आमचे धोत्रे गुरुजी (भाग २)

.....बेल वाजवली......

बेल वाजवली.माझा मुलगा सुकीर्तीने दार उघडलं.त्याच्यामागे दिशा उभी होती.गुरुजींनी नमस्कारासाठी हात जोडले होते.
त्या दोघांनी तपकिरीचा वास येत असल्याने नाकावर हात ठेवले होते.तपकिरीचा वास त्यांना नवीन होता.तपकीर ही वस्तूच त्यांना माहीत नव्हती.आम्ही आत शिरलो.गुरुजींचं सामान असं नव्हतंच.मी ओळख करून देत म्हंटलं, " दिशा ,हे धोत्रे गुरुजी.आणि बरं का कीर्ती, हे तुझे आजोबा. नमस्कार कर."
त्याने नमस्कार केला. दिव्याने आत जाऊन चहा,पोहे, पाणी वगैरे आणलं.त्यावर मी काही म्हणायच्या आधीच दिशा म्हणाली," तुमचा फोन आल्यावर,भुका लागल्या असतील म्हणून मी खाण्याचं आधी बनवून घेतलं.तासाभराने आपण जेवूच ". असं म्हणून तिने गुरुजींना नमस्कार केला. ती आत गेली. खाता खाता , गुरुजींचा गळा भरुन आला.धोतराच्या सोग्याने डोळे पुशीत ते म्हणाले," बरेच दिवसात घरचं अन्न मिळालं नव्हतं " त्यांना हुंदका आवरेना.म्हणून मी जागेवरून उठून त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.हुंदके ऐकून दिशा पण बाहेर आली.माझेही डोळे पाणावले. दिशा म्हणाली," अहो, आता आमच्या घरी आलात ना. मागचं सगळं विसरा बरं. नवीन आयुष्य चालू झालंय असं समजा . आम्ही सगळेच आहोत की. काळजी करूच नका बरं. "
दहा साडेदहापर्यंत आमची जेवणं झाली. गुरुजींना त्यांची खोली दाखवली.सुदैवाने माझा फ्लॅट तीन बीएचके होता.त्यांचा बेड तयार केल्यावर त्यांना बेडवर बसवलं आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत म्हंटलं, " गुरुजी,हे तुमचंच घर आहे, आणि मीच तुमचा मुलगा.काही लागलं तर हक्कानं हात घालून घ्या.अनमान करु नका." .....त्यांचे खांदे आणि मान खाली गेली होती. परत ते भरल्या डोळ्याने म्हणाले," अरे किती करता रे माझ्या सारख्या निरुपयोगी माणसासाठी..कसं सहन करणार हे सूख .". मग मी त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हंटलं ," झोपा आता. सकाळी बोलूच आपण. "
सकाळ झाली.मी गुरुजींच्या खोलीचं दार उघडलं.झोपमोड होऊ नये म्हणून मी लाईटही लावला नाही.त्यांना उठवावा, म्हणून पुढे झालो.
गुरुजी बेडवर दिसले नाहीत.मी थोडा घाबरलो.बाथरुमला गेले असतील, म्हणून मी दरवाज्याकडे वळलो.तर गुरुजी भिंतीच्या कडेला मुटकुळं करुन झोपलेले दिसले. मग मात्र मी त्यांना लाईट लावून उठवलं.बेडवर ठेवीत म्हंटलं. " गुरुजी बेडसोडून इथे काय झोपलात,अंग अवघडेल की."
त्यावर ते काहीच बोलले नाहीत.
मग माझ्या लक्षात आलं, त्यांना बेडवर झोपण्याची संशयी नव्हती.एस्टीच्या कॅन्टीन मधे आणि घर‌ गेल्यापासून त्यांना कुठेही झोपावं लागायचं.घर गेल्यापासून ते किती काळ कुठे कुठे झोपले असतील,कोणजाणे.
मी दरवाज्याकडे वळलो,तर ते माझा हात पकडून म्हणाले," अरे एवढा जीव लावू नये रे.मी नगण्य माणूस आहे.उद्या चुकीचा लागलो तर तुला सहन होणार नाही.मला होतो तिथेच नेऊन टाक रे. "
मी त्यांच्या हातावर हात ठेवीत म्हंटलं ," तसं होणार नाही.तुम्ही तोंड धुवा.चहा,नाश्ता आपण एकत्रच घेऊ." ते बाथरूममध्ये गेलेले पाहून मगच मी बाहेर पडलो.
