आता त्या तिघी एकत्र त्या चाळीच्या दोन खोल्यांमध्ये राहत होत्या. आजूबाजूला थोडी ओळखी झाली. लक्ष्मी सुद्धा तिथे लहान मुलांमध्ये रमायला लागली होती.सावित्रीबाईंनी काही घरी स्वयंपाकाचे काम सुरू केले. तेवढाच त्यांना आधार वाटत होता. लक्ष्मीने सुद्धा आईची हिम्मत बघून नव्याने सुरुवात करायचे ठरवले होते. तिने सुद्धा सकाळी तीन चार घरचे स्वयंपाकाचे काम सुरू केले होते. संध्याकाळी मुलांची शिकवणी घेत होती. सहा महिन्यात दोघींचा चांगला जम बसला. नलुआजीची सुद्धा खूप मदत होत होती. तिघीही एकमेकींची काळजी घेत राहत होत्या. बाकी घरून तसा काही सपोर्ट नव्हताच. ललित काय तो कधीतरी फोन करायचा. लक्ष्मीच्या नवऱ्याने एकदाही फोन केला नव्हता, की साधीशी विचारपूस केली नव्हती. ललितच्या एकदा बोलण्यावरून समजले होते की, लक्ष्मी आणि लक्ष्मीची आई जर त्यांची सगळ्यांची माफी मागेल तर ते लक्ष्मीला घरात घ्यायला तयार आहेत. पण त्यासाठी लक्ष्मी आणि सावित्रीबाईंनी स्पष्ट नकार दिला होता.
राहण्या खाण्यापिण्याची तर सोय झाली होती. पण आजूबाजूची लोकं मात्र काही काही बोलून मायलेकिंचे जगणे कठीण करत होते. लक्ष्मी तर तरुण, दिसायला सुंदर, वरून नवऱ्याने सोडलेली अशीच अफवा सगळीकडे पसरली होती, त्यात बरेच वासानाधिन पुरुष ( यांना पुरुष म्हणायचे काय , हा मोठा प्रश्न ?) तिला रस्त्याने , बाहेर नको तसे स्पर्श करत, नको तसे कॉमेंट पास करत त्रास देत होते. त्यातूनही मायलेकिंने स्वतःला खंबीर बनवत, निडरपणे त्यांचा सामना करत होत्या.
*****
" लक्ष्मी, आता आपले सगळे व्यवस्थित सुरू आहे. तर मला वाटते आता तू तुझं स्वप्न पूर्ण करावे. " ....सावित्रीबाई
" कोणते स्वप्न ग ?? " ....लक्ष्मी
दुसऱ्यांसाठी जगता जगता लक्ष्मी स्वतःचे स्वप्न सुद्धा विसरली होती.
" तुला IAS ची परीक्षा द्यायची होती ना??? लग्नाआधी कितीतरी वेळा मला म्हणाली होती, तुझ्या मैत्रिणीचा भाऊ तयारी करत होता, तेव्हापासून . विसली काय बाळा?" ... सावित्रीबाई
" अच्छा ते होय.. आई कुठे ग आता ?? किती दिवस झाले हातात एखादं पुस्तक सुद्धा नाही घेतले. खूप गॅप गेली ग, ते किती कठीण आहे, आता कसे शक्य आहे ग ?" ....लक्ष्मी
