Login

आजची वटसावित्री

आधुनिक युगातील सावित्रीची गोष्ट!

"अगं सीमा तुझ्या सूनेची आज पहिलीच वटपौर्णिमा ना? मगं तिने उपवास नाही धरला का? नाही म्हणजे सकाळी रोजसारखीच तिला बॅग घेऊन सुटा बुटात जाताना पाहिले मी ऑफिसला म्हणून विचारले. हे बघं आपण शेजारी असलो तरीही इतके वर्षांपासून आपली मैत्री आहे छान म्हणून विचारले मी बाकी काही नाही. "

" हो गं चित्रा मला काही गैर वाटलं नाही त्यात. आता या आजकालच्या मुली यांना कायं बोलायचं तूच सांग जरा. आपण काही नोकरी वगैरे केली नाही का? मी देखील शिक्षिका होते पण म्हणून काही उपवास, पूजा करायचे चुकले नाही. तशी मी तिला शनिवारीच आठवण करून दिलेली या सगळ्याची तरीही आज उठून ऑफिसला गेली.

काल रात्री बोलायचे म्हटले तर अकरा वाजता आली ती फोनवर बोलतच. नेहमीप्रमाणे जेवणं केलं, गोळ्या घेतल्या का विचारले आणि रूममध्ये गेली. आमच्या मुलाला तर काही बोलायचा प्रश्नच येत नाही तो सध्या त्याच्या कामात इतका बिझी असतो की काही विचारू नको, कधीकधी जेवायला ही वेळ मिळत नाही.. दिवस म्हणू नको की रात्र त्याच आपलं काम सुरू असतं पण हिला कळायला नको का नवरा एवढा राबराब राबतोय त्याच्यासाठी किमान उपवास तरी धरायला हवा हिने नाही का?
आपण पूजा केल्याशिवाय काही घ्यायचो तरी का? या हल्ली च्या मुलींचा दिवस कॉफीशिवाय सुरू होत नाही बघं.

आजकाल मुलींना नोकरी करतोय म्हणजे वाटतं की त्या फार कर्तृत्वान आहेत शिवाय हे पूजा वगैरे याबाबतीत तर त्यांचे विचार ऐकायलाच नको वाटतात. जिथे कधीकधी गळ्यात घातलेल मंगळसूत्र फॅशन तर कधी एलर्जीच्या नावाखाली म्हणून उतरवलं जातं तिथे आपण कायं बोलायचं तूच सांग ना?" सीमाताई त्यांच्या नवीन सूने बद्दल आपल्या मैत्रिणी जवळ तक्रार करत होत्या आणि इतक्यात सीमाताई यांची सून प्रिया घरात आली. तिला असे अचानक दारात पाहून सीमाताई जरा गोंधळून गेल्या आणि त्यांची मैत्रीण देखील.

" सीमा मी येते गं पुन्हा " असे म्हणून त्यांच्या मैत्रीणीने तिथून काढता पाय घेतला आणि आता, 'एरवी रात्री आठनंतर घरी येणारी सून सायंकाळी अचानक घरी कशी कायं आली? तिने काही ऐकले असेल का?' या विचारांत सीमाताई गोंधळून गेल्या.

प्रिया काहीही न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली आणि तिने दार बंद करून घेतले.
'बहुतेक हिने ऐकले वाटतं सगळे आता कायं करायचे?' सीमाताई नाही म्हटले तरी थोडा विचार करू लागल्या. दहा - पंधरा मिनिटे झाली तरी त्यांची सून प्रिया बाहेर काही आली नाही यामुळे त्यांची चिंता अधिकच वाढली.

'सहसा ही अशी यावेळी घरी येत नाही आज अचानक घरी आली म्हणजे हिच्या ऑफिसमध्ये काही झाले असेल का? की अजून काही? तिची तब्येत बरी आहे ना? की या दोघांचे काही भांडण झाले असेल?' सीमा ताईंच्या डोक्यात विचारचक्र चालू होते. शेवटी पुढचे दहा मिनिटे वाट पाहूया नाहीतर आपण आवाज देऊया असा विचार करून सीमाताई सोफ्यावर बसल्या इतक्यात बेडरूमचे दार उघडण्याचा आवाज आला.