अंघोळ वगैरे करून मी ऑफिस साठी तयार झालो.चहा नाश्ता टेबलावर मांडला होता.मग कीर्तीला गुरुजींना घेऊन यायला सांगितलं.फारसं काही न बोलता चहा नाश्ता झाला.जाताना गुरुजींसाठी नवीन कपडे आणायला दिशाने सांगितलं.त्याचबरोबर मी तपकीरही लक्षात ठेवली.गुरुजींना सांगून मी निघालो.मला तरी ते शांत वाटले.इथे राहणं त्यांना आवडायला मात्र हवं.ते नक्की काय विचार करीत होते,हे कळतं कठीण होतं.पण आता त्यांना कीर्ती आणि दिशा या दोघांनी स्वीकारायला हवं म्हणजे झालं.अशा शंकेतच मी बाहेर पडलो. आज मी नेहमीपेक्षा लवकरच यायचं ठरवलं.तरीही संध्याकाळचे सात वाजले. तसा मी नऊ नंतर येत असे.आल्या आल्या मी गुरुजींची चवकशी केली. तर ते आज जेवले नसल्याचं दिशा कडून कळलं.ती मला ताबडतोब त्यांच्या खोलीत घेऊन गेली .ते विमनस्क स्थितीत आढ्याकडे पाहात बसलेले दिसले. मला त्यांच्याशी काय बोलावं समजेना.त्यावर दिशा काळजीने म्हणाली," हे असं रोज व्हायला लागलं तर यांना कसं सांभाळणार ? " मी चिडून विचारलं, " मग काय त्यांना रस्त्यावर टाकायचं ? त्यासाठी आणलंय का त्यांना ? " त्यावर ती अजिजीने म्हणाली, " छे हो, काहीतरीच काय? एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे आपण घेऊन गेलो, तर ते सुधारतील तरी." माझा राग अजून शांत झाला नव्हता. " ते कालच आल्येत ना ? काही वेळबीळ लागतो का नाही माणसाला वातावरणाशी जमवून घ्यायला. ते काही वेडे नाहीत मेंटलमधे न्यायला " ....." पण मी कुठे म्हंटलं सेंटरमध्ये घेऊन जायला. मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे डॉक्टरच असतात." . माझा पारा खाली आला. आम्ही दोघे खोलीबाहेर आलो.रात्रीचं जेवण मी त्यांना भरवण्याचं ठरवलं.मी नऊच्या सुमारास जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या खोलीत आलो.ते बेडवर खाली मान घालून बसले होते.त्यांना मी प्रथम हळुवारपणे हांक मारली. " गुरुजी,मी आलोय.घाबरु नका.आता तुम्ही थोडं तरी जेवून घ्या पाहू.असं कसं न जेवून चालेल ?" . ...असं म्हणून मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.ते हसले. आणि अचानक म्हणाले," अरे , मी ठीक आहे मला काहीही झालेलं नाही.बघ! आण बरं ते ताट." असं म्हणून त्यांनी जेवायला सुरुवात केली.मला एकदम हलकं वाटलं.त्यांच्यात अचानक झालेला बदल पाहून भीतीही वाटली.यांना सकाळी जेवायला काय झालं होतं ? मी त्यांना दुखवू इच्छित नव्हतो.पण त्यांचं ते वागणं पाहून मला हळूहळू दिशाचं म्हणणं पटू‌ लागलं.मग मी त्यांना जेवल्यावर गप्पा मारायला येईन असं म्हंटलं.
अर्ध्या पाऊण तासात आमची जेवणं झाली. दहा वाजत होते. झोपण्याची तयारी केली. मी दिशाला भडकल्या बद्दल सॉरी म्हंटलं.मला रोजरोज लवकर येता येणार नव्हतं. मग दिशाला लवकर येण्याचं प्रॉमिस करून मी गुरुजींच्या खोलीत शिरलो.तशी ते माझ्याकडे पाहून गोड हसले. मला खूपच बरं वाटलं. मग ते म्हणाले," काल मी खाली झोपलेला दिसलो ना ? " मी मानेनेच हो म्हंटले. त्यावर ते म्हणाले," काल रात्री तो. आला होता.म्हणजे सदाशिव. अरे असा काय पाहतोस,भूत पाहील्यासारखा ?" मी आश्चर्याने म्हंटलं, काहीतरीच काय? सदाशिव अमेरिकेत नाही का ?
तो इथे कसा येईल ? " त्यावर ते डोळे गरागरा फिरवत म्हणाले, " अरे त्यानेच तर मला खाली झोपायला लावलं.म्हणतो कसा, तुम्हाला मी आरामात झोपू देईन.आईला घालवलीत.मला अमेरिकेत जायला लावलंत.नोकरी घालवलीत.आणि तुम्हाला मी सुखाने झोपून देईन. मुकाट्याने खाली उतरा. आणि झोपा त्या कोपऱ्यात. .....". ते चांगलेच चार्ज झाले होते.ते शिव्याही देत होते. रडत होते....मला आता दिनाचं बोलणं चांगलंच पटलं. त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.मी त्यांना कसंतरीच शांत केलं .लाईट मालवला आणी थोडावेळ त्यांच्या पाठीवर हात फिरवत राहिलो. अर्ध्या पाऊण तासाने ते शांत झाले. आणि त्यांना झोप लागलेली दिसल्यावर मी माझ्या बेडरुमकडे गेलो. दिशा झोपली होती माझी मात्र झोप काळजीने उडाली. पण मला एकदाही गुरुजींना आणल्याचा पश्चात्ताप झाला नाही. एका निराधार माणसाला सांभाळण्यात कसली आली आहे चूक ? उलट मी गुरुजींना मी वेळीच घरी आणलं होतं.

(क्रमशः)



🎭 Series Post

View all