" अभ्यास, आणि तुला कठीण वाटतो??? तू तर नेहमीच तयार असायची, कितीही पुस्तकं द्या, वाचून काढायची. रात्र रात्र जागून वाचायची. किती हाऊस होती तुला. असे एकदम नकार नको देऊ. तुझी ती मैत्रीण इथेच राहते ना?? बघ बोलून?? त्याचे काही नोट्स असतील तर वाचून, अभ्यास करून बघ . ते ऑनलाईन मॉडेल पेपर असतील ते वाचून बघ. तसेही आता फॉर्म भरायचा म्हणजे अजून चार पाच महिने आहेच. तोपर्यंत तुला एक अंदाज येईल तू करू शकते काय ते?? आणि हवे तर क्लासेस लावू . पण अशी एकदम हिम्मत नको हारू. " ....सावित्रीबाई
" अगं पण आई, त्याचे क्लासेस किती महाग आहेत. आपल्याला नाही झेपणार ग ते? तरीपण तू म्हणतेय तर घरीच अभ्यास करून बघते. मग बघुया ." ....लक्ष्मी
." ठीक आहे , सुरुवात तर करू . सुरुवात करायच्या आधीच काय हार मानावी. " ...सावित्रीबाई
लक्ष्मीने तिच्या मैत्रिणीकडून तिचा भावाचे नोट्स आणले. आता दिवसभर ती अभ्यास करू लागली. सावित्रीबाईंनी तिला सकाळची स्वयंपाकाची काम बंद करायला सांगितली, पण आईवर जास्ती भर नको म्हणून ति फक्त दोन घरचा स्वयंपाक करत होती . IAS , UPSC ची तयारी करायची म्हणजे यासाठी फिजिकली फिट असणे पण तेवढेच गरजेचे होते. तिने आता रोज सकाळी बाजूच्या मैदानावर धावायला सुरुवात केली. आणि घरीच योगा करणे सुरू केले. यामुळे आता तिचा आत्मविश्वास बराच वाढला होता. मन प्रसन्न राहायला लागले होते. तिच्यामध्ये तिची आधीची चुणूक परत यायला लागली होती.
****
" काय मायलेकी आहेत, आपला चांगला संसार सोडून इथे येऊन बसल्या." ... एक बाई
" हो ना, पोरीला तर कळत नाही, पण माय?? तिला तर कळायला पाहिजे ना. तिनेच फुस लावली असणार. तसेही मुलीच्या आईचा मुलीच्या संसारात जास्ती हस्तक्षेप झाला की असेच होणार. " .....दुसरी बाई
" हो ना , या अश्या बायकाच मुलींचा संसार मोडण्यासाठी कारणीभुत असतात. काय नाही, काही लफड वैगरे असेल बाहेर, नवऱ्याने हाकलले असणार घरातून . बघितले नाही सकाळी कशी मुलांसारखे कपडे घालून मैदानावर पळत असते. " ...पहिली बाई
दोन बायका सावित्रीबाई आणि लक्ष्मीला येताना बघून त्यांना ऐकू जाईल येवढ्या आवाजात बोलत होत्या.
" यांची अशी कशी बोलायची हिम्मत ? , थांब सांगतेच त्यांना ".... लक्ष्मीला त्या बायकांच्या बोलण्याचा राग आला होता. तिला म्हटले तर तिला काही नव्हते वाटले, पण आई ला म्हटलेले तिला सहन नव्हते झाले. आणि म्हणूनच ती त्यांना बोलायला जात होती. तेवढयात सावित्रीबाईंनी तिचा हात पकडत मानेनेच नाही म्हणून इशारा केला आणि तिला घरात घेऊन गेल्या.
