी देवाचं नामस्मरण करू लागले.

आणि त्याच क्षणी, राघवच्या अंगातून काहीतरी बाहेर निघालं एक काळपट छाया, जी त्याच्या शरीरावरून सुटत नव्हती. ती चपखल वळणं घेत देवदत्तच्या दिशेने झेपावली.

धैर्यसिंहने पाठीमागे पाहिलं. देवदत्त अचानक गंभीर झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना उमटली, जणू त्याच्या आत्म्यावरच कुणीतरी हल्ला केला होता.

"हा खेळ आता संपत आहे…" देवदत्त ओरडला.

आणि त्याच क्षणी, एक जोरदार आवाज झाला… आणि सगळं काळोखात हरवून गेलं.

अंधारातून बाहेर पडताच धैर्यसिंहच्या डोळ्यांसमोर धुकट प्रतिमा तरळल्या राघव जमिनीवर पडला होता, त्याचे शरीर थरथरत होते, आणि त्याच्या भोवती काळी छाया गुंडाळली होती.