त्यांची सून प्रिया साडी नेसून छान तयार होऊन बाहेर आली आणि स्वयंपाकघरात गेली. देवासमोर उभे राहून तिने दिवा लावला, सीमाताई प्रिया कायं करतेय याकडे हळूच लक्ष देऊन डोकावत होत्या. प्रियाने प्रार्थना केली आणि हातात पेढ्यांची वाटी घेऊन ती सीमाताईंसमोर येऊन उभी राहिली. त्यांच्या हातावर पेढा ठेवून तिने नमस्कार केला पण सीमाताईंनी फक्त डोक्यावर हात ठेवला पण तिला काही बोलल्या नाहीत.

प्रिया तशीचं पुन्हा स्वयंपाकघरात गेली यावेळी मात्र येताना तिच्या हातात दोन कप होते.
"आई चहा घ्या.. आज मी सुद्धा चहा घेणार आहे" असे म्हणतं प्रिया त्यांच्यासमोर बसून राहिली.

"पेढा कशासाठी होता?" सीमाताईंनी विचारले तशी प्रिया हसली.

"आई आज वटपौर्णिमा आहे. काल रात्री यायला खूप उशीर झाला मला सकाळी देवाला दिवा लावला पण गोडं दाखवायला काही नव्हते म्हणून आत्ता घेऊन आले. "

" अच्छा वटपौर्णिमा लक्षात आहे पण उपवास धरायचा असतो, पूजा करायची असते हे ठाऊक नाही वाटतं? जाऊ दे तुम्ही आजकालच्या मॉडर्न मुली मी कायं बोलणार? " सीमाताईंनी चहाचा कप तोंडाला लावला.

" आई वटपौर्णिमा आहे हे ठाऊक आहेच पण या दिवसाचे महत्त्व ही ठाऊक आहे. लहानपणापासून आईने प्रत्येक सणाविषयी माहिती दिली आहे. आज पूजा करायची असते, बायकोने नवर्‍यासाठी उपवास धरायचा असतो, त्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची असते हे सगळे काही ठाऊक आहे मला.

हो तुम्ही आत्ता म्हणाले तसे आणि मगाशी मैत्रीणी जवळ सांगत होता ते ही ऐकले मी आई. आहे मी मॉडर्न. माझे विचार ही मॉडर्न आहेत पण याचा अर्थ मी माझ्या संस्कृतीला किंवा आईने दिलेल्या संस्काराला विसरली आहे असा अर्थ नाही होत मुळीच त्याचा.

अगदीच मान्य आहे आई की तुम्ही नोकरी करून हे सगळे केले ते आणि मला नितांत आदर आहे त्याबद्दल तुमचा आणि मला माझ्या आई बद्दल ही आदर वाटतो कायम की ती सगळे सण. उत्सव अगदी उत्साहाने साजरे करते.

नोकरी करते म्हणून मी कर्तृत्वान आहे असे मुळीच मला म्हणायचे नाही आहे पण ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलाची बाजू मैत्रीणी जवळ मांडायचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने कधी मला समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाही आई तुम्ही?

मी सुद्धा आज तुमच्या मुलाच्या बरोबरीने कमावते, किंबहुना त्यापेक्षा जास्त मगं मलाही कामाचा ताण असेलच ना. मान्य आहे आई आज लग्नानंतर पहिली वटपौर्णिमा आहे पण कुठलीही गोष्ट बळजबरीने होत नाही किंबहुना करू नये असे माझे मत आहे.

छे याचा अर्थ माझे तुमच्या मुलावर प्रेम नाही असा होत नाही. माझे माझ्या नवर्‍यावर खूप प्रेम आहे परंतु त्या वडाच्या झाडाला सात फेर्‍या मारून, उपवास करून त्याला दीर्घायुष्य लाभते हे मला पटतं नाही.