" आई, तू मला का अडवले??? त्यांना चांगला जाब दिला असता " ...लक्ष्मी
" आज दोघी बोलल्या, उद्या चार बोलतील. लोकांचे कामच असते बोलायचे, खास करून बाया मुली अशा एकट्या दिसल्या की . लक्ष नसते द्यायचे त्यांच्या बोलण्याकडे. आणि कोणाचे बोलणे मनाला लाऊन सुद्धा घ्यायचे नाही. ज्या बायका मुली स्वतःच्या पायावर काही करून दाखवायला उभ्या राहण्याचा प्रयत्न करतात, ही लोकं त्यांचं खच्चीकरण करण्यात हुशार असतात. खासकरून बायकाच बायकांना सपोर्ट नाही करत, आणि याचाच मग माणसं फायदा उचलतात. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. ती कधीच बदलणार नाही. उत्तर द्यायचेच आहे ना, आपल्या कतृत्वाने ध्य्याचे, काहीतरी बनून मग बोलायचे. तेव्हा तर बोलायचं पण काम पडत नाही, आपले कर्तृत्व सगळे बोलून जाते. त्यामुळे ती अजिबात अश्या लोकांच्या बोलण्याने खच्ची नको होऊ. एक एक शब्दांचा हिशेब देऊ, आता फक्त आपल्या ' लक्ष ' वर लक्ष केंद्रित कर. "....सावित्रीबाई
" लक्ष्मी, तुझी आई बरोबर बोलत आहे. नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. ही लोकं आपल्या डोक्याने कुठे वागतात. जसे आतापर्यंत पिढ्यानपिढ्या वागत आले आहेत, तसेच हे वागतात. त्यांना स्वतःचे डोकच नाही वापरायचे. त्यांचे अजूनही तेच बुरसटलेले विचार आहेत. नुसतेच मॉडर्न झाल्याचा आव आणतात. पण त्यांना कोण सांगेल कपड्यांची फॅशन केली, आणि दोन इंग्रजी मधले शब्द बोलले तर मॉडर्न होत नाही. आपला समाजच तसा आहे पोरी, नवरा बायको मध्ये काही झाले, संसार मोडला की लोकं बाई ला च दोष देणार, ते नाही सुधारणार कधी. यांना चूप करायचे असेल तर तुझी आई ते काय म्हणते ना, कोणती ती परीक्षा , ती तू पास करून दाखव. मी तुझ्या पाठीशी आहे. " .... नलूआजी
" आजी.... " ...म्हणत लक्ष्मी आजीच्या गळ्यात जाऊन पडली.
" आजी तू पण तर जुन्या काळातली आहे, तरी तुझे विचार आजच्या पिढीला मागे पडतात बघ. तुझ्यासारखी बाई प्रत्येक घरात असती ना , तर आज आपला समाज कुठल्या कुठे असता बघ. " .....लक्ष्मी
" हो ना बाई, तुझं बरोबर आहे, पण देवाने माझे घरच नाही फुलू दिले बघ. पण आता तूच माझं स्वप्न बघ. कोणता क्लास लावायचा लाव, माझ्याजवळ थोडे दागिने आहे, एखादा मोडला की येईल बघ पैसे. पण तू आता मागे हटू नको. " .... नलूआजी
" आत्या, असे कसे तुझे दागिने घेणार ??" ....सावित्रीबाई
" माझी सख्खी पोरगी असती तर घेतले असते ना?? पाहिजे तर कर्ज समज, नोकरी लागली की परत दे. तसेही आता कुठे घालून जायचे मला दागिने?? पोरीच्या आयुष्याचे सोने होणार असेल तर त्या सोन्याचा खरा उपयोग झाला बघ. लक्ष्मी जा आता, पाहिजे तो क्लास लावून घे. माझा आणि तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे पोरी. " ....नलूआजी
*****
तीन वर्ष नंतर......
सावित्रीबाई आणि नलुआजी चाळीच्या मेन गेट जवळ येऊन उभ्या होत्या. सोबतीला चाळीतली काही बायका मुले त्यांच्या बाजूने उभे होते.एक अशी मोठीच गर्दी गेट जवळ जमली होती. सावित्रीबाई हातात आरतीचे ताट घेऊ उभ्या होत्या. सगळ्यांची नजर रस्त्यावर खिळून होती. आणि शेवटी तो वाट बघण्याचा क्षण संपला .
