गीतांजली' बंगल्यात सकाळचे आठ वाजले होते. अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होता. नुकतीच गीताताईंची पूजा आटोपली. अंगणातील तुळसही हिरवीगार टवटवीत दिसत होती. देव्हाऱ्यात तेजस्वी ज्योत जळत होती. आज रविवार असल्याने बाकी मंडळींना जरा निवांत होता. सुधाकरराव सोफ्यावर बसून पेपर वाचत " नवराई माझी लाडाची गो " गाणं गुणगुणत गीताताईंच्या हातच्या चहाची वाटं पहात होते. गीताताईंनी चहाचा ट्रे समोर केला, एक हल्की स्माईल देऊन मुलींच्या रूमकडे निघून गेल्या. गीता...." चैत्रा, गौरी उठल्या का गं " हं ...आवरत आहेत रुममध्ये. अगं...आपल्या चैत्राच्या लग्नाला महिना उरला आहे. तुला सांगून ठेवतो गीता , अजिबात आॅनलाइन शॉपिंग करायची नाही. फालतू असतं ते... मनसोक्त दुकनांमध्ये जाऊन खरेद्या करा. गीता .... तुझ्यासाठी गुलाबी आणि जांभळ्या काठाची महागडी पैठणी घे, शोभतो तो रंग तुझ्यावर.... गीताताई काहीच बोलत नाहीत. काय गं हे.... इतकी गप्प गप्प का... कसला विचार करतेस ?गीताताई आपल्या विचारात मग्न होत्या. सुधाकररावांनी
हात धरून सोफ्यावर बसण्यास आग्रह केला.... गीता नाराज दिसतेस काय झालं.... काही नाही हो!!! दोन महिन्यांपूर्वी चैत्राचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. बोलताना गीताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. पडद्याआडून चैत्रा, गौरी हे ऐकत होत्या. चैत्रा बाहेर येत म्हणाली मम्मा !!! don't worry now i am perfectly alright. सुधाकररावांनी गीताताईंचा हात हातात घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. पण गीताताईंच्या विचारात तोच प्रसंग घुमत होता. (तो प्रसंग)
चैत्रा आर्कीटेक्ट असते. क्लाइंट सोबत मिटिंग असल्याने आॅफीसला जाण्याची घाई होती. " गौरी माझी पिंक लिपस्टिक कुठे आहे, माझ्या लाइनरची पण पार वाटं लावलीस. मला या पिंक कुरतीवर ती लिपस्टिक लावायची होती... शीट्ट ...तू माझा mood off केलास. चैत्रा चिडून गौरीला वेडंवाकडं बोलते. तसेही दोघी बहिणींमध्ये अधूनमधून वल्ड वॉर , शीत युद्ध चालायचं. चैत्रा समजदार ,पण का कुणास ठाऊक कामाच्या टेन्शनने रागाच्या भरात दोघींमध्ये शाब्दिक भांडणं सुरू असते. सुधाकररावही घरी नव्हते. कामानिमित्त्याने दिल्लीला गेले होते. गीताताई संतापाने किचनमधून बाहेर येत चैत्रा, गौरीवर भडकल्या.... " देवाने एकतरं मला तरी उचलले पाहिजे नाहीतरं दोघींमधून एखादीचं बरेवाईट झाले की मगं खुशाल रहा एकमेकींशिवाय "....आईचे रागाने बोलने ऐकून दोघी शांत होतात. चैत्रा रागानेच आई मी येते... म्हणत आॅफीससाठी निघते. गाडी सावकाश चालवं गं... गीताताईंनी बजावले.संध्याकाळ झाली अजून चैत्रा आली नव्हती. गीताताई फोनसुद्धा लावत होत्या. सुधाकररावही सोबत नाहीत. इतक्यात गीताताईंचा फोन वाजतो चैत्राचा फोन असेल कदाचित.... हॅलो देशपांडेकडून बोलता का ? हो..