तुमचा मुलगा आणि मी दोघेही आयटी क्षेत्रात काम करतो. तिथे दिवसभर प्रचंड काम असते तणाव असतो या सगळ्या वातावरणात स्वतःला नोकरीत टिकवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. एक दिवस अशी पूजा केली म्हणजेच नवर्‍यावर प्रेम आहे हे सिद्ध होते का?

उपवास करणे ठीक आहे पण आम्ही जिथे काम करतो, तिथे जेवणाची अशी ठराविक वेळ नाही की झोपेची. सध्या महागाई किती आहे. स्वतःचे घर आहे आपले ते ठीक आहे आई पण पुढे जेव्हा कुटुंब वाढणार तेव्हा त्या गोष्टींसाठी किंवा भविष्यासाठी थोडी बचत हवी म्हणून आत्ता काम करतोय आम्ही दोघेही. एक दिवस अशी पुजा करून त्याला दीर्घायुष्य मिळेल असे मला वाटत नाही त्यापेक्षा मी रोज सकाळी उठून त्याच्या नाष्ट्यापासून ते रात्री येईपर्यंत जी जेवणाची काळजी घेते त्याने त्याचे दीर्घायुष्य वाढेल असे मला वाटते.

प्रश्न माझ्या उपवासाचा म्हणाल तर मी केलाही असता उपवास पण तुमची, घराची, ऑफिसची आणि नवर्‍याची काळजी घ्यायची म्हणजे मला अगोदर माझी काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे आई. एकतर अगोदर वेळेत जेवण नसतं त्यात ऑफिस मध्ये काम त्यामुळे उपवास करून आजारी पडण्यात, स्वतःची हेळसांड करून घेण्यात काय अर्थ आहे.

वडाची पूजा करण्यापेक्षा या रविवारी मी ट्री प्लांटेशन करणार आहे. माझा विचार तुम्हाला पटणार नाही ठाऊक आहे पण बळजबरीने तुम्हाला वाटते म्हणून पूजा करण्यात अर्थ नसतो.

आम्ही आजकालच्या मुली फॅशन म्हणून भलेही मंगळसूत्र घालत नसू काहीवेळा खरंय पण मनातून नवर्‍याचा आदर किंवा प्रेम त्यामुळे कमी होत नाही. नवर्‍याच्या बरोबरीने घर सांभाळतो आम्ही.

आता तुमची मगाशी आलेली मैत्रीण एरवी त्यांच्या स्वतःच्या नवर्‍या बद्दल किती तक्रारी चालू असतात, एरवी असे चारचौघांत नवर्‍या विषयी बोलायचे आणि एक दिवस गोडवे गायचे मला पटतं नाही आई.

आपल्या सोसायटीत स्वच्छता करते ती कमल, तिचा नवरा काहीही काम न करता तिच्या पैशावर जगतो आरामात मगं तिने अशा नवर्‍यासाठी उपवास करावा मला सांगा ना?

अशा नवर्‍याची सात जन्म मागणी केली तरी ती मनापासून नसेल मगं केवळ दिखावा म्हणून हे सगळे कायं कामाचे?

आई आजची सावित्री आहे मी, पूजा करण्यापेक्षा नवर्‍याची काळजी घेणं, त्याला जपणं मला महत्त्वाचं वाटतं जास्त.

एरवी तुमचा मुलगा येईपर्यंत मला जेवायला थांबणे होत नाही किंवा गरम स्वयंपाक करून देणे पण आज म्हणूनच मी लवकर घरी आली आहे. तो आला की त्याच्या आवडीचे त्याला गरम करून देणार. आई वटपौर्णिमा अशीही साजरी होऊ शकते ना? " प्रिया च्या बोलण्यावर सीमाताईंनी होकार दर्शवला

आजची वटसावित्री फक्त कर्तृत्वान नाही तर खूप विचारी आणि समंजस आहे तिला संस्कृती कळते, सण माहीत आहेत फक्त ते साजरे करायची तिची पद्धत थोडी वेगळी आहे आणि काळानुसार विचार केला तर योग्य आहे

खरंच आजची वटसावित्री प्रिया सारखी आहे फक्त ते समजून घेणारे सीमा ताईंसारखे लोक या जगात कमी आहेत.