एक पांढऱ्या रंगाची मोठी चारचाकी सावित्रीबाईंच्या पुढे येऊन थांबली . मागून अजून एक गाडी येत थांबली. त्यातून दोन गार्ड बाहेर येऊन उभे झाले. एकाने मोठ्या गाडीचा दरवाजा उघडला. त्यातून एक २६ -२७ वर्षाची मुलगी खाली उतरली. गोल चेहरा, रंग गव्हाळ, बोलके काळेभोर डोळे , छोटेसे पण सरळ नाक , ओठांवर सकारात्मकतेचे गोड हास्य, कानात छोटासा मोती, केस खांद्यापर्यंत कापलेले त्याची पोनी बांधलेली ,फिक्कट गुलाबी रंगाची कॉटनची साडी, त्याला डार्क हिरव्या रंगाची बारीक बॉर्डर. कॉलर बंद गळ्याचे मॅचींग ब्लाऊज , हातात एक काळया पट्टयाचे छोटेसे घड्याळ. चेहरा आणि देहबोलीतून पुरेपूर आत्मविश्र्वास झळकत होता, पण तेवढीच नम्रता वागण्यात. हो ही आपलीच लक्ष्मी, IAS officer लक्ष्मी होती.
ती गाडी मधून खाली उतरत सरळ सावित्रीबाईंजवळ गेली . खाली वाकून त्यांना आणि नलुआजी ला नमस्कार केला.
तिला त्या वेषात बघून सावित्रीबाईंचे डोळे आनंदाने पाणावले. त्यांनी मायेनी तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला. आज लक्ष्मीने स्वतःचे , क्रमाने सावित्रीबाई आणि नलुआजीचे स्वप्न पूर्ण केले होते. तिने एक कणखर स्त्री बनून दाखवले होते. या पौरुशी विचारांच्या समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते, कुठल्याही पुरुषाचे पाठबळ न वापरता. आज सगळ्या लोकांची तोंड आपोआप बोलायची बंद झाली होती. सगळ्यांच्या डोळ्यात फक्त तिच्यासाठी सन्मान, अभिमान दिसत होता.
सावित्रीबाईंनी तिच्या कपाळी कुंकू लावून, तिची आरती करत तिचे औक्षवाण केले. ज्यांनी खरोखर चाळीमध्ये सावित्रीबाई आणि नलुआजिला मदत केली , लक्ष्मीने जाऊन त्यांनाही नमस्कार केला.
" अग पोरी, राहू दे. तू खूप मोठी झाली बघ, आमच्या चाळीचे नाव रोशन केले. इथल्या पोरांसाठी नवीन आदर्श घालून दिला. तू नको पाय पडू. " ..... सविता मावशी
" मावशी , तुमच्या सगळ्यांच्या पाठबळ मुळे हे सगळं करू शकली. तुम्ही आई आजीकडे लक्ष दिले, तिकडे ट्रेनिंग मध्ये मी निश्चिंत होती. रक्ताची जरी नसलात तरी मायेची माणसं आहात तुम्ही. रक्ताच्या माणसांनी तर कधीच पाठ फिरवली. तुम्ही प्रेमाच्या माणसांनी बघा जवळ केले. तुमचा आशीर्वाद घ्यायला नको ?" ....लक्ष्मी
" हो ग बाय, मोठी झाली तरी आपले संस्कार नाही विसरली पोरी. देव सगळ्यांना तुझ्यासारखी लेक देऊ दे . खूप मोठी हो, पाहिजे ते सगळं मिळू दे " ....सविता मावशीने लक्ष्मीच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला. सविता मावशीचे डोळे सुद्धा आनंदाने पाणावले होते.
"तुझ्यासारखी मुलगी सर्वांना मिळू दे" ..ऐकून सावित्रीबाईंना त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आणि त्यांनी घेतलेला निर्णय ethwà
*****
लक्ष्मी IAS officer झाल्याची बातमी हवेसारखी लक्ष्मीच्या वडिलांच्या घरी आणि सासरी पसरली होती . दोन्ही परिवार तिच्यावर आपला हक्क दाखवत तिला घरी न्यायला आले होते.
******
बघुया लक्ष्मी आणि सावित्रीबाई काय निर्णय घेतात पुढल्या भागात.
Thank you , Happy New year
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा