गोष्ट छोटी डोंगराएवढी. विषय:-“आकाशी झेप घे रे पाखरा" आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा ।। तुजभवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी, आसरा ।। घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा, मोहाचे बंधन द्वारा, तुझ अडवितो हा कैसा, उंबरा ।। तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरीडोंगर हिरवी राने, जा ओलांडूंनी या सरिता, सागरा ।। कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते, परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई, बावरा ।। घामातून मोती फुलते, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जिवणी आला, साजिरा ।। गीतकार श्री.जगदीश खेबुडकर संगीत बाबूजी उर्फ श्री. सुधीर फडके गायक बाबूजीच. चित्रपट आराम हराम आहे. (१९७६) यमन, तिलक कामोद, देस या तीन रंगांचा संगम साधून बाबूजींनी हे गाणे पेश केले आहे. वर्षानूवर्षे अमर्यादित आकाशात स्वच्छंदपणे विहार करण्याची स्वप्ने पाहत पिंजर्यात पाळलेला पक्षी दार उघडूनही उडून जात नाही. पांगुळगाड्याची, कुबड्यांची सवय होते, तेच आवडू लागते. कारण आत्मविश्वासाचा अभाव. तो काही विकत मिळत नाही, तो मूलतः असावा लागतो, नाहीतर पैदा करावा लागतो, उसना घेऊन चालत नाही. पंख असले तरी भरारी कोण देणार. शेवटी ही वेळ येते की काही पक्षी “आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा” म्हणत आपल्या पिल्लाला घरट्याबाहेर अक्षरशः ढकलतात. आयते मिळत असतांना ते सोडून कोण जाईल कष्ट करून खायला? स्वप्नाचा फालोअप केल्याशिवाय ती सत्यात, वास्तवात उतरत नाही. त्यासाठी योग्य मेहनत, योग्य वेळी घ्यावी लागते आणि संधी शोधता आली पाहिजे,ओळखता आली पाहिजे. मगच स्वप्न साकार होते. ध्येय गाठतांना वाटेवर काटे अनेक येतील, आकर्षणे येतील, त्याकडे दुर्लक्ष करून वाटचाल चालली पाहिजे. तरच संकल्प पूर्ती होते. हे लक्ष्य साधण्याचा प्रवास अतिशय खडतर असतो. स्वस्थ शरीर, निरोगी मन व प्राप्त परिस्थिति ह्यांचा संगम साधून हे साध्य करावे लागते. नेहमी गोड बोलणे व डोके शांत ठेवणे हे महामानवांचे सूत्र लक्षात ठेऊन त्याप्रमाणे वागावे लागते. खरे तर आयुष्यात “कमवायचे” वा “गमवायचे” काहीच नसते, आपण जगात आल्यावर आहे त्या परिस्थितीशी “जमवायचे” असते. आपल्याला मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते व ते त्याला आयते मिळवून देतात ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचे मूल्य, आदर, प्रेम त्याला असत नाही. तुमची आवड, सवड आणि निवड त्यात त्याची होते परवड. मागितले की लगेच हजर. मुलामुलींच्या चेहर्यावरचा आनंद बघायचा असतो. स्वावलंबी बनवतांना आपण त्यांना घाबरट, परावलंबी करत आहोत. निसर्गाशी, समाजाशी, कौटुंबिक नात्यांशी ते अशाने त्याची किम्मत न कळल्यामुळे, अपयश न पचवता येत असल्यामूळे त्यापासून फटकून राहात आपल्याच विश्वात गुरफटून आत्ममग्न होत आहेत. त्यामुळे शारीरिक सुदृढता, मानसिक संगोपन, सामाजिक बंधन, राष्ट्रीय प्रेम, निष्ठा, चारित्र्य, कर्तव्य याचा अभाव होऊन गरुड व्हायच्या ऐवजी गरुडाचे पंख विकत घेऊन, लावून उडणारे स्वार्थी कावळेच होत आहेत. जे गेलं ते गेलं, त्याचा विचार न करता नव्याने झेप घ्या उंच उंच. अधिकाधिक उंचीवरून जग पहा आणि विशाल दृष्टिकोनासह परत जमिनीवर येऊन रहा. कारण कौतुक करणारे ह्या जमिनीवरच आहेत. शुभेच्छा. झेप घे आकाशी गगनाचे वेध घे... घट्ट रोवून मातीत तू , उंच भरारी नभी घे...! नसे स्पर्धा तूस कोण तुज अडवितो तूच समर्थ , तूच कणखर स्वप्नास तू कवेत घे..! ध्यास तुला, आस तुला हेच तुला आशिष आहे घननीळ तो अथांग आहे तू मुक्त आवेग घे...! संदर्भ:- गुगल साभार