मी मिसेस देशपांडे बोलते...आपण ...हॅलो मी समीर. चैत्रा आणि मी एकाच आॅफिसमध्ये काम करतो, एकदोनदा तुमच्याकडे आलो होतो.... हांहां आलं लक्षात बोला... मॅम चैत्राचा अॅक्सिडेंट झाला.... तिला डोक्याला जास्त मार लागला, ' यशोदा ' हॉस्पिटलला अॅडमिट आहे ती.... तुम्ही घाबरू नका, मी येतो तुम्हाला घ्यायला. समीर गीताताईंना लक्षात होता कारण चैत्राकडून त्याचे गोडवे ऐकले होते. गीताताई स्वतःला अपराधी मानत होत्या. सकाळचा प्रसंग डोक्यातून जाता जाईना.सुधाकररावही बातमी मिळताच दुसऱ्या दिवशी परतले. हळूहळू आठ दहा दिवसांनी चैत्रा ठीकं होऊन घरी येते. समीरने या काळात सुधाकरराव, गीताताईंना खूप धीर दिला. याच कालावधीमध्ये चैत्रा, समीरमध्ये जवळीक निर्माण होते आणि दोघेही प्रेमात पडतात. काही दिवसात दोघांचे लग्न असते.(आता पुढे)
दारावरची बेल वाजते. गौरी दार उघडते.सुधाताई ,श्रीधरराव.....(सुधाकररावांचे बहिण-जावई) कायं मगं झाली का लग्नाची तयारी ? असं बोलत घरात प्रवेश करतात. सुधाकरराव स्वतःला सावरत सुरू आहे असे म्हणाले. सुधा... तू आठ दिवस अगोदर ये, तुझ्या वहिनीच्या मदतीला.... सुधाने गीताताईंकडे पाहिले, त्यांनी डोळे पुसत हलकेच स्मितहास्य केले. का रे दादा....वहिनी का रडते? आता तुम्हीच दोघांनी गीताला समजवा.... सारखी चैत्राच्या अॅक्सिडेंटबाबतीत स्वतःला दोष देते... इतका पश्चाताप बरा नाही. लग्नाच्या धामधूमीत तीच आजारी पडेल.वहिनी....तुझ्या मनात असलेली खदखद, सल दूर कर बरं. त्यादिवशी चैत्राच्या बाबतीत घडलं त्यात दोघींचीही चूक होती. तू आई आहेस... आईचे रागावणे मुलांसाठी शिव्याशाप नसतात .तू नाण्याच्या दोन्ही बाजू बघं....अॅक्सिडेंट पण दैवी संकेत म्हणावा. या दुर्घटनेमुळे आपल्याला समीर आणि त्याच्या कुटुंबासारखे माणसांची भेट झाली. समीर देखणा, कर्तबगार मुलगा आहे ,तो चैत्रावर खूप प्रेम करतो. वहिनी ...हे नसलेच विचार सोडं बरं... सावर स्वतःला....माझी रीमा लागू गं ती.... गजरा माळलेल्या रीमा लागू सारखी स्माईल करून "लेकीची विदाई" करं.आता कुठे गीताताईंना जरा हिम्मत आली ,धीर मिळाला. एक छानशी स्माईल करून गौरीला म्हणाल्या.... आत्यासाठी कांदेपोहे,चहा करं. श्रीधरराव आणि सुधाकरराव जोराने हसत म्हणाले ' ये हुई ना बात'.
सुधा,चैत्रा आणि गीताताई देणंघेणं, साड्या, लग्नाचे विधीसोहळे यांविषयी बोलू लागल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. अर्थातच कुठल्याही वरवरच्या बोलण्याचा, वागण्याचा संबध आपल्या जीवनातील घटनेशी निगडीत नसतो..... आपण मात्र आयुष्यभर त्याच पश्चातापात कुढ़त बसतो.
गौरी जोरात गाणं वाजवते
नवराई माझी लाडाची, लाडाची गो
आवड़ हिला चंद्राची, चंद्राची गो....
धन्यवाद
©® Sujata Tambade